– किरण माने
भांबनाथाच्या डोंगरावर त्या सात दिवसांत तुकोबारायांना नक्की कुठला साक्षात्कार झाला असेल??
‘तो साक्षात्कार गूढ, अध्यात्मिक, पारलौकिक होता,’ असं खूपजणांनी सांगून ठेवलंय. आपली खरी भरकट अशा दंतकथांपासून होते! ‘गूढ-अलौकिक’ असे शब्द आले की बुद्धी बंद. जास्त काही नाही हो, थोडं डोकं चालवलं की गुंता सुटतो.
एक दोन नाही तर तब्बल सात दिवस भांबनाथाच्या डोंगरावर चिंतन करून आल्या आल्या सावकारपुत्र तुकोबांनी पहिली कृती कुठली केली, तर दुष्काळामुळे अन्नान्न करून जीव सोडणार्या दीनदुबळ्या जनतेवर असलेली सगळी कर्जं माफ करून, त्यांची आपल्या वाट्याची गहाणखतं इंद्रायणी नदीत बुडवली! या कृतीचा कार्यकारण संबंध शोधला तर खूप मोलाचं काही गवसतं.
असं म्हणतात की, ‘त्या सात दिवसांत तुकोबांना विठ्ठल दिसला आणि माझी भक्ती कर’ असं म्हणाला. हे खरं असतं तर त्यांनी आल्याआल्या टाळ घेऊन भजनाला सुरुवात केली असती. ते न करता त्यांनी आपल्या सावकारीचं विसर्जन केलं. का? कारण भवतालचं अराजक पाहून ते व्यथित झाले होते. सात दिवस त्यावर मनन-चिंतन केलं होतं. त्यांना दिसलेला ‘विठ्ठल’ म्हणजे त्यांना गवसलेला ‘बुद्ध’ असावा, असं मला कायम वाटतं. तुकाराम महाराज देहूजवळच्या ज्या भंडारा आणि भांबनाथ या डोंगरांवर ध्यान करीत असत, त्या ठिकाणी बौद्ध लेणी आहेत. तुकोबाराया या लेण्यातच ध्यान करीत असत. म्हणूनच नंतरच्या काळात एका अभंगात विठ्ठलात बुद्धाला पाहतात. असो. हे नातं आपण नंतर विस्तारानं बघू.
त्या काळात तुकोबांच्या भवतालची जनता अडाणी, गरीब, त्यात ‘शूद्र’ म्हणून गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेली होती. बहुजनांचं जगणं हराम झालं होतं. लोक त्रासले होते. दु:खी होते. परिस्थितीमुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्याचा फायदा घेऊन वर्णवर्चस्ववादी नराधम मढ्याच्या टाळूवरचंही लोणी खायला मागेपुढे बघत नव्हते. ‘हा देवाचा कोप आहे,’ असं सांगून बहुजनांना आणखी घाबरवून पूजा, शांती, व्रतवैकल्य, यज्ञयाग वगैरे कर्मकांड करायला भाग पाडत होते. गोरगरीबांचं शोषण करून स्वत:ची पोटं भरत होते. अशा रंजल्या-गांजलेल्यांकडून कर्जवसुली करणं म्हणजे गिधाड बनून प्रेताचेही लचके तोडणं, हे तुकोबारायांना जाणवलं होतं. त्यांना आता समाजात एक क्रांती घडवून आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करायचं होतं… कुठलाही स्वार्थ नव्हता, असला तर फक्त कळवळा होता! एका अभंगात ते म्हणतात,
उपकारासाटी बोलो हे उपाय ।
येणेविण काय आम्हा चाड ।।
बुडता हे जन न देखवे डोळां ।
येतो कळवळा म्हणउनि ।।
तुका म्हणे माझे देखतिल डोळे ।
भोग देते वेळे येईल कळो ।।
…आम्ही उपकार करण्याच्या इच्छेनं हे उपाय सांगत आहोत, नाहीतर याशिवाय आमचं काय अडलं आहे?
…लोक बुडत आहेत, त्यांच्या आयुष्याची धुळधाण होत आहे, ते मला डोळ्यांनी बघवत नाही, म्हणून माझ्या मनात कळवळा निर्माण होत आहे.
…माझ्या हेतूवर शंका घेणार्यांवर दु:ख भोगण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना हे कळेल. अर्थात त्यावेळीही माझे डोळे त्यांच्याकडे कळवळ्यानंच पाहतील.
काय पराकोटीची संवेदनशीलता आहे बघा! ही खरी पोटतिडीक… आपला तुकोबाराया फक्त कळवळ्यापोटी लोकांच्या हितासाठी झटला, त्यात त्याचा फायदा सोडाच, झालं तर नुकसानच होणार होतं. कारण समाजाला जागं करणार्या, शहाणं करणार्या, विवेकी बुद्धी देणार्या समाजसुधारकांना धमकावणं… त्यांच्या पोटापाण्याच्या कामावर गदा आणणं… त्यांच्या भजनात, व्याख्यानात, चळवळीत अडथळे आणणं… त्यातूनही समाजप्रबोधन थांबत नाही म्हटल्यावर हल्ले करणं… आणि अगदीच डोईजड झाले तर त्यांची हत्या करणं, हे आजच नाही, तर हजारो वर्ष घडत आलंय.
