• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे कैसे सलगी देणे…

- नीला उपाध्ये (लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 18, 2024
in भाष्य
0

तो संपूर्ण दिवस आपल्या आसवांची लाज न वाटण्याचा होता. १८ नोव्हेंबर २०१२! महाराष्ट्राच्या अस्तित्वातला एक ऐतिहासिक महत्त्व असलेला दिवस! पहाटेपासूनच घरचा टीव्ही सुरू होता. अंत्ययात्रेची तयारी दिसत होती. `मातोश्री’च्या परिसरात मुंगीलाही आत शिरायला जागा मिळू नये, अशी गर्दी लोटलेली होती. एक अभूतपूर्व, ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण आपले डोळे बघताहेत, अशी एक अंधुकशी जाणीव कुठेतरी वर मेंदूत पत्रकार म्हणून चेतत होती, पण आत काळीज मात्र पितृतुल्य बाळासाहेबांच्या दर्शनासाठी व्याकुळले होते. त्या गर्दीत घुसून त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची शारीरिक क्षमता आपल्यात आता उरलेली नाही, ही खंत एकीकडे मन कुरतडत होती. अखेर बाळासाहेबांचं पार्थिव `मातोश्री’ बाहेर आलं! त्या अंतदर्शनाने मात्र इतका वेळ कसाबसा थोपवलेला अश्रूंचा बांध फुटलाच आणि दिवसभर डोळे पाझरत, सुजत राहिले. त्या आसवांच्या झिरझिरीत पडद्याआडूनच बाळासाहेब ठाकरे नावाचं ते प्राजक्ताचे प्रेमळ झाड पत्रकार असूनही आमच्या पदरात काही सुगंधी क्षण-फुलांची पखरण कसं करून गेले, या आठवणींच्या लडी मनोपटलासमोर उलगडू लागल्या.
खरं तर बाळासाहेबांवरली माझी भक्ती ही मुळातली विरोधातून सुरू झालेली. सत्तरच्या दशकात जेव्हा मोठमोठे संपादकदेखील बाळासाहेबांवर किंवा शिवसेनेवर जाहीर टीका करायला टरकायचे, त्या काळात बाळासाहेबांवर जाहीर टीका करण्याचा अभिजात आगाऊपणा माझ्या फाटक्या तोंडाने केला होता. पण बाळासाहेबांमधला `माणूस’ इतका मोठा होता की, माझा तोंडाळपणा आपल्या शेल्यात मायेनं घेऊन त्यांनी समस्त मराठी बांधवांप्रमाणे माझ्यावर प्रेमच केलं. कारण माझा त्यांना असलेला विरोध तात्विक मुद्यावरून होता हे त्यांना ठाऊक होतं.
दैनिक `महाराष्ट्र टाइम्स’साठी वृत्तसंकलन करण्याकरिता म्हणून अगदी प्रथम मी शिवतीर्थावर शिवसेनेच्या सभेला गेले होते नि बाळासाहेबांचं जाहीर भाषण ऐकलं तेव्हा मला कसं कानकोंडं झालं होतं, ते मला आजही आठवतं. त्यांचे ते शिवराळ चावट भाषेतील फटकारे ऐकताना व्यासपीठासमोर बसलेल्या महिला शिवसैनिकही खिदळताना बघितल्या, तेव्हा मी प्रचंड उद्वीग्न झाले होते. महर्षी व्यासाच्या पीठावरून कुणा ज्येष्ठ व्यक्तीने इतक्या थिल्लर भाषेत बोलावं हे मला मुळीच रूचलं नव्हतं. नंतर लगेचच एकदा `मातोश्री’वर बाळासाहेबांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी वार्ताहर परिषदेत मिळाली तेव्हा मी सरळ त्यांना विचारलं, बाळासाहेब, शिवसैनिक तुम्हाला देवाप्रमाणे भजतात, मग तुम्ही व्यासपीठावरून अशी शिवराळ भाषणं का करता? आक्रमक जरूर बोला, पण भाषेचं नि त्या मंचाचं पावित्र्य का दवडता?
चमकूनच बाळासाहेबांनी माझ्याकडे पाहिलं. मला खात्री आहे, तोवर त्यांना असा प्रश्न खुलेपणाने कोणीच कधीही विचारला नसेल. माझ्याकडे रोखून बघत म्हणाले, `काय करणार? त्या शिवराळ भाषेचा वारसा आम्हाला आमच्या वडिलांकडूनच मिळालाय ना!’
