• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डोंगार बिंगार

- सई लळीत (विचारवंतीण)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 7, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

मी रुटीनला कंटाळून चार दिवस कुठे फिरायला गेले की दोन दिवसानंतर मला आठवतं ते आपलं प्रिय, अतिप्रिय रुटीन..!
खरं तर विंदा करंदीकरांच्या त्या प्रसिद्ध कवितेतल्या ओळी- तेच ते… आणि तेच ते- अगदी खर्‍याखुर्‍या वाटायला लागलेल्या असतात. काय साला आपलं लाइफ आहे… किती बोअर जगतोय आपण.. वर्षानुवर्षे तीच ती कामं.
घराची साफसफाई, बाजारहाट, चहा, नाश्ते, जेवणीखाणी. उरलं सुरलं बघा. दुसर्‍या दिवशी खपवा. कट्टे धुवा. फ्रिज साफ करा. दळणं काढा. टोके, दगड धोंडे निवडून बघा. कपडे वाळत टाका. घड्या करा. कपाटात लावा. त्यात परत क्लिनिक सांभाळा… डोकं फिरायची वेळ येते. कोथिंबीर किंवा मेथी निवडताना किंवा रव्याला कीड लागली की हे खूप फील होतं… यू नो!
मग घरात जरा आरडाओरडा करुन, नवर्‍यावर अरसिकतेचे, अहौशीपणाचे आरोप करुन, नंतर मोठ्या उत्साहात बॅगाबिगा भरुन खरं तर आपण घराबाहेर पडलेलो असतो.
दोन दिवस तसे छान बरे उत्तम जातात. सकाळी उठून चहा नाश्ता तयार मिळतो. मग इस्त्रीचे कपडे चढवून कौतुकाची नजर लेवून नुस्तं फिर्रत बसायचं असतं. वेगवेगळी ठिकाणं वेगाने पूर्ण करायची असतात. फोटो काढायचे. काढून घ्यायचे. हसायचं. मार्केटं ढुंढाळायची. अत्यंत मौलिक अशी खरेदी करायची (फक्त काही तास जाणवणारी). काही बघायचं राहिलं नाही ना… हे नीट तपासून बघायचं. एक प्रकारे पोर्शन पुरा करायच्याच मागे असतो आपण…!
म्हणजे कामापासून सुटका म्हणून आपुन फिरायला बाहेर पडतो आणि तिथे गेल्यावर फिरण्याच्या कामात परत स्वत:ला जुंपून घेतो. आपुन निरुद्देश आरामात रिलॅक्समधे फिरायला कधी शिकणार आहोत कोण जाणे. मी त्या दिवसाची वाट बघतेय. आपुन खोटं नाय बोलणार.
अशा तर्‍हेने दोन दिवस बर्‍यापैकी गडबडीत, मजेत, उत्साहात थकवणारे जातात. तिसर्‍या दिवशी आपल्या घरातील हॉलमधला गरगरणारा पंखा, आपल्याला हवी तशी आणि तेवढीच जाड मऊ उशी आणि गवती चटई दिसायला लागते. कट्ट्यावर विराजमान असलेला गोड थंड पाण्याने भरलेला माठ दिसायला लागतो. वाटतं… लगेचच उडत उडत जावं आणि घशात तांब्याभर पाणी ओतावं.
तिथल्या मार्केटमधले ताज्या भाज्यांचे ढीग दिसले की कधी एकदा भाज्या चिरून फोडणीला घालते असं होतं. पीठ भिजवून पोळ्या करणे. कुकर लावणे. ताक करणे. खोबरं खोवणे. किती मस्त मजा (जुन्या भाषेत मौज) असते… हॉटेलमधल्या जेवणनाश्त्याचा कंटाळा यायला लागतो. एकंदरीत तिसरा दिवस निर्णायक ठरतो. घराची खूप आठवण यायला लागते.
आरामात पहिला, दुसरा, तिसरा चहा घ्यायच्या जागा आठवायला लागतात. आपल्या स्टाईलचं जेवण (ज्यात सासरचे, माहेरचे, आजोळचे, आपल्या प्रांताचे, जातीचे धर्माचे- नाही म्हटलं तरी जीन्स मिसळलेले असतात… मला वाटतं… रक्तात सापडणार नाहीत एवढे जीन्स आपल्या आहारात मिळतात) आपणालाच भुरळ पाडायला लागतं. शिळ्या पोळीचा खमंग चिवडा आणि दही, लसणीची फोडणी घातलेला भात आणि पोह्यांचा पापड दिवसा ढवळ्या स्वप्नात यायला लागतो.
आपण आरामशीर बसून टीव्ही बघतो ती जागा. झाडं झुडपं, तुळशीजवळची दिवाबत्ती, मांजर, कुत्री सगळ्यांची अशी तीव्रतेने आठवण येते की चौथ्या दिवशी सकाळपासूनच आपुन निरवानिरव करायला लागतो. अजून दोन दिवस फिरायचे आहेत असं म्हटलं तर आपणाला ती काळपट पाण्याची शिक्षा वाटते.
