• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तू गा ऐ दिल जमाने के लिए…

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 24, 2025
in मनोरंजन
0
तू गा ऐ दिल जमाने के लिए…

मन्नादा सर्वांचाच आवाज होते. ‘सफर’मधले ‘नदीया चले चले रे धारा…’ नावाड्याने गायले, पण राजेश खन्नाची अस्वस्थता गाण्याने टिपली. ‘बॉबी’ मधला कोळीवाड्यातला जॅक ब्रिगान्झा (प्रेमनाथ) जेव्हा ‘ना माँगू सोना चाँदी’ गाऊ लागतो तेव्हा प्रेमनाथ मन्नादाच्या गळ्याने गातोय की मन्नादा हेच समजत नाही.
– – –

कोणे एके काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असं वारंवार वाचण्यात वा ऐकण्यात येतं. याचे प्रत्यक्षातले साक्षीदार आता असणे शक्य नाही. यातील ध्वनित अर्थ सर्वांनाच माहीत आहे. प्रत्यक्ष सोन्याचा धूर मी कधी बघितला नाही. तो बघावा असेही मनोमनी वाटत नाही. पण सोन्यासारखी झळाळी असलेले प्रतिभासंपन्न व्यक्तित्त्वांना अनुभवणं हा वेगळाच आनंद आहे. काही माणसं आपले नातेवाईक, पाहुणे, मित्र यापैकी काहीच नसतात. ते आपल्या जातीगोताचे वा धर्म वंशाचेही नसतात. त्यांना जवळून पाहण्याचा योगही कधीच येत नाही. तरीही ते आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. त्यांना तेथून हुसकावून लावण्याचे धाडसही आपण कधीच करू शकत नाही. गंमत म्हणजे कधीकधी तर ते आपल्यावर दादागिरीही करतात आणि आपण ते निमूटपणे सहनही करतो. आपला काही उपाय नसतो म्हणून नाही, तर ते आपल्याला आवडतं, अगदी मनापासून!
अशी दादागिरी करणार्‍यांपैकी एक दादा म्हणजे मन्नादा. कधीकाळी पतंगबाजी आणि कुस्तीचे शौकिन असलेले मन्नादा संगीतातील दादा कसे काय झाले असतील बुवा? आपला एक येडचोट प्रश्न. असाच एक प्रश्न मदन मोहन व बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बाबतीतही पडतो. मदन मोहन संगीत विश्वात येण्यापूर्वी लष्करात मशिनगन हाताळत असत म्हणे! इकडे येऊन त्यांनी सुरांच्या बंदुकी हाताळल्या, तर पंडित हरिप्रसाद यांना त्यांच्या वडिलांना पहिलवान करायचे होते, पण त्यांनी बासरीतून मनमोहक सूर काढले. पतंगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आकाशात वर वर हवेत डोलत असतो, पण त्याची दोरी मात्र कसलेल्या हातात असल्यामुळे तो कसा नाचवायचा ते त्या जादुई बोटांना माहीत असतं. मन्नादांच्या स्वरांचंही काहीसं असंच होतं. ते कधी आसमंत व्यापत तर कधी क्षणात जमिनीवरच्या मातीच्या कुशीत रमत. ‘दो बिघा जमीन’ मधील त्यांचे ते गाणे आठवा.. ‘धरती कहे पुकार के’ सिनेमातील ‘भाई रे’ म्हणताना सूर थेट गगनात जातात, तर ‘सावन बिता जाए’ म्हणताना थेट मातीच्या गर्भात उतरतात.
