• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबच युतीत सुप्रिमो!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 24, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे २००४ हे वर्ष होते. लोकसभा निवडणुकीची मुदत संपली. पण महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबरपर्यंत होती. केंद्रात भाजपाप्रणित एनडीएचे सरकार होते. ‘फील गुड’, ‘इंडिया शायनिंग’ अशा देशप्रेमाच्या भावनेला हात घालणार्‍या शब्दांची रेलचेल होती. याचा मतदारांवर प्रभाव पडला आहे, असा भाजपच्या धुरिणांचा समज होता, विश्वास होता. त्यामुळे भाजपाचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांना एप्रिलमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घ्यावी, असे वाटत होते. केंद्रातील कामगिरीचा फायदा विधानसभा निवडणुकीत निश्चित होईल असे महाजन-मुंडे द्वयीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले. आकडेवारी देऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाळासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. कारण १९९९च्या निवडणुकीचे उदाहरण ताजे होते. तेव्हा बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध करण्याची भाजप नेत्यांमध्ये हिंमतच नव्हती. शिवसेनाप्रमुखांचा निर्णय युतीत अंतिम निर्णय मानला जात असे, पुन्हा अपील नाही. कारण बाळासाहेबच युतीत सुप्रिमो होते.
शिवसेनाप्रमुखांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण येथे जाहीर प्रचार सभा घेतल्या. पाकिस्तानच्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘फील गुडपेक्षा दिल गुड असावे.’ शिवसेनाप्रमुखांबरोबरच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव यांनी ठिकठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे, बैठका घेऊन मार्गदर्शन केले. शिवसेनेची प्रचारपत्रके, पोस्टर्स, वृत्तपत्रातील जाहिराती कशा प्रभावी होतील याकडे ते जातीने लक्ष देत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागले. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदी विराजमान झाले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर बाळासाहेबांनी भाजपाबद्दल जी तीव्र प्रतिक्रिया दिली, त्यामुळे भाजपाने मुंबई भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी त्यांना निमंत्रित करण्याचे टाळले. याचा बाळासाहेबांना राग आला. त्यामुळे अगोदर ठरवूनही अटलबिहारी वाजपेयींनी भेटण्यासाठी ते गेले नाहीत. त्यामुळे काही काळ भाजपा-शिवसेनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले, ते नंतर निवळले.
२० एप्रिल ते १० मे २००४ या काळात लोकसभा निवडणुका पार पडल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी, राज ठाकरे, भाजपाचे लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आदी नेत्यांच्या दमदार सभा झाल्या. महाराष्ट्रात भाजपला १३ तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २३ जागा मिळाल्या. भाजपाच्या फील गुड, इंडिया शायनिंगचे बारा वाजले, ते झाकोळले गेले. केंद्रात भाजपचा पराभव झाला. काँग्रेस आघाडीचे सरकार आले. भाजपा नेत्यांचा, चाणक्यांचा फाजील आत्मविश्वास युतीला नडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी राजकीय चर्चा रंगली होती की शरद पवारांना भाजपा-शिवसेना युतीत आणण्यासाठी मुंबईत बाळासाहेब ठाकरे-लालकृष्ण अडवाणी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी पवारांना युतीत घेण्यास काही अडचण नसल्याचे सांगून अडवाणी यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्यालाही पसंती दिली होती.

