“उडत गेल्या सगळ्या मानभावी मैना आणि साळसूद साळुंक्या. उरली एक साधी-भोळी गोड `पारू’…
`पुढारी’, `सत्यवादी’ या कोल्हापूर, सांगली या दक्षिण महाराष्ट्राच्या भागातून प्रसिद्ध होणार्या वर्तमानपत्रातील `शिवा रामोशी’ या चित्रपटाची जाहिरात. आज जवळजवळ पन्नास वर्षे उलटून गेली, शाळकरी वयात उत्सुकतेनं वाचलेली ही जाहिरात आजही जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी आहे.
साळसूद साळुंक्या कोण, मानभावी मैना कोण हे जाणून घ्यायच्या भानगडीत मी ‘त्या’ वयात आणि `या’ वयातही कधी पडलो नाही. पण उरली एक साधीभोळी गोड पोर- `पारू’! हिनं मात्र `शिवा रामोशी’च्या आधीच आणि नंतरही आजवर तिच्या पाहिलेल्या चित्रपटातून आपल्या सुंदर अभिनयानं जे जंतर-मंतर केलं आहे ते या क्षणीही कायमच आहे. ती साधीभोळी गोड पोर म्हणजे सुलोचना. त्यांच्या अगदी निकटवासियांत आणि सिनेसृष्टीत `दीदी’ या नावाने ओळखल्या जाणार्या. पन्नास-पंचावन्न वर्षापासूनचा मी त्यांचा एक रसिक चाहता आहे. त्यांच्या कला-गुणांचा आदर्श मानणारा चित्रपट प्रेमी आहे, नाट्य चित्र कलावंत आहे.
चित्रपट, नाटक, तमाशा या सार्या कलांची आवड नेमकी कशामुळे आणि कुणामुळे माझ्यात निर्माण झाली, वाचनाचं वेड मला कसं लागलं, हे मी आज निश्चित नाही सांगू शकणार, पण हा छंद मला लागला आणि तो मी आजवर बर्यापैकी जोपासला हे नक्की! माझ्या जगण्यात `जान’ आली ती या टॉनिकमुळेच!
प्रत्येक चित्रपट (विशेषत: मराठी) आपण बघितलाच पाहिजे ही अनावर ओढ. त्यावेळी मिरजेत सिनेमाच्या तिकिटाचे दर एक आणा (गिन्नी), तीन आणे, पाच आणे असे. कोणत्याही वैध-अवैध मार्गानं गिन्नी मिळवणं ही एक फार मोठी अवघड गोष्ट नव्हती. देवल, माधव, मंगल, हंसप्रभा ही सगळी शाळेच्या वाटेवरची आणि आजूबाजूची सिनेमा थिएटरं, नेताजी पालकर, जय भवानी, भगवा झेंडा, सिंहगड, जय मल्हार, जशास तसे, मीठ भाकर, मोठी माणसं, जिवाचा सखा, बाळा जो जो रे, चिमणी पाखरं, पेडगावचे शहाणे, असे अनेक चित्रपट आम्ही मित्रमंडळीने बघितले. त्या वयातही सुलोचना हे नाव आदरानंच आमच्या तोंडी यायचं, त्यांनी केलेला अभिनय मनाला भिडायचा, ग्रामीण भागाची सोज्वळ सात्विक स्त्री आणि सुलोचना हे समीकरण मनोमन जुळू लागलं होतं. सुलोचना-चंद्रकांत ही एक जोडी ही मनात घर करून राहू लागली. `एका सुरात घुंगरू बोले’, `जिंकून फड आला माझा गं पैलवान’, `वासुकीचा दोर बाई समिंदराचा डेरा’, `चिमण्या पाखरांचे, चिमणं घरकुल’, `स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी, बाळा जो जो रे’ या चित्रपटगीतांच्या ओळी नकळत मनात घोळू लागल्या. त्याचवेळी हिंदी, इंग्रजी चित्रपट बघण्याचाही सपाटा सुरू होता. माणिक चित्रचा `पारिजातक’ चित्रपट बघितला. त्यात सुलोचना होत्या सत्यभामा आणि रुक्मिणी होत्या हंसाबाई वाडकर. मला काही सुलोचना आणि रुसवी फुगवी सत्यभामा हे नातं जुळवायचं जमेना, इतकी तोवर ही प्रतिमा डोक्यात फिट्ट बसलेली होती.
