• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हवाई वाहतूक का अधांतरी?

- प्रशांत कदम (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 20, 2025
in कारण राजकारण
0

अहमदाबादमधल्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या विमान अपघातानं देशाच्या विमान वाहतुकीच्या संदर्भातल्या काही मूलभूत प्रश्नांची चर्चा ऐरणीवर आली आहे. भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात मानला जातोय. अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या या विमानानं उड्डाण केलं आणि त्यानंतर अवघ्या ३२ सेकंदात हा अपघात झाला.
खरंतर विमान अपघात बर्‍याचदा लँडिंगच्या वेळी होतात. टेक ऑफच्या वेळी होणार्‍या अपघातांची संख्या ही तुलनेनं कमी आहे. पण इथे अहमदाबादच्या रनवेवरुन विमानानं उड्डाण केलं आणि लगेचच ते कोसळलं. विमानाचं उड्डाणच नीट होऊ शकलं नाही. त्यात ते एका मेडिकल कॉलेजच्या
हॉस्टेलवर कोसळलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांचा, भावी डॉक्टरांचाही मृत्यू झालाय. २४२ प्रवाश्यांपैकी केवळ एक जण सुदैवानं वाचलाय. अनेक लहान लहान मुलं, महिला यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील याच विमानाने प्रवास करत होते. सध्या केवळ जी बाहेरची माहिती, दृश्यं उपलब्ध आहेत त्यावरून सगळेजण कारणांची चर्चा करतायत. त्याचं नेमकं कारण हे विमानाच्या ब्लॅक बॉक्स आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधूनच बाहेर येऊ शकेल.
एअर इंडियाचं हे विमान बोईंग कंपनीच्या ७८७ ड्रीम लाईनर या मालिकेतलं होतं. बोईंगच्या विमानांच्या अपघातांची मालिका याआधीही घडली असली तरी या सीरीजमधल्या विमानाचा अपघात होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हे विमान अत्यंत सुरक्षित श्रेणीत गणलं जात होतं. अशी विमानं बनायला लागली तर भविष्यात आमची गरज उरणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक पायलट्सनी दिली होती, असं महाराष्ट्राचे माजी चीफ पायलट संजय कर्वे यांनी माझ्याच यू ट्यूब चॅनेलवरच्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तरीही हा अपघात झाला, तर त्याचं नेमकं कारण काय हा प्रश्न अधिक गडद होतो.
विमान प्रवास हा आता केवळ श्रीमंतांचा, उच्च मध्यमवर्गीयांचा विषय राहिलेला नाहीय. उदारीकरणानंतर आता मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयही सहजपणे विमानाचा प्रवास करू लागलेत. देशात कानाकोपर्‍यातली शहरे जोडण्यासाठी सरकारनेही उडान नावाची योजना आणली होती. पण हे करताना त्यांनी ज्या मुद्द्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे, त्याची चर्चा व्हायला हवी.
मुळात आपल्या देशाचं विमान क्षेत्र सध्या दोनच कंपन्यांमधील रणांगण बनलं आहे. इंग्लिशमध्ये याला ड्युऑपॉली म्हणतात. या स्पर्धेत इंडिगो आणि टाटा विस्तारा हे दोनच प्रमुख दावेदार आहेत. २०२२मध्ये एअर इंडिया ही कंपनी टाटांनी ताब्यात घेतली. जेट, किंगफिशर या कंपन्यांचे मालक वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे चर्चेत आले, त्यांच्या कंपन्याही बंद पडल्या. स्पाइसजेट गोते खातेय, तर दुसरीकडे अकासा एअरलाईन्स हे ज्यांचं स्वप्न होतं ते शेअर बाजारातले प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं अकाली निधन झालं. अशा परिस्थितीत मार्वेâटमध्ये निकोप स्पर्धा राहावी, एकमेकांवर चांगल्या कामाचा, गुणवत्तेचा प्रभाव राहावा, यासाठीची आवश्यक स्थिती भारतीय हवाई क्षेत्रात सध्या आहे का याचा प्रामुख्यानं विचार व्हायला हवा.
