• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शक : फातिमा बेगम

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 27, 2025
in सिनेमा
0

चित्रपट हे माध्यम खरे तर दिग्दर्शकाचेच असं म्हटलं जायचं. मात्र हळूहळू हे समीकरण बदलले. पुढे जागतिक ग्लोबलायझेशनच्या काळात ८०च्या दशकानंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्त्री दिग्दर्शकांनी मिळवलेले स्पृहणीय यश बघता फातिमा बेगमसारख्या दिग्दर्शक महिलेला विसरून कसे चालेल?
– – –

निसर्गसाखळीतील अनेक सजीवांपैकी एक म्हणजे मानवप्राणी, पण त्याच्या कवटीतील १३०० ते १४०० ग्रॅम वजनाच्या मेंदूने त्याला बुद्धिमान, विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक, कल्पक आणि सर्वात विखारी प्राणीही बनविले आहे. मानवी वर्तन आणि त्याची विविधांगी वाटचाल तर थक्कच करणारी आहे.
चित्रपटकलेचा आविष्कार झाल्यानंतर अवघ्या १६ वर्षांत भारतात दादासाहेब तोरणे यांचा ‘श्री पुंडलिक’ हा पहिला चित्रपट १८ मे १९१२ रोजी प्रदर्शित झाला. नंतर १९१३मध्ये आला दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्चंद्र’. या चित्रपटात एकही स्त्री कलावंत नव्हती. तारामती या पात्राचे काम अण्णा साळुंके या पुरुष अभिनेत्याने केले होते. आपल्या येथील सामाजिक मूल्यव्यवस्थेने जी एक चौकट तयार करून ठेवली आहे त्यात सर्वाधिक बंदिस्त झाल्या त्या उच्चकुलीन स्त्रिया. घराचा मुख्य उंबरठा ते मागील परसदार हे त्यांचे कार्यक्षेत्र. अर्थात यात काही अपवाद होते. या परिघाबाहेर जाणे म्हणजे पापाचे भागीदार होणे अशी काहीशी विचारसरणी तेव्हा सर्वमान्य होती. कला मग ती कुठलीही असो, आपली मानसिक भूक मोठ्या प्रमाणात भागवते. मात्र या कलेतील स्त्रियांची भागीदारीदेखील पुरुषी संस्कृतीला मान्य नसण्याच्या काळात चित्रपट ही कला भारतात रुजली.
१९१३मध्येच दादासाहेब फाळके यांनी दुसरा चित्रपट तयार केला. नाव होते ‘मोहिनी भस्मासुर’. या चित्रपटात सर्वप्रथम स्त्री कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत पडद्यावर दिसल्या. यात त्यांनी पार्वतीची भूमिका साकार केली आणि भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून त्यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदले गेले. याच चित्रपटात त्यांच्या मुलीने म्हणजे कमल कामतने मोहिनीची भूमिका केली आणि पहिली बाल कलाकार म्हणून त्यांचीही नोंद झाली. दुर्गाबाई कामत यांचे लग्न जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे इतिहासाचे प्रोफेसर आनंद नानोसकर यांच्याशी झाले होते. तर त्यांच्या मुलीचे म्हणजे कमल कामत यांचे लग्न रघुनाथराव गोखले यांच्याशी झाले. कमल गोखले यांच्या तीन मुलांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध रंगभूमी व चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले, जे चित्रपट व रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील होत. कमलाबाईंनी ३५ चित्रपटांतून भूमिका केल्या. १९८०मधील ‘गहराई’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हा सर्व तपशील सांगण्याचा उद्देश हा की चित्रपटसृष्टीत स्त्रियांनी कामे करणे हे त्याज्य मानले गेले असताना दुर्गाबाई व कमलबाई यांनी धाडसाने पाऊल ठेवून स्त्रियांना या क्षेत्रात येण्याची वाट मोकळी करून दिली.
चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून अनेक स्त्रियांनी योगदान दिले, मात्र निर्माता-दिग्दर्शक-लेखक या क्षेत्रापासून त्या लांबच होत्या आणि आजही हे प्रमाण तुलनेने कमीच आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दिग्दर्शक कोण असावी, याचे कुतूहल मला होते. ८०च्या दशकात सई पराजंपे, अपर्णा सेन, विजया मेहता, प्रेमा कारंथ आणि नंतरच्या मीरा नायर यांचा चांगलाच बोलबाला झाला. त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखविली. मात्र १९१३ ते १९८० या काळात स्त्री दिग्दर्शक कोण होत्या? या शोधात एक नाव आढळले. १८९२ला एका मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या या मुलीचा अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, लेखक बनण्याचा प्रवास उर्दू रंगभूमीवरून सुरू झाला. हा प्रवास आणि तिचे स्वत:चे आयुष्य अनेक वळणे घेत पुढे जात राहिला. फातिमा बेगम हे तिचे नाव.
उर्दू रंगभूमीवर सक्रिय असणारी फातिमा वयाच्या १९व्या वर्षीच आई झाली. सुलताना, झुबेदा आणि शहजादी अशा तीन मुलींना पाठीशी घेऊन फातिमा बेगमने आपला चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू केला. चित्रपटसृष्टीला चंदेरी दुनिया असेही म्हणतात, पण फातिमा बेगमला सुरुवातीला भाकरीच्या चंद्रासाठीही झगडावे लागले. सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे हे ‘सचिन’ प्रांताचे नवाब. सचिन प्रांत ब्रिटीश राजवटीत गुजरातमधील सुरत जिल्ह्यात होता. १८८७ ते १९३० या कालखंडात ते येथील नवाब होते. फातिमा बेगमच्या तिन्ही मुलीचे जैविक पिता हे नवाब होते मात्र कायदेशीररित्या कोणतीही नोंद कोणत्याच कार्यालयात झाली नाही. अर्थात ते नवाब असल्यामुळे फातिमा बेगम कोणताही कायदेशीर लढा लढू शकल्या नसाव्यात. त्यात त्या मुस्लीम असल्यामुळे अधिक कोंडीत सापडल्या असतील.
जगण्यासाठी रंगभूमीने कलावंतांना बळ दिले आहे हे सत्य आहे. सर्व जाती, धर्म आणि रंगरूपाच्या पलिकडे जाऊन रंगमंच सर्वांना आपलेसे करतो. रंगभूमीवरील काळ्या विंगेआडून कलावंत रंगभूमीवर प्रवेश करतात, जिथे रंगमंच प्रकाशझोताने उजळलेला असतो. मानवी आयुष्यदेखील असेच काळातून काळाकडे प्रवाहीपणे सरकत असते.
आपल्या तीन मुलींना घेऊन फातिमा बेगम अर्देशीर ईराणी यांच्या तंबूत दाखल झाल्या. अर्देशीर म्हणजे चित्रपटसृष्टीतील बडे प्रस्थ. ‘इम्पिरीअल फिल्म्स’ नावाच्या मोठ्या िचत्रपट संस्थेचे ते मालक, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते. फातिमा बेगम यांना १९२२मधील ‘वीर अभिमन्यू’ या मूक चित्रपटात सुभद्रेची भूमिका मिळाली. यातील उत्तरा या अभिमन्यूच्या पत्नीची भूमिका फातिमाच्या मुलीने म्हणजे सुलतानाने केली होती. तो काळ स्त्री भूमिका पुरुषांनी करण्याचा होता. त्यामुळे फातिमाला सहजपणे भूमिका मिळत गेल्या. फातिमा बेगम वर्णाने अत्यंत उजळ असल्यामुळे त्यानां सेपिया टोनचा मेकअप करावा लागे. कारण चित्रपट कृष्णधवल रंगात असत. प्रत्यक्ष जीवनातला आयुष्य नावाचा तारा काहीसा झाकोळला असताना फातिमा बेगम मूकपटांच्या सुपरस्टार बनल्या. नवाब सिद्दी यांनी जरी तिच्या अस्तित्वाची दखल देहापुरतीच घेतली असली, तरी रंगदेवतेने मात्र योग्य ती दखल घेतली.
