एखादी गूढकथा वाचकांना जशी कमालीची अस्वस्थ करू शकते, तसाच त्याचा नाट्यानुभवही, तो जर ताकदीने रंगमंचावर सादर केला तर थरारक आविष्कार सिद्ध होतो आणि त्यातही गूढकथाकार रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असेल तर सर्वांग सुन्न करून सोडणारी ठरते. हादरून सोडते.
अगदी याच वाटेवर जर आणि तर, शक्य आणि अशक्य. तर्क आणि अतर्क… भास आणि आभास यांचा खेळ ‘२१७ पद्मिनी धाम’ या नव्याकोर्या नाटकात रसिकांपुढे साकार होतो. जो दोनअडीच तास अक्षरशः गुंतवून ठेवतो.
नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मराठी साहित्यातील अनेक दालने ताकदीने हाताळली. त्यांच्या रत्नाक्षरांनी मराठमोळ्या साहित्याला, नाटकांना एक नवे वळण मिळाले. विशेषत: गूढकथा मराठीत खोलवर रुजविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. भयमिश्रित कुतूहल, मानवी मनाचा शोध, काहीदा अदभुत फॅन्टसी, तर काहीदा सत्यकथेच्या आधारावर काल्पनिक गोष्टी यावरल्या त्यांच्या गूढकथा गाजल्या आहेत. डायरी, बॉस, दुरुस्ती, हात, झाड, टोक पक्षी, जळमट, आल्बम, मंदा पाटणकरची गोष्ट, शनचर आणि कामागिरी, या गूढकथा विसरणं शक्यच नाही. ‘कामगिरी’ ही त्यांची भयकथा १९७८च्या सुमारास प्रसिद्ध झालेली. नंतर काही एकांकिका स्पर्धांत नाट्यरूप मिळाले. स्पर्धेतलं विजेतेपद मिळाल्याने गाजलेली. आणि आता व्यावसायिक रंगभूमीवर दोन अंकी नाटकाच्या रंगरूपात प्रगटलीय. आजच्या विनोदी नाटकांच्या महापुरात ही संहिता आणि त्याचे सादरीकरण आपलं वेगळेपण दाखवत आहे; कारण, विषय, आशयापासून ते तांत्रिक बाजूंनीही या नाटकाची श्रीमंती व कल्पकता नोंद घेण्याजोगी आहे.
गूढकथा किंवा रहस्यकथांचे संपूर्ण कथानक मांडल्यास त्याची उत्सुकता संपण्याचे भय असले तरीही मर्यादित अंतर ठेवून तसंच पर्दाफाश न करता काही प्रमाणात कथानक मांडण्याचा हाही एक प्रयोगच! पडदा उघडतो आणि एका कॉलेजमधलं प्राचार्यांचं दालन प्रकाशात येतं. गावातले बडे पुढारी तसेच कॉलेजला आर्थिक सहाय्य करणारे दानशूर उद्योजक रावराजे येतात. ‘टिनपाट कॉलेज त्यात टिनपाट प्राचार्य!’ असं समजणारा हा टिपिकल गावपुढारी. या गावातलं बडं प्रस्थ, कॉलेजमध्ये दबदबा, दहशत. त्यांची मुलगी पद्मिनी याच कॉलेजची विद्यार्थिनी होती. महिन्यापूर्वीच तिचं निधन झालेलं. रावराजेंना तिच्या मासिक स्मृतीदिनी या कॉलेजला तिच्या नावे काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे. पण ही भेटवस्तू कॉलेजचा लॅब इनचार्ज प्राध्यापक असलेला तरूण मुरंजन याच्या हाती सुपूर्द करण्याची त्यांची अट आहे. ही भेटवस्तू प्रयोगशाळेसंदर्भात असल्याने त्यासाठी त्यातला जाणकारच हवा, हा त्यांचा युक्तिवाद. ही अपेक्षा रावराजे हे प्राचार्यांना बोलून दाखवतात. मुरंजनला हे सांगण्यात येतं तेव्हा तो कमालीचा घाबरूनच जातो. इथून सुरु होते ते गूढकथा, रहस्यकथा यांचे चक्र, जे पुढे हे कथानक एका उंचीवर घेऊन जाते.
ठरल्याप्रमाणे ठीक सात वाजता मुरंजन आणि शाळेतला शिपाई बाबू हे दोघे टांग्यातून निघतात. गावाबाहेर असणार्या `२१७ पद्मिनी धाम’ या पुरातन वाड्यापर्यंत पोहोचतात. हा भयानक वाडा आणि त्यात पावसाची रिमझिम. रावराजे मुलीच्या निधनाचं दुःख हलकं करण्यासाठी गॅलरीत दारूचा मस्त आस्वाद आणि सोबत बासरीच्या सुरांचा आधार घेत आहेत. घाबरलेल्या मुरंजनला बोलकं करण्यासाठी दारू पिण्याची ऑफर दिली जाते. त्याने नकार दिल्यावर जबरदस्तीने पाजण्यात येते. त्याला गाण्याचा आग्रहही करण्यात येतो. त्यातून काही गोष्टींचा उलगडा होतो, नाट्य रंगत जातं. आता यात काही फ्लॅशबॅक आहेत, जे यातील गूढताही अधिक गडद करतात. सत्य आणि भास, संभव आणि असंभव याभोवती एकेक प्रसंग आकाराला येतात. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग बघणे उत्तम! कथानक इथेच थांबणं योग्य ठरेल.
