हळूहळू एकेक पॅसेंजर जाणार. गाडी रिकामी होणारच. आपल्या नावाची घंटी कधी वाजते आणि थांबा कधी येतो तेवढे बघायचे. एरवी कंडक्टर असताना ती गाडी कुठे थांबवायची ते माझ्या हातात होते. पण इथे कोणाला कसे थांबवू? पण तुला सांगतो चिमणी, कंडक्टर खूप मोठा माणूस असतो बरं.
– – –
माझ्या लहानपणीची गोष्ट. दसर्याचा सण होता. आम्ही सगळीकडे जाऊन सोनं वाटून आलो होतो. दिवसभराच्या धावपळीने सगळेच दमलो होतो. रात्रीचे अकरा वाजलेले होते. दरवर्षी भेटायला येणारे जवळपास सगळे लोक येऊन गेलेले होते. आम्ही झोपण्यासाठी गाद्या घालत होतो. मच्छरदाणी लावत होतो. इतक्यात जोरजोरात कोणीतरी घराचा मुख्य दरवाजा वाजवला. ‘आता कोण’ असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि सगळ्यांचीच मुद्रा थोडी त्रासिक झाली. पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोठावला गेला आणि बाहेरून हाक आली, ‘काकी, दरवाजा उघडा. मी आलो आहे.’
सगळ्यांनी तो आवाज मात्र लगेच ओळखला. हे तर ‘टिंग टिंग भास्कर काका.’
घरातील कपड्यांवर बाहेरच्या लोकांसमोर जाऊ नये वगैरे औपचारिकता तेव्हा फारशी नव्हती. बाबांनी मच्छरदाणी एका बाजूला केली आणि ते दरवाजा उघडायला गेले. आईने घाईघाईत गाद्या गुंडाळायला घेतल्या. तितक्यात भास्कर काका घरात आले आणि ओरडले, ‘हे काय तुम्हा लोकांची झोपण्याची तयारी झाली की काय?’
बाबा म्हणाले, ‘अरे भास्कर, किती वाजले? अकरा वाजले आहेत.’
टिंग टिंग भास्कर काका तितक्याच जोरात म्हणाले, ‘अकरा वाजोत अथवा बारा. मी अजून आलो नाही आणि तुम्ही झोपायला निघालात. माझ्याकडून सोनं न घेता. विसरलात मला?’
मग आईकडे वळून म्हणाले, ‘काय काकी, मी अजून यायचा राहिलो हे तुम्ही देखील विसरलात? माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्या काकी असे करू शकतात? एका दसर्याला मला यायला थोडासा उशीर काय झाला, तुम्ही लोक माझ्याकडून सोनं न घेता झोपायला निघालात?’
झोपण्यासारखी छोटी गोष्ट भास्कर काकांनी विनाकारण अतिशय भावनिक करून ठेवली होती. त्यामुळे झोपायला न जाता आम्ही कोणाच्या तरी घरी चोरी करायला निघालो आहोत की काय इतका अपराधी भाव आम्हा सगळ्यांच्या मनात दाटून आला होता. भावनिक देखावा एवढ्यावरच मर्यादित न ठेवता भास्कर काका पुढे बोलू लागले, ‘आपले किती वर्षांचे संबंध!’
खरे तर किती वर्षांचे वगैरे काहीही नव्हते. फार तर चार वर्षांपासून भास्कर काका आमच्या घरी येऊ लागले होते. पण आपल्या म्हणण्याला आधार मिळावा म्हणून त्यांनी उगीचच किती वर्षांचे संबंध वगैरे म्हणणे लांबवले होते. काका पुन्हा बोलू लागले, ‘दर वर्षी संक्रांत आणि दसर्याला माझा तुमच्याकडे येण्याचा नेम चुकलेला नाही. मी जरी तुम्हाला काका काकी म्हणत असलो तरीही तुमच्या लहान भावासारखा आहे. तुमच्या पाया पडल्याशिवाय माझा सण साजरा होणार नाही म्हणून आलो तर तुम्ही मला विसरलातच.’
टिंग टिंग भास्कर काका आता फक्त रडायचे बाकी होते. म्हणजे आता जर दुसर्या कोणी काही बोलले नसते तर ते नक्कीच रडले असते. मग आईने पुढाकार घेतला, ‘तसे नाही हो भावजी. विसरू कसे? मगाशीच आम्हाला आठवण झाली होती.’
