• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

देश सुरक्षित हातांमध्ये आहे का?

- अ‍ॅड. नोएल डाबरे (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 5, 2025
in भाष्य
0

प्रत्येक भारतीयाने चिंता करावी असा हा काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचे पितळ उघडे पडले आहे. त्यांच्या हाती देश सुरक्षित नाही. त्यांच्या आततायीपणाची भयंकर किंमत सध्या देश भोगतोय. पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निरपराध पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशात जनक्षोभ उसळला. जिथे मुंगीही आत शिरु शकणार नाही असे वाटत होते, तिथे दहशतवादी आरामात आले आणि नृशंस हत्याकांड घडवून निघून गेले. हे भारतीय मनाला पचण्यासारखे नव्हते. या दहशतवाद्यांचा ताबडतोब पाठलाग करुन त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. तसे काही झालेच नाही. उलट १२ दिवस असेच गेले. सगळ्या वार्‍यावरच्या बाता झाल्या.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या आणि पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याच्या बाता झाल्या. पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या गोष्टी बाजूलाच राहिल्या, उलट पाकिस्तानसारख्या कमजोर राष्ट्राबरोबर आपल्याला शस्त्रविराम करावा लागला. तेही डोनाल्ड ट्रम्पनी सज्जड दम भरल्यामुळे. शस्त्रसंधी करा नाही तर व्यापार थांबवितो या ट्रम्पच्या एका धमकीमुळे मोदी गलितगात्र झाले. यावरुन आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची कल्पना यावी. ज्याला याची कल्पना येणार नाही तो ‘शतरंज के खिलाडी’मधल्या वाजिद अली शहासारखा मूर्ख समजावा. ट्रेडवॉरमध्ये चीनने ट्रम्पना गुडघ्यावर आणून सोडले. त्या पार्श्वभूमीवर ही नामुष्की जीवघेणीच समजावी. प्रत्येक सजग भारतीयांची झोप उडवणारीच ही गोष्ट आहे. आता आपण सावध झालो नाही तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. ज्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून आपला देश स्वतंत्र केला त्यांचा तो घोर अपमान ठरेल. बिकाऊ मीडियाच्या आहारी जाऊन बेगडी देशप्रेमाने वाहून गेलेल्या लोकांनी वेळीच जागृत झालेले बरे. अन्यथा पराभवाच्या मालिका सुरू होतील हे निश्चित!
युद्ध चालू होण्याच्या काही तास अगोदर एका मित्राशी चर्चा चालू होत्या.त्याचा एक नातेवाईक सैन्यामध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता. तो निवृत्त झाला आहे. मित्र नातेवाईकाचा हवाला देऊन म्हणाला, युद्ध भारताला परवडण्यासारखे नाही. भारत कर्जाने जर्जर झालेला आहे. भारतीय सैन्याकडे आवश्यक सामुग्री, शोध आणि संरक्षण यंत्रणा नाही. राज्यकर्त्यांचे नाकर्तेपण देशाला भोगावे लागेल. नेमके तेच झाले. पाकिस्तानच्या मिसाईल्सनी भारताची विमाने अचूक वेध घेऊन पाडली अशी विदेशी वृत्ते आहेत. किमान एकतरी राफेल विमान पाकिस्तानने पाडले अशी वदंता आहे. ती खोटी आहे असे भारतीय सैन्यही स्पष्टपणे बोलत नाही. या बातमीमुळे राफेल बनविणार्‍या प्रâेंच कंपनीचे शेअर्स गडगडले हे सत्य आहे. ते उगाच गडगडले का? एका तज्ज्ञांचे स्पष्ट अनुमान आहे की तीन दिवसांच्या लढाईत भारताचे किमान एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. एका राफेल विमानाची किंमत पंधराशे कोटी रुपये आहे. ते बघता एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले ही काही अतिशयोक्ती ठरणार नाही. शस्रसंधी करण्यामागे या अपरिमित हानीचेही कारण असावे. ट्रम्प मध्यस्थी करतात ही जणू काही चालून आलेली सुवर्णसंधीच असल्याचे मोदींना वाटले असेल, हाही मुद्दा तपासून पाहावा लागेल.
इतक्या हतबल अवस्थेत आपण का पोहचलो बरे! कारणे तपासावीच लागतील. प्रमुख कारण भारतीय जनतेची सातत्याने चालू असलेली दिशाभूल हेच आहे. चाळीस वर्षांत देशात सरसकट सगळे मुसलमान हे देशद्रोही आहेत असे मानणारी बहुसंख्याकांची मानसिकता झाली आहे. मुसलमानांनी या देशाला दिलेले योगदान पद्धतशीरपणे नाकारले जात आहे. त्यांच्याविषयी घृणा निर्माण करण्यात आलेली आहे. अतिरंजित चित्रपटांतून हा विखार पसरवला जात आहे. तो बहुसंख्यांच्या मनात इतका बिंबलेला आहे की हे थिल्लर, बाजारु, अर्थहीन सिनेमे पाहण्यासाठी बहुसंख्याकांची अलोट गर्दी लोटते. द्वेषाच्या या वणव्यात भारतीय जनता दुभंगली आहे. देश अस्वस्थ होण्यासाठी यापेक्षा अधिक कोणत्याही विषाची गरज नाही. आपण त्यातले नाही हे दाखवण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी यांना समालोचक म्हणून पुढे आणण्याची गरज का भासावी?
