राजेंद्र भामरे
एप्रिलचा महिना होता… उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली होती. पंढरपूर-सातारा रस्त्यावर महुद हे चार पाच हजार लोकसंख्येचे गाव. संमिश्र लोकवस्तीचे… तिथे सवर्ण, दलित, मुस्लीम असे लोक एकत्र नांदत होते. एरवी हे गाव खूपच शांत असायचे. गावात शिवजयंतीचा उत्सव सुरू होता. आठ दहा दिवस व्याख्याने वगैरे कार्यक्रम सुरू असत. त्यासाठी मंडप स्टेज केलेले होते. कापडी मंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला होता. तेव्हा मी सांगोला पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून काम करीत होतो. शिवजयंती आयोजित करणार्या संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांचे जिल्हा पातळीवरील शिबीर सांगोला इथे सुरू होते. त्याला जिल्ह्यातून सुमारे पाचशे कार्यकर्ते आलेले होते, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते.
दुपारचे अडीच वाजलेले असतील. मी पोलीस स्टेशनमधून घरी आलो होतो आणि कपडे बदलून जेवायला बसलो होतो. पहिला घास घेणार तेवढ्यात बंगल्याचे गेट वाजले, बघतो तर एक पोलीस कर्मचारी धावत पळत बंगल्यात आला, खिडकीतूनच मला म्हणाला, साहेब, महुद इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे.
हे ऐकताच मी ताटाला नमस्कार केला, हात धुतले आणि पटकन युनिफॉर्म अंगावर घालून त्या पोलीस कर्मचार्याच्या मोटारसायकलवर मागे बसलो. बसता बसताच कमरेला बेल्ट लावला. नेमके काय काय घडले हे त्याला थोडक्यात विचारले. तो म्हणाला, पोलीस स्टेशनला शिवप्रेमी कार्यकर्त्यांची खूप गर्दी झालेली आहे. दोन मिनिटांत आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलो. आवारात दोनशे तीनशे लोकांचा जमाव आला होता. संघटनेचे पदाधिकारी माझ्या चेंबरमध्येच बसलेले होते. मला इतक्या लवकर आलेले पाहताच त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘साहेब आत्ताच कॉन्स्टेबल तुमच्या घराकडे रवाना झाला आणि अवघ्या चार-पाच मिनिटांत तुम्ही पोलीस स्टेशनला आलात, हे कसे काय?’ मी म्हणालो, ‘अहो, मीही मराठी माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझेही आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर मला ते कसे सहन होणार?’ ते खूश झाले.
साहेब आमची फिर्याद घ्या, असे त्यांनी म्हणताच मी ठाणे अंमलदारांना फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितले. पदाधिकार्यांना वाटले होते मी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करीन. बिनतारी संदेशाने ही घटना सोलापूर पोलीस कंट्रोल रूमला स्वत: कळविली आणि महुदला रवाना होतो आहे, असे सांगितले. होता नव्हता तो सगळा स्टाफ एकत्र केला आणि जीपने तात्काळ महुदकडे निघालो. पोलीस अधीक्षकही महुदला निघाल्याचे वाटेत गाडीच्या वायरलेस सेटवरून कळले. आमच्या पाठोपाठ संघटनेच्या पदाधिकार्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पंचवीस-तीस गाड्या होत्या. पंचवीस-तीस मिनिटांत आम्ही महुदला पोहोचलो. तिथे पोलीस आऊटपोस्ट होते. एक हवालदार आणि दोन कर्मचार्यांची तिथे नेमणूक होती. त्यापैकी एका कर्मचार्याची तिथे बंदोबस्ताची ड्युटी होती.
पुतळा विटंबनेमुळे वातावरण चांगलेच तापलेले होते. शिवचरित्र व्याख्यानमालेसाठी उभारलेल्या मंडपातील लाऊडस्पीकरवरून प्रक्षोभक भाषणे सुरू होती. विशिष्ट समाजाच्या लोकांनीच हे काम केलेले आहे, त्यांना सोडता कामा नये, इत्यादी इत्यादी. आजूबाजूच्या गावातून लोक जमा झाले होते, मोठा जमाव जमलेला होता. अजूनही लोक येत होते, वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालेले होते. गावातील दुकाने बंद होती.
