• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुक्ताईचा पाया, बहिणाबाईंची ध्वजा!

- ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध-९)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 30, 2025
in धर्म-कर्म
0

वरी भगवा झाला नामे।
अंतरी वश्य केला कामे ।।१।।
त्याला म्हणू नये साधू।
जगी विटंबना बाधू ।।२।।
आप आपणा शोधुनि घ्यावे।
विवेक नांदे त्याच्या सवे ।।३।।
आशा दंभ अवघे आवरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।
आपल्या भारतीय धर्मपरंपरेत तत्त्वज्ञान सांगण्यासाठी संवादपर माध्यमांचा वापर होत होता. आपले बहुतेक ग्रंथ हे संवादरूपात आहेत. या संवादातूनच तत्त्वज्ञान सांगितलं गेलं आहे. जुन्या काळातला गीता हा ग्रंथही कृष्ण आणि अर्जुनाचा संवादच आहे. अगदी अलीकडच्या काळात महात्मा जोतिबा फुले यांनीही जी सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना मांडून ग्रंथ लिहिला तो ही संवादात्मक आहे. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायातही काही अभंगांचे गट हे संवादाच्या रूपातील आहेत. तीर्थावळीच्या प्रकरणापासून ते तुकोबारायांनी धरणेकर्‍याला केलेल्या उपदेशापर्यंत अनेक अभंग हे संवादात्मक आहेत. वारकरी संप्रदायाचं उच्च तत्त्वज्ञान सांगणारा असाच संवादरूप अभंगगट म्हणजे ताटीचे अभंग. मुक्ताई माऊलींनी ज्ञानदेवांना जो उपदेश केला तोच या ताटीच्या अभंगातून मांडला गेलेला आहे.
ताटीच्या अभंगातला हा एक महत्त्वाचा अभंग. यात मुक्ताई वरकरणी भगवं वस्त्र घालून कामक्रोधादि विकारांनी ग्रासलेल्या ढोंगी साधूंचं वर्णन करतात. भगवा रंग हा आपल्या परंपरेत त्यागाचं प्रतीक मानला जातो. संन्यासी लोक संन्यास घेतल्यानंतर भगव्या रंगाचं वस्त्र घालतात. त्यामुळेच लोकांना भगव्या रंगाच्या वस्त्राचं आकर्षण निर्माण झालेलं आहे. भगवं वस्त्र घालणार्‍यांना साधू म्हणूनच ओळखलं जातं. त्यातूनच खरी फसगत होते. केवळ भगवं वस्त्र घालून कोणत्याही व्यक्तीच्या मनात त्यागाची भावना निर्माण होऊ शकत नाही. भगवं वस्त्र केवळ प्रतिष्ठेसाठीच उपयोगी पडतं. त्याचा वापर करून अनेक तथाकथित साधू लोकांना भुलवतात आणि फसवतात. मुळात लोक या प्रकारच्या साधूंकडे आकर्षित होतात, कारण ते वेगवेगळ्या कारणांनी त्रस्त असतात. कधी शारिरीक आजार तर कधी इतर कारणांनी मानसिकदृष्ट्या ते अस्थिर होतात. असे खचलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी या साधूंच्या शोधात असतात. भगव्या वस्त्रातले संन्यासी साधू पाहिल्यानंतर ते त्यांना शरण जातात आणि त्यांचे भक्त बनतात. लोकांच्या या मानसिक कमजोरीचा फायदा घेऊन हे तथाकथित साधू त्यांना फसवतात.
या सार्‍या प्रक्रियेचं वर्णन अचूकपणे ज्ञानदेवांनी केलेलं आहे.
‘तापत्रयी तापले गुरुते गिर्वासती ।
भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी।
तव ते नेणोनी उपदेशाची रिती ।
आनान उपदेशिती ठकले
निश्चिती तैसे झाले।।’
