• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

- राम जगताप

Nitin Phanse by Nitin Phanse
March 23, 2023
in भाष्य
0

इंदूरचे कवी, चित्रकार, संपादक श्रीकृष्ण बेडेकर यांचं ९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या छोट्याशा बातम्या काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये आल्या, काहींत आल्या नाहीत. यापलीकडे काही बेडेकरांची दखल मराठी प्रसारमाध्यमांनी फारशी घेतली नाही.
काही माणसं मोठी नादिष्ट-छांदिष्ट असतात! आपल्याला वाटतं ते करण्यात ते आपलं सबंध आयुष्य झोकून देतात. श्रीकृष्ण बेडेकर हे अशा नादिष्ट-छांदिष्टांपैकी एक. ते उत्तम चित्रकार होते, त्यांचा गळा गोड होता. संगीतातलेही ते मर्मज्ञ होते. ते कविता उत्तम प्रकारे गाऊन म्हणत असत. त्यांचं अक्षर मोत्यांसारखं टपोरं आणि लोभस होतं. ते सुरेख रांगोळ्याही काढत आणि तेवढ्याच तन्मयतेनं ग़ज़ला आणि नाटकंही लिहीत.
बेडेकर महाराष्ट्राबाहेर, इंदुरात राहत असले तरी तनमनाने महाराष्ट्रीयच होते. महाराष्ट्राबाहेर राहून मराठीच्या जतन, संवर्धनासाठी ते जे गेल्या ३५-४० वर्षं एकलव्याच्या निष्ठेनं धडपडत राहिले, ते महाराष्ट्रातल्या उठसूठ मराठीच्या भवितव्याविषयी गळे काढणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरावं, एवढं स्पृहणीय नक्कीच होतं.
बेडेकर तसे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावचा, ६ डिसेंबर १९४४चा. त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षणही तिथंच झालं. पण त्या काळी मुंबईपेक्षा होळकर रियासतीचा एक भाग असणार्‍या इंदूरमध्ये बर्‍यापैकी स्वस्ताई असल्याने आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. दुर्गाबाई भागवतांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं बेडेकरांवर साहित्याचा पहिला संस्कार करण्याचं श्रेय ओघानं दुर्गाबाईंकडे जातं. त्यांनी बेडेकरांची ‘बालमित्र’शी ओळख करून दिली अन् बेडेकर आपल्या स्वाभाविक वृत्तीनं आणि साहित्याच्या ओढीनं नादावत, रमत गेले. इंदूर तर त्यांना सर्वार्थानं फायदेशीर ठरलं. शालेय दिवसांत अनेक मराठी कविता त्यांना मुखोद्गत झाल्या. त्यांच्यातल्या सुप्त चित्रकाराचा कुंचलाही याच काळात बहरला. इतका की, वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी इंदिरा गांधींचं उत्तम पोर्ट्रेट बनवलं होतं. इंदिराबाई इंदूरला आल्या असताना बेडेकरांनी ते त्यांना दाखवलं. ते इंदिराबाईंना इतकं आवडलं की त्यांनी ते स्वतःबरोबर नेण्याची इच्छा व्यक्त केली. पण या मानी चित्रकारानं त्यांना नम्रपणे नकार देऊन सांगितलं की, ‘माफ करा. हे चित्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. कारण हे चित्र माझ्या घराची शोभा आहे.’
अस्थिरता ही बेडेकरांसारख्या माणसांची पूर्वअट असावी. त्यांनी अनेक व्यवसाय, नोकर्‍या केल्या, पण कुठेच ते फारसे रमले नाहीत. फक्त एकाच ठिकाणी रमले… आणि ते म्हणजे इंदूरच्या ‘नई दुनिया’ या हिन्दी वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात. तिथं त्यांनी तब्बल १६ वर्षं अक्षरांना वळणदार पैलू पाडण्याचं काम केलं.
