वय वाढलं की स्मरणशक्ती कमजोर होते आणि मग दिवसेंदिवस त्यात वाढ होतच जाते. या विकाराला ‘डिमेन्शिया’ म्हणतात. आज जगभरात याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सुमारे ५.५ कोटी लोकं ‘डिमेन्शिया’चे बळी पडले आहेत. आपल्या देशात आणि खासकरून महाराष्ट्रातही अशी लक्षणे असणारे रुग्ण आपल्या जवळपासच वाढत चाललेत. उभं आयुष्य बदलून टाकणारे हे संकट वय झालेल्यांना कधी झपाटून टाकेल, याचा काही भरवसा नाही. याच विषयावर आधारित ‘असेन मी.. नसेन मी..’ हे नाटक रंगभूमीवर आलंय, जे कौटुंबिक नाजूक नात्यांभोवती हळुवारपणे गुंफलंय. अस्वस्थ करणार्या या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन व्यथा मांडलीय. मराठीतील दर्जेदार, कौटुंबिक, हृदयस्पर्शी नाटकांच्या दालनात ते दाखल झालं आहे.
स्त्री ही कुटुंबातील आधारस्तंभच. एक महत्वाचा घटक आणि तिलाच जर चारी बाजूंनी अस्थिरतेचा अंधार असताना या आजाराने पकडलं तर…
वृद्धत्वाकडे झुकलेली एकाकी जीवन जगणारी पुण्यातली दीपा. तिचा दिवंगत नवरा तिला स्वप्नात भेटतो. त्याच्या शेवटच्या आजारपणातल्या आठवणीतून ती पूर्णपणे अजून सावरलेली नाही. तिला दोन मुलं. एक मुलगी गौरी जी वैमानिक आहे. वेळीअवेळी फ्लाईट्स असल्याने अधूनमधून आईकडे येते. लक्ष देते. तिचं लग्न झालंय. तिला एक मुलगीही आहे, पण कौटुंबिक वातावरण बिघडलेलं. तिचं प्रकरण आता घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. दुसरा मुलगा रोहन. तो परदेशी स्थिरावलाय. फोनवरून आईच्या संपर्कात आहे. सारं काही फोनवरून. चौकशी, सल्ले आणि मदत. असे हे टिपिकल पुणेकर कुटुंब. दीपाची एक बहीण आहे, वर्षा तिचं नाव. नॉनस्टॉप बोलणारी आणि अपंगत्वामुळे व्हीलचेअरवर अडकलेली. या दोघी बहिणी अर्थातच व्हिडिओ कॉलवर किंवा फोनवर एकमेकींची विचारपूस करतात.
वर्षाचीही एक स्वतंत्र उपकथा आहे. या सगळ्यांमध्ये ‘फोन’ हे एकमेव भेटीगाठीचं ‘स्थळ’ बनलंय. वर्षामावशी एक नंबरची गप्पिष्ट. आठवणींत रमणारी. वय झाल्याने आवाजाचं मशीन कानाला लावायला विसरणारी. बहिणीवर प्रेम आणि काळजी. तिच्यासाठी स्वेटर विणण्याचं तिचं काम सुरू आहे. ती देखील एकटीच. एके दिवशी बोलताना वर्षाला हृदयविकाराचा जबर झटका येतो आणि ती शांत होते. त्यामुळे एकमेकींशी रोज गप्पा मारणे, थट्टा करणे, नथीतून तीर मारणं, हे सारं काही बंद होतं. त्यामुळे दीपा अस्वस्थ…
स्मरणशक्ती कमी होण्याचं तिचं प्रमाण वाढत चाललंय. पण तरीही ती हे मान्य करीत नाही. कधी भलत्याच गोळ्या घेतल्याने त्रास होतो, तर कधी नळ बंद न केल्याने घरभर पाणी साचते. नळ, गॅस, गिझर, मिक्सर, दारं हे बंद न करण्याचं प्रमाण वाढतं. अनेक व्यवहार विस्कळीत होतात. दिनचर्येत बदल होतो. सतर्क राहण्यासाठी मुलगी गौरी तिला कायम सावध करते, पण वय आणि हट्ट यामुळे मर्यादा पडतात. घरकामासाठी कायम एखादी बाई ठेवण्याचा निर्णय गौरी घेते खरी, पण हा प्रस्ताव आई अमान्य करते. वाद होतात. अखेर बाई ठेवण्याचा निर्णय हा मुलगा रोहन यानेच परदेशातून घेतलाय, असं खोटंनाटं सांगून गळी उतरविते आणि ‘सुनंदा’ ही कामवाली बाई घरात येते. विनोदी, ग्रामीण ठसका असणारी ही बाई. तिचीही व्यथा आहे. जी कथानकाच्या ओघात येते. आईला दिवस-रात्र सांभाळण्याची जबाबदारी डोळ्यात तेल घालून ती पार पाडते. अनेकदा सावरते. सांभाळतेही.
