• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नशीब समजा, बाळासाहेब आज नाहीत…

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
May 30, 2025
in मर्मभेद
0

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आणि त्यांच्या तथाकथित महाशक्तीने ‘पन्नास खोके एकदम ओके’ प्रयोग करून शिवसेनेचे दोन तुकडे केले, गद्दारसेनेला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं, तरी त्यांना अधून मधून शिवसेनेच्या आणि ठाकरेंच्या नावाने उचक्या लागतच असतात. ठाकरे ब्रँड जिवंत आहे, तोवर आपण राज्यात जो बेडकाचा बैल बनवला आहे, त्याला टाचणी लागून त्याची मुंगीही होऊ शकते, याची त्यांना कल्पना आहे. त्यात राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर काय होईल, या कल्पनेने महाशक्तीला कोणकोणत्या जागी घाम फुटला असेल, ते सांगता येणार नाही. त्यामुळेच की काय ते अधून मधून बाळासाहेबांच्या नावाने कोरडे उमाळे काढत असतात.
नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमात असे विधान केले की आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली असती. एकेकाळी त्यांच्या विचाराने चालणार्‍या त्यांच्या पक्षाला आता काय झाले आहे, ते कळत नाही, असे नक्राश्रूही शहा यांनी ढाळले. बाळासाहेबांच्या मूळ विचारांपासून त्यांचे रक्ताचे वारस दूर गेले म्हणून, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आम्ही शिवसेना फोडली, असा हास्यास्पद दावा ईडीच्या भीतीने आणि सत्तेच्या, खोक्यांच्या ऊबेसाठी शेपट्या घालून पळालेले गद्दार करत असतात. त्या एकतारी तुणतुण्याला या महाशक्तीच्या पिचक्या पिपाणीची साथ अधून मधून होत असते. त्यापलीकडे शहांच्या या मतलबी उचक्यांना वेगळा काही अर्थ नाही.
मुळात बाळासाहेब कोण होते आणि त्यांनी काय केले असते, हे कळण्याइतका अमित शहा यांचा अभ्यास कधी झाला? बाळासाहेब ऐन उमेदीत होते तेव्हा अमित शहा कोण होते? कुठे होते? त्यांचं देशाच्या राजकारणात काय स्थान होतं? शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राच्या दोन उत्तुंग नेत्यांनी त्यांना मदत केली नसती, तर आता शहा कुठे असते? मुळात त्यांचे साहिब नरेंद्र मोदी तरी कुठे असले असते? बाळासाहेबांनी मोदींची पाठराखण केली नसती, तर त्यांचा कधीच ‘संजय जोशी’ झाला असता. अमित शहांनी हे लक्षात घ्यायला हवं की आज बाळासाहेब हयात नाहीत हे त्यांचं आणि परपुष्ट कमळीचं नशीब आहे… बाळासाहेब असते, तर झक मारली आणि या दोघांना वाचवलं, असं जाहीरपणे म्हणाले असते. अस्सल ठाकरी भाषेत त्यांनी यांचा कसा उद्धार केला असता ते समजून घ्यायला शहा यांनी कधीतरी वेळात वेळ काढून बाळासाहेबांनी नारोबांची केलेली जाहीर हजामत ऐकायला, पाहायला हवी- कानातले केस जळतील त्यांच्या!
मुळात नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये काय पराक्रम गाजवला आहे की बाळासाहेबांनी त्यांची गळाभेट घेतली असती? आपापल्या बायकांचा सिंदूर पणाला लावून लढायचं सैनिकांनी आणि त्या बळावर स्वप्रसिद्धीचा, पक्षाच्या प्रचाराचा धूर काढायचा उथळ राजाबाबूंनी, हे पाहून बाळासाहेबांनी चारचौघांत ‘आरती’ केली असती. पहलगामचा दहशतवादी हल्ला ते शस्त्रविराम या घटनाक्रमात सैन्यदलांनी त्यांचं कर्तव्य चोख बजावलं. बाळासाहेबांनी त्या वीर सैनिकांना मातोश्रीवर बोलावून गौरवलं असतं, कर्नल सोफिया कुरेशींसारख्या भारताच्या लढवय्या लेकीचाही योग्य सन्मान केला असता, त्यांची शाबासकीची थाप सैनिकांना खरोखरीच स्फुरण देऊन गेली असती. पण, या घटनाक्रमात केंद्र सरकारने असे काय कौतुकास्पद दिवे लावले आहेत?
देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचं गेल्या ११ वर्षांतलं ढळढळीत अपयश बाळासाहेबांना दिसलं नसतं? पहलगाममध्ये सुरक्षाव्यवस्था का नव्हती, हा प्रश्न त्यांनी विचारला नसता? आपल्या आयाबहिणींचा सिंदूर पुसून टाकणार्‍या नराधमांपैकी एकही दहशतवादी पकडता आला नाही आणि विजयाचे ढोल कसले वाजवता, असा प्रश्न त्यांनी विचारला नसता? भारताचे जवान पाकिस्तानला दोन दिवसांत गुडघ्यावर आणण्याची क्षमता राखून असताना ते अमेरिकेचं लाल टोपलं परस्पर सीझफायर जाहीर करून मोकळं झालं आणि आपल्या बनिया सत्ताधार्‍यांनी व्यापाराला महत्त्व देऊन, विजय मिळवण्याऐवजी हा तिसर्‍यानेच जाहीर केलेला शस्त्रविराम बुळचटासारखा मान्य केला, याबद्दल बाळासाहेबांनी मोदींची पाठ थोपटली असती की शब्दांनी, कुंचल्याने सालटी काढली असती?
कमळीची आणि तिच्या पाईकांची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की त्यांना बाळासाहेब कधी कळलेच नाहीत. त्यांनी त्यांच्या सोयीने, राज्यात आणि देशात हातपाय पसरायला बाळासाहेबांच्या वलयाचा फक्त व्यापारी वापर करून घेतला. बाळासाहेबांचा प्रबोधनकार ठाकरेंचा खणखणीत, सुधारकी वारसा त्यांच्या सोयीचा नव्हता, तो झाकून टाकून बाळासाहेबांची आपल्या सोयीची इमेज त्यांनी कायम लोकांवर थोपवण्याचा प्रयत्न केला. आज बाळासाहेब हयात असते तर तुम्ही राज्यात किंवा देशातही सत्तेवर टिकला असतात का, याचा विचार शहा अँड कंपनीने करायला हवा. हिंदुहिताच्या नावाखाली तुम्ही काय देश तोडणारी थेरं चालवली आहेत, ती पाहिल्यानंतर आणि महाराष्ट्र पोखरून, लुटून गुजरातच्या दावणीला बांधण्याचे उद्योग बघितल्यानंतर त्यांनी तुम्हाला साथ दिली असती का? शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गर्जून सांगतात, तेव्हा तुमचा त्ाीळपापड होतो. हे घंटा बडवणारं हिंदुत्व प्रबोधनकारांनाही मान्य नव्हतं आणि बाळासाहेबांनाही मान्य नव्हतं, त्याचं काय! त्यांच्या शिवसेनेत साबीर शेख यांच्यासारखे कितीतरी सच्चे शिवसैनिक होते, त्यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदार्‍या सोपवताना, त्यांना मोठमोठी पदं देताना बाळासाहेबांनी त्यांचा धर्म पाहिला नव्हता. त्यांचा रोष पाकिस्तानधार्जिण्या मुसलमानांवर होता. आज देशाची गुपितं विकणारे कुरुलकर छाप देशद्रोही ‘आपल्या’ धर्माचे आहेत, म्हणून त्यांनी त्यांची गय केली असती का?
आज बाळासाहेब हयात नाहीत, म्हणून काहीही बरळू नका. सच्च्या शिवसैनिकांच्या धमन्यांमधून बाळासाहेबांचे विचार वाहात असतात. त्यांच्या रूपाने बाळासाहेब जिवंतच आहेत आणि तुमच्या उचक्या शांत करण्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी पाणी पाजायला समर्थही आहेत.

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

मुक्ताईचा पाया, बहिणाबाईंची ध्वजा!

Next Post

मुक्ताईचा पाया, बहिणाबाईंची ध्वजा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.