१९२६मध्ये म्हणजे चित्रपटसृष्टीत आगमन झाल्याच्या अवघ्या चार वर्षानंतर फातिमा बेगम यांनी ‘फातिमा फिल्म्स’ नावाची चित्रपट संस्था स्थापन केली. पुढे १९२८मध्ये या संस्थेचे रूपातंर ‘व्हिक्टोरिया फातिमा फिल्म्स’ असे करण्यात आले. फातिमा बेगम यांना भारतातील फँटसी चित्रपटाचे जनक म्हटल्या जाते. ट्रिक फोटोग्राफीचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर त्या या कल्पनारम्य चित्रपटांसाठी करत असत. स्वत:च्या संस्थेसाठी त्या स्वत: निर्मिती, पटकथा लेखन, दिग्दर्शन व अभिनय करत तर ‘कोहिनूर सिनेमा’ आणि ‘इम्पिरीअल फिल्म्स’ या संस्थेसाठी अभिनेत्री म्हणून काम करत. १९२६मध्ये त्यांनी आपल्या संस्थेसाठी ‘बुलबुल-ए-परीस्तान’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. हा चित्रपट फँटसी असल्यामुळे बराच खर्चिक होता. मात्र आज या चित्रपटाची प्रिंट अस्तित्वात आहे की नाही ते माहित नाही. या चित्रपटात फातिमा बेगम यांच्या दोन्ही मुलींनी म्हणजे झुबेदा आणि सुलताना यांनी भूमिका केल्या होत्या.
त्यांची धाकटी मुलगी झुबेदा ही ‘आलम आरा’ या पहिल्या भारतीय बोलपटाची नायिका झाली. अर्देशीर ईराणी हे या बोलपटाचे निर्माते दिग्दर्शक होते. झुबेदाने हैद्राबादचे राजे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ग्यान बहादूर यांच्याशी लग्न केले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. सचिन संस्थानाच्या मुस्लीम नवाबाची मुलगी हैद्राबादच्या हिंदू महाराजाची पत्नी झाली. फातिमा बेगमला मलिका म्हणून न्याय मिळाला नाही, मात्र मुलीला ती प्रतिष्ठा मिळाली. संजय दत्त यांची दुसरी पत्नी मॉडेल रिया पिल्लाई ही याच झुबेदाची नात आहे.
प्रâान्सचा जॉर्ज मेलिएस हा जगातल्या फँटसी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फँटसी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून ‘बुलबुल-ए-परीस्तान’, ‘हीर रांझा’, ‘नसीब की देवी’, ‘चंद्रावली’, ‘कनकतारा’, ‘शंकुतला’, ‘मिलन’ आणि ‘गॉडेस ऑफ लक’ हे सर्वच मूकपट त्या काळी खूप गाजले. खरे तर १९२०च्या दशकात स्त्रियाच नाहीत तर पुरुषांनाही चित्रपटात काम करायला फारशी मान्यता नव्हती. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर फातिमा बेगमसारखी सनातनी मुस्लीम कुटुंबातील स्त्री येथे येऊन निर्माता, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकाची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातिमा बेगमसारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८चा ‘दुनिया क्या कहेगी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. चित्रपटसृष्टीतील १६ वर्षांच्या अखंड प्रवासानंतर फातिमा बेगम यांनी निवृत्ती पत्करली. १९८३मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.
चित्रपट हे माध्यम खरे तर दिग्दर्शकाचे असते अशी पूर्वीपासून मान्यता आहे. मात्र हळूहळू हे माध्यम चित्रपटास अर्थ पुरवठा करणारे आणि नंतर स्टार नायकांकडे हस्तांतरित झाले. आता जागतिक ग्लोबलायझेशनच्या काळात व्यवसाय हेच मुख्य धोरण असल्यामुळे दिग्दर्शकाला अनेक तडजोडी कराव्या लागतात. ८०च्या दशकानंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्त्री दिग्दर्शकांनी मिळवलेले स्पृहणीय यश बघता फातिमा बेगमसारख्या दिग्दर्शक महिलेला विसरून कसे चालेल?

Previous Post

सोमीताईचा सल्ला

Next Post

ती मी नव्हेच!

Next Post

ती मी नव्हेच!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.