‘आम्हाला म्हणजे कोणाला? तुम्हाला की काकांना?’ हा प्रश्न भास्कर काकांनी उगीचच विचारला होता.
‘अहो भावजी, त्याने काय फरक पडतोय?’
‘काय फरक पडतोय म्हणजे काय, मला फरक पडतो. ज्या घरात माझ्या भावनांची किंमत नसेल तिथे कशाला जावे मी? दसर्याच्या दिवशी सोने द्यायला आलो होतो आणि तुम्ही लोक मात्र मला विसरलात.’
भास्कर काका काही त्यांचे पालुपद सोडायला तयार नव्हते.
‘अहो भावजी, म्हणजे मी म्हणाले यांना की आज भास्कर भावजी कसे आले नाहीत? तर हे म्हणाले की तुम्ही बहुतेक गावी जाणार होते. म्हणून आला नसाल. त्यांची तुमची भेट झाली होती म्हणे बसमध्ये मागच्या आठवड्यात.’
आईच्या तोंडून हे वाक्य ऐकून मात्र भास्कर काका एकदम वरमले. ‘हो की खरं, मी म्हणालो होतो काकांना की जायचं आहे मला गावी. शेताचं काम आहे. त्यामुळे वाटले असेल त्यांना.’
‘तेच तर,’ एवढेच वाक्य बाबांनी कसेबसे उच्चारले.
‘मी म्हणालो तुम्हाला काका खरं, पण गेलोच नाही गावी. अहो शेत आमच्या बायकोच्या नावावर करायचं चाललं ना. तर ते दोघींत समसमान वाटायचं आहे. पण घरचे याला तयार नाहीत. शिवाय कायद्याने दोघींच्या नावावर करता येत नाही म्हणे. मी सरळ सांगितलं की जर दोघींच्या नावावर होत नसेल तर मला शेतात वाटा नको. अहो, नंतर घरी यांचे भांडणं लागले तर काय करा! इतकी वर्षं चांगल्या राहिल्या. आता इष्टेटीसाठी उगी सुखी संसारावर वरवंटा फिरवायचा!’
भास्कर काकांना दोन बायका होत्या. हे खरे तर आम्हाला त्यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता असण्याचे एक महत्वाचे कारण होते. आमच्या नात्यात किंवा एकंदरच परिचयात भास्कर काका ही एकमेव व्यक्ती होती की ज्यांना एकावेळी दोन बायका होत्या. दोन बायका आहेत म्हणून त्याबद्दल कुठलाही संकोच भास्कर काकांना वाटत नसे. ते दोघींविषयी तितक्याच प्रेमाने आणि रागाने देखील बोलत असत.
भास्कर काका हे प्रकरण आमच्या आयुष्यात कसं आलं हा खरे तर योगायोगाचा भाग आहे. फार काही नाट्यमयरित्या ते आमच्या आयुष्यात आले नाहीत. आमच्या नात्यात एकूण आठ भास्कर होते. त्या प्रत्येकाला आमच्या घरच्यांनी वेगवेगळी नावे दिलेली होती, जी खरे तर त्यांना ठाऊक नव्हती. उदा. पंचांगवाले भास्कर, धोतर नेसणारे म्हणून धोतर्या भास्कर, काडीवाला भास्कर (चालू कामात काडी घालायची सवय असल्याने हे नाव त्याला बहाल झालेले होते), चष्मीश भास्कर, खर्डेघाशी भास्कर, इंग्रज भास्कर (इंग्रजी बोलण्याची सवय असलेला), भास्कर गुरुजी (शाळेचे हेडमास्तर होते) आणि टिंग टिंग भास्कर.
टिंग टिंग भास्कर हे बसचे कंडक्टर होते. त्यामुळे त्यांना हे असे नाव दिलेले होते. बाबांच्या ऑफिसची बस एक वर्ष बंद होती तेव्हा बाबा सिटी बसने ऑफिसला जात असत. त्या बसवर भास्कर काका कंडक्टर होते. रोजच एकमेकांची भेट होत असे. भास्कर काकांचा स्वभाव अतिशय बडबडा. त्यामुळे लवकरच बाबांशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यात एके दिवशी त्यांच्या बॅगमधील चिल्लरच्या हिशेबाचा काहीतरी घोळ झाला. तो निस्तरायला बाबांनी त्यांना मदत केली. तेव्हापासून त्यांची बाबांवर अक्षरशः भक्ती जडली. दसरा, दिवाळी, संक्रांत अशा सणांना आईबाबांना भेटायला ते येत असत. आईबाबांना ते कुटुंबातील एक मानत असत, पण आम्ही सगळ्यांनी देखील त्यांना आमच्या कुटुंबाचा सदस्य समजावे अशी त्यांची वेगळीच जबरदस्ती आमच्यावर होती.
