• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उच्चशिक्षित शेतकरीण बाईंची कमाल

- डॉ. श्रीराम गीत (करियर कथा)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 17, 2023
in भाष्य
0

पंढरपूरच्या डॉक्टर आईवडिलांनी लाडकी मुलगी लहानपणापासूनच पुण्यात आजीकडे शिकायला ठेवली. आईवडील डॉक्टर असल्यामुळे साहजिकच सायन्सला प्रवेश घेतला. बारावी सायन्सनंतर इंजीनियरिंग करायचे नसल्यामुळे काय करायचे असा प्रश्न होता. त्या काळात नवीन सुरू झालेला कोर्स म्हणजे बीएससी इलेक्ट्रॉनिक्स. त्यासाठी नामवंत कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळाली. यथावकाश पदवी हातात आली. कुठेतरी कशीतरी नोकरी करण्याच्या फंदात पडण्याऐवजी मुलीचे लग्न वेळेत झाले तर बरे, असे आईला वाटत होते. सगळ्याच मुलींप्रमाणे त्याला मुलीची तयारी नव्हती. एवढ्यात कशाला लग्नाची घाई? हे वाक्य रोजच आई व आजी ऐकत होती. अचानकपणे ओळखी ओळखीतून एक स्थळ सांगून आले. मुलीचे डोळे बदामी तर मुलाचे तद्दन घारे. मुलगी सुंदर का मुलगा जास्त देखणा असा प्रश्न पडावे असे ते स्थळ समोर पाहिल्यानंतर हळूहळू मुलीचा विरोध मावळू लागला. त्यातच एक नवीन गोष्ट कळली, ती म्हणजे मुलगा एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स झालेला असून पुण्यात एका कंपनीत छान नोकरी आहे. मोठ्या बहिणींची लग्ने झालेली व मुलगा पुण्यात एकटाच हेही कळले.
पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर एका छोट्या पण ऐतिहासिक गावातील हे मूळचे कुटुंब. वडील पेशाने शिक्षक.पण गावातील सर्व नामवंत झालेली मुले त्यांच्या हाताखाली शिकूनच मोठी झालेली. त्यामुळे गावात वडिलांना भरपूर मान. गाव संपताना रस्त्याला लागूनच मोठी शेती. मात्र शिक्षकी पेशामुळे शेतीत दुय्यम लक्ष.त्यांच्या पत्नीला मात्र शेतीमध्ये भरपूर आवड. शेतकरीण बाई बोलण्या-चालण्यामध्ये तशा तिखट, पण त्यांनाही सून म्हणून ही मुलगी पसंत पडली. मोठ्या बहिणींना नाही म्हणण्याचे काही कारणच नव्हते, कारण धाकट्याचे लग्न कधी होणार असा त्यांनाही प्रश्न होताच. त्यांनीही त्याला पसंती दाखवली. अशा त्या ‘इलेक्ट्रॉनिक जोडप्याचा’ विवाह थाटामाटात पार पडला.
मंजिरी आणि राजेशचा संसार छान सुरू झाला. राजेशच्या आईने गावाकडे शेतीच्या जोडीला नवीन उघडलेल्या एका कॉलेजसाठी वाटेवरचे कॅन्टीन सुरू केले होते. विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवारात किंवा जवळपास हॉटेल नसल्यामुळे कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला कॅन्टीनमध्ये गर्दी असे. मोजकेच महाराष्ट्रीयन पदार्थ मोजक्या वेळेला विकायचे. त्यासाठी मदतीला एक बाई आईने ठेवली होती. पोहे, बटाटेवडा, काही वेळा भजी, चहा कॉफी, उपासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी असा ठराविक बेत असे. शेतीची कामे ठराविक दिवसात संपल्यानंतर तसा त्यांना वेळही भरपूर मिळे. सरांची शाळा सुरू असल्यामुळे घरात बसून काय करायचे? याचे एक उपयुक्त, चांगले व उत्पन्न देणारे उत्तर राजेशच्या आईने शोधले होते.