मनोहर मासिकाच्या मुखपृष्ठावरचा `चिमणी पाखरं’ चित्रपटातला सुलोचनाचा फोटो आजही जशाचा तस्सा डोळ्यासमोर आहे. आम्ही सातारला मामांच्या लग्नाला गेलो होतो, त्यावेळी बघितलेला `देव पावला’ सिनेमासुद्धा मनात चांगलाच भिनलाय.
दिवसेंदिवस माझं सिनेमा-नाटकं बघण्याचं वेड वाढतच गेलं. सगळेच सिनेमे काही उत्तम सदरात मोडणारे नसायचे, अनेक तद्दन भिकार सिनेमेही (मराठी, हिंदी आणि इंग्रजीसुद्धा) असायचे. मी स्वतः बघायचो आणि माझं असं एक मत ठरवायचो. अमका म्हणतो म्हणून तो सिनेमा, ते नाटक चांगलं किंवा वाईट हे मी कधीच स्वीकारलं नाही. त्याचा नकळत फायदा (किंवा तोटा) अजूनही एखादी कलाकृती अनुभवताना होतो.
सुलोचना या अभिनेत्रीचे (अभिनेत्री हा शब्द मी या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक वापरला आहे. नटी, चित्रतारका असले सवंग शब्द नामंजूर) विविध पैलू हळूहळू ध्यानात येऊ लागले. काय छान काम केलंय? सिनेमा उत्तम होता, डबडा होता, भिकार होता किंवा काय दम नाही; इतक्याच मर्यादित शब्दात सिनेमाची आवड-निवड तोकडी राहिली नाही. त्यातलं नेमकं काय आवडलं किंवा नाही, हे जाणून घ्यायची उत्सुकता वाटू लागली. कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत, छायाचित्रण, पार्श्वसंगीत इत्यादी प्रत्येक गोष्टीत हळूहळू रस वाटू लागला. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, त्यातली सहजता, कृत्रिमता, देहबोली, लाँग शॉट, क्लोज शॉट, मिड शॉट कुठे सुरू होते, नेमके कुठे संपते किंवा संपायला पाहिजे, किंवा आपण दिग्दर्शक असतो तर हे दृश्य कसे घेतले असते. कोणताही मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट बघून आल्यावर विचार करण्याचा चाळाच सुरू झाला. त्यात भर घातली सुलोचना या अभिनेत्रीने! सोज्ज्वळ, सोशिक, सात्विकतेतही किती विविध छटा असू शकतात, समर्थ अभिनेत्री त्याचे पैलू किती वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकते याचा वस्तुपाठच त्यांच्या भूमिकांमधून मिळत होता. सुलोचनाबाईंनी साकारलेली काही दृश्यच या क्षणीही माझ्या नजरेसमोर तरळत आहेत.
`वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटात सुलोचनाबाईंची भूमिका कोण विसरू शकेल? (प्रत्येक मराठी घराघरात सुलोचनाबाईंचे सालंकृत सोज्ज्वळ छायाचित्राचं कॅलेंडर भिंतीवर विराजमान झालेलं असायचं.) त्यातला अगदी छोटा प्रसंग! छोटा वासू (माधव वझे) आपली भावी वहिनी कशी आहे हे बघण्यासाठी (नवरी मुलगी पाहणं या थाटात) आला आहे. त्या दृश्यात सुलोचनाबाईंनी होऊ घातलेल्या धाकट्या दिराची राखलेली `आदब’ ज्या अदाकारीनं सादर केली आहे, हे विसरणे शक्यच नाही.