भास्कर काका बरेच तरुण होते. म्हणजे आमची भेट झाली तेव्हा ते जेमतेम बत्तीस तेहेतीस वर्षांचे असतील. त्यामुळेच ते बाबांना काका म्हणाले असावेत. पण नंतर लक्षात आले की काका म्हणण्याइतके बाबांचे वय जास्त नाही. म्हणून काका म्हणणे बंद केले नाही, पण बोलता बोलता ‘तुम्ही मला भावासारखे’ म्हणून उल्लेख करत असत. बरीच वर्षे बस कंडक्टर म्हणून काम केल्यामुळे भास्कर काकांना बसच्या भाषेत बोलायची सवय झालेली होती. कोणालाही हाक मारताना ते ‘ए पॅसेंजर’ असे म्हणत. त्यांच्या दोन्ही बायकांना हाक मारताना देखील ‘कुठे गेल्या माझ्या आयुष्याच्या गाडीच्या ड्रायव्हर’ असे म्हणून बोलावत.
कपाळाला टिळा, करारी चेहरा, भेदक डोळे, सरळ तरतरीत नाक, गव्हाळ रंग, जवळपास सहा फूट उंची, दणदणीत आवाज आणि या सगळ्याच्या विपरीत त्यांचे जाड जाड ओठ. एकंदरीत मानवजातीच्या चेहेर्याचा एक षष्ठांश भाग ओठ असतात, पण भास्कर काकांचे ओठ चेहर्याच्या एकूण आकाराच्या एक तृतीयांश असावेत. बाकी सगळं देखणेपण नायकाचं असूनही केवळ ओठांमुळे ते देखणे होता होता राहिले होते. सगळे त्यांना त्यावरून चिडवत आणि तेदेखील खुल्या मनाने सगळं स्वीकारत. ‘काय करणार अहो, एखाद्या सिनेमाचा नायक झालो असतो, पण ओठांत मार खाल्ला.’
भास्कर काकांच्या घरी आम्ही कधीही गेलो नाही. किंबहुना त्यांच्या दोन्हीही बायकांना भेटण्याचा योगही अगदी योगायोगानेच आला. आमच्या शहरात नवरात्रात अंबाबाईच्या देवळाजवळच्या मैदानात जत्रा भरत असे. आम्ही त्या जत्रेत जात असू. देवीचे दर्शन घडलेच पाहिजे असा काही हट्ट नव्हता. पण आई ऐकत नसे. तर असेच एके वर्षी अष्टमीच्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो होतो. देवळात होम चाललेला होता आणि होमाला भास्कर काका द्विपत्नीक बसलेले होते. येणारे जाणारे सगळे लोक भास्कर काकांकडे आणि त्यांच्या बायकांकडे बघत होते, पण हे तिघेही तल्लीन होऊन पूजा करत होते. पूजा झाल्यावर भास्कर काकांनी दोन्हीही बायकांची ओळख करून दिली. तिघेही माझ्या आईबाबांच्या पाया पडले. ‘हे माझे मोठे भाऊ आणि या वहिनीसारख्या आहेत. मी त्यांना काका काकी म्हणतो. देवमाणूस असा असतो. नीट बघून घ्या.’
त्या दोघीही अगदी भगवंताकडून गीता ऐकावी तसे चेहरे करून भास्कर काकांचे म्हणणे ऐकत होत्या.
भास्कर काका हे खरे तर पात्र म्हणावे इतके वेगळे होते. कधी कसे वागतील याचा नेम नाही. बसमध्ये त्यांचा आवेश म्हणजे युद्धाला निघालेल्या अर्जुनासारखा असे. एकवेळ एखाद्या तुरुंगातून वैâदी निसटून जाईल, पण भास्कर काकांच्या नजरेतून कधीही कोणी तिकीट न घेता निसटून जाऊ शकणार नाही. त्यांना शक्य झाले असते तर त्यांनी बसमध्ये आलेल्या मुंगीला देखील तिकीट काढायला लावले असते. एकदा ते ड्युटीवर असताना बसमध्ये त्यांची धाकटी बायको चढली. तिला वाटले की नवराच आहे, तर आपल्याकडे पैसे मागणार नाही. पण भास्कर काका सगळ्यांसमोर तिला म्हणाले, ‘लेडी प्यासेंजर आहे म्हणून कसलीही सूट मिळणार नाही, फारतर बसण्याची व्यवस्था करून देता येईल, पण तिकीट काढावेच लागेल.’ तिने सगळ्यांसमोर त्यांना तिकिटासाठी पैसे मागितले. त्यांनी पाकिटातून पैसे काढून तिला दिले आणि पुन्हा तिकिटाचे म्हणून परत घेतले. नियम म्हणजे नियम.
