• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोण चूक, कोण बरोबर?

- राजेंद्र भामरे (पोलीसकथा)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in पंचनामा
0

२००८मध्ये पुण्यात गुन्हे शाखेत सामाजिक सुरक्षा विभागामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत होतो. एके दिवशी लंच झाला होता, खुर्चीत पॉवर नॅप घेत बसलो होतो. अचानक सरकारी विभागात कार्यरत असणार्‍या एका उच्चपदस्थ अधिकारी मित्रांचा फोन आला. आमचे बोलणे झाले आणि अवघ्या १५ मिनिटातच एका गृहस्थांना सोबत घेऊन तो माझ्या ऑफिसात आला.
त्याच्या सोबत आलेले गृहस्थ पेशाने डॉक्टर होते, त्यांची पत्नी देखील डॉक्टर होती. हे दोघेजण पुण्यातच राहणारे होते. त्यांना दोन कन्या होत्या, त्यापैकी मोठी मुलगी मेडिकलचे शिक्षण घेत होती तर धाकटी बारावीला शिकत होती.
तीन दिवसांपूर्वी त्यांची धाकटी मुलगी घरातून पळून गेली होती, त्यामुळे दोघेजण खूप अस्वस्थ झाले होते. पोलिसांची मदत घेऊन लवकर तिला घरी आणण्याचे प्रयत्न या दाम्पत्याने सुरू केले होते. ही मुलगी गुजरातला असल्याचे तिच्या मोबाइलमुळे त्यांना समजले होते. सर, काहीही करा आणि तिला लवकर शोधून काढा, अशी याचना हे डॉक्टर माझ्याकडे करत होते.
मी त्यांना मुलीबद्दल अनेक बाबींवर माहिती विचारली. मुलीचे व तिच्या पालकांचे पटत नसल्याने ती पुण्यातच होस्टेलला राहात असल्याची एक वेगळीच माहिती त्यातून समोर आली. काही दिवसांपूर्वी नातेवाईक आणि कौटुंबिक मित्र यांनी मध्यस्थी केल्याने एक महिन्यापासून ती मुक्कामासाठी घरी परतली होती. पण तीन दिवसापूर्वी असे काय झाले, त्यामुळे ती घरातून गायब झाली हे आपल्याला माहित नाही, असे डॉक्टर सुरुवातीला मला सांगत होते.
मुलीचे कुठे प्रेमप्रकरण आहे काय? तुमचा कोणावर संशय आहे काय? याची चौकशी त्यांच्याकडे केली. त्यांनी कोणावरच संशय नसल्याचे सांगितले. म्हणाले, साहेब, मी मुलीला मोबाईल फोन घेऊन दिलेला नाही, तिने कुठून आणला हे मला माहित नाही. आठवड्यापूर्वी रात्री उशिरा ती कोणाशी तरी बोलत असताना तिला रंगेहाथ पकडले, तेव्हा माझे तिच्याबरोबर कडाक्याचे भांडण झाले. तो राग डोक्यात ठेवून दुसर्‍या दिवशी ती घरातून निघून गेली, असे डॉक्टर आता सांगू लागले.
त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर मी लगेच तातडीने तपासाची सूत्रे हलवली आणि कामाला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी कोणी हरवल्याची तक्रार आली की बिनतारी संदेश पाठविणे, हरवल्याची पोस्टर्स पाठविणे, ती भिंतीवर चिटकवणे अशी पद्धत होती. आता मोबाईल, व्हॉट्सअप आल्यामुळे त्यात बदल झाला होता (जरी पालकांच्या मन:स्थितीत बदल झाला नसला तरीही). आम्ही तात्काळ, फोनचे सीडीआर काढले, त्याचा अभ्यास केला, पण त्यात काही संशयास्पद वाटले नाही. मोबाईल फोन बंदच होता. २४ तासांपूर्वी तो बंद केला होता तेव्हा तिचे लोकेशन गुजरात अहमदाबाद येथे होते.
या तपासासाठी पोलिसांची टीम गुजरातला पाठवायची की नाही याचा विचार डोक्यात सुरू असतानाच तिचा फोन पुन्हा सुरू झाल्याचे दिसले. त्याचे लोकेशन होते पुण्याच्या कॅम्प भागातले. पण तो फोन लगेच बंद झाला. एका क्षणाचाही वेळ न घालवता मी तात्काळ अधिकारी व महिला कर्मचारी यांच्या दोन तीन टीम्स तयार केल्या. सगळ्यांच्या मोबाइलमध्ये मुलीचा फोटो घेऊन दोन तीन जागांचा अंदाज बांधला आणि टीम्स पाठवल्या. काही वेळाने अंदाज बांधलेल्या एका ठिकाणीच रेस्टॉरंटमध्ये ती मुलगी सापडली. पोलिसांनी तिला पकडल्यानंतर तिने भरपूर धुडगूस घालत दंगा केला. पोलिसांची टीम साध्या वेशात असल्याने आजूबाजूच्या लोकांना वाटले, की हेच मुलगी पळवून घेऊन चालले आहेत. त्यामुळे तिथे काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या मंडळींना ओळखपत्र दाखविल्यानंतर सगळे एका मिनिटात शांत झाले.
पोलीस त्या मुलीला घेऊन क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये आले, तेव्हा तर या मुलीने चक्क रुद्रावतारच धारण केला. रागामुळे तिचे डोळे लालबुंद झाले होते, डोक्याचा पारा चढलेला होता. मला इथे मला कशाला आणलंय, हा काय तमाशा लावलाय सगळ्या लोकांमध्ये, तुम्ही माझी बेइज्जती केली आहे, वगैरे बोलत तिने ऑफिसातही दंगा चालवला होता. तिथेच वडील तिच्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ती वडिलांशी तर अजिबातच बोलायला तयार नव्हती.