तशी हट्टाला पेटूनच मी पटकन बोलले, `प्रबोधनकार खूप विद्वानही होते नि चळवळे सामाजिक कार्यकर्तेही होते!’
दोन्ही हात कोपरापासून जोडत बाळासाहेब म्हणाले होते, `पाटीलबाई, रायगड जिल्ह्याचे पाणी दाखवलं की अखेर! पण तुमची सूचना नक्की लक्षात ठेवीन!’ (मी मुळातली नीला पाटील… रायगड जिल्ह्यातील झुंझार शेकाप नेते ना. ना. पाटील यांची नात! बाळासाहेबांचा जन्मही रायगड जिल्ह्यातलाच!)
सूचना लक्षात ठेवली की नाही हे ठाऊक नाही, कारण पुन्हा शिवाजी पार्कवर शिवसेना मेळाव्यांना मी शक्यतो गेलेच नाही, पण बाळासाहेबांनी मला मात्र पक्क लक्षात ठेवलं, हे पुढे प्रसंगोपात घडणार्‍या भेटीतून जाणवत राहिलं…
रत्नागिरीला झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील `पत्रकारांना साहित्यिक मान्यता येईल का?’ या विषयावरील परिसंवादात भाषण करण्याची संधी मला माझे धर्मपिता (कै.) दि. विं. गोखले यांच्यामुळे लाभली. त्या भाषणात मी ठामपणे प्रतिपादन केलं की, आम्हा पत्रकारांची लेखनप्रक्रिया, स्वानुभव संपादित करून नवनिर्मिती करणार्‍या साहित्यिकांच्या लेखन प्रक्रियेसारखीच असते. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी उदाहरण दिलं होतं, `उदा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीर सभांतील भाषण जे जे बोलतात, ते सर्वच काही छापायच्या लायकीचं नसतं, आम्हाला ते भाषण संपादन करूनच छापावे लागतं!’
ज्येष्ठ पत्रकार (कै.) माधवराव गडकरी त्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. माझ्या भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख आल्याबरोबर, ते खुर्चीतच ताठ, स्वतःला सावरून बसल्याचं मला डोळ्यांच्या कोपर्‍यातूनही दिसलं होतं. मी बिनधास्त होते. पण माझ्यावर `खास प्रेम’ असलेले (कै.) अशोक पडबिद्री तेव्हा दैनिक `सामना’चे संपादक होते. माझ्या भाषणाचा वृत्तांत त्यांच्या वार्ताहराकडून कळताच त्यांनी लगेच माझ्या बदनामीचा सामना आखला. रत्नागिरीच्या नाक्यानाक्यांवर माझ्या वक्तव्याचा निषेध करणारे फलक झळकावले गेले. दुसर्‍या दिवशी `सामना’च्या पहिल्या पानावर माझ्या वक्तव्याचा व निषेध करणारी चौकट प्रकाशित झाली होती. संमेलनावर मोर्चा आणण्यासाठी रातोरात प्रवास करून शिवसेना नेते सुभाष देसाई रत्नागिरीत डेरेदाखल झाले होते. मी माझ्या प्रतिपादनावर ठाम आहे, हे पाहताच भेकड संमेलनाध्यक्ष मोर्चा टाळायला स्वत:च सेनेची माफी मागून मोकळे झाले! (त्या प्रसंगानंतर काही वर्षांनी मुंबईत `आहे मनोहर तरी’ वरील चर्चासत्रात एसआयइएस
कॉलेजातील आमच्या मराठीच्या अध्यापिका प्रा. यास्मिन शेख, यांचे कॉलेजातील सहाध्यायी पु. ल. देशपांडे यांच्याशी भाबडेपणाने माझा परिचय करून द्यायला लागला. तेव्हा त्यांना अडवत भाईंनी त्यांना चिडवलं होतं, `तू हिची ओळख देतेस मला यास्मीन? अगं, या बयेला कोण ओळखत नाही? तुला काय वाटतं, रत्नागिरी साहित्य संमेलन काय आमच्या त्या कोकण्या अध्यक्षानं गाजवलं होतं? ते खरं गाजवलं होतं या महामायेनं! साक्षात बाळासाहेब ठाकर्‍यांच्या दाढीला या पठ्ठीनं हात घातला होता!’)