राज्य विधानसभा निवडणूक-२००४

शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत कोणी बंडखोरी केली तर ती सहन केली जाणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी दिला. भाजपने १० जागा वाढवून मागितल्या. पण बाळासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. भाजप नेत्यांना त्यांचा निर्णय मानावाच लागला. याच कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी आणि मोफत वीज देण्याची घोषणाही बाळासाहेबांनी केली. शिवसेना-भाजप युतीने २७ सप्टेंबर २००४ रोजी ‘वचननामा’ जाहीर केला. त्यात शेतकरी, कामगार, बेकार तरुण, महिला ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, दलित यांच्यासाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला. मात्र प्रमुख मुद्यांमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि शेतकर्‍यांसाठी मोफत वीज हेच मुद्दे होते.
शिवसेनेच्या शेतकर्‍यांना कर्जे माफ करण्याच्या आणि वीज मोफत पुरविण्याच्या घोषणेवरून लोकसत्तेने ‘शिवसेनेची तुतारी’ असा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात त्यांनी म्हटले होते की बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकून मंत्रालयावर ते भगवा झेंडा फडकवणार की लाल निशाण असा प्रश्न पडावा इतके ‘वर्गीय’ धाटणीचे व जहाल आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन ‘जय किसान, जय कामगार’ हा संदेश पोहोचवावा, असे आदेश त्यांनी दिले. याचा अर्थ शिवसेनेने आता आर्थिक प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे असे समजायला हरकत नाही.
शिवसेनाप्रमुखांनी विधानसभा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे शिवसेनाप्रमुखांना फक्त दोनच सभा घेता आल्या. त्यांनी मुंबई व ठाणे येथे प्रत्येकी एक जाहीर सभा घेतली. ठाण्यातील जाहीर सभेत त्यांनी व्यासपीठावर महाराष्ट्रातील तमाम जनतेला साष्टांग नमस्कार घालून विनंती केली की शिवसेनेला विजयी करा तर मुंबईच्या सभेत ‘ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि मराठी माणसाची राहणार’ अशी घोषणा केली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ५० ते ६० टक्के मतदान झाले. निवडणुकीचा निकाल असा लागला- शिवसेना- ६२, भाजप- ५९, काँग्रेस- ६९, राष्ट्रवादी काँग्रेस- ७१, इतर- ३२, मुंबईत काँग्रेस आघाडीचे १९ तर शिवसेना-भाजपा युतीचे १४ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रात काँग्रेसचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री झाले.

मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अ‍ॅन्टॉप हिल येथे आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक हजार शिवसैनिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरले. शिवसेनेचे लोकाभिमुख कार्य सुरूच होते. त्याच वर्षी पालघर नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर निवडणुका लढविलेल्या शिवसेनेने २५ पैकी १७ जागा जिंकून निर्विवादपणे प्रथमच पालघर नगरपरिषदेवर भगवा फडकवला. पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अंजली पाटील यांनी राष्ट्रवादीच्या भाग्यश्री दांडेकर यांचा सुमारे दोन हजार मताधिक्याने पराभव केला.

कामगारांनो एक व्हा!

दरम्यान, व्हीआरएसची चर्चा सुरू झाली होती. ही स्वेच्छानिवृत्ती म्हणजे मालकाच्या हातात दांडकेच मिळाले. हे दांडके कामगारांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. हा सुडाचा कारभार चांगला नव्हे. हा अन्याय कदापि खपवून घेणार नाही. मालकांच्या अरेरावीला आवर घाला. त्यांच्या हातातले व्हीआरएसचे हे दांडके काढून घ्या, असे स्पष्ट शब्दात बजावताना शिवसेनाप्रमुखांनी व्हीआरएस धोरणाला कडाडून विरोध केला.
अंदमान येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याखाली असलेले सावरकरांचे गीत काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी पेट्रोलियम मंत्री असताना गाळले होते. हे देशवासीयांना कळले तेव्हा देशभर संतापाची लाट उसळली. शिवसेना-भाजपा खासदारांनी या गीताच्या ओळी पुन्हा तिथे लावण्यासाठी संसदेत आवाज उठवला, कामकाज बंद पाडले. २७ ऑगस्ट २००४ रोजी बाळासाहेबांनी अय्यर यांच्या प्रतिमेला पहिला जोडा मारून त्यांचे थोबाड फोडले. स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचा अपमान हा राष्ट्रद्रोहच, मणिशंकर अय्यर हे देशद्रोही आहेत असा आरोप शिवसेनाप्रमुखांनी केला. शिवसेनेने फक्त उक्तीतून नव्हे तर कृतीतून कायम स्वा. सावरकरांचा मानसन्मान राखला. स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करावा ही शिवसेनेची मागणी आजही कायम आहे.

Previous Post

खड्डेच खड्डे चहुकडे, गेले प्रशासन कुणीकडे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.