लहानपणी बाराखडी तर तुम्ही आम्ही सगळेच शिकलो. ‘अ’ अननसाचा, ‘क’ कमळाचा, ‘ज्ञ’ यज्ञाचा, ‘ब’ बाणाचा वगैरे वगैरे. अगदी रटाळ अन् निरस बाराखडी. मग मन्नादाची बाराखडी आली, ‘अ.. आ.. आई… म.. म.. मका… मी तुझा मामा अन दे मला मुका.’’ मी हा सिनेमा आजपर्यंत पाहिला नाही. हा आवाज मन्नादांचा आहे यावरही सुरुवातीस माझा विश्वास नव्हता. बाराखडी इतकी नादमधुर असते आणि हे खट्याळ व मिश्कील स्वर कुस्तीगीर मन्नादांचे आहेत, हेही मला सहजासहजी पचत नाही. मात्र मन्नादांनी असे अनेक चमत्कार आमच्या पचनी पाडले.
अनेकांना शास्त्रीय संगीताची भलतीच अ‍ॅलर्जी असते, तर काहींना जबरदस्त आवड असते… मला आजही लख्ख आठवतं, दोन तीन वर्षांपूर्वी टीव्हीवरील संगीताच्या रिअलिटी शोमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचे ‘लागा चुनरी में दाग’ सुरू होतं, छानच गात होता पोरगा. गाण्याचा शेवटचा तराणा सुरू झाला अन् त्या पोराने चक्क ही कुस्ती जिंकली. मला एकदम क्लिक झाले. मन्नादांनी कुस्तीचा अनुभव या गाण्यातून दिला आणि शास्त्रीय संगीताची अ‍ॅलर्जी असणार्‍यांनीही मनसोक्त टाळ्या वाजविल्या. त्या दिवशी पहिल्यांदा मी मन्नादांचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे शोधून काढले. हे गाणे वयाच्या चाळिशीनंतर मन्नादांनी गायले होते आणि टीव्हीवरचा पोरगा १४ वर्षांचा होता. म्हणजे मन्नादा गायले तेव्हा त्या पोराच्या बापाचाही जन्म कदाचित झाला नसेल. तर अभिजात संगीत असं काळाच्या मर्यादा ओलांडून पुढे निघून जातं.
मन्नादा शास्त्रीय रागदारीवर आधारित गाण्यांवर नेहमीच खुलत. कारण रियाज नावाचा खुराक त्यांनी लहानपणापासूनच भरपूर पचवला होता. ही गाणी ते लिलया गात खरे, पण पडद्यावरील कलावंतांना तोंड हलवताना जाम पंचाईत होत असे. ‘लागा चुनरी में दाग…’ हे गीत पडद्यावर राज कपूर या संगीताचाच पाईक असलेल्या कलावंताने गायले, पण शेवटच्या तराणा गाताना त्यांचे ओठ कमी आणि पदन्यास अधिक दाखवावा लागला, मग बाकीच्यांची काय कथा. फक्त ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया…’ हे गाणे थिएटरात ‘ऐकायला’ जाणारे महाभाग कमी नव्हते. राजकुमारला या गाण्यातील आलापी म्हणताना कोण कसरत करावी लागली होती. सरगम गाताना तर ओठ सोडून बाकी सगळे अँगल त्यात होते. दिलीपकुमार मात्र अशा गाण्यासाठी खूप मेहनत घेत असत.
५० ते ७०चे दशक हे भारतीय चित्रपटांचे सुवर्णयुग. विशेषत: संगीताचे. गाणी लिहिणारी बाप माणसे, चाली लावणारे जबरदस्त संगीतकार. खरे तर हा गीत संगीताचा आखाडाच होता. या आखाड्यातले पहिलवानही एकापेक्षा एक कसलेले होते. वयाच्या १६-१७व्या वर्षी मी मुकेशचा फॅन होतो, म्हणून काही मित्रांनी मला वाळीत टाकण्याचा प्रयत्नही केला होता. ते वयच मुळी ‘दर्द’भरे असतं त्याला मी काय करणार! आपलं प्रेम व्यक्त न करता येत नाही अशा लोकांच्या मनातल्या भावना मुकेश व्यक्त करीत असत. पण जसजसे संगीताचे अवाढव्य विश्व विस्तारू लागले, तसतसे त्यातल्या तार्‍यांची महत्ती उमगू लागली.