आता एवढे रामायण घडल्यानंतर तरी बाळासाहेबांनी माझ्यावर रागवावं! पण छेऽऽ! त्यानंतर काहीच दिवसांनी आमचे एक मित्र आमदार (कै.) अरुण मेहता यांच्या लेकीचं, परीचं लग्न होतं. व्यक्तिगत स्नेहामुळे अरूणभाईने पत्रकारांपैकी केवळ मी व माझे पती वसंतराव उपाध्ये (नागपूरच्या दैनिक `तरूण भारत’चे मुंबई प्रतिनिधी) या दोघांनाच संध्याकाळच्या स्वागत समारंभाऐवजी सकाळीच विवाह सोहळ्याला आवर्जून निमंत्रिले होते. म्हणून आम्ही उभयतां विवाहस्थळी गेलो तर तिथे पहिल्याच कोचवर शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी बसलेले! मी आलेली बघून मिश्किल स्वभावाच्या पवारांनी बाळासाहेबांना `पिन’ मारली, `ती बघा तुमची रत्नागिरीची `स्टार’ पत्रकार येत आहे!’ बाळासाहेबांनी लगेच मला हाक मारली, `नीला, इकडे ये गं! काय बोललीस तू रत्नागिरीला माझ्याविरुद्ध?’ असं हसत हसतच विचारलं.
`जे मी तुम्हाला आपल्या खाजगी भेटीत वेळोवेळी जे सांगत आले, तेच तिथे मी जाहीरपणे बोलले बाळासाहेब… व्यासपीठाचं पावित्र्य भंगू नका! मला नाही वाटत, मी काही चुकीचं बोलले!’ मी त्यांना विनम्र सुरात उत्तर दिलं तसे बाळासाहेबांनी पुन्हा एकदा मला कोपरापासून हात जोडले नि पुटपुटले, `रायगडवाली गं रायगडवाली!’ सोड्याच्या बाटलीचं बूच फटाक्कन उघडावं तसा, हास्याचा फवारा पवारांच्या तोंडून फुटला होता…
इतकेच नव्हे तर १९९५ सालच्या ज्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने मंत्रालयावर भगवा झेंडा फडकवला, त्या आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहायला मला आवडेल का, याची चाचणीही बाळासाहेबांनी पूर्व मुलुंडचे त्यांचे तेव्हाचे कडवे शिवसैनिक शिशिर शिंदे यांच्यामार्फत केली होती. पण तेव्हाही मी त्यांना आभारपूर्वक नकारच दिला होता. `माझा नवरा संघाचा स्वयंसेवक आहे, म्हणून त्याला भाजप हा राजकीय पक्ष जवळचा आहे. तूर्त तुमच्या शिवसेनेने भाजपशी युती केलेली आहे, हे ठीक! पण उद्या तुमची तुटली तर, आमदारकीसाठी माझा नवरा, माझा संसार सोडणं मला नाही होत जमायचं!’ असं नकारासाठी मी दिलेलं कारण बहुधा त्यांना पटलं असावं! म्हणून त्यांच्या (कै.) प्रमोद नवलकरांमार्फत १९९५ साली त्यांनी मला चक्क राज्य साहित्य, संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नेमलं आणि शेवटी तर माझा कामाचा उरक बघून मला मंडळाचे उपाध्यक्षही नेमले!
बाळासाहेबांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवे अनुयायी होते. बाळासाहेबही शिवभक्तच होते. `शिवरायांचे कैसे सलगी देणे!’ असा तो शिवरायांचा गुणविशेष आहे तोच बाळासाहेबांमध्येही होता. पण केवळ आपल्या शिवसैनिकांनाच नव्हे तर, भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला शिवरायांप्रमाणे आपुलकीने सलगी देण्याचा एक विलक्षण दिलदारपणा या निर्व्याज मनाच्या माणसात होता. (पुढे-पुढे तर भेटायला आलेल्या पत्रकारासोबत आपला फोटो काढून घेऊन तो फ्रेम करून त्याला घरी भेट पाठवायचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता!)