गौरीलाही संकटांच्या मालिकांनी जणू घेरलंय. स्वत:चा घटस्फोट आणि उद्ध्वस्त घर. दुसरीकडे कंपनीतील वादविवाद आणि त्यातून नोकरी सोडण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय आणि तिसरीकडे स्मृतिभंशात पूर्णपणे अडकलेली एकाकी जन्मदाती आई. तिची जबाबदारी सांभाळण्याचं कर्तव्य! या विचित्र चक्रातून तिची चारी बाजूंनी घुसमट झालेली. भावभावनांचा जणू भूकंपच. गौरीचं स्वत:चं अस्तित्व हरविलेलं. आई आणि मुलगी दोघेही जशा अगतिकपणे असेन मी.. नसेन मी.. म्हणताहेत.
आई दीपाच्या भूमिकेत नीना कुलकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट यात गेली पन्नासेक वर्षांचा वावर असलेल्या त्या समर्थ अभिनेत्री असून एका रंगपर्वाच्या त्या साक्षीदार आहेत. ‘महासागर’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘गुंतता हृदय हे’, ‘सावित्री’, ‘आईचे घर उन्हात’, ‘ध्यानीमनी’, ‘प्रेमपत्र’, ‘देहभान’ अशा अनेक नाटकांत त्यांनी विविधरंगी भूमिका साकार केल्यात. आजवर त्यांनी चोखंदळपणे भूमिकांची निवड केलीय. एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा त्या आत्मविश्वासाने यातील आईची भूमिका अक्षरश: जगल्या आहेत. त्यांच्यासारखी अनुभवसंपन्न अभिनेत्री आज तरी रंगभूमीवर नाही. त्यांचा समर्थ व परिपूर्ण अभिनय प्रत्यक्ष रंगमंचावर बघणं म्हणजे एक विलक्षण योगच! आई-मुलीतलं नाजुक नातं नजरेत भरतं. एकेका प्रसंगातून वाढत जाणारा स्मृतिभ्रंशाचा आजार तसेच भूतकाळ आणि वर्तमानातलं जगणं हेलावून सोडणारं. रोजचं कावळ्याचं जेवण, त्यांच्याशी संवाद आणि कावळ्याचं निधन.. चटका लावून जाणारं.
या नाटकाचे दिग्दर्शन आणि गौरीची भूमिका अमृता सुभाष यांनी तयारीने केलीय. राग तसेच प्रेम व्यक्त करण्यात असणारी सहजता वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळजीपोटी आईला सांभाळण्याचा केलेला प्रयत्न त्यामागे आहे. अभिनयात जराही कृत्रिमता नाही. ‘वैमानिक’ ही तांत्रिक कौशल्याची भरारी व्यक्तिरेखात असली तरी भावनिक बाजूही तेवढीच हळवी आहे. दुसर्या अंकातील संवाद व स्वगते नाट्याला एका उंचीवर घेऊन जातात. माय-लेकीतले समज-गैरसमज, राग-लोभ हे शब्दातून अन् मौनातून ठळकपणे पुढे येतात.