‘दिल ही तो है’ हा १९६३चा सिनेमा, पण आमच्या गावी पोहचायला त्याला तीन वर्षे लागली (तेव्हा असेच होत असे. त्या सिनेमाची रिळं असणार्‍या लोंखडी पेट्या ट्रेनने येत. अगोदरच्या ठिकाणी सिनेमाचा मुक्काम वाढला की पुन्हा पेटी यायला उशीर होत असे) यातील ‘लागा चुनरी में दाग…’ गाणे रेडिओवरून प्रचंड लोकप्रिय झालेले… हे गाणे पडद्यावर सुरू झाले की शिट्या टाळ्यांचा कडकडाट होई. या गाण्याची चाल संगीतकार रोशन यांनी राग भैरवीत बांधली आहे. खरे तर शास्त्रीय संगीतातल्या मैफिलीचा ‘टाटा बायबाय’ करणारा हा राग. भैरवीने आजही प्रत्येक मैफलीची सांगता होते. अन इथे तर चित्रपटाच्या मध्यातच मन्नादा अवघे थिएटर घुसळून काढत असत. अर्थात यात चमत्कारी ‘रोशना’ई पण होतीच म्हणा! तर ‘मन्नादांचा आवाज असा होता, मन्नादांचा आवाज तसा होता’ हे काटेकोरपणे शास्त्रीय भाषेत सांगणे मला तर अवघडच वाटते. कारण शास्त्रीय संगीतातील माझा वकूब लिंबूटिंबूच आहे. ऐकताना मनाला भावते, पण त्याचं शास्त्र भारी किचकट. मन्नादा यांनी हे खूपच सोपे करून आमच्या कानातून मनापर्यंत पोहचविले. माझे म्हणणे असे की स्वरांचे धबधबे अंगावर घेताना त्यात चिंब भिजून जा की सरळ सरळ!!
मन्नादांचा असाच कोसळणारा एक धबधबा म्हणजे ‘ना तो कारवाँ की तलाश है…’ ही साहिरच्या लखलखत्या लेखणीतून उतरलेली ‘बरसात की रात’ या सिनेमातील कव्वाली. हिंदी चित्रपटसृष्टीतले ७ मिनिटे आणि २२ सेकंदाचे हे सर्वात दीर्घ गाणे आणि तेही ऐकावेसे वाटणारे. या कव्वालीच्या अगोदरचे संगीताचे तुकडे म्हणजे हिरे, माणिक, मोती यांची बरसातच आहे. यात वाजवलेले काचेचे तुकडेही जिवंत होऊन वाजले आहेत. मोहम्मद रफी, आशा भोसले, एस. डी. बर्मन, सुधा मल्होत्रा यांच्यासोबत मन्नादांनी ही कव्वाली अप्रतिम गायली. दमदार-दमदार म्हणतात तो हाच आवाज हे तेव्हा कळले.
मन्नादांची उडत्या चालीतील असंख्य गाणी आजही पायाला ताल धरायला लावतात. ‘वक्त’चा लाला केदारनाथ आपल्या चार तरुण मुलांच्या आईला जेव्हा ‘ए मेरी जोहराजबीं तुझे मालूम नहीं…’असे दणक्यात सांगतो तेव्हा थेटरात शिट्या ऐकताना आपल्याला शिट्टी वाजवता येत नाही याची खंत वाटली होती. असाच जोरदार बार ‘बहारों के सपने’ चित्रपटात ‘चुनरी संभाल गोरी’ म्हणत मन्नादांनी उडवला. या चित्रपटाचा नायक राजेश खन्ना असूनही गाणे मात्र अन्वर हुसेन (संजय दत्तचा मामा, नर्गिसचा भाऊ) यांच्यावर चित्रित झाले होते.
