प्रो कबड्डी लीगचे प्रशिक्षक नेमले, उत्कंठा ताणणारी लिलाव प्रक्रियाही पार पडली. यात वर्चस्व उत्तरेच्याच राज्यांचं दिसून आलं. महाराष्ट्राचे कबड्डीपटू पुणेरी पलटण वगळता सर्वच संघांमध्ये शोधावे लागत आहेत. प्रो कबड्डीच्या नकाशावर महाराष्ट्र इतकुसा कसा?
– – –
हाकिस्सा २०१६चा. पुरुषांची विश्वचषक कबड्डी स्पर्धा अहमदाबादमध्ये रंगात आलेली. या स्पर्धेसाठी भारताचा आणि जपानचा सराव जवळपासच सुरू होतं. सरावाच्या वेळी भारतीय संघातील उत्तरेच्या एका युवा कबड्डीपटूचा खेळ पाहून महाराष्ट्राचे एक अर्जुनवीर विलक्षण भारावले, जे त्यावेळी जपानचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी त्याला जवळ बोलावलं. ‘‘असंच खेळत राहा. तुझं भवितव्य उज्ज्वल आहे. व्यावसायिक संघाकडून खेळण्यासाठी प्रयत्न करतोयस ना,’’ असा प्रश्न त्यांनी त्याला विचारला. तिथे जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू मनजित चिल्लरनं ते ऐकलं. तो तिथं आला आणि त्या युवा कबड्डीपटूला सरावासाठी जाण्याचे निर्देश दिले. तो गपगुमान जाताना मनजितनं या अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटूला ऐकवलं की, ‘‘तुम्ही उत्तरेच्या कबड्डीपटूंचं भलं करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही तुमच्या महाराष्ट्राचंच पाहा!’’ काळजाला बाण लागावा, असेच ते मनजितचे कडवे बोल होते. पण, महाराष्ट्राच्या त्या नामांकित खेळाडूनं उत्तर देण्यापेक्षा शांततेचा पवित्रा घेतला. महाराष्ट्राच्या अर्जुनवीराला ते शल्य तीव्रतेनं बोचत होतं. त्यानं महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना घडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू केले. गुणवत्ता शोध मोहीम राबवली. तो उतला नाही, मातला नाही, घेतला वसा टाकला नाही. काही वर्षांतच त्याच्या मेहनतीचं चीज झालं. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय निवड समितीत, प्रो कबड्डीत आणि भारतीय संघात जो काही थोडाथोडका महाराष्ट्र सापडतोय, याचं श्रेय त्यालाच जातं… त्याचं नाव अशोक शिंदे.
कबड्डीचे जन्मदाते राज्य म्हणजे महाराष्ट्र. कबड्डीचा वारू आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नेण्यातलं योगदान हेही महाराष्ट्राच्या शिलेदारांचं. पण तरीही सद्यास्थितीत कबड्डीत महाराष्ट्राचं वर्चस्व दिसून येत नाही. भारतीय संघाची निवड असो, निवड समिती असो, भारतीय हौशी कबड्डी महासंघाची कार्यकारिणी असो किंवा देशातील दुसर्या क्रमांकाची लीग असा गौरव प्राप्त झालेली प्रो कबड्डी लीग असो. महाराष्ट्र कुठे आहे? प्रो कबड्डी लीगसाठी सर्वच संघांनी मार्गदर्शक फळी नेमण्यात आली, यात महाराष्ट्राचा प्रशिक्षक शोधूनही सापडेना. तसंच यंदाच्या १२व्या पर्वासाठीची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यातही महाराष्ट्राच्या खेळाडूंना कमी मागणी होती. याचाच अर्थ प्रो कबड्डीच्या नकाशावर महाराष्ट्र शोधावा लागतोय!
असं का घडतंय? याचं पहिलं कारण म्हणजे उत्तरेचं वर्चस्व. दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड येथील गुणवत्ता जोपासायची, हेच त्यांचं ब्रीदवाक्य. उत्तरेच्या संघांनी प्रो कबड्डीच्या जवळपास सर्वच संघांवर पूर्णत: नियंत्रण मिळवलंय. यात भारतीय रेल्वे आणि सेनादलात चाकरी करणार्या उत्तरेच्या प्रशिक्षकांचा रुबाबही प्रकर्षानं दिसतो. त्यामुळे इकडे, तिकडे उत्तरेचेच खेळाडू-प्रशिक्षक चोहीकडे हे वास्तववादी चित्र दिसतं. कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवायचं राहतं का? अचाट ही गुणवत्ता ही अशीच असते. मागील हंगामात हरयाणा स्टीलर्सनं प्रो कबड्डीचं जेतेपद पटकावलं. राज्यातला शिवम् पठारे या यशाचा शिल्पकार ठरला. यू मुंबाकडून पुण्यातला अजित चौहान चमकला. पण या व्यतिरिक्त राज्यातली गुणवत्ता ही रेल्वेतल्या नोकरीमुळे दिसते. पुणेरी पलटण हा संघ या ‘उत्तरक्रियेत’ अपवाद ठरतो. इथे राज्यातले खेळाडू मोठ्या संख्येनं खेळताना दिसतात. अस्लम इनामदार, पंकज मोहिते, दादासो पुजारी, आदित्य शिंदे इत्यादी खेळाडू लिलावानंतरही टिकलेत, तर गेल्या हंगामात आकाश शिंदे आणि संकेत सावंतही दिसलेले. परंतु बीसी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला पुण्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. काही सामन्यांनंतर रमेश यांनी तडकाफडकी पद सोडताच हा कार्यभार अशोक शिंदे यांनी सांभाळला. यावेळी ते पुण्याचे व्यूहरचना मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतील.
