कधी कधी जीवनात एखादा असा क्षण येतो, जो आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. तो क्षण ना फार मोठा असतो, ना भव्यदिव्य. पण त्यामागची संवेदना एवढी गहिरी असते की आपली नजर, आपला विचार, आपलं अंतर्मन नव्याने जागं होतं. अशाच एका क्षणातून, एका भेटीतून, एका हाकेतून सुरू झालेला प्रवास म्हणजे सेंट्रल रेल्वेमधील कर्मचार्यांची ‘इनर व्हॉइस सोशल वेलफेअर फाउंडेशन’ ही संस्था. सार्वजनिक कामात कुठून डोनेशन मिळेल याचा विचार अनेकजण करताना दिसतात. अशा कामासाठी खिशात हात घालणारे थोडेच म्हणावे लागतील. अशापैकी एक असलेली ही संस्था. जिथे गरज आहे अशा ठिकाणी फाऊंडेशनचे कार्यकर्ते प्रथम सर्व्हे करतात, नंतर पैसे काढून अशा गरजा पूर्ण करताना दिसतात.
२०१६ साल. सेंट्रल रेल्वेमधील काही संवेदनशील कर्मचार्यांनी ठरवलं की समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं. रेल्वेच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या प्रेरणेतून काही ट्रेन मॅनेजर व मोटरमन यांनी वासिंदजवळील संत गाडगे महाराज आश्रमशाळेला भेट दिली. ही केवळ एक औपचारिक भेट नव्हती. ही होती एका वेदनेची साक्ष.
आश्रमशाळेतील स्थिती अंगावर काटा आणणारी होती. गळक्या छप्परांमधून थेंबथेंब पाणी गळत होतं. कोपर्यात बसलेली लहान मुले. फाटके कपडे, पायात चप्पल नाही… पण डोळ्यांत आशेचा एक नाजूक पण झगमगणारा किरण! डासांच्या प्रचंड उपद्रवामुळे हातांवर पांढरे डाग पडलेले, भिंतींना लागून ठेवलेली वह्यांची पेटी आणि कोरड्या जमिनीवर दाटीवाटीने बसलेली लेकरं, ही केवळ दैन्याची नव्हे तर आपल्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची साक्ष होती. या भेटीने सुयोग कारंडे यांचं अंतर्मन हलवून टाकलं. त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ‘या मुलांसाठी काहीतरी करायला हवं!’
त्यांचं बोलणं हवा नव्हतं, ते एक आवाहन होतं… आणि त्याला प्रतिसाद मिळाला. त्या दिवशी उपस्थित असलेल्या ११ जणांनी ठरवलं, आपण केवळ बोलायचं नाही, काहीतरी करायचं!
२८ ऑगस्ट २०१६ रोजी ‘इनर व्हॉइस’चा पहिला प्रकल्प, एक छोटासा मेडिकल कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला. पण हे केवळ एका दिवसाचं कार्य नव्हतं. यातून उभी राहिली एक चळवळ. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, गडचिरोली, चंद्रपूर ते अगदी छत्तीसगडपर्यंत ४९ प्रकल्प पूर्ण झाले. या प्रकल्पांतून आजवर ६५ लाखांहून अधिक किमतीचं शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं आहे. शालेय पुस्तकं, ड्रेस, वह्या, शालेय बूट, बॅग्स, स्टेशनरी… काय नाही दिलं गेलं? पण सर्वात मौल्यवान गोष्ट मिळाली ती म्हणजे आत्मसन्मान.
या संस्थेचं विशेषत्व म्हणजे यात रेल्वे कर्मचारी, बीएसएनएल, बीएआरसी, एनएमएमसी, शिक्षक, बँक कर्मचारी, खासगी कंपन्यांतले प्रोफेशनल्स, गृहिणी, सगळेच या कार्यात सामील झाले आहेत. कोणत्याही जात, धर्म, पद किंवा पैशाच्या बंधनाविना आज ८००हून अधिक सदस्य या संस्थेचे भाग आहेत. यातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत एकच भावना आहे, ‘आपण कुणासाठी तरी आहोत.’ ‘इनर व्हॉइस’ने गेल्या तीन वर्षांत ‘स्कॉलरशिप योजना’ राबवली आहे. या योजनेअंतर्गत दोन मुलींच्या बी.फार्मसी शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. फक्त फी भरली गेली नाही, तर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळालं आहे.
संस्थेने सामाजिक कामाबरोबरच पर्यावरण रक्षणाकडेही लक्ष दिलं आहे. मलंगगडच्या पायथ्याशी १०१ झाडांचं वृक्षारोपण, सीएसएमटी स्थानकावर आयोजित केलेलं रक्तदान शिबिर, ज्यात तब्बल २३७ युनिट्स रक्तसंकलन. हे कार्य म्हणजे एक जबाबदारी होती. ‘इनर व्हॉइस फाऊंडेशन’ म्हणजे एक आवाज आहे… जो सगळ्यांच्या आत असतो, पण अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण कोणाचं दु:ख पाहून शांत बसू शकत नाही. तो आवाज आपल्याला उठायला सांगतो, पुढे यायला सांगतो, आणि एकटा न राहता ‘आपण’ व्हायला शिकवतो. आज ही संस्था त्यांच्या ५०व्या प्रोजेक्टकडे यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.
या उपक्रमामागे केवळ उत्साह नव्हे तर संघटित लोकसहभाग आहे. दर महिन्याला फक्त १०० रुपये प्रति व्यक्ती योगदान घेतलं जातं आणि या छोट्याशा रकमेच्या माध्यमातूनच आजवर सुमारे ६५ लाख रुपयांची मदत समाजातील गरजूंना करण्यात आली आहे.
हा उपक्रम म्हणजे ‘थोडक्यात मोठं’ साध्य करण्याचा आदर्श उदाहरण आहे. रक्कम लहान असली तरी, हेतू मोठा असेल तर समाजपरिवर्तन शक्य आहे, हे या माध्यमातून ठामपणे सिद्ध झालं आहे. संस्थेचं खरं यश म्हणजे सभासदांनी महिना १०० रुपये दिल्यावर या गरजवंत मुलांना भेटवस्तू दिल्यावर त्याच्या चेहर्यावरील भावना पाहून आपणास खूप काही उमजते. हा प्रवास अजून खूप मोठा आहे. अजूनही अनेक गरजवंत मुलं आहेत, जे ‘शिक्षणासाठी धडपडतात’ हे त्यांचं स्वप्न आहे, या त्यांच्या स्वप्नासाठी ‘इनर व्हॉइस’सारखा एक हात हवा, जो फक्त मदतीसाठी नाही, तर कर्तव्य म्हणून असेल. ‘वुई राईज बाय लिफ्टिंग अदर्स’ आणि ‘मदत नव्हे, कर्तव्य’ या ब्रीदांना जागणारी ही संस्था आहे.
संपर्क : सुयोग कारंडे (९००४४१२६४३)