देशात सर्वात जास्त चहा गुजरातमध्ये प्यायला जातो, असे एका पाहणीत आढळून आलेय, यामागचे कारण काय असावे?
– एक नम्र चहावाला, पिंपळे गुरव
देशाच्या इतर राज्यांत गुजरातपेक्षा कमी चहा प्यायला जातो म्हणून गुजरातमध्ये सगळ्यात जास्त चहा प्यायला जातो, एवढं सोप्पं उत्तर कळत नाही? पण आम्हाला एक कठीण प्रश्न पडलाय, ‘चहावाला आणि नम्र??’ (तुम्ही स्वतःलाच एक नम्र चहावाला असं म्हटलं म्हणून… पण हे लोकांना पटायला हवं ना, चहावाल्याचा अनुभव आहे लोकांना… टपरीवाल्या!)
गेल्या काही वर्षांपासून देशात नमो रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झालेली आहे. या आजारावर नेमकी कोणती लस उपयुक्त ठरेल?
– संजय क्षीरसागर, पिंपरी चिंचवड
तुम्हाला पण या आजाराची लागण झालीय का? कारण या आजारावर कोणती लस उपयुक्त आहे हे आम्ही सांगितलं तर तुम्हाला वाटायचं आम्ही ‘रागा’ रुग्ण आहोत. आणि असं वाटणं हे नमो रुग्णांच हे पहिलं ‘लक्षण’ आहे असं रागा रुग्णांना वाटतं. मग कशाला लस विचारून ‘अवलक्षण’ करून घेताय?
जगातली पहिली अंडरग्राऊंड मेट्रो लंडनमध्ये १८६३ साली सुरू झाली, म्हणजे जवळपास दीडशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी. भारतातली भूमिगत मेट्रो १९८४ साली कोलकात्यात सुरू झाली, म्हणजे ४० वर्षांपूर्वी. मुंबईत असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं असेल मेट्रो बनवणार्यांनी ज्यामुळे पहिल्याच पावसात आत स्टेशनांत पाणी शिरून मेट्रोची सेवाच बंद व्हावी?
– मृदुला जोशी, डोंबिवली
पहिल्याच पावसात स्टेशनात पाणी शिरून मेट्रोची सेवा बंद झाल्यावर ती बातमी बाहेर पडू न देणारं तंत्रज्ञान आणि तरीही बातमी बाहेर पडलीच तर वर तोंड करून या बातमीवर ‘ताडपत्री’ घालणारी टेक्नॉलॉजी १८६३ आणि १९८४ साली होती का? नाही ना! पण आता आहे. नेमकं तेच तंत्रज्ञान आता मुंबईत वापरलं असेल. तेव्हा अशी टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून त्यांनी अशी मेट्रो बनवली नसेल, आता असं तंत्रज्ञान आहे म्हणून आता अशी मेट्रो बनवली असेल. (हे गपचूप वाचा. नाही तर वाचू न देण्याचे तंत्रज्ञान विकसित झालं असेल तर तुम्हाला वाचताही येणार नाही.)
भारताचा मित्र देश रशिया आता पाकिस्तानबरोबर भागीदारी करतो आहे. एकेकाळचे आपले मित्र देश नेपाळ, श्रीलंका, बांगला देश आणि शत्रू पाकिस्तानही चीनबरोबरच्या मैत्रीला सगळ्यात जास्त महत्त्व देत आहेत. मग आमच्या शेजारचे जोशी काका रोज व्हॉट्सअपवर, मोदींमुळे भारताची जगात पत वाढली आहे, असे मेसेज पाठवतायत, त्याचा अर्थ काय समजायचा?
– निनाद चंडोक, जळगाव
जोशी काकांना पत या शब्दाचा ‘अर्थ’ माहित नसावा, किंवा यातून जोशी काकांना ‘अर्थ’प्राप्ती होत असावी, किंवा असं केल्यामुळे जोशी काकांची पत वाढत असावी, किंवा जोशी काका आणि पत यांचा काही संबंध नसावा, किंवा विचार न करता येईल ते फॉरवर्ड करा असं जोशी काकांना सांगितलेलं असावं, किंवा जोशी काकांचं तेच काम असावं, किंवा जोशी काकांना तेवढेच येत असावं, किंवा जोशी काका तिरकस बोलून टोमणा मारत असावेत… अहो कोण जोशी काका? माझी त्यांच्याशी ना ओळख ना पाळख. तुमच्या शेजारी राहून ते का असं करतात तुम्हाला माहित नाही. मी तर कोण कुठला! मग मी कसं सांगणार? अहो, ते देशभक्त असतील किंवा त्यांना देशभक्त बनायचं असेल. त्यांच्या नादात तुम्हाला देशद्रोही बोलून घ्यायचंय का?
पाकिस्तानला मदत करतात म्हणून तुर्कीये आणि अझरबैजान या देशांवर बंदी घालायची, तर पाकिस्तानची थेट पाठराखण करणार्या अमेरिका आणि चीनवर बंदी का नाही घालायची? त्यांच्याबरोबरचा व्यापार का नाही थांबवायचा?
– विकास गोडबोले, ठाणे
यातलं गणित (राजकारण म्हणत नाहीये) समजून घ्या. चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये ज्यांचा बिजनेस असेल त्यांचा तुर्की आणि अजरबैजानमध्ये नसेल. मुळात तुमचा, तुमच्या मुलांचा, जावयाचा अमेरिका आणि चीनमध्ये काही व्यापार आहे का? असेल तर ज्यांच्या मुलांचा आणि जावयाचा व्यापार अमेरिका आणि चीनमध्ये आहे, त्यांच्याशी डिस्कस करून स्ट्रॅटेजी समजून घ्या. आणि नसेल तुमचा व्यापार कुठेच तर कशाला डोक्याला ताप करून घेताय? ज्यांचा व्यापार आहे ते बघून घेतील आपलं नीट चाललंय ना… मग दुनियेला आग लागू दे ना… आपल्याला काय करायचंय?.. सध्या जमानाच तसा आहे म्हणून असं बोललो. तुम्हीही तसंच वागा, नाहीतर तुमच्या इथल्या व्यापारावर बहिष्कार घातला जाईल… अगदी ‘पोळी भाजीचा व्यापार’ करत असलात तरीही… कळलं का गोडबोले साहेब?