पुलंनी म्हटलंच आहे की या जगात बघण्यासारखं आहे कोण तर माणूस. माणसाशिवाय या जगात बघण्यासारखं आहेच काय?
मला ते अगदीच पटलंय. आपुन या जगात काय काय बघितलं नाही, याची खंत या वाक्याने पार धुवून गेलीय. लंडन बघायचं राहिलंय.. तिथलं वॅक्स म्युझियम बघायचं राहिलंय. थेम्स नदी राहिलीय… राहू दे… माणूस बघितलाय ना… बस झालं मग..!
आणि खरं आहे हे…! तुम्ही दोन दिवस कुणाशीच बोलला नाहीत, हसला नाहीत, तर तुमचं कितीही ऐश्वर्य असू देत ते तुम्हाला खायला येतं आणि म्हणूनच समाज हा आपल्या निरोगी मनासाठी सर्वश्रेष्ठ आहे. समाज नावाचा अ‍ॅप सगळ्यांनी डाऊनलोड करुन घ्या! त्याशिवाय विलाज नाही.
हल्ली, म्हणजे साधारण या दहा वर्षांत सगळ्यात जास्त मनोरुग्णांची संख्या वाढत चालली आहे… आणि कायम जिवंत माणसांशी प्रत्येक्ष बोलत राहाणं, काहीतरी काम उत्साहाने करत राहाणं हा त्यावरचा ठोस इलाज आहे. मग हार्मोन बिर्मोन व्यवस्थित टायमात योग्य प्रकारे सिक्रेट होत राहतात आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या फिट ठेवतात. त्यामुळे माझ्याकडे सगळं आहे, मला कुणाचीच गरज नाही, समाज गेला उडत असं म्हणून तुम्ही समाजाला फाट्यावर मारायला जाल, तर मग हार्मोन सिक्रेट होण्यासाठी तुम्हाला गोळ्या घेत राहाव्या लागतील… आणि एक दीर्घकालीन गुंतागुंत तयार होईल. असो. आपुन आपलं तुम्हाला सावध करण्याचं काम केलं. नायतर तुम्ही म्हणाल ही काहीच बोधपर असं सांगत नाही. हिच्या लेखांमध्ये घेण्यासारखं काहीच नसतं. निस्त्या फुलबाज्या असतात.
पण तुम्ही काहीही म्हणा मौजमजा औटघटकेचीच असते. भरपूर काम केल्यावर ओसरीत भिंतीला टेकून तासभर बसण्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला सांगते, चॉपरमधे बसून मिळू शकत नाही. म्हणूनच आमदार बिचारे पंचतारांकित हॉटेलमधे राहिले… कसे दिवस ढव्ाâलले असतील त्यांनी, या गोष्टीचा कोणीच विचार करत नाहीये. लाखमोलाच्या नव्हे, अब्जावधी मोलाच्या रुटीनला ते मुकले आहेत… लाखमोलाचं रुटीन आपल्या सामान्य माणसांचं असतं. सगळ्यांना वाटतंय की ते मजेत राहिले असतील… मसाज, स्टीम, हवं ते खाणं, गाण्याच्या भेंड्या नुसती जिवाची गुवाहाटी केली…! आसामच्या मुख्यमंत्र्याला पण वाटलं असेल की साला भेंडी आपुन मुख्यमंत्री असून एवढी मजा करायला भेटली नाय कधी… तेवढी हे करतायत..! साला भेंडी खेळून पचास सालं मागे पडली… एक गाणं नाय आठवत कधी वेळेवर… आणि हेंचा रियाज होवून राहिलाय दररोजच! हेंच्यातले कोणी उद्या हिंदी सारेगमपमध्ये चमकले तर आमचं नाव तरी घेतील काय? आँ? मी इकडे राज्य पुरात बुडायची वेळ आली तरी हेंच्या हॉटेलला आधीमधी भेट देतोय, तेचं हृयेंना काय कौतुक नाही. आणि मी गेलो की मुद्दाम मराठी गाणी म्हणताहेत. खॅ खॅ हसताहेत.
पण बाबा रे किंवा सायबानु ते मजा करुन नव्हते राहिलेय. मजेत आहोत या अ‍ॅक्टिंगला कंटाळले होते सगळे..! मला माहितेय ना… मसाज करून घेताना परिस्थितीच्या ओझ्याखाली रगडून घेतल्याचा भास झाला असणार. स्टीम घेताना जादाच्या वाफेने जीव होरपळून गेला असणार. भेंड्या खेळताना मजेत असूनही साधं म चं गाणं आठवेना. आठवलं तर आवाज फुटेना. धड चाल सुचेना. मग प्रत्येक जण संगीतकार झाला आणि सुचेल ती चाल रेकू लागलाय, असं झालं असणार… इटंबला असणार त्यांचा जीव त्या भेंड्यांना.. आता तुम्ही म्हणाल तुला कसं कळलं? तर ती जजमेंट असते एक प्रकारची. ती तुम्हाला सांगून कळणार नाय..!