अभिनेत्री शुभांगी गोखले यांची पहिल्या अंकातील वर्षामावशी आणि दुसर्या अंकातील कामवाली सुनंदा या दोन्ही भूमिकांतील वेगळेपण तपशीलांसह नजरेत भरतं. व्हीलचेअरवर असूनही बडबड व अभिनय अप्रतिम तर सुनंदाचा वारकरी संस्कार व ग्रामीण ठसका काहीदा हशे वसूल करतो. दोन्ही भूमिकांमधला वावर लक्षवेधी. देहबोली सुरेख. सुनंदाचं ‘रामकृष्ण हरी’ हे पालुपद वरचढ झालंय.
यातील चारही स्त्रियांचे प्रश्न भिन्न, गुंतागुंतीचे नाजूक आहेत. त्याला वैयक्तिक व भावनिक संदर्भ आहेत. काही प्रश्नांना निश्चित अशी उत्तरे नसतात. उपायही नसतात. ते प्रश्न ज्याने त्याने सोडवायचे असतात. हेच यातील व्यक्तिरेखा कुठेतरी सांगतात आणि रसिक त्यांच्यात गुंतत जातात.
अमृता सुभाष दिग्दर्शिका म्हणून या नाटकातून प्रथमच ‘कॅप्टन’ झाल्यात. त्यांनी पात्रनिवडीतच पहिली बाजी मारली आहे. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही बाजू यशस्वीपणे पेलल्या आहेत. यापूर्वी एकांकिका स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने प्रत्येक प्रसंगावर परिश्रम घेतल्याचे जाणवते. ‘मिस्टर लेखक आणि मिसेस दिग्दर्शक’ हे समीकरणही या निर्मितीतून जुळलंय. अंगाईतले शब्द त्याचा कथेसाठीचा संदर्भ अर्थपूर्णच. आठवणीसाठी घरात चिटकविलेल्या सूचना, आईचा केलेला बॉबकट, खिडकीत पूर्वजांसाठी जेवण… हे सारं काही जवळपासच्या घरातलंच वाटतं. यातून दिग्दर्शक दिसतो. दिग्दर्शक म्हणून नाटकाचं, आणि भूमिका म्हणून आईचं संगोपन अमृताने पुरेपूर केलंय. त्यांच्याकडून भविष्यात अपेक्षा वाढणं हे स्वाभाविक आहे. तांत्रिक बाजूही चांगल्या जुळल्यात.
ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य म्हणजे अभ्यासकांसाठी आदर्श पाठच असतो. टिपिकल मध्यमवर्गीय पुणेकर घर उभं केलंय. त्याची हालचालींशी सांगड उत्तम. बेडरूम, किचन, हॉल अशी तीन दालने. त्यात कुठेही अडसर नाही. खिडकी, दरवाजे, भिंतीवरले फोटो याची मांडणी सुयोग्य. पहिल्या अंकातील मावशीच्या घराची सरकती भिंत परिणामकारक. प्रकाशयोजना त्यांचीच असल्याने प्रसंगांना उठाव आलाय. विशेषत: पडदा पडतानाचा शेवटचा प्रसंग उंचीवर पोहचतो. साकेत कानेटकर यांचे संगीत परिणामकारक. शोकात्म सूर व ताल हा प्रसंगबदलात महत्वाची कामगिरी पार पाडतो. श्वेता बापट यांची वेशभूषा तसेच अन्य तांत्रिक बाजूही पूरक आहेत.