यू मुंबा हा संघ केवळ नावाचाच मुंबईचा. एकेकाळी मुंबईकर रिशांक देवाडिगा, विशाल माने यांनी हा संघ गाजवला. पण त्यावेळी तो आपलासा वाटायचा. आता तसं वाटत नाही. मागील हंगामात प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांनी राज्यातल्या गुणवत्तेला न्याय देत बंगाल वॉरियर्सची उत्तम मोट बांधली. प्रणय राणेनं आपला खेळ आणखी उंचावला. पण बंगालची कामगिरी खालावली, हा शिक्का मारत यावेळी सुर्वे यांनाच डच्चू देण्यात आला.
महाराष्ट्रात गुणवत्तेची वानवा आहे, हे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी खराब असायला हवी. पण तिथंही तशी परिस्थिती नाही. २०२० आणि २०२१मध्ये महाराष्ट्राचा संघ उपांत्यपूर्व फेरीत गारद झाला. २०२२मध्ये हरयाणात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रशांत चव्हाणच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या उत्तरेच्या संघांना निरुत्तर करीत उपविजेतेपदापर्यंत मुसंडी मारली. २०२४मध्ये अहमदनगरच्या राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीत हरयाणाकडून महाराष्ट्राचा संघ हरला. चालू वर्षाच्या सुरुवातीला कटकला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पंजाबनं महाराष्ट्राला हरवलं. या कामगिरीनंतरही महाराष्ट्राचे कबड्डीपटू प्रो कबड्डीच्या मापनश्रेणीत अपयशी ठरतात.
ही स्थिती काही आजची नव्हे, प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासूनची.
निवड समिती, प्रशिक्षक, मार्गदर्शन फळी नेमण्यात धरसोड वृत्ती सोडली, तर महाराष्ट्राची कामगिरी आणखी उंचावेल. पण महाराष्ट्राचे संघटक सत्ता आणि आपला पत्ता, म्हणजेच आपल्या जिल्ह्याची अस्मिता दर्शवेल असा कबड्डीपटू कसा चालेल, यातच धन्यता मानतात. प्रो कबड्डीला पूरक रसद पुरवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे का? मुळीच नाही. गेली अनेक वर्षं महाराष्ट्राली कबड्डी लीग स्थगित आहे, ती पुन्हा जोमानं सुरू करायला हवी. राज्याच्या कानाकोपर्यातल्या खेळाडू, प्रशिक्षकांना हेरण्यासाठी ती फायदेशीर ठरेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे जसं बळ मिळेल, तसंच खेळाडूंना पैसा मिळेल. व्यावसायिक नोकर्या देऊ शकतील, अशा कंपन्यांची संख्या रोडावली आहे. व्यावसायिक स्पर्धांकडे दृष्टिक्षेप टाकला तरी शंकास्पद संघांची आकडेवारी आता वाढल्याचं दिसून येतं. काही महिन्यांपूर्वी राज्य संघटनेनं लीगची घोषणाही केली; पण ती प्रत्यक्षात अवतरू शकली नाही.
सध्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ही कोर्टकचेरीत अडकलीय. तशा अख्ख्या देशभरातील अनेक क्रीडा संघटना कोर्टाच्या पायर्या झिजवतायत. त्यामुळे यात काही वेगळं मानायची गरज नाही. राष्ट्रवादीचीच कबड्डीवर सत्ता आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ठरवलं, तर राज्यातील कबड्डीचा हा वाद संघटनात्मक पातळीवर सुटू शकेल. परंतु हे घोंगडं भिजतच राहिलंय.
कार्यरत संघटक भारतीय कबड्डी महासंघाच्या सभांना केवळ हजेरी लावण्यात आत्मसंतुष्ट होतात. ही मंडळी महाराष्ट्रासाठी भक्कमपणे आवाज का उठवत नाहीत? या प्रक्रियेत महाराष्ट्राला साथ देऊ शकेल अशा काही राज्यांसह एक दबाव गट नक्की तयार करता येईल. जनार्दनसिंह गेहलोत यांच्या मृत्यूनंतर भारतीय कबड्डीची सत्ताही तशीही खंबीर व्यक्तीच्या हाती नाही. चांडाळचौकडींना हाताशी धरून तेजस्वीपणे सत्ता सांभाळता येत नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्रानं ही संधी साधायला हवी. पण राज्य कबड्डीत स्थैर्य हवं. संघटक अंतर्गत लढायांमध्येच मश्गूल आहेत.
तूर्तास, महाराष्ट्राचे जे खेळाडू प्रो कबड्डीच्या लिलाव प्रक्रियेत संघांनी खरेदी केले किंवा कायम राखले त्यांचं कौतुक करू. पण, यातच समाधान न मानता आत्मपरीक्षण जरूर करायला हवं. ते नाही केलं, तर महाराष्ट्र प्रो कबड्डीच्या नकाशावर इतकुसाच असेल.