तासाभराचेच अंतर असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या वर्षात दर पंधरा दिवसांनी दोघांचीही गावाकडे चक्कर होत असे. अर्थातच शेतावर फेरफटका करताना कॅन्टीनकडे दोघांची नजर जाई. गरमागरम पदार्थांचा नाश्ता केल्याशिवाय ते कधीच पुण्याला आले नाहीत. मंजिरी तशी सुबत्तेमध्ये वाढलेली. शाळा व कॉलेज पुण्यात झाल्यामुळे शेत नावाचा प्रकार तसा तिला कौतुकाचा होता. बांधावरून चक्कर मारताना गव्हाची रोपे, ताज्या पालेभाज्या, आंबा, पेरू, आवळे, चिंचा असा रानमेवा तिला आकर्षक वाटत असे. पावसाळ्याच्या दिवसात येणारा धो धो पाऊस व अन्य दिवसांत येणारे डोंगरावरचे झोंबरे वारे हेही सुखावणारे असे. शहरी वातावरणातील कोणालाही हे आनंददायी वातावरण आवडेल असेच असते.
वर्ष दोन वर्षातच मंजिरी व राजेश यांच्या संसाराला दोन गोंडस फुले आली. पहिली मुलगी ऋतुजा तर दुसरा मुलगा अमेय. राजेशची नोकरी उत्तम चालू होती. मुलांच्या मागे मंजिरीचा वेळ भरभर पळत होता. तिच्या शिक्षणाचे इलेक्ट्रॉनिक्स आता डोक्यातून बाजूला पडले होते. मात्र आता गावाकडच्या चकरा खूपच कमी झाल्या होत्या. राजेशच्या लक्षात येत होते की वडील थकत चालले आहेत. आईलाही शेताची उस्तवार तितकी जमत नाही. एवढेच काय कॅन्टीनचे उत्पन्न वाढत असूनही ते काम तिला झेपत नाही. लहानपणापासून कॉलेजला येईपर्यंतचे सर्व दिवस राजेशचे गावातच गेले असल्यामुळे शेतीचा गावाकडच्या वातावरणाचा मनातून ओढा होताच. त्यावर आता गंभीरपणे तो विचार करू लागला होता. नोकरीला सहा-सात वर्षे झाली होती. मात्र आता इलेक्ट्रॉनिक्समधील नवीन इंजिनियर मुलांना ज्या पद्धतीत प्रगती करता येत होती तशी इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स केलेल्याची होणे शक्य नाही, हे त्याच्या लक्षात आलेले होते. त्यातच राजेशचे वडील आजारी पडल्यामुळे त्याला गावाकडे दहा दिवस जाऊन राहण्याची गरज पडली. ऋतुजा व अमेय यांची शाळा असल्यामुळे मंजिरी पुण्यातच होती. वडील आजारपणातून बरे झाले. पण तोपर्यंत राजेशच्या मनात काही वेगळाच विचार शिजला होता. परत आल्यावर त्याने तो मंजिरीला बोलून दाखवला. पुण्यातील घेतलेले घर आपण भाड्याने देऊन गावाकडेच राहायला जाऊयात. शेताकडे व्यवस्थित लक्ष देता येईल व आईच्या कॅन्टीनकडे नीट लक्ष देऊन तो व्यवसाय वाढवायचा का? असा प्रस्ताव त्याने मंजिरीपुढे मांडला. खरे तर शहरातच वाढलेली मंजिरी हे ऐकून थोडी भांबावून गेली होती. असा काही विचार आपल्या नवर्‍याच्या डोक्यात कधी येईल व शहर सोडायला लागेल हे तिच्या स्वप्नात सुद्धा नव्हते.
