सोनाली कुलकर्णी
प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड सरांमुळे मला बेस कशाला म्हणतात ते कळलं. त्यांच्यामुळे स्पंज कसा धरायचा ते कळलं. त्यांच्यामुळे लालीला ब्लशर म्हणतात हे कळलं. रंगभूषा म्हणजे काय हे कळलं.
माझं फोटोशूट होतं. विक्रम सर अमलचे मित्र. अमलेंदू चौधरी. माझा मित्र. आजचा भारतातला आघाडीचा सिनेमॅटोग्राफर. मी कॉलेजला असताना तो स्टिल फोटोग्राफी करायचा. आपण मेकअपसाठी विक्रम सरांना विचारूया, असं अमलचं म्हणणं पडलं. मनाचा हिय्या करून आम्ही सरांना विचारायला गेलो.
त्यांनी चटकन होकार दिला. शिवाय पैशांच्या वाटाघाटीला उडवून लावलं. परवडेल तेवढं मानधन असा ठराव त्यांनी पास केला. शूटच्या दिवशी मी सरांच्या अकॅडमीमध्ये मेकअपला गेले. सरांची दृष्टी म्हणजे कॅमेर्याची लेन्सच! स्किन टोन, चेहर्याची ठेवण, प्लस पॉईंट, कमतरता.. झरझरझर टिपून घ्यायचे. किती सुंदर लुक केले सरांनी! हेअर पण त्यांनीच डिझाईन केले.
माझ्यासारख्या सामान्य दिसणार्या मुलीला सरांचा मिडास स्पर्श लाभला. मी त्यांच्याकडे मेकअप शिकले. अॅस्ट्रिंजिंट मी अजूनही वापरते ते विक्रम सरांमुळे! पोअर्स हा शब्द मी त्यांच्या तोंडी पहिल्यांदा ऐकला. पुण्याच्या रोहन एण्टरप्रायजेस ह्या नव्या दुकानात मी कितीतरी सामान खरेदी केलं, सरांमुळे. मग हळूहळू दरारा किंवा भीती निघूनच गेली. सर आमचे मित्र झाले. डॉ. जब्बार पटेलांकडे माझी रमाबाई आंबेडकरांसाठी लुक टेस्ट झाली. तो रोल मला मिळाला याचं श्रेय सरांचं… त्यांची बोटं आठवतात. दोन चारच स्ट्रोक, शेडिंगसाठी. चटकन ते साम्य साधायचे व्यक्तिरेखेशी.
एकदा सरांनी पुण्यात वर्कशॉप घेतलं होतं. तेव्हा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसाठी मॉडेल म्हणून सरांनी मला बोलवलं होतं. माझ्याकडे तिथला एक फोटो आहे वाटतं अजून. तेव्हा माझा चेहरा समजावून सांगताना सर म्हणाले होते, हिचे डोळे डीप सेट आहेत, त्याची ब्युटी समजून कमीत कमी मेकअप केला तरच हिला शोभून दिसेल. हे मी आजतागायत पाळते सर…
मंदाकिनी आमटेंचा रोल फार ऐनवेळी माझ्याकडे आला. सर होते म्हणून निभावलं गेलं. किती गडबडीत होतो आम्ही सगळे! सर माझ्या घरी आले लुक ट्रायलसाठी… त्यांनी माझ्यात पात्रं घातली आहेत चक्क… मंतरलं आहे त्यांच्या हातांनी… मितभाषी होते सर… एखादाच मुद्दा हलकेच सांगायचे… तो आपण टिपला तर साकारताना आपलं कल्याण होणार हे ठरलेलं…
‘काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात मी सुलोचनाताईंची भूमिका केली. सर खूप कामात होते. त्यांची भिस्त श्रीवर होती. श्रीधर परब, माझा पर्सनल मेकअप आर्टिस्ट. श्री आणि अनिता यांनी सरांच्या फोन/ व्हिडीओ मार्गदर्शनानं उत्तम लुक सेट केला, पण सर आले नाहीत म्हणून मी रूसून बसले. दुसर्या शेड्युलला सर खास माझ्यासाठी सांगलीला आले. किती समाधान होतं त्यांच्या चेहर्यावर.. कारण ते आम्हाला कुठे, त्यांच्या व्यक्तिरेखांनाच भेटायचे.
सरांचं जगच वेगळं. त्यांना सगळे एंजल्स दिसायचे आमच्यात. ते वावरले आमच्यात पण बोलले त्यांच्या पात्रांशी. किती हळुवारपणे. वहिनींना, तन्वीला जाणवले असतील ते. पण आमच्यावर फिरला तो विक्रम सरांच्या जादूचा हात. आम्ही त्या मंत्राचळात भारून भूमिका झालो.
आता ते नाहीत… आता कोण जिवंत करणार आमच्या पात्रांना?.. कोण वेडं प्रेम करणार स्क्रिप्टवर?.. कोण समजून घेणार दिग्दर्शकांना?.. कोण मखमली हात लावणार स्टिकला, कोण श्वास रोखत, मिनिमल बदल करत पालटून टाकणार आमचा चेहरा मोहरा?.. क्षीण झालेल्या रमाबाई साकारताना सर तुम्ही हलकेच माझा भांग रुंद केला होता. बाळंतपणं आणि आजार सोसलेली ती कृश रमा मृत्युशय्येवर असतानाही तुम्ही माझ्यावर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवून होतात…
आता तुमच्यावर कोण लक्ष ठेवणार सर?.. भूमीवरच्या गंधर्वांना देव का वेदना देतो?.. का लवकर घेऊन जातो?.. सर मी कधीच तुमच्या पाया पडायला विसरले नाही.
किती लांब गेलात आता… सगळा कोलाहल झाला आहे… निरवानिरव का करावी लागते आहे?.. कुणीतरी माझ्यातल्या त्या पात्रांना शोषून घेतलंय?.. अचेतन वाटतंय?.. त्यात प्राण फुंकायला तुम्ही नाही सर…
तुम्ही.. मायस्त्रो.. विक्रम गायकवाड सर, गुडबाय…