• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

त्या जिभा गेल्या कुठे?

- रवींद्र पोखरकर (राज्यकारण)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in भाष्य
0

स्वातंत्र्यप्राप्तीपासून महाराष्ट्रात २०१९पर्यंत एकूण एकवीस व्यक्ती राज्यपालपद भूषवून गेल्या. डॉ. पी. सुब्रमण्यम, विजयालक्ष्मी पंडित, अलीयावर जंग, डॉ. शंकरदयाल शर्मा, पी. सी. अलेक्झांडर, डॉ. सी. सुब्रमण्यम आदी अनेक बुद्धिवान व्यक्तिमत्त्वांचा त्यात समावेश आहे. आपल्या देशाचे संविधान, लोकशाही शासनप्रणाली, आपल्या राज्यपालपदाची घटनात्मक चौकट, मर्यादा आदी महत्वपूर्ण बाबींचं पूर्ण भान असलेले हे सर्व लोक होते. राज्यातील सत्तेत आपण किती आणि कुठे हस्तक्षेप करायला हवा, त्यासाठीचे आपल्याला संविधानात्मक अधिकार किती, आपण कुठे आणि किती बोलायला हवं, आपल्या पदाची गरिमा कायम राहण्यासाठी आपलं वर्तन, वक्तव्य, कृती कशी हवी याचं भान असलेल्या या व्यक्ती होत्या. आणि त्यामुळेच या सर्व एकवीस राज्यपालांच्या जवळपास सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रात फार मोठे वाद, राजकीय-सामाजिक तणाव त्यांच्यापैकी कोणाकडूनही निर्माण झाले नाहीत. परंतु महाराष्ट्राचे बाविसावे राज्यपाल म्हणून २०१९ साली भगतसिंग कोश्यारी यांनी सूत्रे हाती घेतली आणि तिथपासूनच राज्यपालपदाची इभ्रत, गरिमा वगैरे सगळंच धोक्यात आलं. आपण अतिशय महत्वपूर्ण अशा घटनात्मक दर्जाच्या पदावर विराजमान आहोत याचं कोणतंही भान या स्वयंघोषित महान बुद्धीवादी व्यक्तीला असल्याचं दिसलं नाही. आपल्या अनेक वक्तव्यांनी आणि घटनाबाह्य कृतींनी कोश्यारींनी राज्यपालपदाचे आजवर या देशात कुणीही, कधीही केले नसेल इतके अवमूल्यन केले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारशी या महामहीम राज्यपालांनी आपणच जणू काही या राज्याचे विरोधी पक्षनेते आहोत अशा प्रकारचे अविवेकी आणि आपल्या मर्यादा ओलांडणारे वर्तन वारंवार केले. तत्कालीन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपलं पूर्ण भाषण न करताच सभागृह सोडून निघून जाणं, त्याप्रसंगी राष्ट्रगीताचाही अवमान करणं, सरकारच्या अनेक निर्णयांमध्ये अडथळे आणणं, न्यायालयाच्या सूचनेनंतरही विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या प्रदीर्घ काळ रोखून धरणं, राजभवनाचा वापर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालय असल्यासारखा करणं, राज्यातील असंवैधानिक सत्ताबदलाला पूर्ण प्रोत्साहन, पाठिंबा आणि घटनाबाह्य पद्धतीने संरक्षण देणं, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच संकेत झुगारून त्यांना स्वतःच्या हाताने पेढे भरवून आनंद साजरा करणं, अशा प्रकारच्या एक ना अनेक कृती या कोश्यारींनी वारंवार केल्या. आपणच जणू काही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहोत आणि पक्षाला पुन्हा राज्याच्या सत्तेत प्रस्थापित करणं ही आपलीच जबाबदारी आहे, अशा प्रकारे हे राज्यपाल वागत राहिले आणि अखेर त्यांनी आपलं इप्सित साध्य केलं. हे सगळं करताना आपण भूषवत असलेल्या राज्यपालपदाचा आपण पूर्णपणे गैरवापर करतोय, त्याचं अवमूल्यन करतोय, याचं कोणतंही भान या माणसाच्या चेहर्‍यावर कधीही दिसलं नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात या अविवेकी, उथळ राज्यपालांनी जे काही उद्योग करायचे ते केलेच; पण त्याहीपेक्षा घातक आणि बेजबाबदार पद्धतीचं वर्तन त्यांचं समाजात वावरताना राहिलं आहे. राज्यपाल म्हणून त्यांना विविध ठिकाणची कार्यक्रमांची आमंत्रणं येत असतात. विद्यापीठांमध्ये भाषणासाठी आमंत्रित केलं जातं. मागील तीन वर्षांत अशा बहुतांश ठिकाणी भाषणे करताना कोश्यारींनी वारंवार आपल्या उथळपणाचे दर्शन सगळ्यांना घडवलेलं आहे. संपूर्ण देशाला वंदनीय असलेल्या महाराष्ट्राच्या थोर विभूतींना आपल्या वक्तव्यांतून अवमानित करण्याचं काम या माणसाने वारंवार केलंय. ‘रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं?’ हे या महामहिम महोदयांचं वक्तव्य! त्यातही रामदास स्वामींचा उच्चार आदरार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उच्चार एकेरी! ‘सावित्रीबाई आणि जोतिबाचे लग्न वयाच्या दहा-बाराव्या वर्षी झाले, विचार करा, ते काय करत असतील,’ असं अतिशय छद्मीपणे हसत आणि घाणेरडे हातवारे करीत या माणसाने जाहीरपणे उद्गार काढले. ‘या राज्यातून गुजराती, मारवाडी, राजस्थानी निघून गेले तर हा महाराष्ट्र दरिद्री होईल,’ असे अकलेचे तारेही या माणसाने तोडले. या महाराष्ट्राचा आणि इथल्या थोर व्यक्तींचा हे महामहिम गेल्या तीन वर्षांत सतत अपमान करीत राहिले आहेत आणि तरीही त्यांच्या विरोधात या राज्यातील जनता फारशी आक्रमक होत नसल्याचे पाहून भीड चेपून ते आता अधिकच चेकाळलेत. ‘शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते,’ हे त्यांचं ताजं वक्तव्य त्याचंच उदाहरण.
एका घटनात्मक पदावर बसून, त्यामुळे मिळणारं संरक्षण घेऊन वारंवार या महाराष्ट्राला अवमानित करणार्‍या या व्यक्तीकडे आणि त्यांच्या प्रत्येक मराष्ट्रद्रोही वक्तव्याकडे दुर्लक्ष करणार्‍या किंवा त्याचं समर्थन करणार्‍या राजकीय पक्षाकडे मराठी जनता अजून काळ दुर्लक्ष करणार हा खरा प्रश्न आहे. एरवी एखादा सिनेअभिनेता रायगडावर महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून फोटो काढतो म्हणून त्याच्यावर आगपाखड करणारे, एखाद्या हास्य कलाकाराने अनावधानाने महाराजांचा उच्चार एकेरी केला म्हणून तिला प्रचंड धमकावणारे शिवभक्त या बेजबाबदार राज्यपालांकडून महाराजांचा वारंवार अवमान होण्याकडे का दुर्लक्ष करीत असतात? त्यांचं सोडा, पण सार्‍या महाराष्ट्रानेच आता हा सारा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोणीतरी देशाच्या अन्य भागातून इथे येणार, घटनात्मक पदावर विराजमान होणार आणि या राज्याची, त्याच्या मानकांची बदनामी करणार, त्यांना अवमानित करणार हे आता थांबवायला हवं.
भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्राच्या पुरोगामी वारशाची अ‍ॅलर्जी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार-विचारांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारधारेचा दुरान्वयानेही संबंध नाही. मतांच्या राजकारणासाठी जोवर आवश्यक तोवर या थोर व्यक्तींची नावे घ्यायची परंतु आतून त्यांची विचारधारा आणि ती प्रसवण्यासाठी काम करणारे लोक कसे संपवायचे याच दृष्टीने संघ-भाजप कार्यरत आहेत. मिर्झाराजे जयसिहांच्या विजयासाठी आणि महाराजांच्या पराजयासाठी होमहवन करणार्‍या वृत्ती संपलेल्या नाहीत, सावित्रीबाई आणि जोतिरावांवर शेण फेकणारे हात पूर्ण नष्ट झालेले नाहीत आणि महात्मा गांधींचा खुनी नथुरामची पूजा अर्चा करणारे, त्याचा पुतळा उभारणारे तर आपण आजही बघतोय. उलट या सर्व प्रवृत्तींमध्ये मागील आठ वर्षांपासून वाढच होऊ लागलीय. कोश्यारी हे याच प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत आणि प्रेरणास्थान मानणार्‍या या राज्यातील समस्त मराठी जनतेने एकवटून या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे.