म्हणूनच शरद पवारांसारख्या आपल्या राजकीय विरोधकांवर प्रचार सभांतून कठोर वाग्प्रहार करणारे बाळासाहेब, खाजगी जीवनात पवारांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी सख्ख्या काकासारखे सद्भाव जोपासू शकायचे. शरद पवारांनी, शरदरावांनी त्यांच्या कन्येला, सुप्रिया सुळेला राज्यसभेची उमेदवारी दिली, तेव्हा त्यांनी गळ घातलेली नसतानाही, कौटुंबीक स्नेहभाव स्मरून, तिच्याविरुद्ध शिवसेनेचा उमेदवार उभा न करता तिला बिनविरोध निवडून देण्याइतपत मनाचा मोठेपणा बाळासाहेबांच्या ठायी होता…
किंबहुना, चांगल्या स्त्रियांनी राजकारणात अवश्य यावं, अशी त्यांची मन:पूर्वक इच्छाच असल्याचे दिसते. मग असेच ते गळाठलेल्या गोपीनाथ मुंडे यांना भाजपात पुन्हा स्थिरस्थावर करतानाच, त्यांची कन्या पंकजा (बाळासाहेब लहानपणी तिला प्रेमाने `झिप्री’ असं म्हणायचे!) हिला राजकारणात उतरवून, आमदार बनण्याचा राज्यमार्ग दाखवून देतात…
या निर्मळ ममतेमुळेच बाळासाहेबांच्या सहवासात थोडा वेळ तरी येण्याचं भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या अगणित सामान्य माणसांना बाळासाहेब सख्ख्या प्रेमळ पित्यासारखेच वाटायचे. मला आठवतंय- आमच्या मंत्रालय वार्ताहर संघाने शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्याच्या हिरवळीवर एके संध्याकाळी `म्हारो डेरे आओ’ म्हणून स्नेहमीलन आयोजित केले होते. आता साहित्यिक-अँकर म्हणून चांगला प्रस्थापित झालेला पत्रकार अंबरीश मिश्राने त्याचं संयोजन करताना शरद पवार, बाळासाहेब ठाकरे मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य अशा कैक मान्यवरांबरोबरच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही निमंत्रित केले होते. वार्ताहर संघाच्या अनेक सदस्य पत्रकारांनी त्या स्नेहसंमेलनात सादर करण्यासाठी गाणी वगैरे बसवली होती. पण साक्षात आशाताईंना समोर मान्यवरांत बसलेले बघितल्यावर सगळेच गळाठले तेव्हा अंबरीशने मलाच कार्यक्रम सुरू करायचं साकडं घातलं.
आता माझी गाण्यातली तयारी म्हणजे, भेंड्या खेळण्यापुरतीच! पण `राजहंस डौलदार चालतो म्हणून काय बदकानं आपली फताकडी पावलं टाकत चालायचंच नाही का?’ हा `ज्ञानेश्वरीत’ माऊलींनी विचारलेला प्रश्न अस्मादिकांना मनोमन पटलेला! त्यामुळे लगेच मी हातात माईक घेऊन `रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी’ ही आशाबाईंनी ठसकेबाजपणे गायलेली फक्कड लावणी, त्यांच्यासमोर गायला धजावले! बिचार्‍या आशाबाईंचं नंतर काय झालं, हे मी त्यांना विचारलं नाही; पण सर्व नेतेमंडळींनी टाळ्यांचा कडकडाट करून माझ्या त्या लावणीला मस्त दाद दिली. मग इतर हौशागवशा पत्रकारांची भीड चेपून तेही गायले!