कधी असे वाटे की भास्कर काकांसारखा हुशार माणूस शोधून सापडणार नाही, पण कधी मात्र ते अक्षरशः डोकं बाजूला काढल्यासारखे वागत, त्यामुळे त्यांचा अंदाजच येत नसे. आमच्या कॉलेजच्या बसला तेच कंडक्टर असायचे. कॉलेजच्या मुलामुलींत ते ‘हिरो’ म्हणून प्रसिद्ध होते. राहायचे तसेच. परीटघडीचा गणवेश असायचा. त्यांनी म्हणे सात गणवेश शिवून घेतलेले होते. कुठे लग्नकार्यात अहेर करायचा असला की त्यांना म्हणे गणवेषच अहेरात देत. त्यांच्या स्वतःच्या दोन्ही लग्नात त्यांनी दोन ड्रेसपैकी एक ड्रेस गणवेशच घेतला होता. त्यांच्या मते जे कपडे जास्त घातले जातात त्यावरच पैसे खर्च करावेत.
बसमध्ये भेटले की त्यांची कंडक्टर सीट मला बसायला देत. ‘आमच्या काकाकाकींची चिमणी आहेस गं तू. रोज इतक्या दूर जाऊन शिकतेस तर त्यात आमचे थोडे सहकार्य’ असे म्हणत. फॅशन करणार्या मुलांचा त्यांना भयंकर राग होता. आईबापाच्या जिवावर फॅशन करणे म्हणजे त्यांना गुन्हा वाटत असे. एरवी काम न करणारी त्यांची स्मृती मुलांच्या तिकिटाच्या आणि पासच्या बाबतीत मात्र तल्लख होती. कुठल्या मुलाचा पास संपला आहे, कोणी तिकीट काढलेले नाही, यावर त्यांची तीक्ष्ण नजर असे. त्यांच्यासारखे कंडक्टर असतील तर महामंडळ कधीही तोट्यात जाणार नाही.
भास्कर काकांच्या बसमधून प्रवास करणे म्हणजे रोजची सहल होती. काका एकदम दिलखुलास गप्पा मारत. कुठला मुलगा कुणाच्या मागे आहे, कोणाचे प्रकरण जुळलेले आहे हे सगळे त्यांना ठाऊक असे. कधीतरी मोठ्यानेच कोणाला तरी म्हणत देखील, ‘कामधंद्याचं बघा आता. मग प्रीतीशी लग्न करायला मोकळे.’ इतके वर्ष प्राणपणाने त्या मुलाने जपलेले गुपित भास्कर काका क्षणात फोडून टाकत. रोज बसमधून उतरताना पैसे आहेत का विचारत. कधीतरी सुट्टे पैसे देत. पोरासोरांना काहीतरी घ्यायला सारखे पैसे लागतात, त्यामुळे असू देत, असे त्यांचे म्हणणे असे.
त्यांना नेहमीच ड्रायव्हरपेक्षा कंडक्टरचे काम जास्त महत्वाचे वाटत असे. कसे काय, असा प्रश्न विचारूच नये; नाहीतर तिकिटे वाटायचे सोडून ते त्यांचा अजब तर्क सांगत बसत. ‘हे बघा ड्रायव्हर रिक्षाला असतो, कारला असतो. कित्येक गाड्यांना असतो. पण कंडक्टर बस सोडून इतर कुठल्या गाडीला असतो का? बोला ना? असतो का? नाही किनई? बससाठी त्यांना इतके महत्वाचे पद तयार करण्याची गरज भासली, म्हणजे बघा, कंडक्टर किती महत्वाचे असतात. रेल्वेगाडीला देखील तिकीट तपासनीस असतो, पण कंडक्टर असतो का?’
मग आम्ही सगळी मुलं ‘नाही’ असे एका आवाजात ओरडत असू.
