• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पालकांनो, तुमची मुलगी करतेय काय?

- मिलिंद धुमाळे (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 5, 2025
in भाष्य
0

आजच्या सोशल मिडियाच्या युगात एक नवा ट्रेंड झपाट्याने पसरताना दिसतोय, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त विधानं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि ट्रोलिंगमधून लक्ष वेधून घेणं. दुर्दैवाने, शिक्षण घेत असलेल्या तरुण-तरुणींना सुद्धा या ‘स्वस्तातल्या प्रसिद्धी’चा मोह आवरत नाहीये.
आपल्या देशात सहिष्णुता आहे की नाही यावर मागे बरीच चर्चा होऊन गेली. आपण फार म्हणजे फारच सहिष्णू आहोत आणि आमच्यावर असहिष्णुतेचा ठपका ठेवणे अत्यंत गैर आहे असं धमक्या शिव्या ट्रोलिंग करत दरडावून सांगितलं जात होतं. सरकारने दिलेले पुरस्कार देशातील महत्वाच्या साहित्यिकांनी परत केल्यावर उठलेल्या वादळाची ती परिणती होती. या घटनेला आता बराच काळ लोटला. परंतु त्यानंतर आपल्या उच्च कोटीच्या सहिष्णुतेच्या खुणा जागोजागी, गावात, गल्लीत राज्याराज्यात झुंडशाहीच्या बळींच्या रूपाने ठळक होत असतात. अशा घटनांनी या सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
त्यात भर म्हणून की काय समाजात नि:स्पृहभावनेने काम करणार्‍या समाजसेवक, लेखक आणि पत्रकारांना या सहिष्णुतेची किंमत गोळ्या खाऊन चुकवावी लागली. त्यावर कहर केला तो सत्ताधार्‍यांच्या आयटी सेलने. अशा पत्रकार लेखकांचे खून पाडल्यावर त्यांना शिवीगाळ करण्याची स्पर्धा सोशल मिडियात सुरू झाली,आणि त्यावर देशाच्या नेतृत्वाने धारण केलेले धृतराष्ट्री दृष्टिमांद्य इतके की या शिवीगाळीवर समाजातून गदारोळ उठल्यावरही नेतृत्वाने अशा समाजविघातक प्रवृत्तीना अनफॉलो केले नाही. फारच निगरगट्ट अन निग्रही मानसिकता यावेळी दिसून आली. कदाचित त्यांना हे सांगायचं असेल की जे काही देशात सुरू आहे ते ठीकच आहे आणि मला असेच तर चित्र देशात हवे होते. तुम्ही कितीही ओरडा, फरक पडत नाही.
मग सुरू झाला एक नवीनच खेळ. ट्रोलिंग, शिव्या, धमक्या, इतर धर्मांची निंदा, यामुळे सोशल मिडियात रातोरात ‘फेमस’ होता येतं, हे लक्षात आल्यावर सगळ्याच लोकांना ही ‘स्वस्तातली प्रसिद्धी’ हवीच होती. त्यामुळे सोशल मीडियात हा एक ट्रेंडच सुरू झाला. काहीतरी वादग्रस्त विधान करायचं. स्वस्त झालेला, दर्जा घसरलेला देशातील मिडिया अशा प्रकारांना वारेमाप प्रसिद्धी देतो, संपादन करणारे आपली बुद्धी अधिकाधिक कॅची लाईन्स देण्यासाठी खर्ची घालतात, जेणेकरून लोकांच्या त्यावर उड्या पडतील. या सगळ्याची लत आता शिक्षण घेणार्‍या, करियर करणार्‍या तरुण तरुणींना देखील लागलेली दिसून येत आहे.
सध्या एक प्रकरण गाजत आहे, शर्मिष्ठा पानोलीचं. ही पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारी तरुणी. तिला शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राममधून अटक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर मुस्लिम धर्माच्या संबंधी आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर आहे. या व्हिडीओनंतर समाजमाध्यमांवर तीव्र वादंग निर्माण झाले. या प्रकरणात न्यायालयाने शर्मिष्ठाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पत्रकार कविश अजिज यांनी सोशल मिडियात माहिती शेअर करत म्हटले आहे की चंदन नावाच्या मुलाने शर्मिष्ठाला भडकाऊ व्हिडीओ अपलोड करण्यास प्रवृत्त केलं होतं. त्याने तिला सांगितलं होतं की, ‘मी सगळं हॅन्डल करीन.’ पण जेव्हा तिचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आणि शर्मिष्ठाबद्दल लोकांमध्ये रोष निर्माण झाला, तेव्हा चंदनने मदत करणे तर दूरच, तिला सगळीकडून ब्लॉक करून टाकलं. ‘माझ्या मुलीचं ब्रेनवॉश करून तिच्याकडून हे सगळं करून घेतलं गेलं आहे,’ असं शर्मिष्ठाचे वडील म्हणाले.
