मुंबई महानगरपालिकेचा कालावधी संपून गेल्यावर ताबडतोब निवडणुका न घेता तिथे प्रशासकीय राजवट लादून पालिकेच्या ८९ हजार कोटींच्या मुदतठेवींची लूट करणार्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पाताळयंत्री कारस्थानाने माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या सध्या हैराण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विविधांगी विकासासाठी कष्टपूर्वक ९८ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी गेली अनेक दशके शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना सुरक्षित ठेवल्या होत्या. केंद्र सरकार, राज्य सरकारे, इतर महापालिका कर्जबाजारी होत असताना मुंबईकरांसाठी शिक्षण, आरोग्य, उद्याने, पाण्यासाठी स्वतंत्र धरणे, कोस्टल रोड इत्यादी आधुनिक संकल्पना राबवूनसुद्धा मुंबई महापालिका आर्थिकदृष्ट्या त्यांनी नेहमीच फायद्यात ठेवली.त्यात या ९८ हजार कोटींच्या मुदतठेवींचा मोठा वाटा होता. पण शिंदे-फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी राज्याची सत्ता मिळताच या ठेवींवर डल्ला मारला. त्यामुळे आता त्यातील फक्त ९ हजार कोटींच्या मुदतठेवी शिल्लक आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता मिळताच उरलेल्या मुदतठेवीसुद्धा हडप करू, अशी दिवास्वप्ने ते पाहताहेत. या असल्या लुटारू टोळीच्या हाती मुंबईकर पालिकेच्या चाव्या देणार नाहीत, हे सत्य असले तरी ही तीन पक्षांची लुटारू टोळी एकमेकांच्या पायात पाय घालून पुढे पळण्याची आणि शर्यत जिंकण्याची स्वप्ने पाहात आहे, हे मी पोक्याला समजावून सांगितल्यावर तो भानावर आला आणि मी या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतो सांगून घाईघाईने निघाला. त्याच या प्रतिक्रिया.
देवेंद्र फडणवीस : आम्ही पालिकेच्या ९८ हजार कोटींच्या मुदतठेवी हडप केल्या हे म्हणणे योग्य होणार नाही. आम्ही त्या विविध विकासकामांसाठी वापरल्या. मात्र ती कामे कुठली हे कृपया विचारू नका. उद्या आम्ही महापालिका जिंकल्यावर त्याचा तपशील सादर करू आणि ९८ हजार कोटीच काय तर तुम्ही कधी तो आकडा कल्पनेतही पाहिला नसेल इतक्या ९९ दशलक्ष कोटी नव्हे तर अब्ज रुपयांच्या मुदतठेवी नव्याने महापालिकेसाठी जमा करून सुरक्षित ठेवू. आता आमच्या महायुतीच्या लाडक्या बहिणींमुळे अनेक खात्यांचे निधी आम्हाला वळवावे किंवा पळवावे लागतात, त्याला आमचा नाईलाज आहे. तसेच काहीसे त्या मुदतठेवींबद्दल झाले असेल. मात्र त्यात माझा दोष नाही. माननीय माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, तेव्हाच आर्थिक तुटवडा भासत होता. परंतु लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेवर येऊ शकलो, याबाबत मी आताचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना त्रिवार धन्यवाद देईन. आमच्या पक्षाकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुम्ही स्वप्नात पाहिला नसेल इतका प्रचंड मोठा, महाकाय पैशांचा डोंगर आहे. त्यामुळेच तुम्हाला जिकडे