मन्नादांनी असाच धुमाकूळ ‘पडोसन’ या चित्रपटात घातला. किशोर कुमार आणि मेहमूदसोबतचे ‘एक चतुर नार’ हे एक धम्माल गाणे. या गाण्याचीही एक कथाच आहे. या गाण्यात शास्त्रीय संगीताचे काहीसे विडंबन होते. मन्नादा सरगमचे मास्टर तर किशोरदाला सरगम अजिबात जमत नसे. यावरून मग वाद झाला. यावर निर्माता म्हणाला, गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जसे लिहिले तसेच गायचे आहे. किशोर कुमार तयार झाले, मात्र मन्नादा तयार होईनात. ते म्हणाले, ‘मैं ऐसा हरगिज नहीं करूँगा. मैं संगीत के साथ मजाक नहीं कर सकता…’ कसेतरी करून मग त्यांचे मन वळवण्यात आले. गाण्याचे मुद्रण सुरू झाले. पण मन्नादांनी सर्व गाणे शास्त्रीय ढंगातच गायले. पण जेव्हा किशोरदांनी आपले कडवे अशास्त्रीय पद्धतीने गायले, तेव्हा मन्नादा खूपच नाराज झाले व म्हणाले, ‘हे कसले गाणे? हा राग कोणता आहे?’ यावर अभिनेते मेहमूद त्यांना समजावत म्हणाले, ‘सर, किशोरने जे गायले त्याची या प्रसंगात गरजच आहे.’ मात्र मन्नादांना ते मान्यच नव्हते. संगीताचे विडंबन त्यांना मान्यच नव्हते. तरीही हे गाणे तुफान गाजले. ही तर आर. डी. बर्मन, मन्नादा, किशोर आणि मेहमूद यांनी केलेली महामस्तीच होती. आठवा तो मन्नादांचा ‘नाच ना जाने आंगन टेडा… टेडा… टेडा.’ माणसं गडबडा लोळत असत व आजही लोळतात, म्हणजे हा कुस्तीतला धोबीपछाड नाही का? आत्ता कळले ना की मन्नादा कसे कुस्तीगिर होते ते!!
याच पठडीतलं आणखी एक गाणं आहे राज कपूरच्या ‘बुटपॉलिश’मधलं. ‘लपक झपककर आ रे बदरवा’ डेव्हिड या कसलेल्या अभिनेत्यानं ते पडद्यावर साकारलं होतं. प्रत्यक्ष गाणे विनोदी जरी वाटत असले तरी यात कमालीची आर्तता व आर्जव होतं. चॅप्लिनच्या विनोदात जशी करुणा दडलेली असते तसं काहीसं हे गाणं होतं. मन्नादांनी याचं सोनं केलं. त्याकाळी चित्रपटसृष्टीत काही आडाखे होते. म्हणजे रफीसाहेब दिलीपकुमारसाठी गाणार, किशोरदा देव आनंदसाठी गाणार तर राज कपूरसाठी मुकेश गाणार… मात्र मन्नादा या चौकटीतले नव्हते. त्यांचा आपला संचार कुठेही. त्यांचे एक गाणे ‘अपने लिए जिए तो क्या जिए’ कोणत्या चित्रपटातले असावे याचा मी शोध घेतला. ‘बादल’ नावाचा तो सिनेमा होता. बघायला गेलो तर नायक प्रेमनाथ. हे गाणे संपल्यानंतर अनेकजण सिनेमा हॉलच्या बाहेर निघून जात. ‘गाणे ऐकले आणि पावलो आता चित्रपट काय बघायचा,’ असं काहीसं त्या काळी प्रेक्षकांना होत असे.