रांगोळीकार ही बेडेकरांची आणखी एक ओळख. विशेषत: त्यांनी काढलेल्या धान्याच्या रांगोळ्या विशेष प्रसिद्ध झाल्या होत्या. १९६२मध्ये त्यांनी सर्वप्रथम इंदूरमधील चिमणबागेत भरलेल्या बालमेळाव्यात रांगोळ्यांतून अनेक चित्रं-व्यंग्यचित्रं काढली. १९७०पर्यंत त्यांनी रांगोळीचित्रांची तीन प्रदर्शने भरवली. या आठ वर्षांच्या काळात त्यांनी काढलेल्या रांगोळीचित्रांची तसेच जलरंग, तैलरंग व कोलाज चित्रांची भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, राजा परांजपे, देव आनंद या मान्यवरांनी वाखाणणी केली होती.
बेडेकरांच्या सुंदर हस्ताक्षराचा महिमा तर महाराष्ट्रात साहित्य व पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या अनेकांपर्यंत पोहचलेला होता, अनेक मान्यवरांनी त्यांच्या हस्ताक्षराचं कौतुकही केलं होतं. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ पु.ल. देशपांडे यांनी बेडेकरांच्या हस्ताक्षराबद्दल एकदा लिहिलं होतं, ‘तुमचे हस्ताक्षर म्हणजे लताच्या आवाजासारखा एक चमत्कार आहे.’ अर्थात हा महिमा झाला तो बेडेकर चालवत असलेल्या ‘पत्रसारांश’ या अभिनव अनियतकालिकामुळे. स्वतःच्या हस्ताक्षरात ते वाचकांचा नाव-पत्ता घालून हे अनियतकालिक महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर पाठवत असत. त्यांचा हा उद्योग १९८५ सालापासून एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अव्याहत सुरू होता. मराठी भाषेच्या प्रेमापोटी बेडेकरांनी हे आंतरदेशीय पत्राच्या आकाराचं ‘पत्रसारांश’ हे अनियतकालिक सुरू केलं होतं. त्यांच्या पहिल्या अंकाच्या १००० प्रती त्यांनी साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पाठवल्या. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील सर्वभाषिक शाळांमध्ये दहावीपर्यंत एकसारखा मराठी अभ्यासक्रम राबवला जावा, याविषयी आग्रह व्यक्त केला होता. त्यांच्या या मताला कुसुमाग्रज, बाबासाहेब पुरंदरे, रा. भि. जोशी आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दुजोरा दिला. अखेर नऊ वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व शाळांत मराठी अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली.
‘पत्रसारांश’चे ना. ग. गोरे, डॉ. वि. भि. कोलते, यदुनाथ थत्ते, वसंत देसाई, शिवाजी सावंत, गो. नी. दांडेकर, श्री. ज. जोशी, उमाकांत ठोमरे यांनी मनापासून कौतुक केलं आणि सभासदत्वही स्वीकारलं. आपलं म्हणणं कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त प्रभावीपणे सांगण्याच्या या उपक्रमाला बेडेकरांनी १९८५मध्ये केलेली सुरुवात पाहून असं वाटे की, ईमेल आणि एसएमएस या ‘पत्रसारांश’च्या पुढील आवृत्त्या तर नाहीत! आजच्या धावपळीच्या काळात पूर्वीसारख्या अघळपघळ गप्पाटप्पा करायला वेळ नसला तरी ‘शब्दसंवादा’ला पर्याय नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच बहुधा बेडेकरांनी आपल्या या नियतकालिकाच्या माध्यमातून समाजाविषयी, शासनाविषयी ‘संताप’ व्यक्त करण्यात खंड पडू दिला नाही. या अंकात ते ‘संतापकीय’ या नावानं ‘संपादकीय’ लिहीत. साडेतीनशेच्या वर दिवाळी अंक प्रकाशित होणार्‍या मराठी वाङ्मय व्यवहारात ‘पत्रसारांश’च्या दीड पानी दिवाळी अंकाचीही आवर्जून दखल घेतली जाई. १९९० साली तर ‘पत्रसारांश’ला ‘मौज’च्या बरोबरीने उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कारही मिळाला होता.
