भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धसदृश परिस्थितीमुळे ‘आयपीएल’ स्थगित झाले. युद्धामुळे किंवा राजनैतिक वैराचा इतिहास क्रीडाक्षेत्रासाठी नेहमीच धगधगत असतो. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रीडात्मक संबंध तसेच जागतिक क्रीडाक्षेत्रावर राजकारणाचे, संघर्षाचे, युद्धाचे कसे परिणाम झाले, याचा आढावा…
– – –
भारत-पाकिस्तान युद्धाचे शंख फुंकले गेल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची आणि अर्थकारणाची ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग असे बिरूद मिरवणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) काही काळासाठी स्थगित करण्यात आली. क्रिकेटमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर मुळीच नवे नाही. त्याला धर्मयुद्ध म्हणणारा मोठा समाज सामन्याची उत्कंठा वाढवतो. पण, युद्धसदृश परिस्थितीचा फटका जागतिक क्रीडाक्षेत्रातील अनेक मोठ्या स्पर्धांना बसल्याचा इतिहास सांगतो. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अशा अनेक स्पर्धांना त्याचा फटका बसला आहे. तसेच अनेक देशांमधील बिघडलेले राजनैतिक संबंध मैदानांवरही प्रकर्षाना दिसून आलेले आहेत.
१९४७मध्ये भारत स्वतंत्र झाला, तसाच पाकिस्तानही. पण या दोन राष्ट्रांमधील राजनैतिक संबंध कधीच चांगले नव्हते. भारत-पाकिस्तान युद्ध दोन्ही देशांनी अनेकदा अनुभवले आहे. पण, सीमेकडील भागातला काश्मीर संघर्ष आणि गोळीबार हा नित्याचाच. या सर्व घटनांचे पडसाद दोन्ही देशांच्या क्रीडास्पर्धांमध्ये उमटल्याचे दिसून येते. दोन देशांमधील पहिली क्रिकेट कसोटी मालिका १९५२मध्ये खेळली गेली होती. तेव्हा पाकिस्तानच्या संघाने भारत दौरा केला होता. परंतु, त्यानंतर आतापर्यंत अनेक नियोजित दौरे राजनैतिक कारणांसाठी रद्द करावे लागले किंवा गुंडाळावे लागले. १९६२ ते १९७७ या काळात दोन देशांमध्ये कोणतेही क्रिकेट सामने झाले नाहीत. याला कारणीभूत ठरले, १९६५ आणि १९७१मधील युद्धे. १९९९मध्ये कारगील युद्धाचाही क्रिकेट संबंधांवर परिणाम झाला. २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळेही द्विराष्ट्रीय क्रिकेट मालिका धोक्यात आल्या. २०१२-१३मध्ये पाकिस्तानचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी अखेरचा भारत दौर्यावर आला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील मालिका झालेल्या नाहीत. परंतु क्रिकेट जगताला भारत-पाकिस्तान क्रिकेट चुरस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकांतच अनुभवता आली आहे. परिणामी तिकीटविक्रीला जशी मोठी मागणी असते, तशीच दूरचित्रवाणी-डिजिटल दर्शकसंख्येचेही नवे विक्रम प्रस्थापित होतात. दोन्ही संघांच्या विजय-पराजयाचे मोठे पडसाद नागरिकांमध्ये उमटत असल्यामुळे हा सामना उच्च तणावाचा मानला जातो. दहशतवाद समूळ संपेपर्यंत पाकिस्तानशी पूर्णत: क्रिकेटसंबंध तोडून टाकावेत, असे मत काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मांडले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) वर्चस्व पाहता पाकिस्तानची क्रिकेटकोंडी होणे स्वाभाविक आहे.
पाकिस्तान देश म्हणून, स्थळ म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी असुरक्षित असल्याचे २००९मध्ये जगाने अनुभवले. पाकिस्तानविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवसाचा खेळ खेळण्यासाठी लाहोरच्या गदाफी स्टेडियमकडे जाणार्या श्रीलंकन क्रिकेटपटूंच्या बसवर १२ दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने जग हादरले. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा क्रिकेटपटू जखमी झाले, तर पाकिस्तानचे सहा पोलीस आणि दोन नागरिक ठार झाले. या घटनेनंतर पाकिस्तान जागतिक क्रिकेटपासून तुटला गेला. त्यामुळे पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीत मालिकांच्या योजना आखल्या. पण २०१५पासून काही देश तिथे खेळले आहेत. पहिल्या हंगामाव्यतिरिक्त ‘आयपीएल’च्या व्यासपीठावरही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर अघोषित प्रवेशबंदीच आहे. अखेरीस २०१६पासून त्यांनी पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) वेगळी चूल मांडली. पण, ‘आयपीएल’चा रूबाब आणि अर्थकारण याची नखाचीही सर ‘पीएसएल’ला प्राप्त झाली. ताज्या घडामोडींचा आणखी मोठा फटका त्यांच्या लीगला बसण्याची दाट शक्यता आहे. युद्धाच्या भीतीने परदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये जाण्यास धजावतील असे वाटत नाही.
