पोलिस सर्वसामान्य माणसांचे रक्षक आहेत असं म्हणतात. त्यांना पगारच त्याचा मिळतो. त्यांना पाहिल्यावर सामान्य माणसाला धीर आला पाहिजे, आधार वाटला पाहिजे. मात्र, आपल्याकडे पोलिसाला पाहिलं की सर्वसामान्य माणूस टरकतो… त्याला भीती वाटते, असं का होतं?
– वैभवी भिरवंडेकर, येरवडा
नेमकं काय झालंय वैभवी ताई ते समजून घ्या, जो पगार पोलिसाला मिळतो त्यात त्याचं आणि परिवाराच भागत नाही. पोलिसाला जे नेते पगार देतात, त्या नेत्यांचं त्यांच्या पगारात भागत नाही. ते भागवण्यासाठी ते नेते जे जे करतात ते पोलिसांपर्यंत गेलंच तर पोलीस आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून नेते पोलिसाला टरकवतात. मग नोकरी जाऊ नये म्हणून पोलीस नेत्यांना टरकतात. मग आपण काहीतरी काम करतो आहोत, हे दाखवण्यासाठी ते सर्वसामान्य माणसांना टरकवतात आणि आपण सर्वसामान्य आहोत ही गोष्ट विसरू नये म्हणून सर्वसामान्य माणूसही पोलिसांना टरकतो.. ही साखळी आहे ती सर्वसामान्य माणसाने तोडून कसं चालेल?
माणसाचा स्वाभिमान केव्हा गळून पडतो?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
ते माणसावर अवलंबून असतं. माणूस छोटा असेल तर नाइंटी आणि बिर्याणी मिळाली तरी स्वाभिमान गळून पडतो. नाइंटी आणि बिर्याणी देणार्याचा स्वाभिमान खोके मिळाले की गळून पडतो. आणि खोके देणार्याचा स्वाभिमान परदेशात गेल्यावर गळून पडतो. काहींचा स्वाभिमान गरिबीमुळे गळून पडतो. काहींचा भीतीमुळे, तर काहींचा लाचारीमुळे गळून पडतो.. आता कोणाचा स्वाभिमान कशामुळे गळून पडतो या जोड्या तुम्ही जुळवा..
भंपक भोंदुत्वाच्या नादी लागून मराठी बाणा विसरून मराठी भय्या बनलेल्या मराठी माणसांना कधी जाग येईल का? आलीच तर ती कधी येईल?
– व्यंकट बारगीर, कोल्हापूर
खरोखर झोपलेल्या माणसाला खुट्ट झालं तरी जाग येते. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागं करण्यासाठी कोणीतरी लाथ घालावी लागते, पण ज्यांना लाथ खाण्याची सवयच असते, त्यांना लाथ मारल्याने कशी जाग येऊ शकते, हे देवालाच माहीत. पण देवा-धर्माची अफू पाजून नॉन बायॉलॉजिकल देवानेच झोपवलेल्या त्याच्या भक्तांना आणि आपण झोपलोय असं दाखवणार्या (आकाशातल्या) देवाच्या कानी कपाळी ओरडलात तरी त्याला जाग येणार नाही. (तुमच्या-आमच्या देवाला जाग येण्यासाठी भूपाळी गायली तरी पुरेशी असते. हे कंसातलं स्पष्टीकरण देवा-देवामधला फरक स्पष्ट व्हावा म्हणून आहे. नाहीतर देवाला काही बोललो असं वाटून झोपलेले जागे व्हायचे. )
पक्ष फोडून, अर्धा पक्ष पळवून, निशाणी चोरून, पैशांचा पाऊस पाडूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीतल्या जागृत
मराठी माणसांनी ज्यांना नाकारलं, त्यांनी हे सगळं करून नेमकं काय साध्य केलं?
– प्रभाकर शिंदे, खोपोली
प्रभाकर राव, शिंदे असून असा प्रश्न विचारताय? तुम्ही फक्त आडनावाचेच शिंदे दिसताय…
मतदान संपायच्या आधीच ज्यांनी एक्झिट पोल जाहीर केला आणि मतमोजणी सुरू व्हायच्या आधी जे त्या मतदारसंघातल्या मतदानाचा कल दाखवत होते, त्या वाहिन्यांचा आणि त्यातल्या पाळीव पत्रकारांचा सत्कार करायला कोणतं मैदान योग्य राहील?
– बाळकृष्ण राणे, लांजा
एका प्रश्नाचे उत्तर दिलं तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पाळलेल्या कुत्र्याला छू म्हटल्यावर ते भुंकलं तर तुम्ही त्याचं काय वेगळं कौतुक करता का? अहो खाऊन उरलेल्या चपातीचा किंवा हाडाचा तुकडा टाकला तरी त्याला पुरे होतं… बाकी त्याला कोणीही, अगदी मालकाने जरी हाडतुड केलं तरी तो मालक दिसल्यावर शेपूट हलवतोच… हे तुम्हाला माहित नाही की वेड पांघरून लांज्याला जाताय.
अमेरिकेतला एक उद्दाम नेता रोज हंटर तडकवतो आणि आपलं भिजलं मांजर रिंगमास्टर सांगेल तशी चक्रातून उडी मारतात… यांना
विश्वगुरू म्हणणार्यांचे डोळे कधी उघडतील?
– प्रथमेश शेळके, सावरगाव
अमेरिकन माणूस हंटर तडकवतो ते तुम्हाला दिसतं.. पण इंडियन माणूस डमरू वाजवतो ते नाही दिसत तुम्हाला? हंटर तडकवल्यावर भिजलेलं मांजर चक्रातून उडी मारत त्याचं तुम्हाला कौतुक वाटतं. पण डमरू वाजवण्यावर कित्येक माणसं माकडासारखी नाचतात याचं कौतुक नाही तुम्हाला. जरा तरी आपल्या माणसाचा अभिमान बाळगा.. नेहमीच अमेरिकन माणसाचं कौतुक का करता? चक्रातून उडी मारणारी मांजर कुठल्यातरी चक्रातच अडकेल तेव्हाच तुमच्यासारखी माणसं खुश होतील… बहुतेक…
****
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

