एखादीविषयी काकूंचे फारसे चांगले मत नसले तरी तिचे खाण्यापिण्याचे लाड काकू करणारच. अफजलखान जरी काकूंना भेटला असता तर त्याला खायला घालण्यात काकूंनी एवढे गुंतवून ठेवले असते की शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा त्याने उचलला आहे हे तो विसरूनच गेला असता.
– – –
आमच्या शेजारच्या जोशी काकूंचा पिंडच सेवाव्रती आहे. माझी आणि त्यांची ओळख अशाच एका घटनेतून झाली होती.
बर्याच वर्षांपूर्वी माझ्याकडे मी कामवाल्या मावशी हव्यात म्हणून चौकशी करत होते. तेव्हा एका शेजारणीने सांगितले की तू सरळ जोशी काकूंकडे जा. त्या तुला हवी ती मदत करतील. मोलकरीण हवी म्हणून कोणाकडे कसे जावे असा प्रश्न पडला. पण गरज मोठी होती त्यामुळे मी पाचव्या मजल्यावरील जोशी काकूंकडे गेलेच. फ्लॅटचा दरवाजा उघडाच होता. असभ्यपणे घरात कसे शिरावे म्हणून मी दरवाजा वाजवला. आतून कोणीतरी म्हणाले, ‘जे कोणी असेल त्याने आत यावे. दरवाजा उघडा त्यासाठीच ठेवला आहे.’
मी आत गेले आणि तिथले दृश्य बघून आश्चर्याचा धक्काच बसला. एक बाई सोफ्यावर बसलेल्या होत्या आणि दुसर्या बाई त्यांच्या पायाला मलमपट्टी करत होत्या. सोफ्यावर बसलेल्या बाईंना मी ओळखत होते. आमच्या शेजारच्या सरिताकडची ती मोलकरीण होती.
‘काय गं बाई? काय हवेय तुला?’ अनुनासिक स्वरात काकूंनी विचारले. तरीही माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हताच. समोरचे दृश्य बघतच मी उभी होते.
‘हिला बघतेस होय? ही सुनीता गं. आपल्या इमारतीत कामाला आहे. खाली उतरले तेव्हा बघितले तर ही लंगडत होती. मग काय आणलंन धरून. दिवसभर पाण्यात कामं करतात. मलमपट्टी नको?’ आता पुढचा संवाद सुनीताशी होता. ‘आता दोन चार दिवस आराम कर. आणि खबरदार पाण्यात पाय घालशील तर. अजून एक सांगते. दुपारी जेवायला ये इकडे. तुझ्यासाठी गरमागरम आमटी भात पापड करते.’
काकूंनी इतक्या प्रेमाने आणि अधिकाराने सांगितले होते की तिची काय बिशाद की ती नाही म्हणेल? सुनीता निघून गेली. मग काकू माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, ‘ओळखते मी तुला. तुला मावशी हव्यात ना कामाला. कळले मला. सांगून ठेवले आहे मी एकदोन बायकांना. पाठवते तुझ्याकडे.’
मला ओळखत देखील नसताना माझ्या गरजेबद्दल ठाऊक असणार्या जोशी काकू अजब होत्या.
‘आपली कधी भेट झालेली नाही काकू. तुम्ही कशा ओळखता मला?’
‘अगं, या इमारतीतील सगळ्या लोकांना, त्यांच्याकडे येणार्या पाहुण्या रावळ्यांसह ओळखते मी. बर्याच लोकांकडे कोण कामाला येतं, कोणाचे ड्रायव्हर असतील तर कोण आहेत असं सगळं ठाऊक आहे मला. आपलं प्रत्यक्ष बोलणं पहिल्यांदा होतंय एवढंच.’
‘ही सुनीता तुमच्याकडे आहे का कामाला?’
‘छे गं.’
‘मग तिला मलमपट्टी केलीत ते?’
‘आपल्यासाठी काम करणार्या लोकांनाच मदत करायची असा नियम आहे का?’
