लहान भाऊ, मोठा भाऊ, छोटा भाऊ, देवाभाऊ, जाड्या भाऊ, रड्या भाऊ, पड्या भाऊ असं भावाभावांचं उदंड पीक सध्या महायुती सरकारमध्ये आल्याने एकमेकांना पाण्यात पाहणारे हे भाऊ पाहून माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या याची सध्या भरपूर करमणूक होतेय. त्यातही येणार्या निवडणुकांमध्ये कोणत्या एरियात कोणत्या भावाचा जोर आहे यावरून सध्याच या भावाभावांत जुंपल्याचे दिसत असल्याने या भावांच्या प्रतिक्रिया घेऊन येण्याचा सल्ला मी पोक्याला दिला. त्याच या प्रतिक्रिया…
एकनाथ शिंदे : ठाणे जिल्ह्यात आमची नकली सेना हाच मोठा भाऊ आहे हे कुणीही सांगेल. महाराष्ट्राला भाजपचे मुख्यमंत्री लाभले असले तरी ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री मीच आहे हे मागच्या निवडणुकीत सिद्ध झालेय. ठाण्यात इतर कुणाचीही दादागिरी चालणार नाही. इथे भाजप आमचा छोटा भाऊच असल्याचं जनतेने दाखवून दिलंय. या भावाने आमच्या तंगड्यांत तंगड्या घालून आम्हाला पाडण्याचं काम केलं तर त्यात महायुतीचंच नुकसान आहे. भावाभावांच्या भांडणात ठाकरेंच्या अस्सल सेनेला लाभ होऊ शकतो, हे या भाजपला कळत नाही याचं आश्चर्य वाटतं. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं अशी या भाजपवाल्यांची घाणेरडी वृत्ती महायुतीत आल्यापासून मी सतत पाहतोय. मुख्यमंत्री वाटतात तितके साधे भोळे नाहीत. ते एक चतुर, कावेबाज, भाजपचंच हित बघणारं स्वार्थी व्यक्तिमत्व आहे. तसं नसतं तर त्यांनी माझा पदोपदी अपमान केला नसता. ठाणे जिल्ह्यात भाजपबद्दल जनतेचं मतही चांगलं नाही. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावर आम्ही म्हणजे दिवंगत आनंद दिघे आणि मी ठाण्यात शिवसेना रुजवली. तिची गोड फळं खाऊन आम्ही परिपक्व झालो आणि गब्बर झाल्यावर मूळ शिवसेनेला खोटी ठरवून मी भाजपच्या महायुतीत शिरलो. मूळ शिवसेना फोडण्याची सुपारी घेऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, ते माझ्या कर्तृत्त्वामुळे. आज हेच भाजपवाले माझ्या ठाण्याच्या राज्यात बस्तान बसवण्याच्या खटपटीत असून आमच्या पक्षाला गिळण्याचा त्यांचा डाव आहे, तो मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही. येत्या निवडणुकीत तुम्हाला दिसेलच कोण मोठा आणि कोण छोटा आहे.
देवेंद्र फडणवीस : भाजप हा देशव्यापी पक्ष आहे. ठाणे जिल्ह्यात त्याची पाळंमुळं रूजवण्याचा आमचा प्रयत्न आहे, हे मी नाकारत नाही. गल्लीचा दादा कधीच दिल्लीचा राजा बनू शकत नाही. गल्लीत त्याची दादागिरी असली तरी लोक असली-नकलीचा फरक ओळखतात. जो आपल्या नेत्याशी बेईमानी करून स्वार्थासाठी गद्दार बनतो त्याला कधी ना कधी कर्माची फळं भोगावीच लागतात. राज्यातील विकासकामांच्या भ्रष्टाचारात सर्वात मोठा वाटा कुणाचा आहे हे जनतेला माहीताय. म्हणून आम्ही अशा लोकांना ठरवून बाजूला ठेवतो. सगळ्या पक्षांतील भ्रष्टाचार्यांची मोट बांधून आम्ही ती महायुतीत सेफ डिपॉझिटमध्ये ठेवलीय. त्यांना राज्यकारभारात काहीच ढवळाढवळ करता येत नाही. आमच्या खाबुगिरीत हात मारण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर ईडीचा बडगा आहेच. महायुतीत कोणताही पक्ष आम्हाला टांग देऊन आमच्यापेक्षा मोठा होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील. स्वत:ला ठाण्याचे राजे आणि आमच्या पक्षाचा मोठा भाऊ समजणार्यांना कोण लहान आणि कोण महान हे लवकरच समजेल. या देवाभाऊपुढे सगळे भाऊ छोटे आहेत.
अजित पवार : आमच्या महायुतीत कोणी मोठा नाही की छोटा नाही. प्रत्येकानं मर्यादा सांभाळून वागावं. नाहीतर तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं अशी गत होईल. घरात काय, राजकारणात काय, छोटा भाऊ-मोठा भाऊ यांचे वाद होतच असतात. त्यात नवल नाही. भावा-भावांनी मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. त्या सिंधुदुर्गातल्या भावाभावांनी तर एकमेकांच्या डोक्याला ताप आणलाय. अरे, कसले कुणाचे बाप काढता? मग बापालाच पोरांना समज द्यावी लागते हे बरं नाही. मोठा भाऊ-छोटा भाऊ काय, काका-पुतणे काय, मामा-भाचे काय, सारं एकमेकांना समजून घेण्यावर असतं. दोघांचं कधी फाटेल आणि कधी जुळेल हे सांगता येत नसतं. ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी स्थिती असते. आपलं वय काय, अनुभव काय, पोझिशन काय हे समजून बोलावं. एकमेकांची मापं काढत बसू नये. लोक फक्त मजा बघतात. मी फटकळ माणूस. मनात असेल ते फटकन बोलून टाकतो. मनात डूख ठेवत नाही. जे दुसर्यांविषयी नेहमी मनात राग ठेवून असतात ते डिप्रेशनने खचून जातात. ते ठाण्यातलेच शिलेदार बघा. कधीतरी फुगा फुटतोच. त्या शिरसाटांनाही काय झालंय कळत नाही. सतत माझा निधी पळवला, माझा निधी वळवला असं बडबडत असतात. माझ्या नावाने शिमगा करत असतात. वर, आम्हा दोघांत मतभेद नहीत, असंही म्हणतात. कुठनं देऊ यांना पैसे? या सगळ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी सगळा घोळ घातलाय. त्यात त्या छोट्या-मोठ्या भावांची एकमेकांना पाण्यात बघायची नजर. काय होणाराय या राज्याचं हे काकाच जाणे.
चंद्रकांत ५२कुळे : मोठा भाऊ-लहान भाऊ हे प्रकरण काय आहे याचा मी कसून शोध घेतोय. लहान भावाने मोठ्याचं ऐकलं पाहिजे हे खरं असलं तरी राजकारणात कोणीच कोणाचा लहान किंवा मोठा भाऊ नसतो. कधी कधी स्वत:ला मोठा भाऊ समजणार्या लहान भावाने अक्कल कुठेतरी गहाण ठेवलेली असते. ठाण्यात तुम्ही स्वत:ला मोठा भाऊ समजता, पण मुंबईत काय? मुंबईत तुम्ही का नाही मोठे भाऊ बनू शकत? पालिका निवडणुकीत कळेलच कोण छोटा आणि कोण मोठा भाऊ! मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवणं काही खायचं काम नाही. नाहीतर दोघांच्या भांडणात तिसराच भाऊ बाजी मारून जायचा!