सत्ता हातात आली की तिचा गैरवापर होतोच. चहापेक्षा किटली गरम म्हणतात तसे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांपेक्षा काही वेळा कार्यकर्तेच मस्तवाल होत जातात. १९७१ सालातल्या एका रविवारच्या जत्रेत बाळासाहेबांनी अशा सत्तेच्या जिवावर मातलेल्या कार्यकर्त्यांचं फार वेधक आणि भेदक चित्रण केलं आहे. कुठे सत्ताधार्यांनी बेकायदा दारुभट्ट्या टाकायला पैसे दिले आहेत गावगुंडांना, कुठे स्मगलर खूष झाले आहेत, कुठे पोलिसांनी छापा टाकल्याबद्दल त्यांनाच दमात घेणारा सत्तेच्या जवळचा काळे धंदेवाला दिसतो आहे, कुठे आपल्याशी संधान साधलेल्या, आपल्या छत्रछायेखाली पोसल्या जाणार्या गुंडांना तडीपार करण्याची हिंमत पोलिसांनी कशी केली, याबद्दल नेता पोलिसांना झापतोय… मात्र सगळ्यात शेवटी बाळासाहेबांनी रेखाटलेलं चित्र सुन्न करून टाकतो… तिथे पोलीस हवालदार सरकारपक्षाला मते द्या, असं भिंतींवर रंगवतो आहे आणि सर्वसामान्य माणसं म्हणतायत की सरकारी यंत्रणांचा इतका गैरवापर होईल, असं कधी वाटलं नव्हतं…
…आज ईडी, सीबीआयपासून निवडणूक आयोगापर्यंत सगळ्या तथाकथित स्वायत्त यंत्रणांनी ज्या प्रकारे सरकारची धुणी धुण्याची कामं निर्लज्जपणे चालवली आहेत, ते पाहिल्यावर हे चित्रही सौम्य वाटायला लागतं. आज बाळासाहेबांच्या कुंचल्यातून किती अग्निज्वाळा निघाल्या असत्या!