• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इराण-इस्रायल युद्धाचा भारताला चटका!

- राजू वेर्णेकर (सप्रमाण)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 26, 2025
in घडामोडी
0

इराण आणि इस्रायल यांच्यामधील युद्धात आतापर्यंत (शुक्रवार दि. २० जून २०२५) ७००हून अधिक लोक मारले गेले असून, जवळ जवळ २००० लोक जखमी झाले आहेत आणि अमेरिकेने इस्रायलचे उघडपणे समर्थन केल्यामुळे या युद्धाचा इतर देशांवर, विशेषत: मध्यपूर्वेतील देशांवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
इराणने बिनशर्त संपूर्ण शरणागती पत्करावी असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. शिवाय इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामेनी यांना आपण कधीही मारू शकतो असे विधान केले आहे. याला प्रत्युतर म्हणून खामेनी यांनी आता ‘युद्ध सुरू’ अशी घोषणा केली आहे. याचबरोबर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी आश्वासक पाउले उचलून शत्रूला बिनशर्त माघार घायला लावणे हाच हा युद्धावर ठोस उपाय आहे, असे म्हटले आहे. थोडक्यात दोन्ही देश एकमेकांविरुद्ध ठाकले असून संघर्ष तीव्र होत चालला आहे. त्याचवेळी रशियाच्या क्रेमलीनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी इशारा दिला आहे की जर कोणी खामेनीना संपविण्याची भाषा बोलत असेल तर इराणमधून तीव्र प्रतिक्रिया येईल. हा इशारा इस्रायल आणि अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण संदेश मानला जातो. याच बरोबर तुर्कीने स्वसंरक्षण हा इराणचा हक्क आहे असे मत व्यक्त केले आहे.

इराण-इस्रायल संबंध

इराण आणि इस्रायलमध्ये १९७९पासून राजनैतिक संबंध नाहीत आणि बर्‍याच वर्षांपासून दोघांत शत्रुत्व आहे. शीतयुद्धाच्या काळात दोघांमध्ये चांगले संबंध होते. मात्र १९७९मध्ये क्रांति होऊन रुहोल्ला खोमेनींच्या नेतृत्वाखाली इराणचे शेवटचे शाह महमद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ची स्थापना झाल्यानंतर इस्रायलचे इराणबरोबरचे संबंध बिघडले. पुढे १९९१मध्ये आखाती युद्धाच्या समाप्तीपासून ते उघडपणे शत्रुत्वाचे राहिले. इराणचे विद्यमान सरकार इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देत नाही. इराण पॅलेस्टाईनलाच पॅलेस्टाईन प्रदेशांचे एकमेव कायदेशीर सरकार मानते. त्याचवेळी इराण हा मध्य पूर्वेच्या स्थिरतेसाठी धोका आहे असे इस्रायल मानत आला असून शेवटी या शत्रुत्वाचे या वर्षी सशस्त्र संघर्षात रूपांतर झाले आहे.