पण एवढ्यावरच समाधान मानणारे बेडेकर नव्हते. एक मोठा दिवाळी अंक काढण्याचं त्यांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. ते २००४ साली साकार झालं. ‘शब्द दर्वळ’ हा तब्बल सव्वाशे-दीडशे पानांचा दिवाळी अंक ते गेल्या वर्षीपर्यंत काढत होते. या अंकातून त्यांनी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण साहित्य देण्याचा प्रयत्न केला. त्याची मांडणी ते स्वत: करत. आपल्या हस्ताक्षरात लेखांची शीर्षकं लिहीत. त्यामुळे ‘शब्द दर्वळ’चा अंक नेहमीच वेगळेपण राखून होता.
२००५ साली बेडेकरांना पुण्याच्या कॉसमॉस बँकेच्या वतीने दिल्या जाणार्‍या ‘कॉसमॉस पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तेव्हा मी पुण्याच्या दै. ‘प्रभात’मध्ये रविवार पुरवणीचं काम पाहत होतो. संपादक होते महावीर जोंधळे. एके दिवशी संपादकांचे मित्र सुभाष नाईक यांनी बेडेकरांविषयीच्या कात्रणांची फाइल आणून दिली आणि या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्याविषयी काही लिहिण्याची विनंती केली. संपादकांनी त्यावरून मला एक लेख लिहायला सांगितला. तोवर मी बेडेकरांना भेटलो नव्हतो. पण त्यांच्या ‘पत्रसारांश’चे अंक पाहिले होते, दिवाळी अंकांतून त्यांच्या कविता वाचल्या होत्या, ‘शब्द दर्वळ’चा पहिलावहिला दिवाळी अंकही वाचला होता. त्यामुळे मी त्यांच्यावर एक लेख तयार केला. २४-२५ हे तसं कुठल्याही गोष्टीनं भारावून जाण्याचंच वय. त्यामुळे मी बेडेकरांवर ‘कलंदर कलावंत, मनस्वी साहित्यिक’ हा दीडेक हजार शब्दांचा लेख लिहिला. तो लेआउट केल्यानंतर अर्धा पान झाला. तो पाहून संपादक जोंधळे म्हणाले, चांगला झालाय, पण एवढा लेख छापण्याएवढे काही बेडेकर मोठे नाहीत.पण आमचं ‘प्रभात’ हे दैनिकही एवढं कुठे मोठं होतं? संपादक म्हणाले, लिहिलाय तर राहू दे. मग तो ३० जुलै २००५च्या अंकात तसाच छापून आला. बेडेकर ‘प्रभात’च्या ऑफिसमध्ये आले. त्यांच्यावर लेख लिहिणारी व्यक्ती कोण आहे हे पाहायला. नंतर ते मला पेरुगेटजवळच्या त्यांच्या स्नेह्याच्या घरी घेऊन गेले. पेटी काढून त्यांनी तीन-चार कविता चालीवर गाऊन दाखवल्या. माझ्यासाठी हा नवीनच अनुभव होता. लेख लिहिल्याबद्दल कुणी अशा प्रकारेही कौतुक करू शकतं, याची मी तोवर कल्पनाच केलेली नव्हती.
तेव्हापासून आमच्या गप्पांना सुरुवात झाली. अनेकदा ते फोन करत आणि म्हणत, ‘काही काम नाही, नुकतीच नवी कविता लिहिलीय. ती तुला वाचून दाखवतो.’ आणि मग ती कविता गाऊन दाखवत. ती झाली की, ‘कशी वाटली?’ असं विचारत आणि नंतर बोलू सविस्तर म्हणत फोन ठेवून देत. अशा त्यांच्या कितीतरी कविता मी १०-१५ वर्षांच्या काळात फोनवर त्यांच्याच सुरेल आवाजात ऐकल्या आहेत.
बेडेकर तसे नितळ मनाचे आणि निरागस होते. त्यांच्याकडे राजकीय-जातीय-धार्मिक हेवेदावे नव्हते. ते राजकारणी तर बिल्कुलच नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला आवडायचं. २००७ साली मी मुंबईला आलो. त्यानंतरही आमच्या फोनगप्पा अधूनमधून होत राहिल्या. दोन-चार वेळा भेटीही झाल्या.
