मोखाडा तालुक्यातील तीव्र उताराच्या डोंगररांगा. पूर्वी घनदाट जंगलं होती तिथे. आता बरीच विरळ आणि उजाड झाली आहेत ती. वळणावळणाची कच्ची वाट ओलांडून तुम्ही आडोशी गावात पोहोचाल, तेव्हा त्या शांत गावाच्या मातीला काहीतरी वेगळं सांगायचं असेल. उन्हाने तापलेली जमीन, आकाशात फिरणारी घार, आणि अंगावर उन्हाची झळ सोसत पाण्यासाठी चालणार्या बाया, हे चित्र काही वर्षांपूर्वी इथे रोजचंच होतं. पण आज… आज हे चित्र बदललंय. आणि हे बदल घडवून आणले आहेत ‘आरोहन’सारख्या संस्थेच्या समर्पित प्रयत्नांनी आणि आडोशीकरांच्या आत्मविश्वासाने.
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा भागात आजही पाण्याचे दुर्भिक्ष्य बघायला मिळते. अनेक आदिवासी पाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे पाण्याच्या जटिल समस्येशी लढत असताना, मोखाड्यातील आडोशी गावात काही सकारात्मक घडले. २०१४पूर्वी, आडोशी गावात फेब्रुवारी आला की चिंता सुरू व्हायची, ‘पाणी कसं मिळेल?’ टँकरवर अवलंबून राहणं, त्या टँकरचं वेळेवर येणं-न येणं, आणि त्यातून वाटून मिळणारं पाणी, हा गावाच्या आयुष्याचा एक भाग झाला होता.
बाया पहाटे उठून पाण्याच्या हिशेबात दिवस मोजू लागायच्या. मुलांना शाळेत पाठवणं किंवा शेतात जाणं हे सर्व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असे.या दुष्काळी चक्रातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करावंच लागेल, हे गावकर्यांनी ठरवलं. त्यातून त्यांनी ‘आरोहन’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने केवळ उपाय दिले नाहीत, तर गावकर्यांमध्ये समस्या ओळखून त्यावर स्वतः उपाय शोधण्याची क्षमता निर्माण केली.
ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील पाण्याचा जलस्त्रोतांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २०१४ मध्ये देवबांध नदीवर गाळमुक्त बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा ही केवळ एक संरचना नव्हती– तो गावाचा नवसंजीवनी बिंदू ठरला असे स्थानिक रहिवासी नितेश मुकणे सांगतात.
पूर्वी राज्य शासनाने या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी काही बंधारे बांधले होते. मात्र ते फार काळ टिकाव धरू शकले नाही. आरोहन संस्थेने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विविध प्रकारचे १२ बंधारे बांधले. योग्य पद्धतीने बांधलेल्या बंधार्यामुळे पाणाटंचाईच्या भीषण गर्तेतून ग्रामस्थांची सुटका झाली. बंधार्यांमुळे पाण्याचा साठा वाढला, भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारली, आणि गावातील विहिरींमध्ये वर्षभर पाणी टिकू लागलं. हळूहळू गावकर्यांच्या डोळ्यांमध्ये आशेचे झरे वाहू लागले. यासाठी आरोहन संस्थेच्या प्रा. अंजली कानिटकर आदींनी अथक परिश्रम घेतले होते.
पाण्याचा साठा वाढल्यानंतर पुढचा टप्पा होता त्याचा योग्य वापर करण्याचा. ‘आरोहन’ने २०२०-२१मध्ये ५.३ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जेवर आधारित पाणीउचल प्रकल्प राबवला. आता गावातील शेतकर्यांना वर्षातून दोन वेळा शेती करता येते. माती ओलसर राहते, पेरणी वेळेवर होते आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढते.
या यशोगाथेचा अर्थ केवळ पाणीपुरवठा किंवा पीक उत्पादन नाही, तर तो आहे – स्वावलंबन. गावकर्यांना स्वतःवरचा विश्वास परत मिळतो आहे. उन्हाळ्यात आमच्याकडे सूर्यफूल, कांदा, तूर, उडीद आदी पिके घेता येतात, अशी माहिती मंगेश ठोमरे आणि रामदास थाळेकर या शेतकर्यांनी दिली.
एका प्रश्नाचे उत्तर मिळाले की दुसरा प्रश्न समोर उभा ठाकतो. विहिरींमध्ये पाणी असले तरी ते थेट पिण्यास योग्य नव्हते. त्यात असलेले सूक्ष्मजीव, प्रदूषण यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहिला. ‘आरोहन’ने हे ओळखून गावात जलशुद्धीकरण यंत्रणा (वॉटर फिल्टर) बसवली. आता गावकर्यांना घरच्या घरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळते.
या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे स्थानिकांचा सहभाग. गावकर्यांनी स्वतः पुढाकार घेतला, श्रमदान केलं, आणि निर्णयप्रक्रियेचा भाग बनले. यामुळे कोणताही उपाय बाहेरून लादलेला न वाटता, त्यांचा स्वत:चा वाटला. त्यातूनच कामाची गुणवत्ता, विश्वास, आणि टिकाव वाढला.
आज आडोशी हे केवळ पाणीटंचाईवर मात केलेलं गाव नाही, तर ते एक शाश्वत विकासाचं उदाहरण बनलं आहे. जलसंधारण, सौरऊर्जा, जलशुद्धीकरण, सामूहिक सहभाग, या सगळ्यांची समन्वित सांगड घालणारा प्रकल्प म्हणून आडोशीकडे आज राज्यभरातून पाहिलं जातं.
आडोशीने दाखवलेली वाट केवळ त्यांच्यासाठी नाही– ती महाराष्ट्रातील हजारो छोट्या गावांसाठी प्रेरणा आहे. सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक यांच्यात जर समन्वय साधला, तर कोणताही बदल अशक्य नाही, हे आडोशीने सिद्ध केलंय.