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणार्‍या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..

हे आपल्या महाराष्ट्र गीताचे शब्द आहेत. राजा बढे यांनी केलेली ही स्फूर्तिदायी शब्दरचना आणि शाहीर साबळेंचा पहाडी आवाज आता केवळ ऐकण्यासाठी राहिलेत का? कुठे गेला आपल्यातील जोम, त्वेष? आपण सगळ्यांनीच जागृत व्हायला हवंय. आपल्या महाराष्ट्रातील केवळ उद्योगधंदेच परराज्यात चाललेले नाहीत, तर त्याचसोबत शिवरायांनी स्थापित केलेल्या या राज्याला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान अमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत.
राज्यात सत्तापालट घडवून सत्तेत आपल्या हातातील कठपुतळ्या बसवणे हा त्या कारस्थानाचाच एक भाग होता. हा महाराष्ट्र, इथले सर्वसमावेशक नेतृत्व, इथले सुधारणावादी विचार दिल्लीश्वरांना कायमच जाचत आलेत. इतिहासकाळापासून ते आजतागायत. भगतसिंग कोश्यारी हे त्याच दिल्लीश्वरांचे प्रतिनिधी आणि त्यांचे समर्थन करणारे या राज्यातील जे कुणी आहेत ते त्याच महाराजांच्या पराजयासाठी होमहवन करणार्‍या, फुले दाम्पत्यावर शेण फेकणार्‍या विचारांचे आजच्या काळातील वाहक. महाराष्ट्राने, मराठी जनतेने हे सगळं नीटपणे समजून घ्यायला हवं आणि या सगळ्या विरोधात एल्गार करण्यासाठी आता सज्ज व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांना, शाहू, फुले, आंबेडकरांना, प्रबोधनाचे विचार मांडत आलेल्या सर्व दिवंगत आणि हयात समाजसुधारकांना आपल्याकडून तेच अपेक्षित असेल..

Previous Post

गुजरातची सूरत बदलणार का?

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.