• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मतदान घोटाळा आणि नापासांची शाळा

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
May 23, 2024
in मर्मभेद
0

देशात लोकसभा निवडणुकीत कोणते पक्ष पास झाले, कोण फेल झाले, हे ४ जूनला कळणार आहे. मात्र, या परीक्षेत देशाचा निवडणूक आयोग संपूर्णपणे नापास झालेला आहे, यात तीळमात्र शंका असायचं कारण नाही. अनेक केंद्रीय यंत्रणांप्रमाणे निवडणूक आयोगही केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हाताच्या हातातलं बाहुलं बनलेला आहे, याची कल्पना ऐन उन्हाळ्यात कंटाळवाण्या सात टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर झाली तेव्हाच आली होती. निवडणूक आयोगाने काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा आधी आखला गेलेला कार्यक्रम समोर ठेवून ‘साहेबांच्या सोयीने’ निवडणुकांच्या तारखा ठरवल्या असाव्यात, अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे. महाराष्ट्र भाजपच्या खोकेबाज महायुतीसाठी अवघड होता, त्यामुळे इथे पाच टप्प्यांपर्यंत निवडणूक लांबवली गेली आणि मोदी यांना प्रचारासाठी पुरेसा अवधी उपलब्ध करून दिला गेला, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
मात्र, देशभरात निवडणूक रेंगाळवाणी करण्याची खेळी आपल्यावरच उलटली आहे, हे भाजपला पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लक्षात आलं असावं. मोदी काहीही उलट सुलट बोलत राहतील, आम्ही यंव केलं, त्यंव केलं, राममंदिर बनवलं, वगैरे डरकाळ्या फोडतील आणि स्वसंमोहित श्रोतृवृंद ‘मोदी मोदी’ आरोळ्या ठोकेल, मेंदूबधिर अवस्थेत भाजपला मतदान करायला धावेल, अशी त्यांची समजूत असावी. परंतु प्रत्यक्षात इंडिया आघाडीने केलेल्या घोषणांवर, काँग्रेसच्या वचननाम्यावर अत्यंत अश्लाघ्य आणि संपूर्णपणे खोटारडी टीका करण्यातच मोदींची सगळी वक्तृत्त्वकला खर्ची पडली. स्वत:च्या कामावर, स्वपक्षाच्या जाहीरनाम्यावर आणि लोकांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नावर चकार शब्द न काढणार्‍या मोदींना ‘कांद्यावर बोला’ असं महाराष्ट्रातच ठणकावून सांगितलं गेलं. त्यावर मोदींनी ‘जय श्रीराम’ हे उत्तर दिलं, हेच पुरेसं बोलकं आहे.
या निवडणुकीत मोदी हे इंडिया आघाडीने चावी दिल्यासारखे वागत, बोलत राहिले आणि प्रचारपातळीत उत्तरोत्तर घसरत राहिले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकदा म्हणाले, आता दोनपाच दिवसांत मोदी रडतील. मोदी त्यांच्या आदेशानुसार कृती केल्यासारखे खरोखरच जाहीर व्यासपीठावर हुकमी रडलेही! एकीकडे मुसलमानांबद्दल गैर उद्गार काढायचे आणि दुसरीकडे आपले शेजारी मुसलमान होते, आपल्यासाठी त्यांच्या घरून जेवण यायचं, असंही ते असंबद्ध बोलत होते. इतके थकलेले, हरलेल्या देहबोलीचे, निष्प्रभ, निस्तेज आणि दिशाहीन मोदी देशाने याआधी पाहिले नसतील. पण, त्यांची लाज राखायला निवडणूक आयोग स्वयंसेवकासारखा सज्ज होता. मोदींनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विखारी धार्मिक प्रचाराची दखलही निवडणूक आयोगाने घेतली नाही. गैरप्रकारांच्या तक्रारींमध्ये एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा, हे उघडपणे दिसत होतं.