पण खरी गंमत पुढेच झाली! काही दिवसांनी `मातोश्री’वर जायचा प्रसंग आला. तर बाळासाहेबांनी माँना हाक मारली. `ए आपली नीला खूप छान गाते हं!’ असं त्यांनी सांगितल्यावर माँनी घरातल्या सर्व पोराबाळांना, लेकी-सुनांना दिवाणखान्यात गोळा केलं आणि त्या सार्‍यांसमोर बाळासाहेबांनी पुन्हा मला `रेशमाच्या रेघांनी’ गायला लावलं! नवल म्हणजे, त्याक्षणी माझ्या मनात असा विचार चुकूनही आला नाही की, `आपण एवढे ज्येष्ठ पत्रकार, आपण कसं या राजकारणी कुटुंबासमोर गायचं? माझ्या घरच्यांच्या समोरच गातेय असं वाटत राहिलं… घरी आलेल्या प्रत्येक सुवासिनीला हळदीकुंकू लावून निरोप देणार्‍या माँसाहेबांविषयी एक मृदू कोपरा माझ्या काळजात कायमचा तयार झाला…
युती सरकार सत्तेवर आलं, `मातोश्री’वरला माणसाचा राबता वाढला; तसं त्या बंगल्याची पुनर्बांधणी करायचं ठाकरे कुटुंबाने ठरवलं. पुनर्बांधणीच्या त्या काळात बाळासाहेबांचे कुटुंब माटुंग्याच्या पाच बाग परिसरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये तात्पुरते राहायला गेलं होतं. तेव्हा मी आमच्या टाइम्स कर्मचारी युनियनच्या बाजूने टाइम्स मॅनेजमेंटशी लढत होते. युनियनच्या एका कामासाठी म्हणून दोन नेत्यांसह एकदा त्या अपार्टमेंटमधील बाळासाहेबांच्या निवासस्थानी मी गेले, तेव्हा तिथला मोठा दिवाणखाना अनेक क्षेत्रांतल्या मोठमोठ्या माणसाने गच्च भरून गेलेला होता. अन् तेवढ्यात त्या माणसांच्या देखत बाळासाहेब दोन ज्येष्ठ पत्रकारांना सोल सोल सोलत होते ते दोघे गुळमुळीतपणे आपला बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते, `नाही हो बाळासाहेब, सर्वच पत्रकार असे भ्रष्ट नसतात, पैसे घेऊन बातम्या छापणारे नसतात!’ म्हणत होते.
नेमकी त्या क्षणाला दिवाणखान्यात माझी `एण्ट्री’ झाली. माझ्याकडे निर्देश करीत बाळासाहेब त्या पत्रकारांना म्हणाले, मी पण कुठे म्हणतो, सर्वच पत्रकार भ्रष्ट असतात म्हणून! या आमच्या नीलाकडेच बघा. या महामायेनं रत्नागिरीच्या साहित्य संमेलनात थेट माझ्याच दाढीला हात घालायची हिंमत दाखवली. तिला कोण भ्रष्ट म्हणेल?’
तेव्हा दिवाणखान्यात उपस्थित सर्व मान्यवरांच्या कौतुकभरल्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या आणि मला विलक्षण संकोचायला नि आनंदायलाही झालं होतं. कारण पत्रकारितेतील माझी घुसखोरी न रूचणार्‍या अनेक महाभागांनी चारित्र्यहननाचे अंतिम शस्त्र असून माझ्या मनावर अनेक वार कठोर घाव घातले होते! बाळासाहेबांनी जाहीरपणे माझ्यावर तत्क्षणी जो विश्वास दाखवला, त्याने मला भरून पावल्यासारखं वाटत वाटलं होतं, मला नवे बळ त्या शब्दांनी दिलं होतं…

काळजी घे पोरी

पण दि. २२ जुलै १९९८ची ती सकाळ तर कधीच विसरू शकणार नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी कोकणातून मुंबईला परतताना आमच्या मोटारीला पनवेलजवळ झालेल्या अपघातात माझे सहकारी साहित्यिक राजा राजवाडे जागीच ठार झाले होते, अन्य तिघेजण जखमी झाले होते आणि ती सर्व दुर्घटना मध्यरात्रीपर्यंत तिथे थांबून निस्तारण्याची दुर्दैवी जबाबदारी माझ्यावर ओढवली होती! दुसर्‍या दिवशी सकाळीच माझ्या घरी आलेल्या दोन-अडीचशे दूरध्वनींमध्ये मला अतिशय आदरणीय वाटणारे तीन फोन होते- दुर्गाबाई भागवत, विंदा करंदीकर यांच्याबरोबर असतो तिसरा फोन दस्तूरखुद्द बाळासाहेबांचा होता! अजूनही तो फोन मला शब्दश: आठवतो. तो प्रेमळ पिता विचारत होता, `नीला, कशी आहेस तू पोरी? आपला राजा गेला, ऐकून मला अगदी माझ्या बिंदाची आठवण झाली बघ! त्यातल्या त्यात तू तरी सुखरूप वाचलीस, ऐकून बरं वाटलं बघ, स्वत:ला जप. आता थोडीतरी विश्रांती घे!’
