‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे म्हणूनच धार्मिक वाद विकोपाला जातो असा आरोप विरोधकच करतात असे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत… मार्च २०२३मध्ये राज्यातील तत्कालीन महायुती सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने असे आसूड ओढले होते. राजकारण आणि धर्म वेगवेगळे करण्याची वेळ आली आहे. तसे केले तरच कटुता संपुष्टात येईल, धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेले सर्व वाद थांबतील, असेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. महायुती सरकार जून २०२२मध्ये राज्यात सत्तेत आल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले गेले होते. द्वेषपूर्ण आणि भडकावू वक्तव्ये, धार्मिक तेढ करणारी विधाने (हेट स्पीच) रोखण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महायुती सरकारला सूचना केल्या होत्या, पण काही फरक पडला नाही.
एकाने काही विधान केले की त्यावर लगेच दुसरे लोक प्रतिक्रिया देतात. ही बेजबाबदार वक्तव्ये थांबवायची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने कारवाई केली पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील सरकार नपुंसक आहे, ते काहीही करत नाही, म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा फटकारले होते. आताही महायुती सरकारच्याच काळात गेल्याच आठवड्यात नागपूर येथे दंगल उसळली. त्याला भाजपातील काही मंत्र्यांची व नेत्यांची इतर धर्मांवरील भडकावू वक्तव्ये काही प्रमाणात कारणीभूत ठरली आहेत.
महाराष्ट्रात गेले काही दिवस औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू होता. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादजवळील औरंगजेबाची कबर उखडून टाका असा घोष सत्ताधारी पक्षातील हिंदुरक्षकाचा ठेका घेतलेली काही मंडळी करीत आहे. त्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघटनांनी राज्यभर निदर्शने, आंदोलने केली. भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनीही छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करणार्या औरंगजेबाचे नामोनिशाण मिटून टाकू अशी धमकी दिली. त्याआधीही त्यांनी मुसलमानांच्या घरात घुसून मारू, ज्यांना मुस्लिमांचा पुळका आला असेल त्यांनी पाकिस्तानात जावे अशी बेताल, भडकावू वक्तव्ये केली होती. मंत्र्याने समाजात सलोखा राखण्याची शपथ मंत्रीपद स्वीकारताना घेतलेली असते. तिलाच त्यांनी हरताळ फासला.
भाजप आणि संघ हिंदू व मुस्लीम समुदायाचा राजकीय फायद्यासाठी सोयीनुसार वापर करतात. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचे त्याचे समर्थन करीत नाही, अशा स्पष्ट शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. गरजेनुसार संघ व भाजप वेगवेगळी भूमिका घेतात, त्याचे हे उदाहरण.
२०२२ सालापासून संघातर्फे मुसलमानांच्या रमझानच्या पवित्र महिन्यात इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर इफ्तार पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोहम’ अशी शिकवण देणार्या संघाला इफ्तार पार्टीच्या आयोजनाची गरज भासते. भाजपाचे अनेक नेते, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रीही इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. त्यात चुकीचे काही नाही. हा देश हिंदूंचा आहे तसा तो वर्षांनुवर्षे येथे राहणार्या मुस्लीम, ख्रिश्चनांचाही आहे. सर्व धर्मांचे सण, उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरे झाले तर देशाची एकात्मता टिकून राहण्यासाठी मदतच होते. प्रेम-बंधुत्वाची शिकवण हिंदुधर्म देतो. पण हिंदुत्वाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, अंगावर भगवी शाल पांघरणार्या भंपक हिंदू पुढार्यांची टोळी ‘हिंदू खतरे में है’ अशी आरोळी ठोकून हिंदू तरुणांची माथी भडकवण्याचे काम करीत असतात. त्यातून नागपूरसारख्या घटना घडतात.
भाजपा व संघ, हिंदू समाज एकटवण्याच्या नावाखाली हिंदू समाजातील असंख्य जाती-पोटजातींत दुरावा निर्माण करते. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी त्यांनी तसा प्रयत्न केला. हरियाणामध्ये जाटांविरुद्ध बिगर जाट, उत्तर प्रदेशात यादवांविरोधात बिगर यादव, दलितांमधील जाटव विरुद्ध बिगर जाटव समाजाला वेगळे करून भाजपाने त्यांची मते मिळवली होती. महाराष्ट्रातही मराठा विरुद्ध ओबीसी असा बखेडा उभा करण्यात भाजपाचे नेतेच आघाडीवर आहेत. मुस्लीम समाजातील ‘पस्मंदा’ समाजालाही मुस्लिमांपासून अलग करण्याचा प्रयत्न २०२४ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपाकडून जानेवारी २०२३ सालापासून केला गेला. मुसलमानांमध्ये तब्बल ८५ टक्के लोकसंख्या पस्मंदा मुसलमानांची आहे. हा मागासवर्गीय समूह आहे. याला भाजपाकडे वळवण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीतर्फे शभरात ‘पस्मंदा स्नेह संवाद’ यात्रा काढण्यात आली. हे करत असताना समाजात, धर्मा-धर्मात द्वेष पसरवून जातीयता-धर्मांधतेला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम ही भाजपाची नेते मंडळी करतात.