तुकोबारायांना याची जाणीव होती. आपण गुलामगिरीत पिचत पडलेल्या दीनदुबळ्या जनतेला दु:खातून बाहेर काढायला निघालो आहोत, पण याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुकोबांनी ओळखलं होतं. राजवैभव त्यागलेल्या बुद्धाची ‘करुणा’ तुकोबाच्या पोटी उत्पन्न झाली होती. ही गोष्ट अशी आहे की त्यापोटी माणूस शोषितांच्या भल्यासाठी जिवावर उदार व्हायला तयार होतो. बहुजनांची फरपट हातावर हात ठेवून बघत राहणं तुकोबांसारख्या संवेदनशील माणसाला असह्य झालं होतं. त्यांनी त्या काळात अजस्त्र, बलाढ्य आणि कर्मठ अशा धर्मसत्तेला आव्हान दिलं. तिने तुकोबारायांच्या भजनात अडथळे आणले. अनेक प्रकारे त्रास दिला. पण तुकोबाराया मागे हटले नाहीत. करून करून काय करतील? जीव घेतील? मग निडरपणे ‘आता मी माझ्या मरणालाही भित नाही’ अशी डरकाळीच फोडली आपल्या वाघानं!
भीत नाहीं आतां आपुल्या मी मरणा ।
दु:खी होतां जना न देखवे ।।
आमची तो जाती ऐसी परंपरा ।
कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ।।
भजनीं विक्षेप तें चि पैं मरण ।
न वजावा क्षण एक वांयां ।।
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा ।
ते स्थळीं दातारा ठाव मागें ।।
…आता मला माझ्या मरणाचीही भीती वाटत नाही, कारण मला हे लोक दु:खात असलेले पहावत नाही.
…आमची जात लढवय्यांची परंपरा दाखवणारी आहे, हे का तुला ठाऊक नाही देवा?
…पण हे लोक माझ्या भजनात व्यत्यय आणतात हे मला मरणप्राय यातना देतं. लोकजागृतीचा एक क्षणही वाया जाऊ नये असं मला वाटतं.
…शेवटी तुका म्हणे- त्यामुळे जिथे अशा जीवघेण्या आघातांचा वाराही स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी देवा मला ठाव दे.
बहुजनांच्या माणूसपणावर घाला घालणार्या हजारो वर्षांच्या अवाढव्य जुलमी व्यवस्थेची तुकोबांनी लक्तरं केली. मरणाचीही भीती बाळगली नाही. आपल्यासाठी भयाण त्रास सहन केला त्यांनी. अक्षरश: रक्ताचं पाणी केलं.. जिवाचं रान केलं… मारहाण सहन केली.. जळते निखारे झेलले.. बदनामीच्या प्रयत्नांना तोंड दिलं… पण मागं हटला नाही. लढत राहिला. ‘आमची जातच लढवय्याची आहे, आम्ही पळपुटे नाही,’ अशी गर्जना केली आपल्या ‘हिरो’नं!
तुकोबाराया जे बंड करत होते, विद्रोहाची आग ओकत होते, विषमता-शोषण याबद्दल अडाणी जनतेला जागं करून समाजाच्या उद्धाराचं काम करत होते, हे साधं काम नव्हतं. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मनुवादाला, वर्चस्ववादाला आव्हान देण्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात, याची जाणीव तुकोबारायांना होती. हे नीच लोक कुठल्या थराला जाऊ शकतात हे न कळण्याइतका तो भाबडा नव्हताच. पण तरीही सगळं समजून उमजून, जाणून बुजून त्यांनी ही रिस्क घेतली होती. बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी जिवाची बाजी लावली होती त्यांनी. आता काय होईल ते होईल, असं म्हणून ते रणांगणात उतरले होते. ‘तुका म्हणे रणी । नये पाहो परतोनी ।।’ असं योद्ध्यांना सांगणारा हा शूरवीर स्वत: थोडीच मागे वळून पहाणार होता? सिनेमात जे हिरो दाखवतात ते फिके पडतील असा हा आपला ‘रिअल लाईफ हिरो’ होता.
आपल्या जिवाला धोका आहे, आपला घात होणार आहे असं सांगणारा एक अभंग लिहून ठेवला होता तुकोबा माऊलीनं… तो खूप ‘सूचक’ आहे. तुकोबाराया आपल्याला सांगून ठेवतो,
‘लावूनि कोलित । माझा करितील घात ।।
ऐसें बहुतांचे संधी । सांपडलों खोळेमधीं ।।
पाहातील उणें । तेथें देतील अनुमोदनें ।।
तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं लाजें धिंगे ।।’
…हे लोक कोलित लावून माझा घात करतील.
…अशा अनेक कारस्थान्यांच्या गराड्यात मी सापडलो आहे.