मन्नादांची काही गाणी जशी दमदार, झोकदार, डौलदार, जोमदार आहेत तशी काही हळुवार व गोडही आहेत. ‘रात और दिन’ हा नर्गिसला अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा तिच्या कारकिर्दीतीला शेवटचा चित्रपट. या चित्रपटात लतादीदीबरोबर त्यांनी गायलेले ‘दिल की गिरह खोल दो’ ऐकून बघा. मात्र यासाठी एक अट आहे… दारे खिडक्या बंद अन डोळे बंद करा अन मनाचा झरोका उघडा. स्वरांच्या लयदार हिंदोळ्याबरोबर मन्नादा तुम्हाला वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडवून आणतील. बहुतेक हेच ते स्वरांचे विश्व असावे. या विश्वात गाणारा आणि ऐकणारा दोघेही तल्लीन झाले की आनंदाच्या गुहेत आपण खोल खोल जाणार यात शंकाच नाही. असेच एक मधाळ गाणे म्हणजे ‘चोरी चोरी’मधील ‘ये रात भिगी भिगी…’ या गाण्याच्या सुरुवातीस वाजवलेले ट्रम्पेटचे तुकडे अगोदर घायाळ करतात, तर उरलेली कसर मन्नादा व लताबाई भरून काढतात. यातील ‘जीवन में न जाने क्या है कमी’ या ओळीतली कातरता शब्दात कशी सांगायची? खरं तर राज कपूरचा आवाज म्हणजे मुकेश. मात्र अनेक चित्रपटात ते त्यांच्यासाठी मन्नादांचा आवाज वापरत. ‘श्री ४२०’मधला निरागस राजू जेव्हा ‘दिल का हाल सुने दिलवाला’ म्हणत वैâफियत मांडतो तेव्हा मन्नादांच्या चेहर्‍यावरही तसंच निरागस हसू उमटलं असेल की! ‘कस्मेवादे प्यार वफा सब…’ यातला पोकळपणा मन्नादाने जितक्या ताकदीने प्रकट केला तर तितकाच ‘जिंदगी वैâसी है पहेली…’ची विषन्नताही संवेदनशील स्वरांनी प्रकट केली.
मन्नादा कुस्तीगीर होते म्हणून काय मनाचे हळवंपण लोप पावतं? आपल्या मायभूमीला पारखं होऊन जे भूतकाळातील आठवणींना लोंबकळत असतात, त्यांनाच ‘ऐ मेरे प्यारे वतन…’ची वेदना समजू शकते. मन्नादांचा स्वर या गीतात टोकाचा हळवा झालाय, अगदी हृदयात खोल भाला खुपसावा पण रक्ताचा एक थेंबही न निघावा असेच आहेत, हे स्वर.
वर्ष १९५६ म्हणजे मी जेमतेम एक वर्षाचा होतो तेव्हा एक चित्रपट आला होता ‘बसंत बहार’. भारतीय संगीताचा आत्मा म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या शास्त्रीय संगीताला केंद्रस्थानी ठेवून याची कथा लिहिली होती. सपाट चेहरा ठेवून तोंडावर एकही सुरकती उठू द्यायची नाही अशी स्पर्धा ठेवली तर ज्याला पहिला क्रमांक मिळाला असता, असा भारत भूषण या चित्रपटाचा नायक, तर निम्मी ही नायिका. शंकर-जयकिशन हे सिनेमाचे संगीतकार होते खरे, पण खर्‍या अर्थाने तेच या चित्रपटाचे नायक होते. म्हणजे यातील संगीत वजा केले तर कुणीही हा सिनेमा पाहवयाचे धाडस केले नसते. यात एक गाणे आहे, ‘सूर ना सजे क्या गाऊ मैं’. शैलेंद्रने गाण्यातच लिहून ठेवलं की सूरच लागत नाहीत तर काय कप्पाळ गाणार? म्हणजे हा एक विरोधाभासच म्हणायला हवा की… पण मन्नादांनी अत्यंत मर्मभेदी, तरल व हळव्या स्वरात न लागणार्‍या सर्वच स्वरांना सजवले. आता हे काम येरागबाळ्याचे कसे असेल? याच चित्रपटात पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गज गायकाबरोबर ‘केतकी गुलाब जुही…’ म्हणत तानांचा पाऊस पाडण्याची किमयाही त्यांनी केली.
