प्रत्येक व्यक्तीच्या घशात ‘व्होकल कॉर्ड’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापुद्र्यासारखा दिसणारा हा अवयव आपल्याला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लतादिदींनी आपल्या घशाचा विमा उतरविला होता. कारण त्यांचा घसा हाच सर्वात मौल्यवान अवयव होता. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते, मात्र प्रत्येक आवाजाचा एक विशिष्ट पोत असतो. या पोतावरूनच आपल्याला सहज ओळखता येते की आवाज कुणाचा आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत गायक-गायिकांचा आवाज म्हणूनच आपण सहज ओळखू शकतो.
चित्रपटसृष्टीत संधी मिळवून बस्तान बसविण्यासाठी अनेकजण मुंबापुरीत येत असतात. पण अनेकदा येणार्याला जे बनायचं असतं ते राहून जातं आणि त्याची वेगळीच ओळख तयार होते. लुधियानातील जोरावरचंद आणि चाँदरानी यांच्या पोटी जन्मलेल्या एका तरुणाचे काहीसे असेच होणार होते. खरं तर दिसायला सुंदरच होता हा तरुण. ३०-४०च्या दशकातल्या चित्रपटातले अनेक नायक स्वत:ची गाणी स्वत:च गात, कारण तेव्हा पार्श्वगायन पूर्णपणे रुजले नव्हते. याला गाताही येत असल्यामुळे नायक बनण्याची महत्वाकांक्षा होती, त्यात गैर काहीच नव्हते. मोठी बहीण संगीत शिकत असताना यालाही लहानपणीच संगीताची गोडी लागली.
जोरावरचंद आणि चाँदरानी यांचे एक दूरचे नातेवाईक होते मोतीलाल. हे चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेते. त्यांनी या तरुणाला बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात गाताना ऐकले. त्यांच्या आवाजातील वेगळेपण त्यांच्या लक्षात आले आणि ते त्याला मुंबईला घेऊन आले. मोतीलाल या तरुणापेक्षा १३ वर्षे मोठे होते. पण त्यावेळी त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की याच तरुणाचा आवाज उसना घेऊन एके दिवशी त्यांना गावे लागणार आहे. मुंबईत त्याची रहाण्याची सोय मोतीलाल यांनी स्वत:च्या घरातच केली आणि त्याच्यासाठी एक संगीत-शिक्षकही नेमला.
१९४१मध्ये या तरुणाला शेवटी एका चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट होता ‘निर्दोष’. यातील गाणीही त्याने स्वत: गायली होती. त्या काळात कुंदनलाल सैगल हे गायक अभिनेत्यांमध्ये सर्वोच्च शिखरावर होते. आणखी तीन वर्षांनी हा तरुणही चित्रपटसृष्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेणार होता, पण अभिनयाने नव्हे तर आपल्या गोड गळ्याने…
मधल्या काळात मजहर खान या दिग्दर्शकाचा ‘पहली नजर’ हा चित्रपट थिएटरमध्ये झळकला. मोतीलाल, वीणा, मुनव्वर सुलताना, बाबूराव पेंढारकर, प्रसिद्ध शाहीर बाळकराम, बिब्बो अशी तगडी स्टारकास्ट होती. दोन पठाण मुस्लीम घराण्यांतील शोकांतिका यात दाखविली होती. या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. सफदर आह सितापुरी यांनी गाणी लिहिली होती. पैकी एक गाणे होते, ‘दिल जलता है तो जलने दे…’ हे गीत कुणी गायले आहे, यावर त्यावेळच्या अनेक चित्रपट रसिकांनी पैजा लावल्याचे बोलले जाते. कारण हुबेहूब कुंदनलाल सैगलचाच आवाज ऐकू येत होता. पण, हे गाणे सैगलचे आहे म्हणणारे रसिक ही पैज हरले होते. स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. हे गाणे गायले होते जोरावरचंद यांच्या त्याच मुलाने… मुकेशचंद जोरावरचंद माथूर या २२ वर्षीय तरुणाने, जो पुढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला… या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली. नंतर हळूहळू मुकेश सैगलच्या प्रभावातून मुक्त झाले. प्रत्येक कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सुरुवातीस कुणाच्या तरी प्रभावाखाली असतोच. जर त्याने स्वत:ला यातून मुक्त केले नाही तर मात्र त्याची ओळख फार काळ टिकू शकत नाही. अनेक गायक-गायिकांच्या बाबतीत असे झाले आहे.