पण तसाच बघण्याचा प्रसंग त्यांनी `देव पावला’ या चित्रपटात कसा रंगवला आहे पाहा- `देव पावला’ची जोडी होती सुलोचना आणि दामूअण्णा मालवणकर (ही जोडी ज्यांनी निवडली आणि यशस्वी करून दाखवली त्या सर्वांचं कोणत्या शब्दात कौतुक करावं?) `कौसल्येचा राम बाई’ हे गीत आठवलं की मागावर विणकाम करणार्या सुलोचनाबाईच डोळ्यासमोर येतात. `कुणी म्हणेल वेडा तुला, कुणी म्हणेल वेडी मला’ म्हणताना ओढ्याकाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविणारे जनू पाणक्या आणि सरू (दामू अण्णा आणि सुलोचना दिसतात, याच दृष्यात आपल्याच अंगावर आपणच पाणी उडून घेणारे दामूअण्णा आणि त्यांच्या या भोळ्या भाबडेपणावरच भाळलेली सुलोचना दोघांचाही सहज अभिनय भावून जातो.
सरुच्या गांजेकस काकानं (विष्णुपंत जोग तिच्या लग्नाचा (?) घाट घातला आहे. मुलगी बघण्याचा बहाणा करून एक (तमाशा) पार्टी घरी आणलेली आहे. सरू आलेल्या माणसासमोर गाणं म्हणते,
`जा मुली शकुंतले सासरी
आवरी डोळ्यामधल्या सरी’
गाणं संपता-संपता बघायला आलेल्यांच्यातली तमासगिरी उफाळून येते. लावणीच्या चालीवर ते गाण्याच्या ओळीची झील धरतात. सरूला हा सगळा बनाव ध्यानी येतो.
काही क्षणापूर्वीच भुईवर नजर ठेवून तन्मयतेनं गाणारी सरू आता काकांचं आणि आलेल्या लोकांचं खरं स्वरूप समजल्यावर नागिणीसारखी फडा काढून फुत्कारणारी सरू होते! एकाच दृश्यात अत्यंत परस्पर टोकांच्या भिन्न-भिन्न भावमुद्रा! सुलोचनाबाईंनी आपला अभिनयानं हे सारंच दृश्य जिवंत केलं आहे.
`सांगत्ये ऐका’ सिनेमाच्या आठवणी निघाल्या की हमखास ‘चल, उठ रामराया, झाली भली पहाट’ या गाण्याच्या ओळी आठवतात आणि डोळ्यापुढे येते, सुलोचना-चंद्रकांत ही अस्सल मराठमोळी जोडी. एक से एक कलाकार या सिनेमात एकत्र आलेले. छान रसायन जमलं आणि चित्रपटापासून मराठी तमाशा चित्रपटांचा मुखडाच बदलला. या चित्रपटातलं प्रत्येक गाणं `हिट’ ठरलं. `बुगडी’ची गोडी अजूनही अवीट आहे. या चित्रपटात सुलोचनाबाईंची भूमिका छोटीशीच आहे, पण आहे ती अभिनयाच्या दृष्टीने मोठी. पाटलाच्या बलात्काराला बळी पडलेली, सर्वस्व गमावलेली, असहाय्य, मूक अबला न बोलता, डोळ्यातून आसवांचा एकही टिपूस न काढता ‘शंभर पापं भरली की इच्चू चावतो आन् शंभरवर पाच भरली की इंगळी डसते’ हे दुसर्या पात्राचं वाक्य आतल्या आत गिळणारी. `सावळ्या, तुला देन्यासारखं माझ्यापाशी कायबी र्हायलं न्हाई’ या एकाच वाक्यातून सुलोचनाबाईंचा समर्थ अभिनय खूप काही सांगून जातो.
`सांगत्ये ऐका’मधल्या वगाचा काही भाग गदिमांनी सुलोचनाबाईंना डोळ्यासमोर ठेवून रचल्यासारखा वाटतो.
भोकरावानी टपोरं डोळं, केस लांब काळं
गालावर तीळ, चाल हंसाची
बोलनं तिचं लई छान, हरपवी भान,
हसनं जनू तान, मालकंसाची.