मंडपाच्या एका बाजूला छोटा पेंडॉल होता, पेंडॉलच्या कपड्याला लागूनच लाकडी टेबल ठेवले होते. तिथे प्लास्टर ऑफ पॅरिसचा चॉकलेटी रंगाचा पुतळा पडून फुटलेला दिसत होता. टेबलावर पुतळ्याच्या आजूबाजूच्या गुलालामुळे त्याच्या आकाराचा चौकोन झाल्याचे दिसत होते. पुतळ्याच्या टेबलामागचा पेंडॉलचा पडदा अत्यंत पातळ कापडाचा होता. तो वार्याने नावेच्या शिडासारखा फुगून मागेपुढे होत होता. पुतळा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा, पोकळ व वजनाने हलका असल्याने पडदा वार्याने जोरात हलून पुतळा पडला असावा, हे स्पष्टपणे कळत होते. परंतु अशा वेळी पोलीस अधिकार्याने जनमानसाच्या मनाविरुद्ध मत दिले की जमाव पोलिसांच्या विरोधात जातो आणि कायदा व सुव्यवस्था कंट्रोल करायला कठीण जाते. मी त्या संघटनेतील माझ्या अत्यंत विश्वासाच्या दोन तीन कार्यकर्त्यांना माझा अंदाज सांगितला, त्यांना ती परिस्थिती दाखवली, त्यांनाही ते पटले, परंतु तेही एकदम उघड बोलू शकत नव्हते.
दिवसा ड्युटीला कोण कर्मचारी होता याचा तपास करता भारत जाधव नावाचा पोलीस कर्मचारी नेमणुकीस असल्याचे कळाले. तो पोलीस खात्याच्या कबड्डी टीमचा राज्य पातळीवरचा खेळाडू होता. तो महुद गावात अत्यंत लोकप्रिय होता. ज्या पदाधिकार्याने पुतळा विटंबनाची फिर्याद दिली होती, तो आणि भारत हे जवळचे मित्र होते हे मला माहित होते. भारत तेथे चेहरा पाडून उभा होता. फिर्यादींनी मला काळजीच्या स्वरात विचारले, ‘साहेब भारत जाधवांची ड्युटी होती. त्यांना काही होणार नाही ना?’
यावर मी संधीचा फायदा घेत त्यांना खोटेच सांगितले की तो गैरहजर राहिल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला निलंबित केलेले आहे.
यावर त्यांनी मला विचारले, ‘आपल्याला काही करता येणार नाही का? त्यांचे निलंबन वगैरे होणार नाही असे काहीतरी करा’.
मी त्यांना म्हटले, ‘बघू या काय करता येते ते, माझ्या हातात काही नाही. पोलीस अधीक्षकांपर्यंत ही घटना समजली आहे, बघूया काय होते.’
बाण टार्गेटवर लागला होता. ते काळजीने तेथेच थांबले. त्यावेळी मी पुन्हा इतर कार्यकर्त्यांना ‘हा पुतळा हाताने ढकलून मुद्दामहून फोडल्यासारखा वाटत नसून वार्याने पेंडॉलचा पडदा हलून त्याच्या धक्क्याने पडलेला असावा असे वाटते, तुम्हाला काय वाटते?’ असे हळूच विचारले. फिर्याद देणारे पदाधिकारी माझे हे बोलणे काळजीपूर्वक ऐकत होते. मी त्यांनाही बोलावले आणि विचारले, ‘तुम्हाला हे पटतंय का? पुतळा या पेंडॉलमध्ये दिवसा उजेडी येऊन कोणी तोडेल फोडेल? एवढी कोणाची हिंमत होईल का?’ मी त्यांना हलणारा पडदा दाखवला.
ते म्हणाले, ‘हो साहेब मलाही असेच वाटते की पडद्याचा धक्का लागूनच पुतळा पडला असावा.’
मग मी त्यांना म्हटले, ‘ठीक आहे. पटले तर तसे लिहून द्या.’