युद्धात झालेले नुकसान

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत असून इस्रायलने इराणमधील अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी छावण्यांवर आतापर्यंत हल्ले केले आहेत. इस्रायली हल्ल्यात ‘इराण रिव्होल्यूशनरी गार्ड’चे प्रमुख हुसेन सलामी, माजी अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख फेरेदून अब्बासी आणि इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष मोहम्मद मेहदी तेहरानची यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय दोन्ही देशांचे लष्करी तळ, हॉस्पिटल्ससहीत इतर आस्थापना आणि यंत्रसामुग्री उद्ध्वस्त झाली आहे.
याला उत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या नागरी व लष्करी तळावर जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्राने हल्ले सुरू आहेत. आतापर्यंत इराणने इस्रायलवर १८०० किलोमीटर (११०० मैल) पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. शिवाय इराणकडे २००० किलोमीटरहून (१२४० मैल) अधिक पल्ला असणारी क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्रांमध्ये बंदी असलेला ‘क्लस्टर बॉम्ब’ बसविला जातो. इराणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हवेत ७००० मीटर उंचीवर २० वेगवेगळ्या रॉकेट्समध्ये विभागली जातात. त्यानंतर २० छोटी क्षेपणास्त्रे आठ किलोमीटरच्या रेडियसला टार्गेट करतात. यामुळे इस्रायलमध्ये सध्या विध्वंस सुरू आहे. ‘क्लस्टर बॉम्ब’ जगात अत्यंत धोकादायक मानला जातो. दुसर्‍या जागतिक युद्धाच्या वेळी ‘क्लस्टर बॉम्ब’चा वापर झाला होता. विएतनाम युद्धाच्यावेळी अमेरिकेने या बॉम्बच्या माध्यमातून मोठ नुकसान केलं होतं. इराण-इराक युद्धाच्यावेळी सुद्धा ‘क्लस्टर बॉम्ब’चा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यानंतर सगळ्या जगात या बॉम्बची चर्चा झाली. २००८ साली ९४ देशांनी एका करारावर स्वाक्षरी करून युद्धात ‘क्लस्टर बॉम्ब’चा वापर करायचा नाही, असं ठरवलं होतं.

अणुबॉम्बचे काय?

पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धात ‘हमास’ या संघटनेस इराणद्वारा दिले जाणारे कथित समर्थन हा इस्रायल-इराणमधील कळीचा मुद्दा आहेच. शिवाय इराणद्वारा अणुबॉम्बसाठी केले जाणारे युरेनियम संवर्धन हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. इस्रायलला इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखायचं आहे आणि इराण सतत युरेनियम संवर्धन वाढवतो, असं इस्रायलचा दावा आहे. तर युरेनियम नागरी उर्जेसाठी वापरले जाते, असे इराणचे स्पष्टीकरण आहे. मात्र जास्त प्रमाणत युरेनियम संवर्धन केल्यास, इराण सहज अणुबॉम्ब बनवू शकतो असे इराण विरोधकांचे म्हणणे आहे. इस्रायलने ‘इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी’च्या अहवालाचा हवाला देऊन दावा केला आहे की इराणने नऊ अणूबॉम्ब बनवण्याइतपत युरेनियम संवर्धन केलं आहे. आज, इराणकडे ६० टक्के शुद्धतेचे समृद्ध युरेनियमचे मोठे साठे आहेत. हे साठे नागरी ऊर्जेच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या साठ्यांपेक्षा अधिक आहेत आणि ते ९० टक्क्यांपर्यंत समृद्ध केले तर अणुबॉम्बसाठी किमान १० कोर तयार करण्यासाठी पुरेसे आहेत.

‘ऑपरेशन रायझिंग लायन’

इराणकडून इस्रायलच्या अस्तित्त्वाला निर्माण होऊ शकणार्‍या संभाव्य धोक्याला थोपविण्यासाठी इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले आहे. हा धोका पूर्णपणे दूर करण्यासाठी आवश्यक तेवढे दिवस ही मोहाrम सुरू राहील. याला उत्तर म्हणून इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने या मोहीमेला ट्रु प्रॉमिस ३’ असं नांव दिलं आहे.

भारत-इस्रायल व्यापार

आतापर्यंत जवळपास ३०० इस्रायली कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. भारतातून इस्रायलला होणार्‍या प्रमुख निर्यातीत मोती आणि मौल्यवान खडे, ऑटोमोटिव्ह डिझेल, रासायनिक आणि खनिज उत्पादने, यंत्रसामग्री आणि विजेची उपकरणे, प्लास्टिक, कापड आणि वस्त्र उत्पादने, मूळ धातू आणि वाहतूक उपकरणे, कृषी उत्पादने यांचा समावेश होतो.
एप्रिल-नोव्हेंबर २०२४दरम्यान संरक्षण वगळता दोन्ही देशांमधील व्यापार २.३४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आणि व्यापार संतुलन भारताच्या बाजूने राहिले. परंतु भारताच्या एकूण निर्यातीच्या बाबतीत हा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले होते की येत्या १२-१३ वर्षांत भारत आणि इस्रायलमधील द्विपक्षीय व्यापारात दहापट वाढ होऊ शकते. अजून ते लक्ष्य गाठायचे आहे. मात्र २०२५ या आर्थिक वर्षात भारताने इस्रायलला २.१५ अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या आणि १.६१ अब्ज डॉलर्सची आयात केली.