तापत्रयी म्हणजे त्रिविध ताप. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशा तीन तापांनी तापलेले लोक गुरुला शोधत असतात. त्यातच त्यांना भगव्या वस्त्राच्या स्वामींची भेट होते. त्यांना ते गुरु मानतात. पण ते गुरु लोकांना भलताच उपदेश करतात. त्यामुळे या लोकांची फसवणूक होते.
भगवी वस्त्रे घालणार्‍या लोकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुक्ताईंनी या अभंगातून उपदेश केलेला आहे. त्यांच्या मते वरून भगवी वस्त्रं घालून कामक्रोधादि विकारांनी ग्रस्त असलेल्या अशा लोकांना साधू म्हणू नये. त्याचा ढोंगीपणा उघडा पडून त्याची जगात विटंबना होणार आहेच. अशा फसव्या गुरुला बळी पडण्याऐवजी आपण स्वतःच आत्मखूण जाणावी. ती जाणली असता असा फसवा साधू सहजपणे ओळखता येतो. आत्मखूण जाणली की विवेक जागा होतो. या विवेकामुळेच पुढची फसवणूक टळते.
केवळ भगव्या वस्त्राने साधुत्वाचे गुण अंतरंगात उतरत नाहीत.
‘भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा ।
तेथे अनुभवाचा काय पंथ ।।’
या अभंगाच्या चरणातून तुकोबाराय तेच सांगतात. केवळ भगव्या वस्त्राने त्यागाची आणि साधुत्वाची भावना अंगी येत नाही. भगव्या वस्त्राने साधुत्वाची भावना येत असती तर भगव्या रंगाच्या कुत्रीही साधुपदाला पोचली असती असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. मुळात त्यागाची जी भावना आहे ती विधिपूर्वक भोगातून येते. याउलट भोगविहीन त्यागाने भोगाची भावना वाढत जाते.
‘भोगे घडे त्याग।
त्यागे अंगा येती भोग।।’
असा हा उलटा मामला असल्याचं तुकोबाराय सांगतात. जे लोक संन्यास घेऊन त्यागी होतात त्यांचे वासनाविकार प्रबळ होतात. याउलट सांसारिक माणूस विधिपूर्वक भोग घेत असतो. त्यातून त्याला अतिभोगातला फोलपणा समजतो. सामान्य संसारिक माणूस वासनाविकार ताब्यात ठेवतो आणि संन्यासी माणूस या विकारांचा गुलाम बनतो. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे ‘ऐसे उफराटे वर्म। धर्माअंगीच अधर्म ।।’ असा उफराटा व्यवहार होतो. त्यामुळेच वारकरी संतांनी संन्यासाऐवजी संसारात राहूनच भक्ती करायला सांगितली. संन्यास घेतल्यानं आशा आणि दंभ वाढत जातो. सांसारिक माणूस भोगातलं वैय्यर्थ अनुभवाने जाणतो. त्यामुळे वारकरी संत संसारात असले तरी कमळाप्रमाणे असतात. कमळ पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त असतं, त्याप्रमाणे वारकरी संत संसारात असूनही त्यापासून अलिप्त असतात.
‘सत्यवादी करी संसार सकळ।
अलिप्त कमळ जळी जैसे ।।’
असं उदाहरण देऊन तुकोबाराय हे सांगतात. तुकोबारायांच्या या तत्त्वज्ञानाचा धागा थेट मुक्ताईंच्या अभंगात आपल्याला दिसतो. त्याची पार्श्वभूमीही तशीच आहे. ज्ञानदेवादी भावंडांचे वडील विठ्ठलपंत यांनी आधी संन्यास घेतला होता. त्यानंतर काही कारणाने त्यांनी संन्यासाश्रम सोडून परत गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे आळंदीच्या पुरोहितांनी त्यांना वाळीत टाकलं. संन्यासाश्रम श्रेष्ठ तर गृहस्थाश्रम कनिष्ठ अशी त्या काळची समजूत होती. श्रेष्ठ आश्रमातून कनिष्ठ आश्रमात माघारी येणं हा पुरोहित मंडळींच्या लेखी अपराधच होता. पुढे