असा कुठला अपघात घडला की त्याचं खापर पायलटसवर फोडणं खूप सोप्पं असतं, कंपन्या आपल्या नावाला बट्टा लावून घ्यायला तयार नसतात. त्यासाठी त्या कुठल्या थराला जाऊ शकतात हे बोईंगच्याच एका गाजलेल्या केसमध्ये दिसून आलं आहे. २०१८मध्ये पाच महिन्यांच्या अंतरात बोईंगच्या ७३७ मॅक्स सीरीजच्या विमानाचे लागोपाठ अपघात झाले. तेव्हा सुरुवातीला हे सगळं खापर पायलट्सवर फोडण्याचाच प्रयत्न बोईंगने केला. पण नंतर लक्षात आलं की कंपनीने या विमानात वापरलेलं एक नवं तंत्रज्ञान केवळ प्रशिक्षणावर खर्च करावा लागू नये म्हणून सांगितलंच नव्हतं. ते सांगण्याची गरज नाही असा त्यांचा अविर्भाव होता. पण हे तंत्रज्ञानच लोकांच्या जिवावर बेतत होतं. केवळ दोन विमानांच्या अपघातातच ३४६ लोकांचे जीव गेले होते. त्यानंतर मग ही केस अमेरिकेच्या चौकशी यंत्रणांनी गांभीर्यानं घेतली. कंपनीला २.५ बिलियन डॉलर्सचा दंड लागला, सीईओंना राजीनामा द्यावा लागला.
सध्या भारतात ज्या विमानाचा अपघात झालाय, ते बोईंगच्या ७८७ सीरीजमधलं विमान होतं. त्याचा या अपघाती इतिहास असलेल्या विमानांशी संबंध नाहीय. पण, कंपनी तीच आहे. त्यामुळे, प्रत्येकच पातळीवर सगळ्या गोष्टी पारखून घेतल्या पाहिजेत. विमान कोसळलं तेव्हा त्याचं नाक वरच्या दिशेनं होतं, याचा अर्थ ते वर जाण्याचाच प्रयत्न करत होते, पण कुठल्या तरी कारणानं झेपावू शकलं नाही. विमान अपघातानंतर आधी गृहमंत्री आणि पाठोपाठ पंतप्रधान दोघांनीही घटनास्थळाला भेट दिली. गृहमंत्री अमित शाह यांचं म्हणणं होतं अपघात हा अपघात असतो, तो रोखला जाऊ शकत नाही. इतकं बेजबाबदार विधान हे खरंतर देशाच्या नंबर दोनच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कुठल्याही गोष्टी रोखल्या जाऊ शकत नसतील तर मग सरकारी व्यवस्था आहे कशाला?.. रोखली जाऊ शकत नाही म्हणायला ही काही नैसर्गिक आपत्ती नव्हती. सगळ्या गोष्टी नॉर्मल असताना त्या वातावरणात एक विमान उड्डाण घेतं आणि कोसळतंय… अशावेळी निव्वळ जबाबदारी झटकण्यासाठी अशी विधानं केली जातायत. खरंतर देशात गेल्या काही वर्षांपासून कुठल्याही गोष्टीसाठी सरकारची, सरकारच्या प्रमुखांची जबाबदारी असते हेच लोक विसरून गेले आहेत. त्यांना तसे प्रश्नही कुणाला विचारावेसे वाटत नाहीत, कुणी विचारले तर आवडत नाहीत.
भारतीय मीडियाही विमान अपघातात ज्या उथळपणाने वार्तांकन करत होता, तो असंवेदनशीलतेचा कळस होता. अपघात घडल्या घडल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतांच्या कुटुंबांच्या ‘प्रतिक्रिया’ विचारल्या जात होत्या. विश्वासकुमार रमेश हा या अपघातातून चमत्कार म्हणावा अशाच पद्धतीने वाचलेला एकमेव प्रवासी, त्याला तर हॉस्पिटलच्या बेडवरही स्वस्थ बसू दिले जात नव्हते… तिथपर्यंतही कॅमेरे पोहचले होते. इतक्या महत्वाच्या आपत्तीत मीडियाचं