बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेली ही काळजात धडकी भरवणारी पुतना मावशी आहे महागाईची. १९७२च्या दुष्काळानंतर देशात महागाईचा आगडोंब उसळला होता, त्या काळातलं हे चित्र. पण, आज ते महाराष्ट्राच्या गुजरातधार्जिण्या निर्लज्ज आणि खोटारड्या राज्यकर्त्यांमुळे हिंदी सक्तीच्या पुतनामावशीला जसेच्या तसे लागू पडते. हिंदी भाषेचा महाराष्ट्राने कधी दुस्वास केला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीही मुंबईतच फुलली आणि बहरली आहे. मात्र, महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचे काय कारण? महाराष्ट्रातून कोण देशात पोट भरायला जातो ही संपर्कभाषा वापरण्याची वेळ यायला? उलट भारतभरातून लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात पोट भरायला येतात. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात, सगळ्या हिंदी पट्ट्यात तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवली गेली पाहिजे खरे तर. एक देश, एक पक्ष, एक नेता, एक भाषा असला हुकुमशाहीचा वरवंटा महाराष्ट्रावर हिंदी भाषेच्या सकतीच्या माध्यमातून फिरवला जाणार असेल, तर शिवसेनारूपी बाळकृष्ण काय करील, हे या मावशीच्या आचळांना स्वार्थापुरते लटकलेल्या मिंध्यांनी आणि दिल्लीच्या गुलामांनी लक्षात ठेवलेले बरे!