…आता हे माझ्यातले ‘उणे’, म्हणजे दोष शोधतील आणि त्यांचा बभ्रा करतील. मला बदनाम करून त्याचा फायदा घेतील.
…शेवटी तुकाराम म्हणे- आता या निर्लज्ज लोकांचे हे दुष्ट, कुटिल उद्योग वाढतच जाणार आहेत.
तुकोबारायांनी आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं होतं. आपल्याला सांगितलं जातं की वारकरी संप्रदाय हा भोळ्याभाबड्या भाविक संतांचा भक्तिसंप्रदाय आहे. मग असं असेल तर या संतांचा छळ का केला हो? मारहाण, शिवीगाळ का केली? गाथा का बुडवायला लावली? कारण शोधल्यावर आपल्या ध्यानात येतं लोकहो, वारकरी संप्रदाय ही भक्ती चळवळ नाही, तर ‘मुक्ती चळवळ’ होती! वर्चस्ववाद्यांनी धर्मसत्तेच्या बळावर शुद्रातिशूद्रांना आणि स्त्रियांना गुलाम करून टाकलं होतं. ना शिक्षण घेऊ दिलं, ना ज्ञान मिळवू दिलं. लोक अडाणी ठेवले की लुबाडणं सोपं जातं. गुलाम बनवण्याचा डाव साधला जातो. या गुलामगिरीतून बहुजनांची मुक्तता करण्यासाठी आपल्या सगळ्या-सगळ्या संतांनी खूप मोठ्ठी चळवळ उभी केली. त्याचा कळस तुकोबारायांनी गाठला! उद्दाम, मग्रूर धर्मसत्तेला ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वहावा भार माथा ।।’ असं उघड-उघड, आमनेसामने येऊन सुनावणं म्हणजे खायचं काम नव्हतं लोकहो… खूप मोठ्ठा जिगरा होता तुकोबारायांकडं!
आपल्या सगळ्यांच्या हक्कांसाठी, आपला हा महामानव जिवाचं रान करून लढला. रक्ताचं पाणी केलं. ‘महाराशी शिवे.. कोपे ब्राह्मण तो नव्हे!’ असं ठणकावून सांगितलं त्यानं. एका शूद्राचा हा कॉन्फिडन्स आणि लोकप्रियता वर्चस्ववाद्यांना खुपायला लागली. अहो, आजही २०२५ साली जातवर्चस्ववाद्यांचा जो उद्दामपणा चाललाय, मुजोरी चाललीय, ती पहाता चारशे वर्षांपूर्वी ही मग्रुरी किती टोकाची असेल, विचार करा! त्यामुळेच हा लढा देताना आपला शेवट काय होणार आहे याचा अंदाज तुकोबारायांना आला होता. वरच्या अभंगातून त्यांनी हीच फॅक्ट सांगितलीय. हे लोक निर्लज्ज आहेत, त्यांना कसलाच विधिनिषेध नाही, भीडभाड नाही, कसली पर्वा नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे उद्या आपल्या जिवाचं काही बरंवाईट झालं, तर आपल्या कुटुंबीयांना, साथीदारांना, अनुयायांना याची कल्पना असावी या हेतूनं त्यांनी हा अभंग लिहिला असावा.
आपल्या कळवळ्यापोटी तुकोबारायानं जो अद्भुत, अवर्णनीय, अफाट संघर्ष केला त्याची आपण जरा चाड मनात बाळगूया. मी वारंवार हे कळवळून सांगतो की ‘गाथा’ देवघरात पूजायला नाही, तर शेल्फमध्ये ठेवून, वेळोवेळी वाचून, त्यानुसार वागण्यासाठी, जगण्यासाठी आहे. तरच आपण स्वत:ला तुकोबांचे वारस म्हणायच्या लायकीचे ठरू.
आज अनेक भरकटलेल्या बहुजनांमध्ये ‘ओठात तुकोबा आणि डोक्यात मंबाजी’ अशी बिनडोक अवस्था दिसते. तशी आपली होता कामा नये. आपण वारकरी आहोत म्हणजे ‘कुणीही या आणि टपली मारून जा’ असे भोळे टाळकुटे नाही… वेळ आली तर ‘नाठाळाच्या माथ्यावर काठी देणारे’ लढवय्येही आहोत हे भान पाहिजे. चारशे वर्षांनंतरची आजची परिस्थिती, भवताल, समस्या यात फरक पडलाय पण माणसाची वृत्ती बदललेली नाही. ती तशीच आहे. तुकोबारायांना छळणार्या वृत्तीनं तर आज महाभयंकर उच्छाद मांडलाय. मानवतावाद्यांपुढं मोठं आव्हान उभं आहे. या परिस्थितीला भिडताना तुकोबांचाच विचार कामी येणार आहे! आपण तुकोबाच्या वाटेवर चालणारे वारकरी आहोत. त्यांच्या विचारांच्या सोबतीनं प्रवास करूया. आणि तुकोबाच्या संघर्षाचं सोनं करूया!