मात्र त्याचवेळी मंजिरीच्या एक गोष्ट लक्षात आली. शहरातील धावपळ, मुलांना शाळेत नेऊन सोडणे आणणे, रस्त्यातल्या ट्रॅफिक, धूर, गर्दी या सगळ्यातून निवांत आयुष्य जगण्याची ही एक महत्त्वाची व मोलाची संधी चालून येत आहे. येऊन जाऊन प्रश्न होता त्या दोन गोंडस मुलांच्या शिक्षणाचा. त्यावरसुद्धा राजेशने सांगितले माझे संपूर्ण शिक्षण गावातच नाही का झाले, तसेच त्यांचेही पूर्ण होईल. गरज पडली तर कॉलेजकरता ते पुण्यालाच येतील. आपले घर आपण त्या वेळेला आपल्या आपल्या ताब्यात घेऊ. तोवर भाडे तर मिळत राहणारच आहे.
अजून एक महत्त्वाचा प्रस्ताव राजेशकडून मंजिरीला आला. आई आता किती वर्षे काम करणार आहे? त्यापेक्षा आपण तिला आता काम थांबवायला सांगू आणि कॅन्टीनची संपूर्ण जबाबदारी, त्याचा विस्तार करणे व मनाजोगते चालवणे हे तूच कर.
हे पण मीच करायचे? असा प्रश्न प्रथम मंजिरीला पडला पण नंतर आपण गेल्या सहा-सात वर्षांत काहीच करत नव्हतो, हेही प्रकर्षाने जाणवले. सदैव कामात असलेली डॉक्टर आई पण आठवली. अधूनमधून आईने दिलेले टोमणेसुद्धा आठवत होते. ‘इलेक्ट्रॉनिक्समधली पदवीधर आहेस तू. आता त्यातला ‘ई’ तरी आठवतो का?’
दोन दिवस डोक्याचा प्रचंड झालेला गलबला बाजूला ठेवून शांत डोक्याने तिने निर्णय घेतला व राजेशला होकार दिला.
एक गोष्ट राजेशने अतिशय चांगली आणि वेगळी केली होती. तो जिथे नोकरी करत होता, तेथीलच एका मित्राबरोबर त्याने व्हर्च्युअल रियलिटीचे काही प्रशिक्षण हौसेने घेतले होते. आपण व्हर्च्युअल रियलिटी म्हणजेच व्ही.आर.बद्दल सध्या कौतुकाने ऐकतो. पण तो सगळा प्रकार त्या काळात भारतात नवीनच येत होता. मित्रांनी ठिकठिकाणी जाऊन काम करायचे व त्यासाठीचा सगळा बॅकअप गावातूनच राजेशनी पाठवून द्यायचा. गरजेनुसार आठ दिवसांतून एकदा मदतीकरता लागेल त्या ठिकाणी जाऊन चक्कर टाकून यायचे, अशी योजना त्याने केली. नोकरी सोडली तरी नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न कॅन्टीनची वेळ संपल्यानंतर काम करून मिळणार याची त्याने सोय करून ठेवली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना राजेश व मंजिरी दोन्ही मुलांसह गावाकडे दाखल झाले. मुलांची नवीन शाळा सुरू झाली. गावातील शैक्षणिक वातावरण उत्तम असल्यामुळे पाहता पाहता मुले तिथे छान रुळली. शाळेनंतर रोज शेतावर चक्कर टाकून त्यांनाही मोकळा छान आनंदाचा ठेवा मिळाला. शहरांमध्ये असताना शाळा सोडली तर खेळायला ना जागा, ना मैदान, ना मित्र. या ऐवजी अनेक प्राणी आणि गावाकडचे मित्र यामध्ये मुले रमली. घरात असलेली मांजरांची जोडी, शेतावरची कुत्र्यांची जोडी आणि गायबैलांची पण एक वेगळी जोडी यामध्ये अमेय मनापासून रमला.