आई महामाया व वडील पूर्णचंद्र डे यांच्या घरी जन्मलेल्या या मुलाला लहानपणापासूनच आपले काका कृष्णचंद्र अर्थात के. सी. डे यांच्या संगीताने भूल घातली. वडिलांना वाटे आपला मुलगा वकील व्हावा. त्यामुळे मन्नादा अनेक वर्षे गोंधळलेल्या अवस्थेत होते. ‘वकील की गाणे’ हा प्रश्न होता. शेवटी गाण्याने वकिलावर मात केली. ते लहान असताना एकदा उस्ताद बादल खान आणि त्यांचे काका कृष्णचंद्र रियाज करत होते. त्यावेळी बादल खान यांच्या कानावर लहानग्या मन्नाचे सूर पडले. त्यावर त्यांनी कृष्णचंद्र यांना विचारले, ‘हा कोण मुलगा गातोय?’ यावर काकांनी मन्नाला बोलावले व ओळख करून दिली. त्यांनी छोट्या मन्नाची प्रतिभा ओळखली. काका कृष्णचंद्र हे संगीतक्षेत्रात सर्वांना परिचित होते. मन्ना त्यांच्यासोबतच मुंबईला आला आणि इथलाच झाला. १९४३मध्ये सर्वप्रथम त्यांना गायिका सुरैय्या हिच्यासोबत ‘तमन्ना’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी ‘रामराज्य’ (महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट) या चित्रपटात कोरसमध्ये उभे राहून आवाज दिला होता.
मन्नादा सर्वांचाच आवाज होते. नायक, खलनायक, विनोदवीर, सहकलाकार अगदी कुणीही. ‘सफर’मधले ‘नदीया चले चले रे धारा…’ नावाड्याने गायले, पण राजेश खन्नाची संपूर्ण अस्वस्थता गाण्याने अलगद टिपली. १९७३ मधील ‘बॉबी’तला कोळीवाड्यातला जॅक ब्रिगान्झा (प्रेमनाथ) जेव्हा ‘ना माँगू सोना चाँदी’ गाऊ लागतो तेव्हा प्रेमनाथ मन्नादाच्या गळ्याने गातोय की मन्नादा त्याच्या गळ्याने गातात हेच समजत नाही इतका हा आवाज एकमेकात मिसळून गेला आहे. असेच एक अप्रतिम गाणे म्हणजे ’मेरी सुरत तेरी आंखे’ या चित्रपटातील ‘पूछो ना कैसे मैंने रैन बिताई…’ सचिन देव बर्मन यांनी अहिर भैरव रागात बांधलेले हे गाणे आजही हृदयात वेदनेची कंपने निर्माण करते. खरं तर त्यांची अशी शेकडो गाणी आहेत ज्यावर स्वतंत्रपणे एकेक लेख लिहिता येईल.
मन्नादांना सुरुवातीला धार्मिक व पौराणिक चित्रपटाची गाणी बर्‍यापैकी मिळाली. रामराज्य, महाकवी कालिदास, विक्रमादित्य, प्रभू का घर, गीतगोविंद, रामायण, जय महादेव, अंगुलीमाल वगैरे. अशा चित्रपटात मुख्यत्वे भक्तिरसाचा कस लागतो आणि नकळतपणे गायक भजन गायक होऊ शकतो. मात्र मन्नादा फक्त भजन गायक नाही झाले. जी भजने नसतात, पण भक्तिरसाने ओथंबलेली असतात, अशा अनेक गाण्यांनाही त्यांनी न्याय दिला. ‘तू प्यार का सागर है’, ‘ए मालिक तेरे बंदे हम्ा’, ‘भयभजंना सून वंदना हमारी’, ‘कहाँ से आयो घन:श्याम’, ‘यशोमती मय्या से’सारखी भक्तिरसाचा मळा फुलवणारे मन्नादा जेव्हा ‘प्यार हुआ इकरार हुआ…’ आणि ‘झुमता मौसम मस्त महिना…’ म्हणू लागतात तेव्हा चकित व्हायला होते. त्यांची प्रकृती वा वृत्ती पाहता हा माणूस गाण्यातून इतका अवखळपणा कसा काय व्यक्त करू शकला? (पण असं घडू शकतं. ओमप्रकाश, कन्हैयालाल, डेव्हिड हे कसलेले कलावंत अविवाहित होते, पण चित्रपटातील त्यांचा कौटुंबिक अभिनय कसा विसरता येईल?)
