• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

त्रिधर्मीय एकतेची नाळ!

- किरण माने (शुद्ध बुद्ध काया... तुकोबाराया! (भाग:८))

Nitin Phanse by Nitin Phanse
June 5, 2025
in धर्म-कर्म
0

‘शुद्ध बुद्ध काया… तुकोबाराया’ हे माझ्या या सदराचे नाव (लोगो) वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काहीजणांच्या ‘भावना’ वगैरे दुखावल्या गेल्या. संत तुकाराम महाराजांचा बुद्धांशी काय संबंध, असं एकदोघांनी कुत्सितपणे विचारलं. आज जातीधर्माच्या अस्मितेवरून अत्यंत गढूळ झालेल्या वातावरणात अशा शंका विचारल्या जाणं साहजिक आहे. पण याच वातावरणात, जातधर्मावरून माणसामाणसांत भेद निर्माण करणार्‍या भवतालात, अशा महामानवांमध्ये असलेलं आपापसातलं नातं जर आपण खोलात जाऊन अभ्यासलं, तर त्यांना श्रद्धास्थान, प्रेरणास्थान मानणार्‍या अनुयायांमध्ये जी दरी निर्माण झालीय ती भरून यायला खूप मदत होईल. ‘हा आमचा-तो तुमचा’ अशा वादांपलीकडे जाऊन, या महामानवांच्या तत्त्वज्ञानात ‘आपलं’, आपल्या जगण्यातलं, आपल्या सगळ्यांच्या हिताचं काय आहे, हे आपण सगळ्यांनी मिळून पाहाणं गरजेचं आहे. तरच हा दुरावा आणि एकमेकांविषयी असलेली नाराजी दूर होईल आणि हा समाज काही महत्त्वाच्या धाग्यांनी जोडला जाईल. जसे हे महामानव एकमेकांमध्ये मिसळून एकरूप झाले होते.
तुकाराम गाथेतल्या एका अभंगात एक वचन आहे… ‘तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध। शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे’ अर्थात, ‘आपल्याला बंधनकारक असलेल्या सर्व गोष्टींपासून संबंध तोडून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर जो शुद्ध आहे त्याच्या जवळ जाऊन आपणही ‘शुद्ध बुद्ध’ व्हायला हवं!’ कसलंही किल्मिष, कसलीही गढुळता, वाईट भावना नसलेल्या, नितळ, निर्मळ, प्रसन्न अवस्थेसाठी तुकोबारायांनी ‘शुद्ध बुद्ध’ हा शब्द वापरला आहे. हे खूप सूचक आहे.
तथागत बुद्धांनी एका उन्नत, उदात्त आणि अतिशय नितळ अवस्थेला बुद्धत्वाशी जोडलं होतं. वरील वचनामध्ये तुकोबाराया नेमक्या याच अवस्थेकडे बोट दाखवत आहेत. माणसाला आयुष्यातलं सर्वोच्च सुख मिळवायचं असेल तर त्यासाठी त्यानं निर्विकार होणं गरजेचं आहे असं तुकोबाराया म्हणतात. कुणाला असे वाटत असेल की ‘यात बुद्धांचा काहीही संबंध नाही,’ तर त्याचे मत त्याच्या ठिकाणी ठेवूनही हे सत्य लपत नाही की बुद्धांनी बहुजनांपुढे जो सर्वोच्च सुखाचा मार्ग दाखवला होता, तोच तुकोबारायांनीही दाखवला!
तुकाराम गाथेत एका ठिकाणी तर संत तुकाराम महाराजांनी बुद्ध आणि विठ्ठल एकच असल्याचा थेट अभंग लिहिला आहे.
बौध्यअवतार माझिया अदृष्टा।
मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।
लोकांचियेसाटी शाम चतुर्भुज ।
संतांसवे गुज बोलतसा ।।
आले कलियुग माझिया संचिता ।
डोळां हाकलिता न पडेसी ।।
म्याच तुझे काय केले नारायणा ।
का नये करुणा तुका म्हणे ।।
…तुझा बुद्ध अवतार मी प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्या अवतारात तू मुखाने मौन धरण्याची निष्ठा धारण केली आहेस.
…लोकांसाठी तू सावळ्या चतुर्भुज रूपात प्रकट झाला आहेस. तू संतांबरोबर गुजगोष्टी करतोस.
…माझ्या नशिबाला कलियुग आले आहे. डोळ्यांनी दूर सारले, तरी तू दूर जात नाहीस.
…तुकाराम म्हणतात, ‘हे नारायणा, मीच तुझे काय केले आहे? तुला माझी करुणा का येत नाही?’