पहिले चार महिने गेल्यानंतर मंजिरीने संपूर्णपणे आखणी करून शेतातील काही भाग कॅन्टीनसाठी वेगळा काढला. त्या भागात सुरेख आमराई होती. त्याचा फायदा घेऊन गावाकडचा वाटेल असा ढाबा हे कॅन्टीनचे बदललेले नवे स्वरूप तयार झाले. शेतीकडे राजेश लक्ष देत होता. हुकमी मौसमी पिके, लागवडीची धान्ये, स्ट्रॉबेरीसारखी नवीनच लागवड असे लहानपणापासून मनात असलेले विविध प्रयोग त्याने प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. एक वेगळा धाडसी निर्णय त्याने घेतला. थेट हरियाणातून वेगळ्या स्वरूपाच्या संकरित म्हशी व त्यांची वासरे एका निगराणी करणार्‍या भैयासकट मागवली. चार्‍याचा प्रश्नच नव्हता आणि जागेला तोटा नव्हता. पाहता पाहता दुधाचे नगदी उत्पन्न दैनंदिनरित्या सुरू झाले. खाण्यापिण्याकरता व वापराकरता मुबलक दुधाचे उत्पन्न होऊन आता दिवसाकाठी त्याची विक्री करणेही सहज शक्य झाले. गावातून शेती विकून शहराकडे ओघ चालू असताना उत्तम नोकरी असलेले हे उच्चशिक्षित जोडपे आज दहा वर्षे गावात छान बस्तान बांधून आहे. एका प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी जाणारा रस्ता त्यांच्या शेतावरूनच जातो. थेट गुजरातपासून मुंबईपर्यंत किंवा नाशिक, औरंगाबाद ,कोल्हापूरपासून पर्यटनाला येणारे सर्वजण याच रस्त्याने जातात व येतात. आता ते कॅन्टीन नसून, ढाबा नसून एक निवांत फार्महाऊस झाले आहे. एकावेळी १०० जण तरी सुंदर महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेतात. मुख्य म्हणजे गरमागरम ठराविक मेनूच्या जोडीला आता तोंडाला पाणी सुटणारे पुरणपोळी, गुलाबजाम, श्रीखंड, आईस्क्रीम नेहमी उपलब्ध करून दिले आहे. ट्रिप म्हणजे नॉनव्हेज हे डोक्यात गणित असणार्‍यांना चविष्ट मासे, मटण आणि अर्थातच चिकन थाळी मागवता येते. थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान ठेवणारे पोटभर जेवून आम्ही अमक्या तारखेला परत येणार आहोत, तेव्हाची नोंदणी करूनच पुढे जातात. एक मात्र पथ्य कटाक्षाने पाळले जाते. सगळे मिळेल पण बाटली आडवीच हवी. तिला येथे परवानगी नाही. मात्र हे ठिकाण आवडलेले कोणीही बाटली गाडीत ठेवूनच आनंदाने ती अट मान्य करतात, हेही विशेष. मंजिरीची दोन्ही मुले आता पदवीधर होऊन आपापल्या उद्योगाला लागली आहेत. राजेश व्हीआरचे भारतातील विविध प्रकल्प राबवण्यात वर्षाचे ५० दिवस गुंतलेला असतो. शेतकरीण मंजिरीबाई मात्र पदर खोवून जातीने सगळ्यांची देखभाल करतात. आलेल्या प्रत्येकाचे नावानिशी आदरातिथ्य करत असल्यामुळे लोकांना आपुलकी जाणवते.

तात्पर्य : राजेशकडे शेती होती म्हणून हे शक्य झाले असे कोणाला नक्की वाटू शकते. कोणाला ही जागा मोक्याची होती म्हणूनही शक्य झाले असेही म्हणता येते. मात्र डॉक्टर आई-वडिलांची मुलगी मंजिरी, जिने गाव शेत कधीच पाहिले नाही, तिने आता हा सारा कामाचा डोलारा केवळ संभाळलाच नाही तर मनापासून त्यात लक्ष घालून सासूच्या दसपट तरी वाढवला. मंजिरी मॅडम भेटल्या तर जेवण गोड लागते असे म्हणणारे कुटुंब आता नवीन राहिलेले नाही.

Previous Post

पक्षी दूर देशी गेला…

Next Post

वात्रटायन

Next Post

वात्रटायन

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.