सोशल मिडियावर शेअर झालेली माहिती अशी आहे : शर्मिष्ठाच्या प्रकरणात सर्वात आधी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या तीन इन्फ्लुएंसर लोकांनी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. सुप्रीम कोर्टात काम करणारे एक वकील, ज्यांचं टोपण नाव ‘झा’ आहे, त्याने सुद्धा ‘तो’ व्हिडीओ शेअर करून व्हायरल केला. जेव्हा काल शर्मिष्ठाला अटक झाली, तेव्हा झा यांनी ही केस लढण्यासाठी १७ लाख रुपये रोख रकमेची मागणी केली. शर्मिष्ठाचं कुटुंब थोडंसं संपन्न असलं, तरीही एका दिवसात एवढी मोठी रक्कम उभी करणं शक्य नव्हतं. पुढे आलेले इतर तथाकथित उच्चजातीय वकीलसुद्धा फुकट केस लढण्यास तयार झाले नाहीत. प्रत्येकाने किमान पाच लाख रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून मागितले. या सगळ्या कारणांमुळे शर्मिष्ठाचा बेल अर्ज कमकुवत पडला. अशात, मोहम्मद शमीमुद्दीन नावाचे एक मुस्लीम वकील विनामूल्य केस लढायला तयार झाले. त्यांनी तिचं वय आणि परिस्थिती पाहून दया दाखवली. त्यांना मजबूत याचिका तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, तरीही त्यांनी शर्मिष्ठाला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यश मिळवलं– ज्यामुळे तिला थर्ड डिग्री टॉर्चरपासून वाचवलं. जी शर्मिष्ठा मुस्लिमांना शिव्या घालत होती, त्यांच्यातलाच एक मुस्लिम वकील तिला पोलिसांच्या जाचापासून वाचवायला पुढे आला, हे विशेष.
मी हिचा एक व्हिडिओ पाहिला आणि वाईट वाटलं… आज देशात जे वातावरण आहे त्याला ती बळी पडलेली आहे. ती काही नादान नाही, ती केवळ सज्ञानच नाही, तर कायद्याचेच शिक्षण घेत आहे. पाच वर्षे तिने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. म्हणजे तिचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, तिला कायद्याचे ज्ञान इतरांपेक्षा थोडे जास्त असणार. अशा वेळी आपण काय करावे, काय नाही केले पाहिजे, हे तिला कळत नसेल तर या वयातही तिला पालकांनी ‘समज’ देण्याची आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
ही मुलगी कोणत्याही धर्माचा आदर करत नसल्याचे तिच्या व्हिडिओवरून दिसून येते. तिने हिंदू देव-देवतांनाही अपशब्द वापरले आणि मुस्लिमांनाही. त्यामुळे ती हे कशासाठी करत आहे हे कळायला वेळ लागत नाही. अशाच लोकांचा फायदा राजकीय सौदेबाजी करणारे उचलतात, त्यांना धर्माच्या नावाने भडकावून आपल्या जाळ्यात ओढतात आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतात. मात्र त्यांच्यावर कारवाई झाल्यावर हेच लोक तुम्हाला ब्लॉक करून गायब होतात. जे शर्मिष्ठा केसमध्येही झाल्याचे दिसून येत आहे.
जे लोक ‘हिंदू-मुस्लिम’च्या नावावर एकमेकांशी भांडायला तयार आहेत, त्याच ‘आपल्या’ लोकांनी ती अडचणीत आल्यावर गुन्हा दाखल झाल्यावर १७ लाख रुपये मागितले आणि जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा एका ‘मुस्लिम’ वकीलाने केवळ माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला, हा केवळ शर्मिष्ठाचा मुद्दा नाही – ही एक सामाजिक जाणीव आहे.
पालकांनो, सजग व्हा! तुमची मुलं शिक्षण घेत आहेत, करिअरच्या मार्गावर आहेत. पण ते कुठल्या विचारांच्या प्रभावाखाली आहेत, ते तुम्हाला माहीत आहे का? शर्मिष्ठा एकटी नाही. अनेक तरुण-तरुणी आज अशा ट्रॅपमध्ये अडकत आहेत. जे त्यांना थोडक्यात प्रसिद्धी देतात, पण आयुष्यभरासाठी बदनामीच वाट्याला येते. पालक म्हणून तुमचं हे कर्तव्य आहे की तुमच्या मुलांचं वागणं, विचार, सोशल मिडिया अ‍ॅक्टिव्हिटी यावर लक्ष ठेवा. संवाद ठेवा. समज द्या. कारण एकदा का नुकसान झालं की मग त्याची किंमत फार मोठी असते आणि मदतीला कोणीच येत नाही.
म्हणूनच तुमची मुलं आपलं नाव ‘उज्वल’ करणार असतील, तर त्यांना विचारपूर्वक, माणुसकीच्या मार्गाने चालायला शिकवा. अन्यथा ही सामाजिक अधोगती थांबवणं अशक्य होईल. विचार करा, आपण कुणाच्या राजकारणाचे प्यादे बनत आहोत? ही धर्मांधता फक्त आपल्याला संपवत आहे; मदतीला कोणीच येत नाही! पालकांनी मुलांना अशा ट्रॅपपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना करियर बरबाद करून अशाच मार्गाने आपले नाव उज्वल करावे, अशी पालकांचीच इच्छा असेल, तर मग बोलणेच व्यर्थ आहे.

Previous Post

न सुटणारे ‘जातग्रहण’!

Next Post

विकृत नराधमानंद!

Next Post

विकृत नराधमानंद!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.