काकू असे म्हणल्यावर मला माझा प्रश्न अगदी वेडेपणाचा वाटला.
जोशी काकू मदत करण्यात इतक्या गोड आणि सहज आहेत की त्यापासून त्यांना वेगळ्या करणे शक्य नाही. मागच्या पंधरा वर्षात काकूंना मी निवांत बसलेले कधीही बघितलेले नाही. सतत त्या काहीतरी करत असतात आणि प्रत्येक वेळी ते करणे दुसर्यांसाठी असते.
आजूबाजूच्या जवळपास पंधरा घरांच्या किल्ल्या काकूंकडे असतात. प्रत्येक वेळी किल्ल्या द्यायला कोणी आले की काकू त्यांच्या हातावर काहीतरी ठेवल्याशिवाय परत पाठवत नाहीत. श्रीखंडाच्या वड्या, नारळाच्या वड्या, खारे दाणे, चिवडा आणि अगदीच घरचे काही तयार नसेल तर चॉकलेट किंवा गोळी असे काहीतरी हातावर पडते. सिलेंडर द्यायला येणारी मुलं, कचरा उचलायला येणारी मुलं, प्लंबर, इलेक्ट्रिशियन असे कोणीही याला अपवाद नाही. प्रत्येकाला खाऊ मिळतो.
खाऊ देण्यापासून ते कोणाबरोबर दवाखान्यात जाईपर्यंत सगळी मदत जोशी काकू करतात. सोसायटीतील कोणाचे बाळंतपण झालेले असले तर त्यांच्याकडे केवळ बाळंतिणीला पाच दिवस वेगवेगळ्या खिरी देऊन काकूंचे काम भागत नाही तर महिनाभर बाळंतिणीला शेकशेगडी देणे हे काम स्वेच्छेने काकू करतात. त्यामुळेच परवा एके ठिकाणी लग्नाला गेले होते तिथे काकू नवर्या मुलाला म्हणत होत्या, ‘आता लवकर नातवंड होऊ द्या. तिला शेकशेगडी द्यायला येईन हो. तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईला देखील दिली होती.’
एवढेच नाही तर बाळंतिणीचे करता करता बाकीच्यांना नाश्तापाणी तयार करायला वेळ मिळणार नाही म्हणून चार-पाच दिवस नाश्त्याचे पदार्थ देखील घेऊन जातात.
काकूंचा उत्साह दांडगा आहे. कोरोनाच्या काळात जितक्या घरी कोरोना झाला आहे त्या सगळीकडे काकू डबा देत असत. डबे करून करून त्या आजारी पडायची वेळ आली, पण काकूंनी काही कोणाचे ऐकले नाही. काकूंच्या खायला घालण्याच्या सवयींबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे लोक मुद्दाम कारण काढून त्यांच्याकडे जातात. शिवाय काकू काही फक्त ओळखीच्या लोकांनाच खायला घालतात वगैरे काही नाही. शेजारी पाजारी, त्यांच्या कामवाल्या मावशी अशा कोणाचेही परिचित, नातेवाईक अशा सगळ्यांच्या आवडी निवडी त्यांना ठाऊक आहेत. अमुक तमुकचे नातेवाईक येणार आहेत हे काकूंना कळण्याचा अवकाश की काकू त्यांचे आवडीचे पदार्थ करून मोकळे होतात. ते लोक त्यांच्या घरी आले नाहीत तरी काकूंना चालणार असते. त्या स्वत: डबे भरून त्यांच्या घरी नेऊन देतात. काकूंना नाही म्हणून काहीही उपयोग नाही. त्यांना जे करायचे ते आपण करू द्यावे एवढेच आपल्या हातात आहे.