मन्नादांचे गाणे कोणत्या नायकाने गायले याला रसिकांनी फारसे महत्व दिलेच नाही. त्यांचे अमुक तमुक गाणे चित्रपटात आहे, एवढेच रसिकांसाठी पुरेसे होते. विनोदाचा बादशाह मेहमूदसाठी त्यांनी गायलेली गाणी ही खास मन्नादा पठडीतील आहेत. जितेंद्र-बबीताच्या औलाद सिनेमामधील ‘जोडी हमारी जमेगा कैसे जानी’, ‘गंगा मेरी माँ का नाम,’ ‘आजा मेरी जान ये है जून का महिना’, ‘खाली बोतल खाली डिब्बा’, ‘वाँगो… वाँगो…’ शम्मी कपूरचा गोंधळ असलेले ‘मेरे भैंस डंडा क्यूँ मारा’ ही गाणी केवळ आणि केवळ मन्नादांसाठीच ऐकली व पाहिली जातात. कठीण गाणे गावे ते मन्नादा यांनीच… ते नेहमीच अशा कठीण गाण्यांना आव्हान देत आणि ती ऐकायला सोपी करून टाकत. कवी हरीवंशराय बच्चन यांनाही जेव्हा ‘मधुशाला’ स्वरबद्ध करायची होती तेव्हा त्यांना सर्वप्रथम आठवण झाली ती मन्नादा यांचीच. इतक्या वर्षांनंतर आजही ही मधुशाला अत्यंत मधाळ वाटते ती मन्नादांच्या सुरांमुळेच.
१८ डिसेंबर १९५३ रोजी केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. शुरोमा आणि सुमिता अशा दोन मुली त्यांना आहेत. २०१२मध्ये त्यांच्या पत्नीचे बंगलोर येथे कर्करोगाने निधन झाले. ५० वर्षे मुंबईत राहिलेले मन्नादा पत्नीच्या निधनानंतर बंगलोरला स्थायिक झाले ते कायमचेच. चित्रपट हे माध्यमच मुळी आभासी आहे. एका पांढर्‍या शुभ्र पडद्यावर तांत्रिक करामती करून छायाचित्राद्वारे केलेला खेळ. मात्र चित्रपटगृहातील अंधारात आपण त्यात बुडून जातोच की! या चित्रपटातील संगीत मात्र अस्सल असतं. कारण सिनेमा संपल्यावरही आपण आपल्यासोबत आणतो ते गाणं. निसर्गाने सर्वच प्राण्यांना ध्वनी दिला आहे. पण फक्त मानवानेच या ध्वनीचे रूपांतर संगीतात, गाण्यात केले.
असं म्हणतात की गाताना किंवा कोणत्याही कलेच्या अविष्कारात तादात्म्य फार महत्वाचे. मन्नादा रंगमंचावर प्रेक्षकांसमोर थेट गाणे सादर करीत तेव्हा ते डोळे मिटून गात असत. त्यांना याचे कारण विचारले तर म्हणत, ‘गाणे ही माझी पूजाअर्चना, साधना, प्रार्थना आहे. ती डोळे मिटूनच करतात.’ पार्श्वगायनात असे तादात्म्य पावणे सोपे नाही. कारण ते गाणे चित्रपटात ‘कुणीतरी’ गाणार आहे, म्हणजे त्यातील व्यक्तिरेखा आपल्या भावना गाण्यातून व्यक्त करणार आहे. पण त्याचवेळी ती व्यक्तिरेखा जिवंत करणारा आणखी कुणीतरी कलावंत आहे, जो एकाचवेळी पडद्यावर वेगळा आहे आणि प्रत्यक्षात वेगळा आहे. अशा व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायकाला गायकाला गायचं आहे, तेही वेळेचं भान ठेवून. मुळात ही एक फार मोठी कसरतच असते आणि चित्रपटाच्या सुवर्णकाळातील दिग्गजांना ती कसरत छान पार पाडता आली.