तिकडे विकासच विकास दिसेल. आमच्या एकेक मंत्र्यांच्या संपत्तीचे करोडोंचे आकडे ऐकून तुम्हाला चक्कर येईल. त्यांचा विकास म्हणजेच मुंबई-महाराष्ट्राचा विकास ही आमची धारणा आहे. इतर पक्षांतून आलेल्या आणि सध्या महायुतीच्या वॉशिंग मशीनमध्ये असलेल्या नेत्यांपैकी एकही नेता भ्रष्ट नाही, भ्रष्टाचारी नाही. सगळे तनाने, मनाने, धनाने शुद्ध, पवित्र झाले आहेत. मुंबई तर आमचा जीव की प्राण आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कल्पनाही आम्ही सहन करू शकत नाही. उलट तिच्यात देशातील इतर प्रांतीय जनता मोठ्या प्रमाणात कोंबून भारताची एक फुगीर प्रतिकृती म्हणून तिला नावारुपास आणण्याची आमची धडपड असेल. क्लस्टर योजनेखाली मुंबईच्या चांगल्या, मजबूत इमारती पाडून तिथे मोठमोठे टॉवर्स बांधण्याचे आमचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. नव्या टॉवर्समधील आलिशान सदनिकांचा दहा-दहा हजार रुपये मेंटेनन्स न परवडल्यामुळे त्या सदनिका कोटी-कोटींना विकून स्थानिक मराठी माणसाला मुंबईबाहेर जाऊन स्थायिक होण्याचा एक आदर्श मार्ग आम्ही खुला करून दिला आहे. फक्त मुंबई महापालिका आमच्या हातात येईपर्यंत वाट बघा. मग तुम्हाला मुंबईचा विकास कसा असतो हे काही महिन्यांतच कळेल. जय महायुती, जय भाजप, जयहिंद.
एकनाथ शिंदे : मुंबई आमची जान आहे, शान आहे, मान आहे. मुंबईच्या महायुतीत माझा पक्ष मोठा भाऊ आणि भाजपा छोटा भाऊ आहे. तिसर्या भावाला आम्ही मुंबईत जमेत धरत नाही. त्यामुळे दोघांच्या जागावाटपात काही तंटा-बखेडा झाला तर हा मोठा भाऊ भाजप या छोट्या भावाशी निवडणुकीपुरती फारकत घेईल. मात्र मुंबईत माझा पक्ष गद्दार समजला जात असला तरी स्वबळावर लढेल आणि स्वत:च्या ताकदीवर सर्व पक्षांपेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेवर माझ्या पक्षाचा झेंडा फडकावेल, हे स्वप्न मी महायुतीत गेल्यापासून पाहतो आहे. मुंबई महापालिकेच्या ९८ हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी हडपण्याच्या कटात मी सहभागी नव्हतो. आमच्या महायुतीत एकतंत्री कारभार कुणाचा आहे हे सार्या जगाला माहीत आहे. सगळीकडे चमकोगिरी करणारे नेतृत्व असले की ते आयत्याच प्रशासनाच्या हाती आलेल्या मुंबई महापालिकेच्या ठेवींचे लोणी चाटून पुसून फस्त करणार हे ओघाने आलेच. लोणी खाण्याचे आमचे मार्ग वेगळे आहेत. ते पूर्वीपासून भरपेट खाऊन आम्ही तृप्त आहोत. एवढ्या कोटींच्या मुदतठेवी पाहिल्यावर यांच्या तोंडाला पाणी सुटणे स्वाभाविक आहे, कारण यांना त्याचा फारसा अनुभव नाही. आम्ही तर केव्हापासून कोटी कोटीच्या रकमा हाताळत आहोत, हे ठाण्यातील जनता तुम्हाला सांगेल. आमचा पक्ष सत्तेवर आल्यावर आम्ही मुंबईचा नागपूर नव्हे, तर पॅरिस करू. ‘इव्हीनिंग इन पॅरीस’ हा सिनेमा पाहिल्यापासून मुंबईचा पॅरिस तसेच ‘लव्ह इन टोकियो’ हा सिनेमा पाहिल्यानंतर ठाण्याचा जपान करण्याचे स्वप्न आम्ही उरी बाळगून आहोत. ही दोन्ही स्वप्ने साकार होतील याची मात्र पूर्ण खात्री आहे. जय मुंबई, जय जय ठाणे.