आणखी एका अभंगात तुकोबाराया म्हणतात, ‘कलीमाजी देव बौध्यरूप जाला।’ अशी असंख्य वचनं आहेत, जी आपल्याला या संदर्भात खूप काही सांगून जातात. तथागत बुद्धांचं ‘त्रिशरण’ तर प्रसिद्ध आहे. ‘बुद्धम् शरणम् गच्छामी… धम्मम् शरणम गच्छामी… संघम् शरणम गच्छामी’ बुद्धांना, बुद्धांच्या शिकवणीला आणि त्यांच्या विचारांनी आचरण करणार्‍या संघाला शरण जाणं, या त्रिरत्नांवर विश्वास ठेवणं यासाठी हे वचन आहे. तुकोबाराया एका अभंगात म्हणतात, ‘शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ।।’ हेही खूप सूचक आहे.
देहूजवळ भंडारा आणि भांबनाथ हे डोंगर आहेत. तुकोबाराया या डोंगरांवर जाऊन चिंतन करत. तुम्ही आजही जाऊन पहाल तर त्या डोंगरांवर बौद्ध लेणी आहेत. आजही भंडारा डोंगराच्या उतारावर बौद्ध लेण्यासमोर बौद्ध स्तूप आहे. त्या स्तूपांसमोर जलकुंड आहे. तुकाराम या लेण्यांमध्ये चिंतन, मनन, ध्यान करत असत. ‘बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणऊनी ।।’ असे म्हणत बहुजनांचा उद्धार करायचा निर्णय घेऊन गहाणखतं बुडवून गोरगरीबांची कर्ज माफ करण्याआधी त्यांना याच लेण्यांमध्ये साक्षात्कार झाला होता. हा साक्षात्कार ‘दैवी’ वगैरे नव्हता, तो जमिनीचं भान देणारा होता. तुकारामांनी सावकारीवर पाणी सोडणं आणि बुद्धांनी राजवैभवाचा त्याग करणं, हे साम्यही खूप बोलकं आहे!
तुकोबारायांनी आपल्या अभंगात ‘मौन्यमुखे निष्ठा धरलेल्या’ बुद्धावताराची तुलना विठ्ठलाशी केली आहे. ध्यानस्थ बसलेल्या बुद्धमूर्ती पाहिल्या आणि विठ्ठलमूर्ती पाहिली की तुकोबारायांना नक्की काय म्हणायचं आहे, हे लक्षात येतं. बुद्धांसारखंच संत तुकारामांना प्रखर समाजभान होतं. त्यामुळे अडाणी, अशिक्षित बहुजनांना नाडणार्‍या, लुबाडणार्‍या आणि त्यांना कर्मकांडात, अंधश्रद्धेत गुंतवून त्यांच्या आयुष्याचा घात करणार्‍या लोकांच्या कारस्थानांना दोघांनीही सुरूंग लावला. या कपटी लोकांपासून बहुजनांना सावध केलं. त्यांचा दुष्टावा उदाहरणांसहित दाखवून दिला.
संत तुकारामांना गुरू मानणार्‍या संत बहिणाबाई म्हणतात, ‘कलियुगी हरी। बौद्धरूप धरी।। तुकोबाशरीरी। प्रवेशला।।’ बुद्धांनी सांगितलेली विचारधाराच तुकोबांनी पुढं चालवली आहे, असाच याचा अर्थ निघतो.
ज्याप्रमाणे तुकोबाराया विठ्ठलामध्ये बुद्धाला पहात होते त्याचप्रमाणे ते ‘अल्ला आणि विठूराया’लाही वेगळं मानत नव्हते! आज ‘मुस्लीमद्वेष’ पसरवून समाजमन नासवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असताना हे पाहणंही फार गरजेचं आहे. आज काय गंमत आहे बघा की… हे तीनही विचार एकमेकांत गुंफलेले असूनही विठ्ठल-बुद्ध आणि अल्ला यांना मानणार्‍यांमध्ये मात्र आपल्याला फूट पडलेली दिसते. का होत असेल असं?
मी बर्‍याचदा तुकोबारायाचे अल्लावरचे अभंग काढून समजून घेत बसतो. उर्दू, फारसी आणि मराठी शब्दांनी सजवलेल्या त्या अभंगाचा अर्थ लावणं, हे सोपं काम नाही. पण तो लागला आणि मेंदूत मुरला तर या भेदाभेदाच्या भिंती धडाधडा कोसळतात. एका अभंगात तुकोबाराया म्हणतात,
आवल्ल आल्ला नाम बडा लेते भूल न जाये। इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये।।
अल्ला एक तुं नबी एक तुं। काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये।।
सुनो भाई बजार नहीं सब हि नर चलावे। नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलावे।।
एक तीर नहीं प्यार जीतनकी आस। कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास।।
…अल्ला ‘अव्वल’ म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं नाव घ्यायला विसरू नकोस. वीणा वाजवत त्याचं स्तवन कर.
…तूच अल्ला आणि परमेश्वराची शिकवण माणसांपर्यंत पोचवणारा पैगंबरही तूच. तुझे नाम घेताना हात, पाय वा शिर कापून टाकले तरी भीती वाटत नाही.
…ऐका रे भावांनो, हा माणसांनी भरवलेला बाजार नाही, हा अल्लाचा बाजार आहे. इथे लहान-मोठा, उच्च-नीच असा भेद नाही, सगळे समान आहेत.