आपल्यासाठी आठवणीने केलेली भाजी किंवा आपला उपास आठवणीने लक्षात ठेवून घरात केलेलं अत्यंत साधं जेवण किंवा उपास सोडताना केलेला आंबेमोहर तांदळाचा भात, केळीच्या पानावरची पंगत, आवर्जून केलेलं गोडधोड. कसं बेजवार असतंय सगळं..! घरचा साधा पिठलंभात असेल… किती छान लागायचा? आणि इथे काल पिठलं दिलं होतं… छ्या छ्या ..चीज किसून घातलं होतं त्यात… असं झालं असणार!
अशा किती गोष्टींनी गदगदून आलं असेल त्यांना (येत नसेल तर यायला हवं. माणूस म्हणून ते आवश्यक आहे)… रोज आपण किती लोकांना भेटायचो, बोलायचो, खिदळायचो. किती लोकं आपल्या मागे मागे असायची. साहेब साहेब साहेब साहेब गुंजारव सुरु असायचा. लहानपणापासूनची मित्रमंडळी.. एकत्र लढलो.. आंदोलन केली.. मार खाल्ला.. मार दिला. खुन्नस दिली. गळ्यात गळे घालून रडलो… आणि सगळे म्हणताहेत आम्ही फायु स्टारच्या हॉटेलमदे मजा मारतोय म्हणून..! आमास्नी नॉस्टॅल्जीक व्हायला होतंय! आम्हाला मराठी माणसांची मनं पेटवणारी आंदोलनं आठवताहेत!
कष्टाच्या चटणी भाकरीची चव फुकटच्या श्रीखंड पुरीला नसते किंबहुना ही श्रीखंडपुरी ही आम्हाला आळसावून बोजड करुन ठेवतेय.
बापूंच्या मनात कायतरी वेगळच शिजतय. अरे आपुन सहज म्हटलं.. काय डोंगार काय झाडी काय हाटील… तर हे महाराष्ट्राचं लोकगीत बनून राहिलंय. काल बायकू म्हणाली, पण आता हेच्या तेच्या मागे धावण्यापक्षा तुम्ही गाणीच लिवा. तुमच्यातल्या कलाकाराला जागा करा. पुरे झाली तुमची आमदारकी. वर्षाला चार अल्बम झाले तरी आरामात जल्म जातोय आपला!
आता बापू तिला सांगा समजावून तळागाळातल्या शेवटच्या माणसासाठी मला राबायचं आहे. माझ्या कामाचा ठसा उमटवायचा आहे. बाकी सर्व ठीकच म्हणायचं. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढ्या घडामोडी चालल्या आहेत की राजकारणावरच्या सिनेमात पण एवढ्या ट्विस्टी येत नसतील. मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी खाल्ला म्हणून न्युज चॅनेलवर ब्लेम केला जातोय.. पण घटनाच एवढ्या घडतायत की श्वास रोखला जातोय..! मालिकांमधले ट्विस्ट गुळचट मेणचट वाटायला लागले आहेत! मेली ठेचेवर ठेच लागणं सुरुच आहे.
राजीनामे घेतले जाताहेत.. मागितले जाताहेत. बंडं केली जाताहेत.. करुन घेतली जाताहेत. आरोप होताहेत. प्रत्यारोप होताहेत. गेम होताहेत. नेम साधले जाताहेत. गेम करणार्‍यांना आपला पण गेम होतोय हे उशीरा लक्षात येतंय. चटके दिले जाताहेत. देता देता स्वत:लाही बसताहेत. राजकारण असं मोठ्या रांजणात भरुन रवीने उभ्याने घुसळलं जातंय. साध्या वहीवरचं चित्र बघता बघता मोठ्या कॅनव्हासवर जावं… तसंच काहीसं झालंय. आमचा हा प्रिय महाराष्ट्र केवळ प्रगतीपथावर नव्हे तर नैतिकदृष्ट्याही उच्चपदावर राहावा असं वाटतंय, कारण महाराष्ट्र हा केवळ वीरांची भूमी नाही, तर जगाला डोळस आध्यात्मिक बैठक देणार्‍या संतांची भूमी आहे.
बाय द वे… बंडखोरी करणार्‍या प्रत्येक आमदाराला आत्मचरित्र कंपलसरी लिहायला सांगायला हवे, असं माझं वैयक्तिक खाजगी मत आहे. म्हणजे चित्तथरारक मजकूर वाचायला गावेल असं वाटतंय. तुमचं काय मत?

Previous Post

स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स… चायनीज तरी हेल्दी

Next Post

सूत्रधार नामानिराळा

Next Post

सूत्रधार नामानिराळा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.