प्रत्यक्षात देशद्रोही कोण? जे राजकारणी, सरकारी अधिकारी, न्यायाधीश (?) भ्रष्टाचारी आहेत तेच खरे देशाचे शत्रू आहेत. फार काळ गेला नाही. अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशा भ्रष्ट माणसांचा भारतीय जनतेला प्रचंड तिटकारा वाटत असे. स्वामी अग्निवेश, प्रशांत भूषण, अरुंधती रॉय, हरीदेव शौरी, विनायक सेन, अरविंद केजरीवालसारख्या लोकांनी या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध चालविलेल्या आंदोलनाला जनतेचा भरभरून पाठिंबा असे. अशा भ्रष्टाचारी लोकांना जिणे मुश्किल होऊन जाई. निवडणुकीत मोठ्या पराभवांना त्यांना सामोरे जावे लागे. आज काय परिस्थिती आहे? कालचे सगळे भ्रष्टाचारी आज एका झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत. हा झेंडा कुणाचा हे सांगायला नको. भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधातील आवाज इतिहासजमा झालेला आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून ते मिरवत आहेत. केवळ मुस्लीमद्वेषाच्या आहारी गेल्यामुळे जनतेला भ्रष्टाचाराशी काही देणेघेणे राहिलेले नाही. देश अधोगतीला पोहोचल्याचे हे लक्षण आहे.
आश्चर्य याचे आहे की देशाच्या सैन्याच्या कारभाराबाबत प्रश्न विचारणे धोक्याचे ठरते आहे. एखादा राजव्ाâीय नेता तसे काही बोलला तर त्याची कारकीर्द धोक्यात आली म्हणून समजावे. अगदी विन्स्टन चर्चिल यांनादेखील सैन्याच्या नाकर्तेपणाबद्धल ब्रिटिश संसदेत धारेवर धरण्यात येत असे. त्यासाठी स्पेशल सेशन्स भरवली जात. भारतात काय परिस्थिती आहे? मोदी खास संसदीय सत्र भरवण्यास टाळाटाळ करीत आहेत. भारतीय सैन्याला का प्रश्न विचारु नयेत? का त्यांच्याकडून पुरावे मागू नयेत? पहेलगाममधील हत्याकांड हे सैन्याचे अपयश मानले पाहिजे. भारतातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था काश्मीरमध्ये आहे. त्यासाठी देशाचे अब्जावधी रुपये खर्च होतात. तिथे भारतीय नागरिक सुरक्षीत नसतील तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरावे? त्याबाबत लष्कराला प्रश्न विचारणे गुन्हा मानला जात असेल तर या देशाला कुणीही वाचवू शकणार नाही. देश कधी पोखरला जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. लडाखमध्ये चीन येऊन ठेपल्याचे वृत्त आश्चर्याचे वाटू नये. २०१९मधील बालाकोट हल्ल्याबाबत माहिती विचारणे गुन्हा आहे का? आपले विमान पाडले गेले. आपला वैमानिक पकडला गेला. आपल्या वैमानिकाला सोडण्यात आले. ही अपमानास्पद बाब नाही असे कसे म्हणता येईल? मात्र इथे पराभवाचा विजयोत्सव साजरा केला गेला. सोडलेल्या वैमानिकाचे, त्याने भीमपराक्रम केल्यासारखे स्वागत करण्यात आले. ही भारतीय जनतेची शुद्ध फसवणूक होती. जनता त्याला बळी पडली. म्हणून आता इतक्या मोठ्या अपमानाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आता तर शरणागतीचा उत्सव चालू झालेला आहे.
हा काळ आत्मचिंतनाचा आहे. तसाच तो नव्या आशेचाही आहे. काश्मीरच्या मुस्लीम जनतेने घाबरलेल्या पर्यटकांना धीर देत असीम मानवतेचे दर्शन घडविले. हिंदू, मुस्लीम ऐक्याचा त्यांनी जणू नारा दिला आहे. त्याला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. धर्मवेड बाजूला ठेवून एकत्र येण्याचा हा काळ आहे. देशाचे नेतृत्त्व सुरक्षित हातात नाही हे समजण्याचा हा काळ आहे. देशाची सूत्रे आता जनतेने हातात घेण्याची गरज आहे. कुणाच्याही समोर न झुकणारे, सार्‍यांना एकत्र घेऊन जाणारे, भ्रष्टाचार्‍यांना संपवणारे नेतृत्व आता जनतेने शोधून पुढे आणले पाहिजे.

– अ‍ॅड. नोएल डाबरे

Previous Post

‘त्या’ तीन हजार कोटींचे लाभार्थी कोण होते?

Next Post

न सुटणारे ‘जातग्रहण’!

Next Post

न सुटणारे ‘जातग्रहण’!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.