‘मेरा नाम जोकर’मधील राजू जीवनावर भाष्य करताना म्हणतो, ‘पहला घंटा बचपन है… दूसरा जवानी… तिसरा बुढापा…’ यातील प्रत्येक शब्दातील अर्थ मन्नादांनी केवळ आणि केवळ आपल्या सुरांनी जिवंत केला आहे. शेवटी तर त्यांनी कहरच केला आहे. त्यांच्या गळ्यातून जीवनाचा आशय आर्ततेने पाझरू लागतो, ‘‘उसके बाद खाली खाली तंबू है, खाली खाली कुर्सियाँ है, बिना चिडिया का बसेरा है, ना तेरा है ना मेरा है…’’ आजही जेव्हा-जेव्हा हे स्वर कानी पडतात, तेव्हा-तेव्हा सभोवती एकटेपणाचे अव्यक्त धुके पसरल्याचा भास होतो.
रफी साहब, मुकेश, किशोर, तलत मेहमूद, महेंद्र कपूर या सर्वात मन्नादा ज्येष्ठ होते. स्वत: रफी साहब त्यांचे दिलोजान से चाहते होते. ८ जून २०१३ रोजी छातीत इन्फेक्शन झाले आणि मन्नादा यांना आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागले. सुरुवातीला ते बरे झाले, पण नंतर मात्र कार्डिअ‍ॅक अरेस्टने त्यांना चाहत्यांपासून कायमचे हिरावून घेतले. लहानपणापासून केलेली पहिलवानी व सुरांच्या तालमीमुळे सुदैवाने त्यांना उत्तम आरोग्य लाभले. ९४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले.
मन्नादांनी गायलेल्या गाण्याची संख्या किती आहे यापेक्षा त्यांनी गायलेली गाणी आपल्या हृदयात घर करून बसतात हेच महत्वाचे. अनेकदा त्यांचे स्वर ऐकताना जन्माबरोबरच आलेला मृत्यू नावाचा सवंगडी प्रथमच जवळपास असल्याचा भास होऊ लागतो. गाणे असे जन्म आणि मृत्यूला जोडते. हा जोडणारा सेतू म्हणजे गायक, संगीतकार, गीतकार… मनस्वी कलावंत असतो.
मन्नादा आता आपल्यात नाहीत हे माझ्यासारख्याला पचनी पडत नाही, कारण त्यांना कधी जवळून प्रत्यक्ष पाहता आले नाही, त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला कधी जाता आले नाही, त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा योग कधी आला नाही आणि बोलणे तर फार फार लांबची बात. मात्र तरीही ते माझ्यासारख्या शेकडो, लाखो जणांच्या कुठेतरी आत तेव्हाही ते नक्कीच होते आणि आताही आहेत. कारण गाणं कधीच संपत नसतं, नव्हे ते कधी संपूच नये. अन्न पाणी हवा या सोबतच मन्नादांच्या गाण्यावर पोसलेली एक पिढी आजही हयात आहे, त्यांच्यासाठी मन्नादा कायम त्यांच्यासोबतच आहेत!!

Previous Post

विषय ‘गंभीर’ आहे!

Next Post

दर्जेदार नाट्यकृतीचा आविष्कार

Next Post

दर्जेदार नाट्यकृतीचा आविष्कार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.