□ योगी आदित्यनाथ थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरला धडकला पक्षी.
■ आता पक्ष्याच्या घरट्यावर बुलडोझर चालणार.
□ ५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो सांगून ठाकुर्ली-चोळेगाव येथे ५६ लाखांचा चुना लावून पुजार्यासह सहाजण फरार
■ पाऊस पडलाच, पण पुजार्यावर आणि साथीदारांवर… ५६ लाखांचा.
□ कुणाच्या ताकदीशिवाय शिंदे हे धाडस करणार नाहीत – एकनाथ खडसे
■ ती महाशक्ती सगळ्यांना माहिती होती… आता खुराड्यातून बाहेर येऊन कॉक कॉक पण करायला लागली आहे.
□ …तर बंडखोर आसामला का जाऊन बसले? – शरद पवार
■ इथे शिवसैनिकांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना दाखवायला तोंड आहे का?
□ सत्तेचा प्रस्ताव आल्यास विचार करू – मुनगंटीवार
■ मांजरी डोळे मिटून आइस्क्रीम खातायत.
□ बंडखोर १४ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा. कुटुंबीयांना संरक्षण द्या. राज्यपालांची मागणी
■ बिचार्या काश्मिरी पंडितांचं एवढं भाग्य नाही… त्यांचा उपयोग फक्त राजकारणापुरता… बाकी कायमस्वरूपी वार्यावर.
□ मोबाइलमुळे मुले हिंसक बनली आहेत का? कोरोनाकाळात वाढले मोबाइल वापरण्याचे प्रमाण
■ मोबाइलवर बिल कशाला फाडायचं? मोबाइलवर त्यांना काय पाहायला मिळतं ते चुकीचं आहे ना?
□ मोफत रेशन योजना बंद होणार. केंद्र सरकारला आर्थिक भार सोसवेना. ८० कोटी नागरिकांना फटका.
■ हळुहळू सगळ्यांना भिकेला लागायचं आहे… पैसा फक्त दोन मित्रांच्या मुठीत राहणार.
□ प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही – नरेंद्र मोदी
■ तुम्ही डीएनएबदलाचं ऑपरेशन केलंय की काय!
□ आसाममध्ये २८ जिल्ह्यांना महापुराचा वेढा. राज्यात पावसाचे ११८ बळी.
■ सामान्य माणसं मरोत हो हवी तेवढी; आमचे ‘मौल्यवान’ आमदार सुरक्षित आहेत ना, मग झालं.
□ चीन सिंथेटिक ड्रग्जचे सेंटर. मेक्सिको सेल्समन. ग्राहक म्हणून दोघांचे टार्गेट भारत.
■ तीच सगळी गुजरातच्या बंदरात उतरतात काय?
□ राजकारणात ‘शॉर्टकट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मुर्ख बनवले जाऊ शकत नाही – नितीन गडकरी
■ हे ज्यांना सांगताय, त्या सत्तामदांधांना सांगून काही उपयोग नाही गडकरी साहेब!
□ १०० कोटींपेक्षा जास्त पैशांचे आमिष दाखवूनही मी गेलो नाही – औरंगाबादमधील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा गौप्यस्फोट
■ पक्षनिष्ठेची किंमत पैशांमध्ये करणं हे आईचं दूध विकण्यासारखंच आहे.
□ देशात फक्त एक टक्का लोक शास्त्रीय संगीत ऐकतात – राधा मंगेशकर
■ पण, ते सुस्थापित असतात, सुरश्रीमंतही असतात. त्यामुळे शास्त्रीय संगीताला बरकत असते.
□ धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदे यांच्या बंडावर नाराज.
■ अधर्मवीरांनी धर्मवीरांचा वारसा सांगितल्याने व्यथित झाले असतील ते.
□ आणीबाणीचा भयंकर काळ विसरू नका – नरेंद्र मोदी
■ तुम्ही विसरू द्याल तर विसरतील ना लोक? ती बरी होती, असं म्हणायची वेळ आली आता तुमच्या राज्यात.
□ पंतप्रधान मोदी त्यांच्या मित्रांना देशातील विमानतळ ५० वर्षांसाठी चालवायला ‘दौलतवीर’ करीत आहेत, तर तरुणांना चार वर्षांच्या कंत्राटावर ‘अग्निवीर’ करीत आहेत – राहुल गांधी यांची टीका
■ त्या विमानतळांवर सुरक्षा कर्मचारी नकोत का नंतर? यालाच म्हणतात मित्रप्रेम आणि दूरदृष्टी.
□ अन्य पक्षात वाल्या, भाजपमध्ये गेल्यावर वाल्मिकी – अजय चौधरी
■ भ्रष्टाचाराला आपल्यातच सामावून घेऊन ते भ्रष्टाचारमुक्ती साधत आहेत.
□ बोलण्यासारखे काही नाही म्हणून फडणवीसांचे मौन – चंद्रकांतदादा पाटील
■ आता बोलू लागतील घडाघडा.
□ इस्लाम, ख्रिस्ती धर्म राजकीयच! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
■ हिंदू धर्म तसा नव्हता, तो आता तुमच्याच अनुयायांनी बनवायला घेतलाय.