पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात गुलझारीलाल नंदा हे ज्येष्ठ नेते गृहमंत्री होते, त्या काळातलं हे मुखपृष्ठचित्र (हे नंदा नंतर भारताचे काळजीवाहू पंतप्रधानही झाले). या व्यंगचित्रात भारतमाता नंदा यांना दोष देते आहे. नंदा यांनी काही पाकिस्तानी हेरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. तरीही भारतमाता नंदा यांना खडसावते आहे की तुम्हीच खरे गुन्हेगार आहात, तुमच्यामुळेच हे गुन्हेगार माजले आहेत. पलीकडे ख्वाजा शमसुद्दीन उभे आहेत. हे तेव्हाचे काश्मीरचे मुख्यमंत्री होते (तेव्हा त्या पदाला काश्मीरचे पंतप्रधान म्हटलं जायचं). त्यांच्याच कार्यकाळात काश्मीरमधील प्रसिद्ध हजरतबाल दर्गा येथील प्रेषित मोहंमद पैगंबरांच्या अवशेषाची चोरी झाल्याची घटना घडली आणि त्यांना हटवून मोहम्मद सादिक यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आलं. या मुखपृष्ठचित्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानी हेर माजले आहेत, याची जबाबदारी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर टाकली होती, त्यांना कुंचल्याचे फटकारे दिले होते… बाळासाहेब आज हयात आणि कार्यरत असते तर पुण्यातल्या स्वयंसेवक कुरुलकरपासून जे अनेक पाकिस्तानी हेर सापडले त्यांनाही त्यांनी तडाखे दिले असते, पहलगामसारखी घटना कशी घडते, तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, ३७० कलम हटवून नेमकं काय साध्य केलं आणि दहशतवाद्यांना जेरबंद किंवा ठार न करता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचे ढोल का वाजवले जात आहेत, असे भेदक सवाल त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना लेखणीच्या, कुंचल्याच्या माध्यमातून विचारलेच असते… तेव्हा ताठ कण्याची पत्रकारिता होती… आज?… लाजिरवाणा, लोटांगणबहाद्दर गोदी मीडिया आहे!!