मराठी नाटक कायम समाजातील प्रश्नांजवळच राहिले. महिला, वयोवृद्ध, कुटुंब यांच्याजवळचे विषय बदलत्या काळानुसार आलेत. जगण्यासाठीच्या प्रश्नांना थेट भिडण्याचे बळ त्यातून मिळाले. अगदी ‘शारदा’पासून ते ‘चारचौघी’पर्यंत काळानुरूप जीवनशैलीला सामोरं जाणार्या स्त्रियांची अनेक वैशिष्टे साकार झालीत. केवळ कल्पना किंवा स्वप्नरंजन यात न अडकता वास्तवाशी अतूट नातं संहितकारांनी आजवर जपलं. त्या प्रवाहात नव्या पिढीचा कल्पक नाटककार संदेश कुलकर्णी याची ही संहिता निश्चितच अर्थपूर्ण आहे. विषय शोकात्म असला तरी त्यात अतिरेक नाही. सहजता आहे. घरोघरी घडणारी गोष्ट बघितल्यासारखी वाटते.
यातलं वेगळेपण म्हणजे ‘डिमेन्शिया’ची मानसिक व्याधी आणि त्यातून होणारी विकृती. यातून उडालेला भावनिक उद्रेक. जो नेमकेपणानं संहितेतून टिपला आहे. वसंत कानेटकर (अखेरचा सवाल), रत्नाकर मतकरी (स्पर्श अमृताचा), जयवंत दळवी (स्पर्श), शं. ना. नवरे (वर्षाव), शेखर ताम्हाणे (सविता दामोदर परांजपे), विजय तेंडुलकर (मित्राची गोष्ट), सुरेश खरे (मंतरलेली चैत्रवेल) या काही रंगभूमीवर गाजलेल्या संहिता. ज्या शाररिक-मानसिक आजारपणावर बेतलेल्या होत्या. विस्मृतीवर म्हणजे ‘डिमेन्शिया’वरलं हे पूर्णपणे आधारित असं पहिलंच नाटक म्हणावं लागेल.
‘स्क्रिस्टीज क्रिएशन’ ही नव्याने स्थापन झालेली नाट्यसंस्था. प्रायोगिक, हटके नाट्यनिर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या बॅनरची पहिली निर्मिती ‘पुन:श्च हनिमून’ ही होती. संहिता व दिग्दर्शन संदेश कुलकर्णी यांचे होते आणि स्वतः ‘संदेश व अमृता’ ही जोडीही यात रंगमंचावर चमकली. या संस्थेची ही दुसरी निर्मिती. दर्जेदार निर्मितीमूल्यामुळे लक्ष वेधून घेत आहे.
नाटकाच्या काव्यात्म नावापासूनच तसेच तिघीजणींच्या जाहिरातीतल्या अस्तित्वामुळे रसिकांचे कुतहूल वाढते. एकेकाळी गाजलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या स्त्रीप्रधान नाटकांची हमखास आठवण येते. नाटकाचे शीर्षक व जाहिरात व्यावसायिकवर प्रामुख्याने महिला प्रेक्षकांना आकृष्ट करणारे आहे आणि त्याची बुकिंग विंडोवरही पूरेपूर खात्री पटते. जाहिरातीपासूनच नाटक हे ‘घर’ करतेय. तसेच प्रयोगानंतर कलाकारांच्या भेटीसाठी ‘सेल्फी’करिता उसळणारी गर्दी ही तर मालिकांचाही प्रभाव अधोरेखित करणारी आहे. ही बाबदेखील एक ‘व्यवसाय’ म्हणून नोंद घेण्याजोगी. असो.
कितीही प्रयत्न केला तरी अंधारातली सावली, वृद्धत्वातले शरीर आणि मृत्यूनंतरची संपत्ती ही साथ देत नाही, हेच खरे. एक हृदयस्पर्शी नाटक बघितल्याचे समाधान रसिकांना मिळेल, यात तीळमात्र शंका नाही.
असेन मी… नसेन मी…
लेखन : संदेश कुलकर्णी
दिग्दर्शन : अमृता सुभाष
नेपथ्य / प्रकाश : प्रदीप मुळ्ये
संगीत : साकेत कानेटकर
वेशभूषा : श्वेता बापट
सूत्रधार : दिगंबर प्रभू
निर्मिती : स्क्रिप्टीज क्रिएशन्स / रंगाई