विठ्ठलपंताना चार मुलं झाली. त्यांना ‘संन्याशांची पोरं’ म्हणून हिणवलं जाऊ लागलं. त्या वेदना असह्य होऊन ज्ञानदेवांनी एकदा झोपडी बंद केली. त्यावेळी मुक्ताईंनी समाजावर रागावलेल्या ज्ञानदेवांना त्यांच्या ‘संतत्वाची’ जाणीव करून देणारा उपदेश केला. तो उपदेश म्हणजे ताटीचे अभंग. मुक्ताईंना सांगायचं असावं की वरकरणी भगवी वस्त्रं घालून कामक्रोधादि विकारांनी ग्रस्त राहण्याची गरज नाही. रीतसर संन्यासाचा मार्ग व त्यातून विवेकपूर्वक संसाराचा मार्ग वडीलांनी स्वीकारला तो योग्यच होता. त्यागातून निर्माण होणारी भोगाची आशा आणि दंभ बाजूला सारायचा असेल तर सांसारिकांचा मार्गच योग्य आहे. त्यामुळेच ‘आशा दंभ अवघे आवरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।’ असं मुक्ताई म्हणत आहेत.
ताटीच्या या अभंगाचं मोल जाणलं ते बहिणाबाई चौधरी यांनी. मुक्ताई अविवाहित होत्या, तर बहिणाबाई चौधरी विधवा. एका अर्थाने दोघीही एकल महिला होत्या. मुक्ताईंची समाधी खानदेशातच आहे. त्याच खानदेशात बहिणाबाईंची हयात गेली. साध्या साध्या शब्दातून सहजपणाने पण प्रभावीपणे तत्त्वज्ञान सांगण्याची हातोटी जशी मुक्ताईंनी साधली आहे, त्याचप्रमाणे ती बहिणाबाईंनीही साधली आहे. बहिणाबाईंच्या कविता तत्त्वज्ञान आणि शैली या दोन्ही पातळ्यांवर श्रेष्ठच आहेत. नामदेव ढसाळ यांच्यासारख्या महाकवीलाही त्या थोर कवयित्री वाटतात, तर आचार्य अत्र्यांना त्यांच्या कविता म्हणजे बावन्नकशी सोन्याचा खजिना वाटतो. मराठी भाषेच्या वैभवात भर टाकणार्‍या या बहिणाबाईंनी मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगांचं मोल नेमकेपणाने जाणलं. एखाद्या पट्टीच्या तत्त्वज्ञालाही जे समजणार नाही ते बहिणाबाईंनी प्रभावीपणे त्यांच्या खास शैलीत मांडलं आहे. त्या सुरुवातीला ताटीच्या अभंगाची पार्श्वभूमी सांगतात. ‘संन्यासाची पोरं’ म्हणून ज्ञानदेव हिणवले जातात. ‘अरे संन्यासाची पोरं, कुणी बोलती हिनई। टाकीदेयलं पोराचं, तोंड कधी पाहू नई ।।’ या प्रकारे लोकांकडून हिणवलं गेल्यामुळं ज्ञानदेव ताटी लावून घरात बसतात. ‘असं माझं तोंड, कसं दावू मी लोकाले?। ताटी लायी ज्ञानदेव, घरामदी रे दडले ।।’ घरात दडलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताई कळवळून उपदेश करतात.
उबगले ज्ञानदेव, घडे असंगाशी संग।
कयवयली मुक्ताई, बोले ताटीचे अभंग।।
ही पार्श्वभूमी सांगितल्यानंतर त्या ताटीच्या अभंगाचं मोल सांगतात.
‘घेती हिरीदाचा ठाव,
ऐका ताटीचे अभंग।
एकाएका अभंगात,
उभा केला पांडुरंग ।।’
हृदयाचा ठाव घेणारी ही मुक्ताईंची वाणी आहे. त्यांच्या एकेका अभंगात थेट पांडुरंगरूपी चैतन्याचा अविष्कार होतोय असं बहिणाबाई सांगत आहेत. पुढे त्या ताटीच्या अभंगांचा ज्ञानदेवांवर जो परिणाम झाला त्याचं भावपूर्ण चित्र रंगवतात. ‘गह्यरले ज्ञानदेव, डोये गेले भरीसन। असा भाग्यवंत भाऊ, त्याची मुक्ताई बहीण।।’ मुक्ताईंचे ताटीचे अभंग आणि त्यावरचं बहिणाबाईंचं हे भाष्य दोन्हीही तेवढ्याच तोलामोलाचं आहे असं मला वाटतं. डॉ. सदानंद मोरे यांनी ताटीच्या अभंगाना गीतेची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने मोहग्रस्त अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून दिली, त्याचप्रमाणे मुक्ताईंनी ताटीच्या अभंगातून ज्ञानदेवांना त्यांच्या संतत्वाची जाणीव करून दिली. गीतेच्या उपदेशातला भावार्थ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत रेखाटला आणि त्या प्रसंगाचं चित्रण केलं. त्याचप्रमाणे बहिणाबाईंनी ताटीच्या अभंगांचं चित्रण करून त्यामागचा भावार्थ सांगितला. गीतेचा उपदेश पूर्ण होत आल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला अलिंगन दिल्याचं माऊलींनी सांगितलं आहे. ‘मग सावळा सकरुणु। बाहु पसरूनि दक्षणु। आलंगिला स्वशरणु। भक्तराजु तो ।।’ अशी ती ओवी आहे. मुळात गीतेत त्या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला अलिंगन दिल्याचा उल्लेख नाही. तरीही ज्ञानदेवांनी त्या प्रसंगाचं भावपूर्ण चित्रण करताना अलिंगन दिल्याचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे ताटीचे अभंग ऐकल्यानंतर ज्ञानदेवांनी दिलेल्या प्रतिसादाची नोंद नाही. ती रिकामी जागा बहिणाबाई त्यांच्या प्रतिभेने भरून काढतात. मुक्ताईंचे अभंग ऐकून ज्ञानदेव गहिवरले आणि त्यांचे डोळे भरून आले असं बहिणाबाई सांगतात. मुक्ताईंच्या उपदेशाशी एकरुप झाल्याशिवाय अशी रम्य, हृद्य आणि भावपूर्ण कल्पना सुचणं शक्य नाही.
सहसा बहुतेक धर्मग्रंथ आणि त्यावरचे भाष्यग्रंथ पुरुषांनीच लिहिलेले आहेत. वारकरी संप्रदायात मात्र स्त्री-पुरुष भेदभाव नाही. त्यामुळेच मुक्ताईंनी लिहिलेले ताटीचे अभंग हा वारकरी तत्त्वविचारांचा गाभा मानला गेला. त्यावर भाष्य करून बहिणाबाईंनी वारकरी विचारांची ‘ध्वजा’ फडकवली. आपल्या महाराष्ट्रात दोन बहिणाबाई झाल्या. पहिल्या संत बहिणाबाई पाठक आणि दुसर्‍या या बहिणाबाई चौधरी. संत बहिणाबाई एका अभंगात स्वत:ला संतकृपेच्या इमारतीवरची निरुपणरुपी ध्वजा म्हणून सांगतात. ‘बहिणी फडकती ध्वजा। निरुपणा केले ओजा।।’ असं त्या म्हणतात. तेच रुपक वापरून सांगायचं झाल्यास मुक्ताईंनी ताटीच्या अभंगातून वारकरी विचारांचा ‘पाया’ घातला. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांचं निरुपण करुन त्या वारकरी विचारांची ‘ध्वजा’ फडकवली. ही ध्वजा संतांच्या अंत‘रंगाची’ होती.
काही लोक संतांच्या नावाने वरकरणी ‘भगव्या रंगाची’ धर्मध्वजा फडकवतानाच अंतरंगात मात्र वर्चस्ववादी वासनाविकारांची ध्वजा लावण्याचा कावेबाजपणा करतात. तो आपण ओळखायला हवा. मुक्ताईंच्या भाषेत त्यांचा ध्वज ‘वरी भगवा झाला नामे’ असा असला तरी अंतरी मात्र ‘पाप’ असतं. त्यामुळेच केवळ ध्वजाच्या भगव्या रंगाला न भुलता आपल्या अंतरात संतांच्या विवेकाचा ध्वज लावायला हवा. तेच मुक्ताई सांगत आहेत.

Previous Post

नशीब समजा, बाळासाहेब आज नाहीत…

Next Post

रक्तातला गरम सिंदूर सौद्यापुढे गोठला का?

Next Post

रक्तातला गरम सिंदूर सौद्यापुढे गोठला का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.