…या अभंगाच्या शेवटी तुकोबाराया म्हणतात, ‘एक तीर नहीं प्यार जीतनकी आस। कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास।।’
याचा अर्थ असा की, ‘पैलतीर गाठणं अर्थात मुक्ती-मोक्ष वगैरे मिळवणं हा माझा उद्देश नाही, तर मला फक्त प्रेम जिंकण्याची आस आहे. त्यामुळे ‘मुंडां’नी मला त्यांच्या पायाशी राहण्याचा आनंद घेऊ द्यावा.’
…’मुंडा’ म्हणजे काय? तुकोबाराया एवढं आदरानं नाव घेतात म्हणजे काहीतरी वेगळं असणार. हिंदी सिनेमात प्रेयसी प्रियकराला ‘मुंडा’ म्हणताना खूपवेळा ऐकलंय आपण. पण या शब्दाचा खरा मूळ अर्थ मला मारुती जाधव ऊर्फ तळाशीकर गुरुजींच्या ग्रंथात सापडला. तिथं लिहिलंय ‘मुंडा’ म्हणजे ‘मुस्लीम साधूंचा एक प्रकार’. म्हणजे तुकोबारायांनी त्या ओळीत ‘सूफी संतांच्या पायाशी रहाण्याचा आनंद’ मागितलाय ! सूफींचं अल्लाला साद घालणं, हे वारकरी विठूरायाला हाक मारतात त्याच्याशी नातं सांगणारं आहे.
हिंदू-मुस्लीम एकतेची नाळ किती जुनी आहे बघा. याच अभंगातला ‘अल्ला एक तुं नबी एक तुं। काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये।।’ या ओळीतला आशय तुकोबाराया विठ्ठलासाठीही वापरतात. ‘फुटो हे मस्तक तुटो हे शरीर। नामाचा गजर सोडू नये।।’… किती सुंदर आहे हा मिलाफ! तुकोबारायांच्या या आशयसाधर्म्यामुळं एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे अल्ला आणि विठ्ठल नावं वेगळी आहेत, मुळात ‘तो’ एकच आहे.
‘सूफी’ हा इस्लाममधला असा संप्रदाय आहे, जो आचारविचारांनी आपल्या ‘वारकरी संप्रदाया’शी मिळताजुळता आहे! सूफी हासुद्धा वारकर्‍यांसारखा एकेश्वरवादी संप्रदाय आहे, जो धार्मिक कट्टरतेपासून लांब आहे. कर्मकांड मानत नाही. प्रेम आणि नामस्मरण हीच ईश्वरापर्यंत पोहोचण्याची खरी वाट आहे, असं याही संप्रदायाचं मानणं आहे. जसं ‘एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम। आणिकांचे काम नाही आता।।’ वारकरी संप्रदायासारखाच सूफी संप्रदायही सर्वधर्मसमभाव, मानवता, उदारमतवाद यासाठी प्रसिद्ध आहे.
असंच नातं बौद्ध धम्मातल्या ‘चारिका’ आणि आपली वारकर्‍यांची ‘दिंडी’ या दोन्हीत सापडतं! बौद्ध भिक्खू पायी चालत निघतात. ठिकठिकाणी लोक स्वखुशीनं, स्वखर्चानं त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करतात. दिंडीतही वारकर्‍यांना जेवण देणं, त्यांची सेवा करणं हे सन्मानाचं समजलं जातं. थोडाफार फरक असला तरी दोन्हीचं मूळ उद्दिष्ट हे ‘समता-बंधुता’ रुजवणं हेच आहे!
हिंदू-मुस्लीम-बौद्ध एकतेची नाळ किती जुनी आहे बघा. असंच आपल्याला इतरही धर्मांबाबतीत सापडतं. बुद्ध, बसवण्णा, महावीर, मोइनुद्दीन चिश्ती, नामदेव, गुरू नानक, कबीर, तुकाराम… अशा सगळ्यांचं एकमेकांशी घट्ट वैचारिक नातं आहे. पण आज यांच्या अनुयायांमध्ये भिंती उभ्या करण्याचं कारस्थान यशस्वी झालंय. म्हणजे, आपणच या महामानवांच्या विचारांना नीट समजून घेण्यात कुठंतरी कमी पडतो.
अजून वेळ गेलेली नाही. आपल्या सगळ्या महामानवांचा छळ करणारे, त्यांची बदनामी करणारे, त्यांच्या जिवावर उठलेले तेच नराधम होते, जे आज द्वेषाचं विष पेरून बहुजनांमध्ये फूट पाडताहेत. बुद्धांचे, तुकोबांचे आणि पैगंबरांचे अनुयायी घट्टपणे एक झाले तर या भूमीत घुसखोरी करून आलेला वर्चस्ववाद याच भूमीत गाडला जाईल, जसा क्रूरकर्मा औरंगजेब गाडला गेला! भेदभाव आणि उच्चनीचतेची कबर बांधली जाईल. बहुजन मानसिक गुलामगिरीतून मुक्त होईल… आणि हा देश समतेच्या, मानवतेच्या विचारांनी बहरून जाईल.

Previous Post

साप्ताहिक लोकहितवादीचा मुजरा

Next Post

११ वर्षे… विनाशवाटेवरची!

Next Post

११ वर्षे... विनाशवाटेवरची!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.