काकूंना शक्य असते तर बाहेरच्या देशाचा पंतप्रधान पुण्यात येणार आहे, त्याला पालकाची भाजी आवडते अशी खबर काकूंना कुठून तरी लागली असती तर काकूंनी त्याच्यासाठी पालकाची भाजी करून ती त्याला घेऊन जायला सांगितली असती. काकूंचे हे एक आहे. म्हणजे सोसायटीत जे कोणी राहतात त्यांच्या घरी काकू स्वत: डबा नेऊन देतात, पण बाहेरच्या कोणासाठी काही केले तर त्याने मात्र काकूंकडे येऊन डबा घेऊन जावा लागतो. त्या माणसाकडे वेळ आहे किंवा नाहीये याच्याशी काकूंना काहीही देणेघेणे नसते. एकदा तर आमच्या इथले आमदार आमच्या सोसायटीत येणार होते. त्यांच्या हस्ते सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन होते. आमदार साहेबांसाठी खायला काय ठेवायचे यावर चर्चा चालू होती. काकू कोणाकडे तरी डबा देऊन परत येत होत्या, ही चर्चा त्यांच्या कानावर पडली. आमदार साहेबांना अळूवडी आवडते एवढे त्यांना कळले. आता काय, जोशी काकूंना तेवढेच निमित्त मिळाले. त्यांनी उद्घाटनाच्या दिवशी आयोजकांना फोन केला आणि आमदार साहेबांचा नंबर मिळवला. थेट आमदार साहेबांना फोन लावला आणि वड्या खायला यायचे आमंत्रण दिले. निवडणुकीचा काळ जवळ आला होता. आमदार साहेबाना नाही देखील म्हणता येईना. उद्घाटन झाल्यावर प्रयत्न करतो असे म्हणाल्यावर त्यांनी आमदार साहेबांची चांगलीच हजेरी घेतली. उद्घाटन होत राहील, तोपर्यंत वड्या थंड होतील. त्या दिवशी उद्घाटन सोडून आमदार साहेब त्यांच्याकडे आवडीने वड्या खात बसलेले होते.
काकूंच्या हाताला एवढी चव आहे की त्यांच्याकडे एकदा गेलेला माणूस पुन्हा पुन्हा तिकडे गेल्यावाचून राहणारच नाही. जोशी काकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन होते तेव्हा ते काकांचे झाले आहे की डॉक्टरांचे असे वाटावे इतके काकूंनी डॉक्टरांचे खाण्यापिण्याचे लाड केले होते. अजून थोडे दिवस काकूंच्या हातचे पदार्थ खाण्याच्या मोहापायी म्हणे डॉक्टरांनी मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी काकांना चांगले चार दिवस दवाखान्यात ठेवून घेतले होते.
शत्रू वगैरे भानगडी काकूंच्या पाठ्यक्रमात नाहीतच. पण एखादीविषयी काकूंचे फारसे चांगले मत नसले तरी तिचे खाण्यापिण्याचे लाड करण्यापासून काही काकू स्वत:ला थांबवू शकत नाहीत. मला खात्री आहे, अफजलखान जरी काकूंना भेटला असता तर त्याला चित्रान्न, खिचडी खायला घालण्यात काकूंनी एवढे गुंतवून ठेवले असते की शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा त्याने उचलला आहे हे तो विसरूनच गेला असता.
माझे तर म्हणणे आहे की काकूंना आंतरराष्ट्रीय पेच वगैरे सोडवणार्या मीटिंगला न्यावे. त्या लोकांना खाण्यात एवढे गुंतवून ठेवतील की पेच सोडवण्याची वेळच येणार नाही.
समोरच्याला किती खाण्याची गरज आहे हे काकू ठरवत असतात. त्यामुळे आपण कितीही नको नको म्हणून उपयोग नसतो. तो पदार्थ काकू म्हणतील तोपर्यंत आपल्याला खावाच लागतो. त्यांच्याकडे खाणे हे येड्यागबाळ्याचे कामच नव्हे.
