• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मशाल धगधगली, भगवा फडकला…

(संपादकीय - १२ नोव्हेंबर २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 10, 2022
in संपादकीय
0

‘मार्मिक’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ काय असावे याची चर्चा करताना मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव यांनी दिलेल्या पर्यायांमधून हातात मशाल घेऊन चालणारा शिवसैनिक आणि त्याच्यामागे प्रकाशमान झालेला हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा हा पर्याय निवडला गेला, तेव्हा तो नियतीचा केवढा मोठा संकेत होता, याची कल्पना कोणालाच आली नसेल. त्याच संध्याकाळी दिल्लीश्वरांच्या इशार्‍यांवर चालणार्‍या निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा अनाकलनीय निर्णय जाहीर केला. ज्या निवडणुकीत शिवसेनेवर दावा सांगणारा गद्दार खोकेबाजांचा मिंधे गट उतरणारच नव्हता, त्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने इतक्या तातडीने हे उद्योग करण्याची गरजच नव्हती. पण, सुडाने पेटलेल्या कमळीने शिवसेनेला नेस्तनाबूत करण्यासाठी खेळलेली ही विषारी खेळी होती. ती मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या मराठीजनांच्या मनांवर आघात करून गेली, दंश करून गेली. राजकारण करा, निवडणुकीच्या मैदानात हवे तेवढे लढा, पण सत्तेसाठी कोणत्या पातळीवर जाल? राज्यातल्या मराठीजनांसाठी आणि नंतर देशभरातल्या हिंदूंसाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेला ‘शिवसेना’ हा एक चार अक्षरी महामंत्र होता. तोच गोठवण्याचा नीचपणा करण्याइतके अधम झालात? कमळीचे ठीक आहे, ती तर बोलून चालून परकीच होती; पण, ज्या शिवसेनेने या गद्दारांना रस्त्यावरून सत्तेत पोहोचवले, रंकांचे राव केले, त्या शिवसेनेचे नाव गोठवले जात असताना यांच्यातल्या एकाही मिंध्याच्या मनाला काही लाजलज्जा शरम वाटली नसेल का?
शिवसेनेला संपवण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा तेव्हा शिवसेना दुप्पट जोमाने उसळी घेते, हा इतिहास मिंधेही विसरले आणि त्यांचे मालकही विसरले. शिवसेना हे नाव गोठवण्याची घृणास्पद कृती महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. शिवसेनेने दिलेल्या चिन्हांच्या पर्यायांपैकी मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आणि ‘मार्मिक’च्या दीपावली अंकाचे मुखपृष्ठ आणखी अन्वर्थक बनले, त्या मशालीने शिवसेनेची पुढच्या यशाची वाटच उजळवली.
शिवसेनेच्या रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरीची विधानसभेची जागा लढवणार्‍या ऋतुजा लटके यांच्या वाटेत काटे पेरण्याचा प्रयत्न झाला. तिथे मिंधे सरकार तोंडघशी पडले. खरेतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हरकत नव्हती. पण, भाजपला इथे आपली ताकद आजमावण्याची दुर्बुद्धी सुचली. कोणा मुरजी पटेल यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली गेली. शिवसेना मुरजीला घरची वाट दाखवायला सज्ज झाली. महाविकास आघाडीतले सगळे पक्ष तर शड्डू ठोकूनच उभे राहिले. त्याचबरोबर शिवसेनेशी ज्यांचे कायम वितुष्टाचे संबंध राहिले त्या लालभाईंसह अनेक समाजवादी नेत्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी, विचारवंतांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरवण्याच्या वल्गना करणार्‍या कमळीला अंधेरीत आपल्या डोळ्यांसमोर केवढी अंधेरी येईल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तो केवढा मोठा अपशकुन ठरेल, याची कल्पना आली. मग, महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देणारी पत्रे लिहवून घेण्यात आली- सतत महाराष्ट्राच्या ताटातले घास गुजरातला भरवण्याच्या नादात या गुजरातसेवकांना मराठी संस्कृतीचा विसर पडला असल्यास त्यातही काही आश्चर्य नाही म्हणा- मग त्या पत्रांचा मान राखून माघारीचे नाटक वठवण्यात आले. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्यात आली… पण तीही सव्वा लाखापर्यंत कुठे पोहोचली. ऋतुजाताईंच्या विरोधात ‘नोटा’ उतरवण्याचा हिणकस प्रयत्न झाला. त्याला जेमतेम १२ हजार मते पडली. वर आशिष शेलार वल्गना करतात की, आम्ही निवडणूक लढवली असती तर लटके जिंकल्याच नसत्या. जिंकण्याची एक टक्का शक्यता असती तरी भाजप किती हिरीरीने निवडणुकीत उतरली असती, केवढे रान पेटवले असते, केवढा आव आणला असता, खुद्द पंतप्रधानही कसे इथे येऊन प्रचाराचे भाषण ठोकून गेले असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा आता उगाच बेटकुळ्या काढून कुणाला दाखवता?
दिवाळीच्या सुटीनंतर ‘मार्मिक’ पुन्हा वाचकांच्या सेवेत नवी सदरे, नवे विषय घेऊन रुजू होत असताना मशाल धगधगली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पहिला विजय नोंदवला आहे. ही मशाल यापुढेही अशीच धगधगत राहणार आहे. तिचे चटके सत्ताधार्‍यांच्या बुडाला बसू लागले आहेत, म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभांना परवानगी नाकारणे, नेत्यांना, उपनेत्यांना स्थानबद्ध करणे असले मोगलाईला शोभणारे धंदे मिंधे सरकार करू लागलेले आहे.
या मिंध्यांनी नेमक्या कोणत्या हिंदुत्वासाठी कमळीची कास धरली, ते त्यांच्यातल्याच बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात लागलेल्या कलगीतुर्‍यामुळे सगळ्या महाराष्ट्राला समजले आहे. हे हिंदुत्वासाठी तिकडे गेले, असे समजण्याइतका महाराष्ट्र कधीच खुळा नव्हता. यांनी स्वत:च कमरेचे फेडून दाखवले आणि उरलासुरला संशयही फिटवला. यांच्यात एकाचा पायपोस दुसर्‍याच्या पायात नाही. त्यात १७ ठिकाणचे पाणी पिऊन आलेले हे ‘निष्ठावंत’ सांभाळणे आणि निवडणुकीत त्यांना जागा देणे भाजपला परवडणारे नाही. त्यातून अंतर्गत असंतोषाचा स्फोट होऊ शकतो. ही धोंड झटकून टाकण्यासाठी योग्य वेळी पत्रबहाद्दरांना सोबत घेऊन नवी मांडणी करून मध्यावधी निवडणुका घेण्याचा घाट घातला जाण्याची दाट शक्यता आहे.
कधीही निवडणुका घ्या, राज्यात घ्या, मुंबई महानगरपालिकेत घ्या, कुठेही घ्या. प्रत्येक मराठीजनाच्या हृदयात पेटलेली आमची मशाल तुमच्या दिवास्वप्नांना चूड लावायला सज्ज आहे. या मैदानात!

Previous Post

नया है वह…

Next Post

शिवसेना स्थापनेपूर्वीचा महाराष्ट्र!

Next Post

शिवसेना स्थापनेपूर्वीचा महाराष्ट्र!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.