यावर त्यांनी विचारले, ‘मी हे लिहून दिल्यावर पुढे काय होईल?’
मी म्हटलं, ‘काहीही होणार नाही. हे प्रकरण इथेच थांबेल.’
यावर त्यांनी विचारले, ‘जाधवांचे निलंबन थांबेल ना?’
मी म्हणालो, ‘नक्की. तशी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो.’ यावर त्यांनी त्यांच्या सिनियर नेत्याशी चर्चा केली. मी त्यांनाही कसे घडले असावे हे प्रात्यक्षिकाने दाखविले. ते त्यांनाही पटले. मी घरून पोलीस स्टेशनला तात्काळ आल्याने आणि त्यांची फिर्याद ताबडतोब घेतल्याने त्या सर्वांचा माझ्यावर विश्वास बसलेला होता. एका कॉन्स्टेबलला फिर्यादीचा जबाब लिहून घेण्यास सांगितले. त्यांनी लिहून दिले की, ‘मी सांगोल्यात होतो. तेथे मला पुतळा विटंबन प्रकाराची गोष्ट कळली. महाराज आमचे आराध्य दैवत असल्याने मला भान राहिले नाही. भावनेच्या व रागाच्या भरातच मी फिर्याद दिलेली होती, परंतु प्रत्यक्ष इथे येऊन परिस्थिती बघता पुतळा कोणी फोडल्यासारखे वाटत नसून, तो वार्याने पडदा हलून फुटलेला असावा असे मला वाटते.’
जमलेल्या नेत्यांनी पुतळा कसा फुटला आहे हे जमलेल्या लोकांना लाऊडस्पीकरवरून समजावून सांगितले, तसेच पोलिसांनी तात्काळ, गंभीरपणे कारवाई केल्याबद्दल आभार मानले. त्यामुळे वातावरणातील तणाव एका झटक्यात कमी झाला होता. हे सर्व सुरू असताना मी हेडकॉन्स्टेबल गोडसे यांना तातडीने दुसरा पुतळा आणण्यास सांगितले होते. ते जवळच असणार्या शाळेतून पुतळा घेऊन आले. त्यानंतर आम्ही फुटलेल्या पुतळ्याचे तुकडे बाजूला करून त्या ठिकाणी नवीन पुतळा बसविला आणि त्याची पूजा केली. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.
हे सारे चालू असताना पंढरपूरहून डीवायएसपी व इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तेथे बंदोबस्ताला आले. काही वेळाने सोलापूर येथून जिल्हा पोलीस अधीक्षकही त्या ठिकाणी येऊन पोहोचले. जिल्हा नियंत्रण कक्षाने पुतळा विटंबनाची माहिती पोलीस महासंचालक कंट्रोल रूम, मुंबई येथे कळवली असल्याने पोलीस महासंचालकांनी सोलापूर व सातारा जिल्ह्यात रायट स्कीम बंदोबस्त (दंगल प्रतिबंधक) लावला होता. तसेच अधिकचा बंदोबस्त महुदला पाठविण्यास सांगितलेले होते. मी पोलीस अधीक्षकांना सर्व माहिती सांगितली आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांशी त्यांची भेट घालून दिली. पुतळा पडूनच फुटलेला आहे आणि आमचा कुणावरही संशय नाही, असे पदाधिकार्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले आणि लगेचच न झालेले सस्पेन्शन मागे घेण्यात आले.
दुसर्या दिवशी पोलीस अधीक्षक यांच्याकडून मला एक अर्धशासकीय पत्र आले. त्यात त्यांनी, ‘घटना चांगली हाताळली पण ती त्यांना फोन करून का कळवली नाही’ म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या काळात एसटीडी सेवा नव्हती. ट्रंक कॉल लावावा लागे आणि तो लागण्यासाठी बराच वेळ जात असे. मी फोन करण्यासाठी थांबलो असतो तर वेळेवर न पोहोचल्याने अनर्थ घडला असता व कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. अत्यंत वेगाने हालचाली करून घटनास्थळी आल्यानेच पुढील अनर्थ टळला होता. मन नाराज झाले, पण असो.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)