□ मोदी स्वत:च्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत?- भाजपच्या ‘ऑपरेशन बंगाल’वरून ममता बॅनर्जी भडकल्या.
■ ममतादीदींनी पंतप्रधान पदाचा आदर राखावा, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टिप्पणी करू नये, असेच कोणाही सुजाण माणसाला वाटेल हा हल्ला पाहिल्यावर… पण, मुळात आपल्या पदाचा सर्वात आधी आपण आदर राखायचा असतो. पचास करोड की गर्लफ्रेंड, टपोरी छाप ‘दीदी ओ दीदी’ अशी वक्तव्यं करणार्या मोदींच्या बाबतीत सुजाणांचीही पंचाईतच होते.
□ मुंबईकरांना १६ टक्के मालमत्ता करवाढीचा झटका.
■ मुंबईत चोहीकडे अनावश्यक आणि भानगडबाज विकास सुरू आहे, तो दिसतो आहे ना? त्यासाठी पैसे कुठून आणणार? लाडक्या उद्योगपतींच्या घशात सगळी मुंबई घालायची आहे, तीही कमीत कमी पैशांत, मग कोणीतरी किंमत चुकवायलाच हवी ना!
□ लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट; नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला.
■ या योजनेला भुलून या अपात्र सरकारच्या पदरात मतांचं दान घालणार्यांत दलित आणि आदिवासी बहिणीही असतीलच ना! आपण आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेत आहोत, हे त्या बिचार्यांना तेव्हा कळलं नाही, यापुढे तरी त्यांना आणि इतर बहिणींना ते कळो!
□ शिंदे, अजितदादा जनतेशी संवाद साधण्यात कच्चे – फडणवीस.
■ चींटी के पर निकल आये, म्हणतात याला… रेकून रेकून खोटं बोलण्याला जनसंवाद म्हणत नाहीत. शिंदेंनी स्वत:वर आता मिंधेगिरीचा शिक्का मारून घेतला असला तरी त्यांचा जनतेशी काही एक प्रकारचा कनेक्ट आहेच. अजित दादा हे तर ग्रामीण ढंगाचं फर्डं वक्तृत्त्व लाभलेले लोकनेते आहेत. कधीतरी दोघे मिळून या जनसंवादकौशल्याची गठडी वळून नागपुरात पार्सल करतील, तेव्हा कळेल.
□ बीडमध्ये सहा महिन्यांत शंभर शेतकर्यांनी गळफास घेतला….
■ आता केंद्र सरकारने मोजदाद थांबवली आहे म्हणे… उगाच कशाला सरकारच्या आरत्या ओवाळणार्यांचा उत्साहभंग करणारा आकडा नोंदवून ठेवायचा… शेतकरी संपत जातील तशी जमीन विकासासाठी मोकळी होईल, जी काही अन्नधान्याची गरज असेल, ती भागवायला दोन मालकांची कॉर्पोरेट शेती सुरू होईलच की!
□ पावसात केईएमही तुंबले – यापुढे असे होता कामा नये, हायकोर्टाने सहाय्यक डीनना बजावले.
■ आता डीन काय बादल्या घेऊन पाणी उपसा करतील? सगळ्या मुंबईचा अनावश्यक काँक्रिटीकरणाने सत्यानाश केलेला आहे. सगळीकडे पाणी साचतंय. उद्घाटनानंतर १५ दिवसांत पाणी साचण्याचा विक्रम मेट्रोने केला आहे. त्यात केईएम तुंबलं तर त्यात काय आश्चर्य?
□ अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही – महायुती सरकारची जाहीर कबुली.
■ कोणत्या ठिकाणी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते या ठिकाणी?- जनतेचा प्रश्न… असायला हवा खरंतर… पण ती उदासीनतेची, व्हॉट्सअपज्ञानातून पेरलेल्या विखारी नशेची झालर पांघरून स्वस्थ बसलेली आहे…
□ महायुती सरकारचा भेदभाव – युवा धोरण आढावा समितीत विरोधी पक्ष आणि महिला आमदारांना डावलले.
■ ईव्हीएमच्या खेळाने गलितगात्र करून टाकलेल्या मूठभर विरोधकांचीही इतकी धास्ती वाटते की मुळातच वृत्ती इतकी कोती आहे?
□ सोबत आले तर ठीक, अन्यथा स्वतंत्र लढू – अजित पवार व मिंधेंना भाजपचा इशारा.
■ कसेही लढा, एकेक उमेदवार स्वतंत्र उभा करून लढा; नंतर परसात बांधलेले दोन कुत्रे सोडून कोणालाही आपल्यात आणता येतंच, ही मस्ती बोलते आहे…
□ अडीच हजार लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी.
■ वर सत्तेत बसून लाडके भाऊ खोकेच्या खोके जिरवतायत, मुरवतायत, हजारो स्क्वेअरफुटांचे बंगले बांधतायत, शेकडो कोटींची हॉटेलं विकत घेतायत, बहिणींना दीड हजाराचा मोह सुटला तर त्यात काय विशेष?
□ सर्वोच्च न्यायालयाने तडाखा देताच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीएवर नामुष्की; ठाण्यातील १४ हजार कोटींच्या निविदा रद्द.
■ शिंदे आपल्या घरातून चालवतात का एमएमआरडीएचा कारभार? गेले सरकार असो की आताचे सरकार- मुख्यमंत्रीपदावर कोणीही असला तरी सरकारच्या खर्या नाड्या कुणाच्या हातात होत्या, हे सगळ्या जगाला माहिती होते. तेव्हा घोळ घालू द्यायचे आणि आता ते उघडकीला आणून स्वच्छतेचा आव आणायचा, हे निव्वळ राजकारण आहे…
□ मोदींचा मित्र पुतीन पाकिस्तानच्या पाठीशी; पाकड्यांना रशियाचा २२ हजार कोटींचा बुस्टर.
■ मोदींचे मित्र असं म्हटल्यावर हे सगळे लोक तोंडावर हात ठेवून फसफसून हसत असतील कदाचित… मोदींच्या मांडीवर बसलेल्या चिमुकल्या गोदी मीडियाला पप्पा सांगतात ते सगळं खरं वाटतं… त्यांनी सांगितलं हे सगळे माझे मित्र, मला विश्वगुरू मानतात, त्या इवल्याश्या मेंदूच्या मीडियाने तेच खरं मानलं… भक्तांचा तर मेंदूशी काही संबंध नसतोच…
□ ईडीचे ओडिशा येथील उपसंचालक रघुवंशी यांना २० लाखांची लाच घेताना अटक.
■ ओडिशामध्ये ईडीने काही महाकांड घडवलेले नाही. जिथे यांचे थैमान सुरू आहे तिथे काय रकमांचे व्यवहार असतील? बेंबट्या, मोज बोटे. कर हिशेब!