एक दूरदर्शी राजकीय नेता, एक हुन्नरी व्यंगचित्रकार, यापेक्षाही बाळासाहेबांमधला हा मोठा प्रेमळ पितृतुल्य माणूसच मला अतिशय भावतो. सर्व राजकीय नेते आम्हा पत्रकारांचा नुस्ता वापरच सहसा करून घेत असतात. पण स्वत: एक पत्रकार असलेल्या बाळासाहेबांनी (कै.) विद्याधर गोखले, (कै.) नारायण आठवले, संजय राऊत, भारतकुमार राऊत अनेक पत्रकारांना चक्क राज्यसभा सदस्य बनवलं! यातील कोणीही स्वप्नात देखील कधी `आपण कधी काळी खासदार बनू’ अशी कल्पना केली नसेल! हा चमत्कार केवळ बाळासाहेबच करू जाणे!

दिल्लीचा दुकानदार

१९८५मध्ये जगभरातील हिरव्या आतंकवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन बाळासाहेबांनी, केवळ मराठी माणसाचे हितरक्षण हे ब्रीद सोडून, हिंदूधर्मरक्षण हा व्यापक अजेंडा आपल्या अनुयायांसमोर ठेवला. तो फलद्रूूप कसा झाला, याची प्रचिती मला माझ्या दिल्ली दौर्‍यात आली होती. युनियनच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी म्हणून मी माझ्या पतीसह दिल्लीत गेले होते, तेव्हा फावल्या वेळात मुलांसाठी काहीबाही खरेदी करावं, म्हणून तिथल्या चांदनी बाजारात आम्ही गेलो होतो. आमचा परस्परसंवाद मराठीतून चाललेला ऐकून तिथल्या त्या हिंदीभाषी दुकानदारानं आम्हाला आदरानं विचारलं, आप महाराष्ट्र से आये हो…’ आम्ही म्हटलं, `हाँ, हम मुंबई से आये हैं…’ तर साक्षात बाळासाहेबांची भेट झाल्याचा आनंद त्या दुकानदाराच्या मुखावर दिसला. आवेगाने म्हणू लागला, `तब तो आप हमारे बाळासाहेब ठाकरे को जानते होगे ना? मुंबई वापस जायेंगे तो उन्हें हमारा प्रणाम बोल देना। वो तो हम हिंदुओं के लिए मसिहा है। उन्हें बोल देना, उनके स्वास्थ्य के लिए हम हररोज भगवान से दुवा माँगते हैं। भगवान उन्हें लंबी उमर देवे।’
मुंबईला परतल्यावर मुद्दाम `मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांना त्या दुकानदाराचा निरोप सांगितला तेव्हा त्यांच्या ओठावर स्मितरेषा उमटली. पुढल्या क्षणी नेहमीच्या मिश्किलपणाने त्यांनी मला विचारलं, `मग? त्याला माझ्या शिवराळपणाबद्दल सांगितलंस की नाही?’ तेव्हा, ‘बाळासाहेब…’ एवढंच मी कृतक्कोपाने उद्गारू शकले होते.
आज मात्र काळजाचा कण-न–कण `बाळासाहेब… बाळासाहेब?’ म्हणून विव्हळतो आहे. मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांप्रमाणे दिल्लीच्या त्या दुकानदारासारखे महाराष्ट्राबाहेरचेही बाळासाहेबांचे लक्षावधी चाहते अजूनही माझ्याप्रमाणेच व्याकुळ असतील! पण मी मात्र त्यांच्याप्रमाणे भाबडेपणी `साहेब, तुम्ही आम्हाला पोरके करून गेलात! असा हंबरडा फोडणार नाही. बाळासाहेबांनी आपल्या हिंदुत्व-रक्षण- ध्यासाची धुरा दसर्‍याला मोठ्या विश्वासाने आपला विवेकी, संवेदनशील स्वभावाचा सुपुत्र उद्धव आणि नातू आदित्य यांच्या तरूण खांद्यावर सोपवली आहे. त्यांचा तो विश्वास किती सार्थ आहे, हे उद्धवने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवरल्या वादात पोक्तपणे पडून दिलेल्या सल्ल्यावरून कळतंय! बाळासाहेबांचे आशीर्वाद नि आम्हां लाखो चाहत्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत नि राहतील’…
जय महाराष्ट्र!!

(दैनिक लोकशाही वार्ता नागपूर)

Previous Post

आंब्राई

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.