प्राधान्य कशाला होतं तर भगवद्गीतेची एक प्रत या भीषण अपघातातून कशी वाचली याला… नंतर कुणीतरी याच अपघातातून कुराणाची प्रतही वाचल्याचा दावा केला… आजतक वाहिनीच्या श्वेता सिंह यांनी भगवद्गीता वाचली या विषयावर एक विशेष शो करून मीडियाच्या उथळपणाच्या स्पर्धेत नवा तळ गाठून दाखवला. पहलगामचा हल्ला आणि त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर या घटनांमध्ये मीडियाच्या बेजबाबदार वार्तांकनाची छी थू झालेली होती. पण त्यातून कुठलाही धडा न घेता आता आणखी खोल तळ गाठण्यासाठी जणू तयारच असल्याप्रमाणे माध्यमांचं वर्तन पाहायला मिळाले.
पंतप्रधान मोदी खूप क्वचित वेळा आपत्तीच्या स्थळी जातात. यावेळी तर त्यांच्याच गृहराज्यात हा अपघात झाला होता. शिवाय अपघातात अनेक विदेशी नागरिकही मरण पावलेले असल्याने ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची बातमी बनलेली होती. त्याचंही गांभीर्य, सोबत विजय रुपानी यांच्या रूपाने एक जुना सहकारी गमावला. पण इतक्या दु:खाच्या प्रसंगातही त्यांचा कॅमेरा अँगल वगैरे निवडून केलेलं फोटो सेशन काही चुकलं नाही. ज्या इमारतीवर विमान घुसलेलं होतं, तिच्याखाली उभे राहून पंतप्रधानांनी नाट्यमय फोटो काढून घेतला. अशा इमारतीच्या खाली उभे राहणे हेच मुळात धोकादायक… आणि पंतप्रधानांचा असा फोटो काढण्यासाठी जी मेहनत कॅमेरामनला करावी लागली असेल ती वेगळीच. देशाच्या हवाई वाहतूक मंत्र्यांचेही घटनास्थळी पाहणी करतानाचे रील सोशल माध्यमांवर दिसत होते. रेल्वेमंत्र्यांपाठोपाठ त्यांनीही रील्समंत्री बनण्याचा निर्धार केला असावा. पण दोघांचं प्रेरणास्थान एकच असल्याने बोलायचं तरी कोणाला?
मुळात, विमान अपघात कुणाच्या हातात नसतात, ही टिपिकल भारतीय दैववादी कल्पना साफ चुकीची आहे. विमानांची देखभाल करून, यंत्रणांमध्ये सुधारणा करून अपघातांच्या शक्यता कमीत कमी करत नेणं हे सतत सुरू असणारं काम असतं. त्यात गडबड झाली तरच अपघात होतात. ती चूक कोणती आहे, हे नेटाने शोधणं आणि त्यातून धडा घेत यंत्रणा मजबूत करणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. कुठलीही लपवाछपवी न करता या अपघाताच्या मूळ कारणांपर्यंत पोहचलो आणि त्यातून योग्य उपाययोजना केल्या तरच देशातल्या हवाई प्रवाशांना धीर येईल. इतके पैसे भरून अनेकदा सामान्य सुविधाही भारतीय प्रवाशांना मिळत नाहीत. त्याबद्दलच्या तक्रारी असतातच. पण सुरक्षितता हा तर विमान प्रवासातला सर्वात मोठा आणि प्राथमिक मुद्दा आहे. एअर इंडियाच्या विमानाचा २०२०मध्ये कोळिकोडमध्ये झालेला अपघात हा देशातला याआधीचा सर्वात मोठा अपघात होता. त्यानंतर पाच वर्षांत पुन्हा हा मोठा अपघात घडला आहे. यावेळी मृतांचा आकडा जवळपास अडीचशे तीनशेच्या घरात आहे. त्यामुळे त्याची व्याप्ती मोठी आहे. सर्वात सुरक्षित समजल्या जाणार्‍या ड्रीमलाईनर विमानाचा हा अपघात त्यामुळे देशातल्या हवाई वाहतुकीच्या परीक्षणासाठी निमित्त ठरावा आणि शेवटचा ठरावा हीच अपेक्षा.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

काकांच्या काँग्रेसकृत जन्मयातना!

Next Post

काकांच्या काँग्रेसकृत जन्मयातना!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.