निवडणुकांच्या मतदानाची वाढलेली संशयास्पद टक्केवारी, हा एक आणखी चिंतेचा विषय. ईव्हीएमची यंत्रणाच मुळी निवडणुका वेगवान घ्याव्यात आणि मनुष्यतास वाचून वेगाने निकाल लागावा, यासाठी आहे. ज्या ईव्हीएममध्ये अचूक आकडा मतदान संपल्याच्या दुसर्‍या क्षणी नोंदवलेला असतो, त्या ईव्हीएमच्या मतदानाची आकडेवारी उशिराने, तीही आकड्यांमध्ये जाहीर न करता टक्क्यांमध्ये जाहीर करणे आणि काही दिवसांनंतर ती पाच-सात टक्क्यांनी वाढलेली दाखवणे, हे कमालीचे संशयास्पद आहे. ईव्हीएम या यंत्राविषयी सर्वोच्च न्यायालयालाही शंका नसली, तरी ही यंत्रे हाताळणार्‍या यंत्रणा आणि खासकरून निवडणूक आयोगाबद्दल जनमानसात शंका आहेच. पूर्वी मतपेट्यांची पळवापळवी, अदलाबदली व्हायची, तशा प्रकारचे खेळ ईव्हीएमबद्दल होऊ शकतात, अशी धास्ती जनतेच्या मनात आहे. ती या निवडणुकीत दूर झाली नाही, उलट ईव्हीएमच्या मतांबरोबर व्हीव्हीपॅट स्लिप्सची पूर्ण मोजणी होणार नसल्याने शंका आणखी बळावली आहे.
महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात मतदान झालं. मुंबईत मतदारांच्या रांगा लागल्या. तीन तीन तास मतदार रांगांमध्ये खोळंबून राहिले. एकीकडे मतदान करा, मतदान करा म्हणून जनजागृती करता, एसेमेसचा भडिमार करता आणि याद्यांमधून ऐनवेळी ८० हजार, एक लाख नावं गायब करता? उन्हातान्हात सर्व वयोगटांमधले लोक धावपळ करत होते, नाव शोधत होते, नाईलाजाने परत जात होते. ज्यांना मतदानाची संधी मिळाली, ते किती तास रांगेत उभे राहतील? त्यांना अनेक ठिकाणी ना पाणी मिळाले ना छत; मतदाराला राजा म्हणायचं आणि मत देण्याचा अधिकार नीट बजावता यावा यासाठी सुविधाही पुरवायच्या नाहीत? ज्या मतदानकेंद्रांमध्ये वाढीव रांगा होत्या तिथे मतदानाला वेग आणण्यासाठी आयोगाने काय केले?
मुंबईत मतदानात झालेल्या या संशयास्पद प्रकारांमुळे निवडणूक आयोगाचं पितळ तर पूर्णपणे उघडं पडलं आणि भाजपचं कथीलही उतावळेपणाने स्वत:हून कपडे फेडून बसलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानातल्या दिरंगाईबद्दल आक्षेप घेताच खोके सरकारचे उपप्रमुख बरळले की उद्धव हे पराजयाच्या निराशेतून हे बोलत आहेत. उद्धव यांच्यावर टीका करण्याच्या नादात आपण निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळे मतदानाचा हक्क बजावू न शकलेल्या मतदारांच्या जखमेवर मीठ चोळतो आहोत, याचंही भान सुटावं?
अर्थात, आपण समजून घेतलं पाहिजे. जिथे खुद्द मोदींचं चित्त थार्‍यावर नाही, तिथे हा चिल्लर खुर्दा आता अधिकाधिक खुळखुळत राहणार… पिगी बँक फुटायची वेळ जवळ आली आहे.

Previous Post

नाय, नो, नेव्हर… (१८ मे २०२४)

Next Post

प्रबोधनकारांची प्रतिज्ञा

Next Post

प्रबोधनकारांची प्रतिज्ञा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.