भारत-इराण व्यापार

भारत आणि इराण यांच्यात बहुआयामी व्यापार संबंध आहेत, कृषी मालापासून ते औद्योगिक यंत्रसामग्रीपर्यंत विविध उत्पादनांची देवाणघेवाण होत आहे. शिवाय केशर आणि चहासह इराणी ब्रँड्स भारतात वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. भारत इराणला प्रामुख्याने बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळे, औषधे, सॉफ्ट ड्रिंक्स, मसाले, आणि कृत्रिम दागिने निर्यात करतो. याचबरोबर भारत, इराणकडून कच्चे तेल, एलपीजी, कोरडी फळे (बदाम, खजूर), केशर, खनिजे, मिथेनॉल आणि पेट्रोलियम बिटुमेन आयात करतो. २०२५मध्ये भारताने इराणला १.२४ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आणि त्याबदल्यात ४४१.९ दशलक्ष डॉलर्सची आयात केली.
इराण हा भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे, जो दररोज ४२५,००० पेक्षा जास्त बॅरल तेल पुरवठा करतो. ही आयात २०१८मध्ये अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे २०१९मध्ये थांबली होती आणि तिचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम झाला होता. शिवाय सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलपुरवठ्यात निर्माण झालेले अडथळे अजून दूर झाले नाहीत.

इराणचे चाबहार बंदर

मे २०२४मध्ये भारताने इराणच्या चाबहार बंदरातील ‘शहीद बेहेश्ती टर्मिनल’ चालविण्यासाठी १० वर्षाचा ४७७० कोटी रुपयांचा करार केला. हे बंदर ‘भारत पोटर््स ग्लोबल लिमिटेड’ चालविते. हे बंदर भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंतचा थेट मार्ग देते, ज्यामुळे पाकिस्तानच्या मार्गाची गरज भासत नाही. शिवाय चीनच्या ‘ग्वादर बंदराचा’ प्रभावही कमी होतो. मात्र आता आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरवर लादलेल्या पाश्चिमात्य निर्बंधांचा चाबहर बंदर आणि आयएनएसटीसी कॉरिडोरवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

व्यापारावर परिणाम

भारताच्या एकूण व्यापारात इस्रायलचा वाटा कमी असल्याने (११६० अब्ज डॉलर्सपैकी सुमारे तीन अब्ज डॉलर्स), भारतावर त्याचा मर्यादित परिणाम होईल. तथापि, प्रमुख सागरी मार्गांमध्ये कोणताही व्यत्यय आल्यास व्यापारावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. मुख्य चिंता होर्मुझची सामुद्रधुनी आहे, जी पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते आणि जागतिक तेलनिर्यातीच्या जवळजवळ २० टक्के वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि तो रोखण्याच्या कोणत्याही हालचालीमुळे ऊर्जा बाजारपेठेत गोंधळ उडेल. तथापि, इराण जलमार्ग बंद करेल अशी शक्यता कमी आहे. शिवाय इस्रायल-इराण संघर्ष बराच काळ सुरू राहिल्यास तर त्याचे दूरगामी परिणाम व्यापारावर होऊन बरेच नुकसान होऊ शकते.
भारताने वाढत्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचे आणि संवाद आणि राजनैतिकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारत इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध राखतो आणि दोन्ही राष्ट्रांना सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार आहे. दरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत भारतात परत आणले जात आहे.

Previous Post

फॅसिझम पुन्हा जिवंत झाला आहे…

Next Post

श्रमिकांच्या नावाने स्टालिनची हुकूमशाही

Next Post

श्रमिकांच्या नावाने स्टालिनची हुकूमशाही

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.