दहशतवाद तसा अन्य देशांसाठीही नवा नाही. २००९पर्यंत श्रीलंकासुद्धा ‘एलटीटीई’च्या हल्ल्याच्या दहशतीखाली वावरत होता. कोलंबोतील बॉम्बस्फोटामुळे १९९६च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी तिथे खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीलंकेच्या खात्यावर विजयाचे गुण जमा झाले. २००८मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे इंग्लंडचा संघ मायदेशी परतला. त्यामुळे दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले. पण दोन आठवड्यांत इंग्लंडचा संघ भारतात परतून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला. २०२२मध्ये काबूल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. अशी अनेक उदाहरणे क्रिकेटमध्ये आढळतात.
क्रिकेटप्रमाणेच हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान क्रीडात्मक द्वंद्व प्रतिष्ठेचे मानले जाते. विश्वचषक, एफआयएच प्रो लीग, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशिया चषक, आशियाई चॅम्पियन्स करंडक, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांची रंगत वेगळीच असते. कबड्डीमध्येही भारत-पाकिस्तान यांच्यातील हाडवैर दिसून आले आहे. परंतु दोन देशांमधील सामन्यांची संख्या घटली आहे आणि प्रो कबड्डी लीगमध्येही पाकिस्तानच्या कबड्डीपटूंना स्थान नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या कबड्डीचा स्तर खालावला आहे.
युद्धामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धांचे कधीच नुकसान झाले नाही. परंतु, ऑलिम्पिक आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धांना त्याचा फटका बसल्याच्या काही घटना घडल्या आहेत. पहिल्या महायुद्धामुळे २०१६चे बर्लिन (जर्मनी) ऑलिम्पिक रद्द करावे लागले. त्यानंतर दुसर्या महायुद्धामुळे २०४० आणि २०४४च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याची परिस्थिती ओढवली. परिणामी १९३६ ते १९४८ असे एक तप ऑलिम्पिक स्पर्धांना जगाला मुकावे लागले. स्वाभाविकपणे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा या कालावधीत झाल्या नाहीत. दुसर्या महायुद्धामुळे १९४२ आणि १९४६च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा झाल्या नव्हत्या.
१९७२चे म्युनिच (जर्मनी) ऑलिम्पिक हत्याकांड म्हणजे क्रीडाजगताचा एक काळा इतिहास मानला जातो. ब्लॅक सप्टेंबर नामक पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायली ऑलिम्पिक संघाच्या दोन खेळाडूंना ठार केले, तर नऊ जणांना ओलीस धरले. परंतु त्यांना सोडवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे उर्वरित ओलिसांनाही दहशतवाद्यांनी ठार केले. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधील सुरक्षा व्यवस्थांमध्ये क्रांतिकारी बदल झाले. अमेरिकेत २०१३च्या बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेच्या अंतिम रेषेनजीक झालेल्या दोन स्फोटांमध्ये तीन नागरिक ठार झाले, तर २६० जण जखमी झाले. २०१५मध्ये पॅरिसच्या स्टॅड डी फ्रान्स स्टेडियमवर फ्रान्स विरुद्ध जर्मनी यांच्यातील सामना चालू असताना स्टेडियमबाहेर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचाही परिणाम क्रीडाजगतावर झाला होता. अफगाणिस्तानवरील रशियाच्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिकेसह ६० देशांनी बहिष्कार घातला. त्यापुढचे १९८४चे ऑलिम्पिक लॉस एंजेलिस येथे झाले. यावेळी प्रत्युत्तरादाखल रशियासह काही मित्रराष्ट्रांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. फक्त रोमानिया त्याला अपवाद ठरला. ऐंशीच्या दशकातील शीतयुद्धाचा क्रीडाक्षेत्रावरील परिणाम टाळण्याच्या हेतूने टेड टर्नर यांनी सदिच्छा क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. १९८६ ते २००१या कालवधीत पाच सदिच्छा क्रीडा स्पर्धा झाल्या. २००५मध्ये फिनिक्स येथे होणार्या स्पर्धा काही कारणास्तव रद्द झाल्या. त्या पुन्हा कधीच होऊ शकल्या नाहीत.
दहशतवादामुळे आणि प्रतिस्पर्धी देशांमधील हाडवैरामुळे क्रीडाक्षेत्राला अनेकदा हादरवले आहे. तूर्तास, भारत-पाकिस्तान युद्धस्थितीमुळे ‘आयपीएल’ला अडथळा आला. भारताला त्यावर मात करणे जड जाणार नाही. पाकिस्तानला मात्र क्रिकेटमधील अनेक परिणामांना यापुढे सामोरे जावे लागेल.