त्यातून जाणवलं ते असं की, बेडेकरांचं मराठी साहित्यावर नितांत प्रेम होतं. अगदी पराकोटीचं म्हणावं असं. त्यांच्या बोलण्यात नेहमी मराठी साहित्यिक, साहित्य यांचेच संदर्भ असत. तनाने इंदुरात, धनाने व्यवसायात तर मनाने महाराष्ट्रात, अशी त्यांची कायम त्रिस्थळी यात्रा चालू असे. परप्रांतात राहून मराठी भाषेविषयी त्यांना जे प्रेम, आस्था, ममत्व आणि काळजी होती, ती महाराष्ट्रातल्या अनेक वाचाळवीरांकडे नाही, हे खरं. इंदूरकरांना त्यांच्यासारख्या कलंदर कलावंताचा आणि मनस्वी साहित्यिकाचा अभिमानच वाटला. त्यांचा योग्य तो आदर-सत्कार इंदूरकरांनी केला. इंदूरमध्ये जे दोन मराठी साहित्यिक ‘लोकप्रिय’ होते, त्यात बेडेकर आणि दिलीप चिंचालकर यांचा(च) समावेश होता.
पण बेडेकर हे समाधानी व्यक्तिमत्त्व नव्हतं. त्यांची कशाबद्दल तरी तक्रार असेच, मात्र बहुतेक वेळेला विशिष्ट व्यक्तीबद्दल नसे, ती समष्टीबद्दलच असे. त्यामुळे त्यात हेवेदावे, रागलोभ या गोष्टी नसत. बेडेकर आपली नाराजी कधी लपवण्याचा प्रयत्न करत नसत. त्यांच्याकडे बघितल्यावर जाणवे की, ते तमाम दुनियेबद्दल नाराज आहेत. मराठीतील साहित्यसंस्था, पुरस्कारसंस्था, एकंदर व्यवस्था, समाज यांवर ते कायमच रुष्ट असत. त्यांच्यातला व्यंग्यचित्रकार त्यावर उपहास-उपरोधपूर्ण भाष्य करे. पण त्यात एक अलवारपणा असे. मराठी माणसांची स्वभाषेबद्दलची अनास्था आणि मराठी साहित्यिकांचा पोकळ दंभ यानेही ते व्यथित होत, संतापून बोलत. त्यामुळेच त्यांची मित्रमंडळी त्यांना ‘इंदूरचे अल्बर्ट पिंटो’ म्हणत असे!
बेडेकर हरहुन्नरी होते. कवी होते, गजलकार-व्यंग्यकार होते. चांगले संपादक होते. रांगोळीकार-चित्रकार होते. मराठीप्रमाणेच त्यांना हिंदी भाषाही उत्तम बोलता-लिहिता येत असे. ते पेटीही चांगली वाजवत आणि गातही छान. बेडेकरांच्या काही गेय कविता अनुराधा पौडवाल, अरुण दाते, राणी वर्मा यांनी गायल्या आहेत यापैकी कशातही ते चांगलं करिअर करू शकले असते, पण ही सगळी ‘हुन्नर’ हा त्यांच्या कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा पाया होता. त्या ‘पाया’वर ‘इमला’ बांधण्याच्या कल्पना त्यांना रुचल्या नाहीत, कदाचित सुचल्याही नाहीत किंवा जमल्या नाहीत. कारण त्यांचं सर्वाधिक प्रेम होतं, महाराष्ट्रावर, मराठी साहित्यावर.
त्यामुळे लेखन, संपादन, प्रकाशन असे वेगवेगळे प्रयोग ते मन:पूतपणे करत राहिले. यातल्या कशानेच त्यांना फारसा आर्थिक फायदा झाला नाही. पण त्याची त्यांना तमा नव्हती. त्यामुळे बेडेकर मला एकोणिसाव्या शतकातल्या हरहुन्नरी आणि बहुभाषिक महानुभावांसारखे वाटत. त्यांचे मोह अनावर होते, पण त्यातून माया जमवण्याच्या कल्पना सहसा त्यांना सुचत नसत. त्यामुळे त्यांची ‘एकांडी शिलेदारी’ कधी फारशी फलदायी ठरली नाही.
बेडेकरांसारख्या माणसांची प्रजातीच आता महाराष्ट्रातून नामशेष होत चालली आहे. त्यांच्या नावानं मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फारशा मोठ्या नोंदी लिहिल्या जाणार नाहीत. पण हे तितकंच खरं की, बेडेकरांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला, त्या प्रत्येकाचं आयुष्य थोडंफार तरी प्रसन्न करण्याचं काम त्यांनी इमानेइतबारे केलं.

(अर्कचित्रे : सतीश उपाध्याय)
(अक्षरनामा या पोर्टलवरून संपादित लेख)

Previous Post

‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

Next Post

आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

Next Post

आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.