काकूंचा चेहरा एवढा निरागस आहे की त्यांचा हिरमोड करणाराच दु:खी होतो आणि चेहरा पाडून बसतो. खांद्याला शबनम लावून काकू कुठे जाताना दिसल्या की ओळखावे की त्या कोणाला तरी डबा द्यायला चालल्या आहेत किंवा दुसर्या कुठल्या तरी प्रकारची काहीतरी मदत करायला चालल्या आहेत. संपूर्ण सोसायटी नव्हे तर आमचं पूर्ण शहरच काकूंना सेवाव्रती म्हणून ओळखतं.
आमच्या सोसायटीत ‘मी काकू’ नावाचे एक प्रकरण आहे. आजूबाजूला घडणारी प्रत्येक चांगली गोष्ट माझ्यामुळेच घडली असा या ‘मी काकूं’चा दावा असतो. पण त्या चक्क जोशी काकूंना कामाचे श्रेय घेऊ देतात म्हणजे बघा.
पाच फूट दोन इंच इतकी उंची. फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस, केसांचा यू कट.
दोन्ही हातात एकेक सोन्याची बांगडी घातलेली. चेहर्यावर कायम हसू, तोंडात साखर आणि भरपूर बोलणं, ही काकूंची ओळख. काकूंच्या चेहर्यावर कायम एक सात्विक भाव असतो. तो इतका वेल्हाळ असतो की काकू कितीही बोलत राहिल्या तरीही माणूस त्यांच्या समोरून हलत नाही.
इतरांना मदत करण्याची सवय काकूंना कधीपासून लागली ते ठाऊक नाही. आम्ही त्यांना कायमच असे बघत आलो आहोत. सोसायटीच्या कार्यक्रमाचे आयोजन जसे आमच्या इथल्या पाटील साहेबांशिवाय होऊ शकत नाही तसे कुणाकडेही काहीही मदत हवी असेल किंवा खाण्याचे कुठले पदार्थ करून आणायचे असतील तर ते काम जोशी काकूंशिवाय दुसरे कोणाला करायला मिळणारच नाही.
कित्येक ठिकाणी तर ज्याच्या घरी कार्य असते ती व्यक्ती सोडून जोशी काकूंच्या घरचे कार्य आहे की काय असा पुढाकार घेऊन काकू सगळे करत असतात. त्यांची मुले शाळेत होती तेव्हा रोज शाळा सुटायच्या वेळी तिथल्या सगळ्या मुलांना खाऊवाटपाचा काकूंचा कार्यक्रम असे.
इतरांसाठी काही करण्यात काकूंना मनस्वी आनंद मिळतो. त्यांच्या चेहर्यावर हा आनंद कायम झळकत असतो.
हे सगळं करण्यासाठी त्या कधीही कोणाची परवानगी वगैरेंच्या भानगडीत पडत नाहीत. ‘मी काय च्ाुकीचं करत नाही. आणि धरलंन मला तर एक बेसनाचा लाडू देईन की त्यांना. मग बघ बच्चमजी कसे पुन्हा लाडू मागायला येतील.’
कधीतरी काकूंच्या या सेवाव्रती स्वभावाचा, काहीतरी करून खायला घालण्याच्या स्वभावाचा फायदा घेणारे देखील लोक आहेत. विशेष करून नातेवाईकांत सगळीकडे सगळेच काकूंना करावे लागते. काकूंना हे लक्षात येत नाही अशातील भाग नाहीच. पण त्यांना परोपकारात आनंद आहे. जोपर्यंत हा आनंद मिळतोय तोपर्यंत त्या आमदार, खासदार, पंतप्रधान, शास्त्रज्ञ, डॉक्टर काय खुद्द ब्रह्मदेव जरी आला तरीही खायला घातल्याशिवाय त्यांना सोडणार नाहीत.
मी काय म्हणते की तुम्ही कधी आमच्या जोशी काकूंना भेटलात तर तुमच्या आवडीचा पदार्थ त्यांना नक्की सांगा. आणि हो मग थोडा वेळ काढूनच यावे लागेल. कारण तो पदार्थ करून तुमच्या पोटात गेल्याशिवाय तुम्ही तिथून निघू शकणार नाहीत. म्हणजे काकूच निघू देणार नाहीत.