हिंदुरक्षक भाजपावाले काश्मीरमधील हिंदू पंडितांचे स्थलांतर गेल्या अकरा वर्षांत केंद्रात सत्तेत आल्यापासून थांबवू शकले नाहीत. जून २०२२ साली काश्मीर खोर्यातील १८०० काश्मीरी पंडितांसह तीन हजारांहून अधिक हिंदूंनी कुटुंबासह काश्मीर सोडले. दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगच्या दहशतीपुढे त्यांनी शरणागती पत्करली आणि स्वत:चा जीव वाचवला. केंद्रात हिंदुत्ववाद्यांचे सरकार असताना त्यांना पलायन करावे लागले. आपल्याच मायभूमीत काश्मिरी पंडितांना शरणागत म्हणून राहावे लागते.
याच भाजपाने सत्तेसाठी पाकिस्तानी आतंकवाद्यांची तळी उचलणार्या पीडीपी पक्षाच्या मेहबूब मुफ्तीबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. काश्मिरी पंडितांची घरे उद्ध्वस्त होत असताना दहशतवाद्यांचे समर्थन करणार्या पक्षाच्या नेत्यांबरोबर ते इफ्तार पार्ट्या झोडत होते. तेव्हा कुठे गेले यांचे कट्टर हिंदुत्व?
सध्या वादग्रस्त बनवण्यात आलेली औरंगजेबाची कबर हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला मुद्दा. केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून या कबरीची देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मुस्लिमांच्या मदरशांमधील विद्यार्थ्यांना हिंदू धर्माविरोधात शिक्षण दिले जाते असा आरोप करणार्या भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांतील मदरश्यांना तेथील राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत का दिली जाते? एवढेच नाही तर मदरशात शिकवणार्या शिक्षकांना वेळोवेळी पगारवाढ दिली जाते. मागच्या आठवड्यातच दिल्लीतील भाजपा नेत्या आणि दिल्ली हाज कमिटीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, मंत्री प्रवेश वर्मा, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, खासदार कमलजीत सहरावत, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन आदी भाजपाचे नेते उपस्थित होते. एकीकडे इफ्तार पार्टीतील शीर कुर्मावर आडेहात ताव मारायचा, तर दुसरीकडे मुस्लीम द्वेषाची गरळ ओकायची असा दुटप्पीपणा भाजपा करते.
या देशात मुसलमान नको म्हणायचे, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन हिंदुस्तानच्या फाळणीचे जनक असलेल्या महमद अली जीना यांच्या कबरीवर चादर चढवायची. आमंत्रण नसतानाही पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन वाढदिवसाची मिठाई खायची व खिलवायची.
भाजपाचे नेते मंडळी मुस्लीम द्वेष पसरवित असताना मुलामुलींच्या मुस्लीम प्रेमाला मात्र गुलाबी गालीचा अंथरतात. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचे जावई माजी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसेन हे आहेत. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे जावईही मुस्लीम आहेत. भाजपाचे फायर ब्रँड नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा जावईही मुस्लीम आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर (मूळचे नाशिकचे) यांची पत्नी मुस्लीम आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. कुणाबरोबर प्रेम करावे, विवाह बंधनात अडकावे हा व्यक्तिगत प्रश्न असतो. पण जेव्हा भाजपावाले मुस्लीम समाजाविषयी नाकाने कांदे सोलतात तेव्हा अशी वैयक्तिक उदाहरणे नाईलाजाने द्यावी लागतात.
औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायला निघालेल्या भाजपाने औरंगजेबाचा विश्वासू मिर्झाराजे जयसिंगाच्या वंशाला राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवले आहे. मिर्झाराजाने शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी यज्ञयाग व तांत्रिक विधी केल्या. त्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांना कोटी रुपयांचे दान दिले. अशा जयसिंगाच्या वंशजाला भाजपाने उपमुख्यमंत्रीपद देऊन औरंगजेबाच्या क्रूरवृत्तीचे उदात्तीकरणच केले नाही का?
एकीकडे पाकिस्तानविरुद्ध थयथयाट करायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा. शिवसेनेला हिंदुत्व शिकवणार्या नेत्यांची मुले दुबईत क्रिकेट सामना बघण्यात दंग होती. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या आणि पाक क्रिकेट मंडळाच्या पदाधिकार्यांच्या मांडीला मांडी लावून क्रिकेट सामन्याची मजा घेत होते.
राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. दंगल परिसर महाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयापासून जवळच आहे. हिंदू धर्मरक्षकाचा टेंभा मिरवणारे संघाचे नेते हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले आहेत असा याचा अर्थ काढायचा का? संघ व भाजपाच्या ‘कथनी व करणी’मध्ये महद अंतर आहे, कारण भाजपा व संघ हिंदुत्ववादी आहे, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे. अशा अनेक घटनांमुळे भाजपाचे बेगडी हिंदुत्व म्हणजे भोंदुत्व आहे हेच अधोरेखित होते.
– योगेंद्र ठाकूर