‘बघा म्हणजे, कंडक्टर किती महत्वाचा असतो. भगवान श्रीकृष्ण जर सारथी न होता अर्जुनाच्या रथाचे कंडक्टर झाले असते, तर अठरा दिवस युद्ध चाललेच नसते. पहिल्याच दिवशी अर्जुन सगळ्यांना ठाय ठाय करून बाण मारून आला असता.’
कंडक्टर असण्याचे महत्व त्या पाच वर्षात भास्कर काकांनी इतके पटवून दिलेले होते की काही मुलं बहुधा भाषा विषयांच्या ‘मी कोण होणार’ या निबंधात ‘कंडक्टर’ असेच लिहून आलेली असणार. किंवा पदवी झाली की लगेच कंडक्टरची नोकरी मिळवण्याच्या मागे लागली असणार.
भास्कर काकांना ट्रॅफिकचा अचूक अंदाज होता. त्यानुसार किती वेळ गाडी थांबवायला हवी, किती वेळात मुलांनी खाली उतरले पाहिजे अशी सगळी गणितं त्यांना पक्की ठाऊक होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या आमच्या शहरात त्या काळी कितीतरी दंगली झाल्या. पण भास्कर काका ज्या बसमध्ये आहेत, तिची कधीही काच फुटली नाही. दंगल झाल्यावर कित्येक मुलांना त्यांनी बसमध्ये आश्रय दिला होता आणि बस सुरक्षित ठिकाणी हलवायला लावली होती.
त्यांची आमची एवढी ओळख असूनही मी त्यांच्या द्विभार्या प्रकरणाबद्दल कधीही कोणाला काही सांगत नसे. पण भास्कर काका म्हणजे भास्कर काका आहेत. ते स्वत:च कधीतरी मुलांना ओरडत, ‘आपल्याशी जास्त गमजा करायच्या नाहीत. जिथं मी दोन बायका सुखाने सांभाळू शकतो तिथे तुम्ही पन्नास पंचावन्न पोरं काय चीज?’
भास्कर काकांनी दोन बायका का केल्या हे आम्हाला कित्येक वर्षे ठाऊक नव्हते. म्हणजे ते कितीही खुलेपणाने त्याबद्दल बोलत असले तरीही आमच्या घरी कोणालाही त्याबद्दल त्यांना काही विचारावेसे वाटले नाही. एकदा तर ते तावातावाने आमच्या घरी आले आणि बाबांना म्हणू लागले, ‘तुमच्या ऑफिसात तो बबन आहे ना? कामावरून काढून टाका त्याला.’
बाबा म्हणाले, ‘का रे भास्कर? झाले काय? एकतर असे उठून कोणालाही काढणे माझ्या हातात नाही. आणि दुसरे जर तो माझ्या विभागात असेल तर कारण असल्याशिवाय त्याला कसे काढणार? तुझे त्याच्याशी कसले शत्रुत्व?’
‘आओ, आपला चुलत भाऊ लागतो तो. लग्न झालं ना नुकतच त्याचं.’
‘हो, अजून मुद्द्याचं बोलला नाहीस.’
‘आओ काका. कसले नातेवाईक आहेत बघा आमचे. मी तर लग्नाला पण गेलो नाही. चांगलाच रागावलो आहे त्यांच्यावर.’
‘का बुवा?’
‘अहो, लग्नाच्या पत्रिकेत माझ्या पहिल्या बायकोचंच नाव घातलं, दुसरीचं घातलं नाही. असं कसं? बसली न रुसून. आता कसं बसं समजावून सांगितलं तिला. पण असं करावंच का माणसानं? माझ्या लग्नाच्या दोन्ही बायका आहेत. काही पळवून आणलेल्या नाहीत. का नाव घातलं नाही असं विचारलं तर म्हणे जागा शिल्लक नव्हती. कसं आहे काका, माणसाच्या मनात जागा असली की बाकी कुठंही आपोआप जागा होतीय.’
कुठल्या अजब मिश्रणातून हा माणूस जन्माला आला होता काही समजत नाही. बाबांनी यावेळी मात्र स्वत:हून विषय काढला. ‘अरे भास्कर, याआधी कधी प्रशस्त वाटलं नाही म्हणून बोललो नाही. पण एक विचारू का?’