मुकेशचा किंचित अनुनासिक, पण दर्दभरा आवाज हीच त्यांची खरी ओळख बनली. संगीतकार नौशाद यांनी मुकेशकडून दिलीपकुमारसाठी अनेक गाणी गाऊन घेतली. मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटातील मुकेशची सर्वच गाणी गाजली. ‘तू कहे अगर…’, ‘झूमझूम के नाचो आज…’, ‘हम आज कही दिल खो बैठे…’ वगैरे. गंमत म्हणजे या सिनेमात राज कपूरही होता, पण त्याचं एकही गाणं मुकेशने गायलं नव्हतं, पण पुढे जाऊन तो राज कपूरचा अभिन्नजीव आवाज बनला. ‘गाए जा गीत मिलनके’, ‘धरती को आकाश पुकारे’ (मेला), ‘ये मेरा दिवानपन है’ (यहुदी), ‘सुहाना सफर और ये मोसम हँसी’ (मधुमती), ‘जीवन सपना टूट गया’ (अनोखा प्यार) ही सर्व दिलीपकुमारसाठी मुकेशने गायलेली गाणी. १९५०नंतर मात्र मुकेशचा गळा खर्या अर्थाने राज कपूरलाच शोभला आणि दिलीपकुमार रफीच्या आवाजात गाऊ लागला… किशोर कुमारचा आवाज देव आनंदसाठी चपखल बसला.
मुकेशच्या आवाजात एक वेगळीच आर्तता असायची. मोहम्मद रफीसारखी सर्व सप्तकांतील रेंज वा मन्नादाच्या आवाजातला शास्त्रीय टच मुकेशकडे भलेही नव्हता; पण, हृदय भेदून जाणारा दर्द मात्र त्याच्या आवाजात नक्कीच होता. मोजकीच गाणी सोडली तर संगीतकार त्यांना तारसप्तकात गायला सांगत नसत. मात्र ‘झूमती चली हवा’ हे सोहनी रागातील गाणे (संगीतसम्राट तानसेन) आणि शिवरंजनी रागातील ‘जाने कहाँ गए वो दिन’ (मेरा नाम जोकर) या गाण्यात मुकेशजींनी खूप वरचे स्वर लावले अाहेत, जे आजही ऐकताना हृदयाच्या आरपार जातात.
मुकेशची सर्वच गाणी ओठांत सहज बसणारी आहेत. त्यांनी गायलेली उडत्या चालीची अनेक गाणी खूप हिट झाली. ‘किसी की मुस्कुराहटों पर हो निसार’, ‘सबकुछ सिखा हमने’ (अनाडी), ‘डम डम डिगा डिगा’ (छलिया), ‘रुक जा वो जानेवाली रुक जा’ (कन्हैया), ‘मेरा जुता है जापानी (श्री ४२०) वगैरे… राज कपूरसाठी मुकेश खरोखरच अप्रतिम गात असत. राज कपूरचा चेहरा विलक्षण बोलका. चेहर्यावरची नस न नस हलायची. डोळ्यातील भाव मुकेशच्या आवाजाने अधिक गहिरे होत जायचे. स्वत: राज कपूरही सुंदर गात असत. मुकेशने म्हटले होते की, ‘मनात आणले असते तर ते माझ्यापेक्षाही उत्तम गायक झाले असते.’ राज कपूरनी मुकेशला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गाईन आणि ते त्यांनी मुकेश यांच्या शेवटापर्यंत पाळलेही. ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा खरा नायिकाप्रधान चित्रपट, पण या चित्रपटात मुकेश यांच्या गाण्यासाठी राज कपूरने खास प्रसंग निर्माण केले.
मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावुक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आईजवळ मागणी केली की मला मुकेशने गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईन. आईने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की, ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यांना खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच… शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणेही गायले. मुलीच्या चेहर्यावरील आनंद बघून ते म्हणाले, ‘ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या कितीतरी पट आनंद मला झाला आहे.’ त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहुदा हृदयापासून येत असावे.
राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘आह’ चित्रपटात मुकेश तुम्हाला दिसतील. ‘आह’मधील ‘छोटीसी ये जिंदगानी रे…’ हे गाणे स्वत:च्याच आवाजात गाणारा गाडीवान स्वत: मुकेशच आहे. मुकेशने दोन चित्रपटांची निर्मिती पण केली होती. १९५१मध्ये त्यांनी ‘मल्हार’ हा चित्रपट निर्माण केला. यातील प्रमुख भूमिका मोती सागर (रामानंद सागर यांचे चिरंजीव) आणि शम्मी यांनी साकारल्या होत्या. यातील मुकेश आणि लताचे ‘बडे आरमान से रखा है बलम तेरी कसम…’ हे रोशनने संगीत दिलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. दुसरा चित्रपट १९५६मधील ‘अनुराग’ हा होता. यात त्यांनीच प्रमुख नायकाची भूमिका केली होती. यानंतर बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे की अभिनय हा आपला प्रांत नाही. मग त्यांनी गाण्यांवरच लक्ष केंद्रित केले आणि आपला ठसा उमटवला.
६०च्या दशकातल्या सर्वच संगीतकारांनी मुकेशकडून गाणी गाऊन घेतली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचे सर्वोच्च शिखर असलेला तो काळ होता. त्यांनी सुनील दत्त, मनोजकुमार यांच्यासाठी गायलेली गाणी देखील तुफान गाजली. १९६७मध्ये सुनील दत्त-नूतन यांच्या ‘मिलन’मधील ‘सावन का महिना…’ हे लताजींबरोबर गायलेले ड्युएट तुफान लोकप्रिय झाले. त्यावर्षीच्या बिनाका गीतमालामधील ते क्रमांक एकचे गाणे होते… ‘सब कुछ सिखा हमने’ (अनाडी १९५९), ‘सबसे बडा नादान…’ (पहचान १९७०), ‘जय बोलो बेईमान की’ (बेईमान १९७२), ‘कभी कभी मेरे दिल में…’ (कभी कभी १९७६) असे चार फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. १९७४मधील ‘रजनीगंधा’ सिनेमातील ‘कई बार यूं भी देखा है…’ या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
त्यांनी रायचंद्र त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी २२ जुलै १९४६ रोजी लग्न केले. त्या काळात गाणे-बजावणे हे खालच्या पातळीवरचे समजण्यात येई. त्यामुळे रायचंद यांनी विरोध केला. मग दोघांनी पळून जाऊन कांदिवलीच्या एका देवळात जाऊन लग्न केले. त्यावेळी मुकेश २३ वर्षांचे होते. मोतीलाल आणि आर.डी. माथूर (मुगल-ए-आझम या चित्रपटाचे छायाचित्रकार) यांनी त्यांना मदत केली होती. त्यांना नितीन मुकेश या गायक मुलासह एकूण चार अपत्ये आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश हा त्यांचा नातू.
मुकेशजी अनेकदा स्टेज शोदेखील करत असत. गाताना सोबत नेहमी त्यांची हर्मोनियम असे. किशोरकुमार स्टेजवर मस्ती करत, त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट-टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत, तेव्हा त्यांना लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत. मध्येच शिट्ट्या वा टाळ्या वाजत नसत. २२ जुलै १९७४ रोजी मुकेशनी त्यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस साजरा केला आणि लगेच चार दिवसांनी अमेरिकेला प्रयाण केले. डेट्रॉईट, मिशिगन येथे त्यांचा स्टेज शो होता. २७ ऑगस्टला त्यांनी एरवीपेक्षा लवकर उठून स्नान केले. कपडे घालताना त्यांच्या छातीत दुखायला लागले म्हणून त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेले गेले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिल्लक राहिलेला स्टेज शो लतादीदी आणि त्यांच्या मुलगा नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लताबाई त्यांचे पार्थिव शरीर घेऊन भारतात आल्या. त्यावेळी चित्रपटसृष्टीतले असंख्य मान्यवर उपस्थित होते. राज कपूर यांच्या कानावर जेव्हा वृत्त गेले त्यावेळी त्यांचे उद्गार होते, ‘आज माझा आवाज हरवला…’ त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी गाणी गायलेले काही चित्रपट प्रदर्शित झाले. मुकेशजी वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी हे जग सोडून गेले. म्हणजे तसे ते तरुणच होते. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज असे अवेळी का सोडून गेले असावेत? हा प्रश्न मनाला सतत बोचणी लावतो…