रूपाची खान, अंग गोरंपान,
बांधा अटकर
अंगावर नाही दागिना, नेसू पटकुर
`प्रपंच’ या चित्रपटास जन्मजात दारिद्र्यानं गांजलेली, पोराबाळांच्या लटांबरानं थकलेली आणि अखेरीस सुखी संसारासाठी प्रपंचाचा पसारा आवरता घ्या असं लोकांना ठामपणे सांगण्यासाठी गावची शीव निर्धारानं ओलांडणारी कुंभारीण. ही सुलोचनाबाईच्या अभिनयातली एकाग्रता विलक्षण आहे.
`एकटी’ या चित्रपटातला एक प्रसंग. हा तर त्या चित्रपटाशी संबंधित असणार्याच्या, आणि चित्रपट हे माध्यम केवळ करमणूक म्हणून नव्हे तर जीवनाचा सर्वस्पर्शी अनुभव म्हणून स्वीकारण्याच्या प्रेक्षकांसाठीही कसोटी ठरणाराच.
एक खोली, एक शिवणयंत्र. त्यावर काम करणारी एक वृद्धा, अकाली वैधव्याचं दाहक दुःख पचवून आपल्या मुलासाठी खंबीरपणे उभी राहणारी, त्याला वाढविणारी, प्रशिक्षण देणारी, संस्कार देणारी, कर्तव्यदक्ष माता. आज मात्र ही हताश, निराश, आणि जीवनाचं चाक तरीही अखंडपणे फिरतं राहण्यासाठी धडपडणारी मानिनी!
आईलाही विसरून जाती या देशातील पिले अडाणी। चल सोडून जा हा देश पक्षिणी।। काळीज ढवळून काढणारे गीताचे शब्द, गीताची चाल आणि गायन. दृश्य नियोजनाचं आणि दृश्य टिपण्याचं दिग्दर्शकाला आणि चित्रण करणार्याला आव्हान. दृश्यात आकाशाची, सागराची, निसर्गाच्या निसर्गाची दृश्ये नाहीत, काही तांत्रिक करामतीही नाहीत.
उडुनी उंच जा ऊर्ध्व दिशेला
मार्ग मानिनी अन्य न तुजला
यातील `ऊर्ध्व’ हा सर्वार्थाने अत्यंत समर्पक शब्द आणि सुलोचना या उत्सुंग अभिनेत्रीने सर्वांगाने साकारलेले प्रसंग चित्रपटाच्या सर्व तंत्राचा मंत्राचा समर्थाचा कौशल्याचा घडलेला साक्षात्कार!
ग्रामीण भागात जन्मलेली, फारशी न शिकलेली एक मुलगी चित्रपटासारख्या एका क्षणात स्वर्गात दुसर्या क्षणी पाताळात अशा अत्यंत चंचल क्षेत्रात येते काय आणि अविरत कष्टानं निरीक्षणानं, कर्तृत्वानं, अविरत प्रयत्नानं चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टींबरोबरच बोलीभाषा, आंगिक, वाचिक अभिनय आणि मुख्य म्हणजे भूमिकेची उत्तम जाण आणि प्रकटीकरण यावर विलक्षण प्रभुत्व मिळवते काय आणि सातत्याने पन्नास पंचावन्न वर्षे टिकून राहते काय, सारेच विलक्षण. उमेदवारीच्या काळात भालजी पेंढारकरांसारखा मार्गदर्शक-गुरु भेटला ही भाग्याची गोष्ट असली तरी शिष्यसुद्धा तेवढाच समर्थ, जिज्ञासू आणि प्रज्ञावंत असला पाहिजे. विशेषत: अभिनयाचा झरा आतूनच कुठं तरी उसळता हवा. जाणकार मार्गदर्शक त्यांची वाट मोकळी करून देतो. पण मूळ झरा हवाच.