तिला थोडे शांत करून काही प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा ती संतप्त सुरात म्हणाली, आधी वडिलांना बाहेर काढा, मी त्यांच्यासमोर काहीही बोलणार नाही. तेव्हा तिच्या वडिलांना शेजारच्या खोलीत बसण्यास सांगितले. इकडचे तिकडचे विषय काढून ती शांत होईल, अशा पद्धतीने तिची विचारपूस करायला सुरुवात केली. अखेर काही वेळाने ती नरमली आणि खुलली.
या मुलीला दहावीला ८२ टक्के मिळाले होते. दहावीत गेल्यापासून तिचे आईवडील अभ्यासासाठी तिच्या मागे लागत असत. ते म्हणायचे की ताई दहावी व बारावीला बोर्डात आलेली आहे. पण तू मात्र आमचे नाव घालवणार आहेस. अशा भाषेत आईवडील घालून पाडून बोलत. प्रत्येक वेळी छोटी-मोठी परीक्षा असली की तिची तुलना मोठ्या बहिणीबरोबर केली जायची. त्यामुळे सतत होणार्‍या अपमानातून तिची भांडणे व्हायची. ती पालकांना म्हणायची, मी खूप प्रयत्न करते आहे, यापेक्षा जास्त मार्क मला मिळत नाहीत, तर मी काय करू? मीही त्या मुलीला म्हणालो, तू पालकांच्या अपेक्षाप्रमाणे मार्क्स का मिळवू शकत नाहीस? त्यावेळी म्हणाली, ‘मी मॅक्झिमम प्रयत्न करूनही एवढेच मार्क्स मिळतात. कदाचित माझी कपॅसिटी एवढीच असेल. माझी तुलना बहिणीशी का करता? ती व मी वेगवेगळ्या आहोत, हे त्यांना कळत नाही का?
तू मोबाईल कुठून आणला असे विचारल्यावर तिने पॉकेटमनी साठवून त्यातून मोबाइल घेतला असल्याचे सांगितले. तसेच सिमकार्ड मित्राच्या नावावर घेतले असल्याचेही सांगितले. असे वडिलांना न सांगता मोबाइल विकत घेणे चांगले आहे काय, असे विचारता तिने शांतपणे सांगितले की आताच्या पिढीत माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या पालकांनी मोबाइल घेऊन दिलेले आहेत. माझ्या आईबाबांनी मला मात्र अनेकदा मागणी करूनही तो घेऊन दिलेला नाही, माझ्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असती, तर मी तो मागितलाही नसता. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, पण त्यांच्या हट्टीपणामुळे आणि हेकेखोरपणामुळे मला ते मोबाइल घेऊन देत नाहीत.
घरातून पळून जाण्याबाबत विचारता ती म्हणाली, नातेवाईक आणि मित्रांच्या मध्यस्थीमुळे पालकांनी तिला एक महिन्यापूर्वी हॉस्टेलवरून घरी परत आणले होते. थोडे दिवस बरे गेले, परंतु परत पुन्हा बहिणीशी तुलना, आडवे बोलणे व जवळ सापडलेल्या मोबाईल यामुळे तिचे पालकांशी जोरात भांडण झाले आणि त्यामुळे वैतागून, खराब मन:स्थितीत ती अहमदाबादला मैत्रिणीकडे निघून गेली होती.
तिची बाजू ऐकल्यानंतर मी तिच्या पालकांना बोलावले. पोलिसी भाषेत चार गोष्टी सुनावल्या आणि मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. माझ्या कार्यालयातून बाहेर पडत असताना ती मुलगी मला म्हणाली, सर या दोघांना मला हॉस्टेलला ठेवायला सांगा. हे सुधारणार नाहीत. मी पुन्हा घरातून पळून जाईन. ही गोष्ट लिहीत असताना मला आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आठवला. त्यातील सुप्रसिद्ध वाक्य ‘एव्हरी चाईल्ड इज स्पेशल’ हेही आठवले.
खूपदा असेच होते. १९७५मध्ये मी दहावीला होतो. घरात थोरली बहीण स्कॉलर. त्यामुळे साहाजिकच पालकांच्या माझ्याकडूनही मार्क्सबाबत खूपच जास्त अपेक्षा होत्या. परंतु मला दहावीत कमी मार्क्स मिळाले. त्यामुळे माझी पालकांशी बोलायची हिम्मत होईना आणि वडील म्हणाले, मार्क्स कमी मिळाले तरी काही हरकत नाही. तुला इंजिनीअर व्हायचे आहे, तू सायन्सला जा. मला सायन्स झेपणार नाही असे मी डेअरिंग करून सांगावयास हवे होते. कारण मी स्पोर्ट्समन असल्या कारणाने सतत जिमखाना व ग्राऊंडवर असायचो. परंतु मार्क्स कमी पडल्यामुळे वाटणारी लाज व पालकांची भीती यामुळे काही बोललो नाही व सायन्सला गेलो. झाले, बारावी सायन्सला नापास झालो आणि कॉमर्सला आलो. त्यानंतर गाडी रुळावर आली, आमचे शिक्षण सुखरूप पार पडले. पुढे पुण्यात एमएसडब्ल्यूला गेलो आणि एमपीएससीद्वारे पीएसआयची परीक्षा पास झालो.
आजही अनेकदा ती मुलगी आणि तिचे ते पालक आठवले की नक्की कोण चूक आणि कोण बरोबर, याबाबतचे मनात द्वंद्व चाललेले असते.

– राजेंद्र भामरे

(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)

Previous Post

चंदू

Next Post

शुद्धनिर्मला… रसगुल्ला!!

Next Post

शुद्धनिर्मला... रसगुल्ला!!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.