पद्मिनीचा मृत्यू हा खून की आत्महत्या? तो का, कसा झाला? तो सांगाडा कुणाचा? तोच कॉलेजला भेटवस्तू देण्यामागे नेमके प्रयोजन काय? सांगाडा आणि पद्मिनी यांच्यातील संबंध काय? क्रूरतेने भाष्य कारणारा बाप खलनायक की बासरी वाजवून कलात्मकता जपणारा नायक? यात प्रेमप्रकरणातली भुताटकी की भुताटकीतलं प्रेमप्रकरण? प्रश्न आणि प्रश्न. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास नेमकी उत्तरे मिळत नाहीत. ती अखेर गूढच राहातात. उलट मिळालेल्या तर्कशास्त्रीय उत्तरातून नवे प्रश्न उभे राहातात. अर्थात रसिकांना हादरून सोडणं, हेच प्रमुख प्रयोजन यामागे आहे आणि ते यशस्वीही झालंय.
नेपथ्यासाठी या नाटकाला शंभरापैकी शंभर गुण! त्यामुळे नाट्याला बळकटी आलीय. पहिल्या अंकातलं प्राचार्यांची केबिन, बाहेर कॉरिडॉर, बोर्ड यातून कॉलेजची वातावरणनिर्मिती नेमकी होते. तर दुसर्या प्रवेशात रावराजे यांचा वाड्याबाहेरला भयानक वाडा, भलीमोठी कमान, त्यावरले अक्षरलेखन, गेट, जिना, जुने फर्निचर आणि रंगमंचावर घोड्यांचा टांगा! त्यातला जीवघेणा हादरून सोडणारा प्रवास. या सार्या नेपथ्यरचनेतून अभ्यासू आणि कल्पक नेपथ्यकाराचे दर्शन होते. ‘नाटकात चित्रपट’ बघायचा असेल तर सध्याची दोन नाटके नक्कीच बघावी लागतील. एक `सफरचंद’ आणि दुसरे हे ‘पद्मिनी’! आणि दोन्ही नाटकांचे नेपथ्यकार एकच आहेत… संदेश बेंद्रे. `सफरचंद’मध्ये काश्मीरची सफर होती तर यात गूढ वाडा अन् रात्रीचा घोडागाडीतला थरारक प्रवास आहे. आपण रामसे बंधूंचा चित्रपट बघतोय की काय, असा भास निश्चितच अनुभवण्यास मिळेल.
नेपथ्याला पुरेपूर साथ देणारी प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी केलीय. विशेषतः फ्लॅशबॅकचे प्रसंग, तसेच घोडागाडीचा प्रवास यातून चांगलाच खेळ रंगवला आहे. शुभम ढेकळे यांनीही संगीतातून प्रसंगातील गूढता वाढविली आहे. अशा विषयाच्या नाटकांमध्ये तांत्रिक बाजूंवर बरीच मदार असते. ती नेपथ्य, प्रकाश आणि संगीतातून एकत्रित परिणाम करतात. यातही नाटकाची भट्टी चांगली जुळली आहे.
चित्रपट, मालिका यातला ओळखीचा खलनायक रंगमंचावर प्रगटतो तेव्हा त्याच्या एंट्रीपासूनच रसिकांच्या नजरा जरा सावधच होतात. इथेही तेच झालंय. रावराजेंच्या भूमिकेत मिलिंद शिंदे हे बेरकी नजर आणि करारी आवाजाने पहिल्या प्रसंगापासूनच नाटक ताब्यात घेतात. हा खलनायक असला तरी त्याला एक शेड आहे. संगीताची आवड अन् बासरी वाजविण्याची लकब आहे. त्यामुळे ही भूमिका ‘हटके’ झालीय. मुरंजन तसेच पद्मिनी या दोघांसोबतचे सवालजवाब आणि त्यातली जुगलबंदी मस्त जमली आहे. एका मोठ्या मध्यंतरानंतर त्यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर प्रवेश केलाय. त्यांचे काही वर्षापूर्वी आलेले ‘अबीर गुलाल’ हे राजकीय सूडनाट्य आजही स्मरणात आहे. ‘नटरंग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘टुरिंग टॉकीज’, ‘बाबू बँडबाजा’ असे किमान डझनभर चित्रपट त्यांनी आजवर गाजविलेत. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून त्यांनी या चंदेरी-रुपेरी दुनियेत प्रवेश केलाय. या नाटकातली ‘रावराजें’ची भूमिका खलनायकी असली तरी याला एक बापाच्या हृदयाची नाजुक झालर आहे. देहबोली तसेच संवादातून अनेक प्रसंग प्रभावी झालेत.