आज या सार्या गोष्टी मला जशा दिसल्या तशा मांडू शकलो. माझ्या स्वतःच्या बाबतीतही ही गोष्ट एक क्षणात घडलेली नाही. मी बघत गेलो वाचत गेलो, तशी माझीही आवड-निवड बदलू लागली. एकेकाळी किंवा `हीरो’ किंवा `हिरॉइन’ म्हणून जे ग्रेट वाटायचे ते अत्यंत सामान्य वकुबाचे वाटू लागले. त्यातूनही जे टिकले आणि आजही टिकून आहेत असे सन्माननीय अपवाद आहेत. सुलोचना या अभिनेत्री त्यापैकीच एक.
आपणही सिनेमातून नाटकांमधून कामं करावी अशी उर्मी मला लहानपणापासूनच येत होती. दैवाचे अनुकूल फासे पडले असते तर तसं घडलंही असतं. पण तसं नाही घडलं. मला चक्क नोकरी करत करत जशी जमेल तशी ही आवड जोपासावी लागली. ज्यांना आपण चित्रपटातील अभिनयक्षेत्रात इतकं मनापासून मानतो त्यांच्याशी ओळख व्हावी ही इच्छा अपुरीच राहिली आहे.
तशी संधी मिळण्याची वेळ शाळकरी वयातच येण्याची शक्यता होती. माझ्या मोठ्या बंधूंचे (पंडितराव खाडिलकर, हे दत्तक गेले होते) बालपासूनचे मित्र दिलीप जामदार, कोल्हापूरचे बाबुराव पेंटर, बाळ गजबर यांच्याबरोबर अनेक चित्रपटसृष्टीत काम करत होते. `मुकं लेकरु’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना, रमेश देव (बहुधा त्यांचं या चित्रपटामधून चित्रसृष्टीत पदार्पण झालं असावं) यांनी या सिनेमात कामं केली होती. त्यातल्या एक लहान मुलाची भूमिका मला देण्याचा विचार दिलीप जामदारांच्या मनात होता.
पुढे काय झालं कोणास ठाऊक? पण मला काही त्यात काम मिळाले नाही. मी तो चित्रपट मिरजेच्या देवल टॉकीजमध्ये सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून बघितला. त्यावेळी जर मला संधी मिळाली असती तर? सुलोचनाबाईंची परिचय झाला असता.
दुसरी संधी आली होती `एक डाव भुताचा’ या चित्रपटाच्या वेळी. सुलोचनाबाई या चित्रपटात नायिकेच्या आई आहेत. शूटिंग सासवडला होतं. मीही त्या चित्रपटात छोटीशी भूमिका केली आहे. पण यावेळी ओळख होऊ शकली नाही. सुलोचनाबाई ठरलेल्या वेळेत वेळेआधी रंगभूषा, वेशभूषा करून तयार असायच्या. त्यांच्यासाठी एक खुर्ची ठेवलेली असायची. पण त्यांना खुर्चीवर बसलेलं मी कधी पाहिलं नाही. त्या सतत मैदानावर ठराविक अंतरावर फेर्या मारायच्या एकाग्रपणानं. शॉटसाठी बोलावणं आलं की लगेच निघायच्या. कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, घाई नाही. आरडाओरडा नाही. स्वतःचं अस्तित्व जगाला दाखवण्याचा आटापिटा नाही. आपणहून पुढं व्हावं त्यांची ओळख करून घ्यावी असं याचं भानच मला राहिलं नाही. त्या शांतपणे फेर्या मारताहेत हीच मूर्ती मी मनात साठवली.
इज्या झाला, बिज्या झाल्या, तिज्याची संधी आता कायमची हुकली.
पण, `उरली एक साधी भोळी गोड पोर पारू’ ही सिनेमाची जाहिरात अगदी शाळकरी वयात वाचलेली. ती मूर्ती पन्नास वर्षांपूर्वीची असूनही कालच पडलेल्या स्वप्नासारखी मनात अजूनही आदराच्या सिंहासनावर विराजमान आहे… विराजमान राहील.
(२००५ साली प्रसिद्ध झालेल्या सुलोचनादीदी विशेष अंकातून साभार.)