‘असं काय काका? तुम्हाला काका म्हणत असलो तरी तुम्ही माझ्या मायबापापेक्षा वेगळे नाही. उगीच कोणी कोणाला इतकी माया लावतं का? ती माऊली तर चांगलंचुंगलं काही केलं की तुमच्या लेकरांच्या हाती पाठवती मला. तुम्ही काहीही विचारा, मागा. सगळं दिलं समजा.’
‘अरे तू दुसरं लग्न का केलंस? म्हणजे तुझ्या पहिल्या बायकोपासून तुला चांगले दोन मुलगे होते. मग मुलासाठी दुसरं लग्न केलं म्हटलं तर तशीही गत नाही.’
‘हात ‘तेरी. एवढंच का? काय काका तुम्ही. हे विचारायला एवढे दिवस लावले. अहो. मी लोकांना सांगतो की पहिल्या बायकोपासून मुलगी झाली नाही म्हणून दुसरी केली. पण तुम्ही मोठ्या भावासारखे. तुम्हाला खोटं सांगून कुठं जाऊ. ही दुसरी जी आहे ना, ती आमच्या नात्यातली आहे. लग्न झालं आणि तिसर्या दिवशी नवरा गेला. तिची बिचारीची काय चूक? माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी तिचा जीव हैराण करून ठेवला. जीव द्यायला निघाली होती. आधार म्हणून तिला आमच्या घरी आणून ठेवली. पण आजूबाजूचे सगळे नावं ठेवायला लागले. खूप मुलं बघितली. पण विधवेशी लग्न करायचे म्हणजे आधीचा नवरा कसा आणि केव्हा गेला हे सांगितल्यावर कोणी पुढेच सरकेना. मग शेवटी आमची पहिली बायकोच म्हणाली की करून टाका लग्न तुम्हीच. मी तेव्हाच दोघींकडून मंजूर करून घेतलं की दोन प्यासेंजरमध्ये भांडण झालं तर सरळ बसमधून उतरवून देईन. गाडीत बसून आमचंच टायर पंक्चर करू नका म्हणजे मिळवलं.’
‘पण तुझ्या एवढ्या तुटपुंज्या पगारात सगळ्यांचे भागते का?’
‘करतो कसेबसे. मुख्य म्हणजे दोघी उधळ्या नाहीत. दुसरी तर टेलरिंग करते. ती थोडे कमावते. बाकी थोड्या कुरबुरी असतात. पण त्या कोणाच्या घरी नसतात काका. तुम्हाला म्हणून सांगतो. पहिले पहिले बायका माझ्याबरोबर बाहेर यायच्या नाहीत. म्हणायच्या की दोघी दोघींना एकत्र नेऊ नका. लोक काय म्हणतील. पण आता तसं नाही. सगळ्यांना माहिती आहे. लोक थोडे दिवस टर उडवतात. दुसरा विषय मिळाला आणि आपण चिडत नाही म्हटले की काही म्हणत नाहीत. आपणच आपल्या बायकांवर आधी बोलून मोकळे व्हायचे, म्हणजे समोरचा काही बोललाच नाही पाहिजे.’
परोपकार म्हणून लग्न करणारे भास्कर काका शहाणे की वेडे असा प्रश्न आम्हाला पडला होता.
आता मध्ये बरीच वर्षे गेली आहेत. मी शहरातून बाहेर पडली आहे. अशात त्यांची आणि माझी भेट झाली नाही. भास्कर काका कधीचेच निवृत्त झाले. त्यांची एक बायको देवाघरी गेली असे कळले तेव्हा मी जाऊन भेटून आले. मला म्हणाले, ‘हळूहळू एकेक पॅसेंजर जाणार. गाडी रिकामी होणारच. आपल्या नावाची घंटी कधी वाजते आणि थांबा कधी येतो तेवढे बघायचे. एरवी कंडक्टर असताना ती गाडी कुठे थांबवायची ते माझ्या हातात होते. पण इथे कोणाला कसे थांबवू? पण तुला सांगतो चिमणी, कंडक्टर खूप मोठा माणूस असतो बरं.’
आणि मग कंडक्टर असण्याचे महत्व पटवून देताना एक वेगळीच चमक त्यांच्या डोळ्यात उतरली होती.
मी काय म्हणते की तुम्ही आमच्या शहरात गेलात आणि तुम्हाला उगीचच कोणी ‘पॅसेंजर’ अशी हाक मारून बोलताना आढळले तर लक्षात घ्या की ते आमचे टिंग टिंग भास्कर काका आहेत. आयुष्यभर चिल्लर मोजली असली तरी माणूस मात्र बंदा रुपया आहे.