अमृता पवार हिची पद्मिनी शोभून दिसते. तिचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. अनेक मालिका आणि एकांकिकांमध्ये अमृता यापूर्वी दिसली आहे. अभिनयातली चांगली जाण असल्याने ती खिळवून ठेवते. मुरंजनच्या भूमिकेत ऋतुराज फडके यानेही भूमिका पेलली आहे. त्याच्या मनातली घुसमट नजरेत भरते. रावराजेंसोबतचे प्रसंग पकड घेतात. घाबरट, गोंधळलेला, प्रेमात अडकलेला; पण त्यातली अगतिकताही त्याने चांगली उभी केलीय. तिघा प्रमुख पात्रांचं ट्युनिंग उत्तम. अनिकेत कदम (बाबू), सचिन नवरे (प्राचार्य) यांच्या भूमिका साथ देणार्या आहेत.
नचिकेत दांडेकर आणि संकेत पाटील या दोघांनी या सात-आठ पानी कथेचे नाट्यरूपांतर करतांना कथा कुठेही हरवलेली नाही तसेच उपकथानकांचाही आधार घेतलेला नाही. संवादातली ताकद विलक्षणच. संकेत पाटील याचे दिग्दर्शनही वेगवान आहे. त्यामुळे नाट्य कुठेही रेंगाळत नाही. धक्कातंत्राने परिपूर्ण नाट्य झालंय. अनिकेत कदम यांची गीते, संदेश रणदिवे यांचे नृत्यदिग्दर्शन यामुळे गूढता वाढण्यास मदतच होते.
या नाटकामागे असलेले गूढकथाकार रत्नाकर मतकरी. कोरोनाकाळात २०२० साली त्यांची लेखणी शांत झाली. पण त्यांच्या कथा, नाटके आजही रसिकांना आकर्षित करतात. गूढकथांचे ते तर मराठीतले सम्राटच जणू होते. दोन पिढ्यांनी त्यांचे साहित्य, नाटके यातून त्यांना अनुभवले आहे. आज मतकरींच्या दोन संहिता व्यावसायिक रंगभूमीवर गाजत आहेत. एक- विश्वविक्रमी ठरलेले बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’. यात अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची चेटकिणीची भूमिका अजरामर ठरली होती. आजही नव्या संचात ही चेटकीण सातशे प्रयोगापुढे निघाली आहे. दुसरे नाटक ‘काळी राणी’. बॉलीवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ त्यात आहे. विजय केंकरे याचे दिग्दर्शन आणि गिरीश ओक, मनवा नाईक यांच्या त्यात भूमिका आहेत. आणि आता या नव्या नाटकात एक अर्धवट संपले ती प्रेमकहाणी अन् त्याभोवतीचं गूढ व थरार गच्च भरलंय. अशा प्रकारे बालनाट्य, रहस्यनाट्य आणि गूढकथा या तिन्ही शैलींत समर्थपणे वावर असणारी ‘मतकरी टच’ नाटके रसिकांना आजही खुणावत आहेत, हे विशेष!
एकाच वेळी माणूस हिंसेचा तिरस्कार करतो आणि त्याच वेळी त्याला हिंसेबद्दल प्रचंड आकर्षणही वाटतं. त्याच्या मनात त्याबद्दल भीती आणि कुतूहलही असतं. बहुतेकांना वाटतं की माणूस मुळात शांतताप्रेमी व अहिंसक असतो, पण तसं नाही. संधी मिळाली की तो आत लपलेला क्रूरपणा दाखवतो. मग त्याच्या वर्तनात धरबंधच राहत नाही. इथेही रावराजे अगदी त्याच वळणावर आहे. मतकरी यांनी गूढकथाकार म्हणून फत्ते केलेली कथारूपी ‘कामगिरी’ नचिकेत आणि संकेत यांनी रंगमंचावर पेलली आहे. त्यामागील मानसशास्त्रीय विचार पोहचविण्याचा प्रयत्न यातील व्यक्तिरेखांत दिसतोय.
भीती ही अपराधीपणातून मनात जन्माला येते, त्या भयापोटी कसलेही, कुठलेही भास होऊ शकतात, हे लॉजिक अखेरीस मांडून नाट्य कळसापर्यंत पोहचते खरे, पण घोडागाडीतला रात्रीचा प्रवास आणि तो मानवी हाडांचा सापळा काही केल्या रसिकांचा डोळ्यातून डोक्यातून जाता जात नाही. पडदा पडला तरी भय इथले संपत नाही. हेच या निर्मितीमागले खरे श्रेय आहे. रंगभूमीवर बर्याच काळानंतर एक सशक्त गूढनाट्य प्रगटले आहे. ज्याचा प्रयोग थरार उडवितो. तो अनुभवायलाच हवा!
२१७ पद्मिनी धाम
मूळ कथा – रत्नाकर मतकरी
नाट्यरूपांतर – नचिकेत दांडेकर/संकेत पाटील
दिग्दर्शन – संकेत पाटील
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – शुभम ढेकळे
प्रकाश – शीतल तळपदे
नृत्य दिग्दर्शन – संदेश रणदिवे
सूत्रधार – नितीन नाईक/ कल्पेश बाविस्कर