जिथे सत्ता असते, तिथे लांगूलचालन होतंच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत समाजातल्या एका मोठ्या वर्गाने त्यापलीकडची, भक्तीची पायरी गाठली आहे. श्रद्धा आली की चिकित्सा संपते, भक्ती आली की सारासार विचार करण्याची वृत्ती खुंटीला टांगली जाते. अशा मेंदूगहाण भक्तांच्या फौजा हे मोदीकाळाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यात मोदींनी वेगवेगळे मार्ग वापरून बहुतेक सगळी प्रसारमाध्यमं अंकित करून घेतली आहेत. कधीकाळी पत्रकारितेत साध्या वेषात वावरत असलेले त्यांचे वैचारिक सहोदर आता निर्भीडपणे गणवेशात येऊन उत्साहात लाठ्या काठ्या फिरवू लागलेले आहेत. त्या सगळ्याचा नीचतम परिपाक म्हणजे भारतीय सैन्यदलांचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना या भक्तगणंगांच्या ‘लष्कर-ए-होयबा’ने वृत्तवाहिन्यांवर आणि समाजमाध्यमांमध्ये चालवलेला जहरी, आत्मघातकी, अडाणी उन्मादाचा नंगानाच!
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पुरेसा वेळ घेऊन, पाकिस्तानला गाफील ठेवून अचानक शिस्तबद्ध हल्ला चढवून दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त केले. या सर्व काळात हे सुस्पष्ट होतं की भारतीय सैन्याचा हेतू पाकिस्तानातल्या जनजीवनावर आघात करण्याचा नव्हता, काहीही जिंकून घेण्याचा नव्हता, तर भारतावर हल्ले चढवणार्या दहशतवाद्यांचा अचूक खात्मा करण्याचा होता. मात्र, टीव्ही चॅनेलांवरच्या मंदमती, उथळबुद्धी पत्रकारांनी आणि संपादकांनी आता लाहोर काबीज केलं, कराची उद्ध्वस्त झाली, इस्लामाबाद ताब्यात येणार, बलुचिस्तान स्वतंत्र झालं, वगैरे गावगप्पा बातम्या म्हणून सांगायला सुरुवात केली आणि देशात मुळातच सुरू नसलेल्या युद्धाचा ज्वर निर्माण केला.
हा सगळा तमाशा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला नसला तरी सरकार म्हणून त्याला आवर घालण्यासाठी आवश्यक पावलं त्वरेने उचलली गेली नाहीत. शौर्य सैन्याचं, बलिदान जवानांचं आणि पराक्रमगाथेचे हीरो कोण तर ज्यांना पहलगामच्या हल्ल्याचा पत्ता लागला नाही, त्यामागचे दहशतवादी शोधता आले नाहीत, ते अजित डोवाल आणि पहलगामला न जाता बिहारमध्ये प्रचाराला पोहोचणारे पंतप्रधान मोदी! ‘आपदा में अवसर’ अशा व्यापारी वृत्तीने ग्रासलेल्या सत्ताधारी पक्षाने ताबडतोब ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आपली टिमकी वाजवायला सुरुवात केली. युद्धाचाही वापर प्रचारासाठी करण्यासाठी आवश्यक कोडगेपणा भाजपाकडे पुरेपूर आहेच.
मोदींच्या लष्कर-ए-होयबामधली दुसरी फळी त्यानंतर कार्यान्वित झाली. हा सुखवस्तू व्हॉट्सअपज्ञानी मध्यमवर्ग देशाच्या विविध शहरांच्या पेठांमध्ये वसलेला आहे. भाजपच्या आयटी सेलने तयार केलेले धादांत खोटे मेसेज हे यांचं ज्ञानाचं साधन. यांना आंतरराष्ट्रीय विषयात गती शून्य. यांचं कुणी पिढ्यानपिढ्या सैन्यात गेलेलं नाही. मुलांना परदेशात सेटल करून दिवसभर गावच्या चकाट्या पिटण्यात मग्न असलेले रिकामटेकडे काका आणि काकू. वाघा बॉर्डरवरचं संचलन पाहण्यापलीकडे यांचा सीमेशी संबंध नाही. पण, आताच घुसा, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, हीच वेळ आहे बलुचिस्तान मुक्त करण्याची वगैरे तारे तोडण्यात हे आघाडीवर. ही सगळी सेना घरातल्या घरात चेकाळते आणि तीन वेळा तडस लागेपर्यंत जेवून, दुपारी डाव्या कुशीवर अंमळ लवंडून, चहाच्या वेळी पुन्हा सोशल मीडियावर शब्दयुद्ध लढायला सज्ज होते. तुमच्यात एवढा चेव आहे तर चला सीमेवर, असं सांगितलं तर यांची कढी पातळ होईल. आपण रोज सकाळी भारतीय सैनिकांच्या सुरक्षेसाठी एक मंत्र म्हणू या, तीच देशभक्ती, ही यांची स्वार्थी, कातडीबचाऊ अक्कल.
हे सगळे युद्धज्वराने तापून लालेलाल झालेले असताना ‘माय फ्रेंड डोलांड’ने त्यांच्या अंगावर शस्त्रविरामाचं गारेगार पाणी ओतलं. ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय सैन्याने ज्या संयत शक्तीचं दर्शन घडवलं, पाकिस्तानला ज्या प्रकारे घेरून गुडघ्यावर आणलं, त्या यशाला राजनैतिक साथ मिळाली का? ज्यांनी पाकिस्तानच्या विरोधात रान पेटवायला हवं होतं, त्यांनी काय केलं? पाकिस्तानची आगळीक असूनही त्या देशाच्या पाठिशी चीनसह इतर अनेक देश उभे राहिले, भारताच्या बाजूने अधिकृतपणे कोण उभं राहिलं? भारताचे परराष्ट्रमंत्री आणि गावठी जेम्स बाँड यांनी काय कामगिरी केली? मोदी विश्वगुरू आहेत आणि त्यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, या हास्यास्पद दाव्यावर विश्वास ठेवणार्या एकाही मठ्ठाला हा प्रश्न का पडला नाही की या संकटकाळात विश्वगुरूंच्या पाठिशी विश्वातले कोणी उभे कसे राहिले नाही? भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या द्विपक्षीय गोष्टींमध्ये तिसर्या देशाची मध्यस्थी चालणार नाही, ही भारताची अधिकृत भूमिका होती. मग या दोन देशांनी शस्त्रविराम स्वीकारल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे करू शकतात? त्यापुढे जाऊन ट्रम्प आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढायला निघाले आहेत (गाझा पट्ट्यातल्या लोकांना हटवून तिथे अतिश्रीमंतांसाठी मुक्त पर्यटन क्षेत्र निर्माण करायचे, हा तोडगा या आचरटोत्तमाला सुचतो, तो काश्मीरवर काय तोडगा काढेल?), त्यांना ही ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी, कसा, का आणि कशासाठी दिला? त्याबदल्यात काय डील झालं? पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दोन अब्ज डॉलरची मदतही मिळवली. आपल्यासाठी ना कुलभूषण जाधव मुक्त झाले, ना दहशतवादी भारताकडे सोपवले गेले- मग भारताने काय कमावले? की ‘राष्ट्रीय उद्योगपतींचे हित प्रथम, राष्ट्र द्वितीय, तृतीय किंवा दशम’ हीच या सरकारची अनधिकृत घोषणा आहे?
हे सगळे प्रश्न पडण्याची मोदींच्या लष्कर-ए-होयबाची बौद्धिक कुवत नाही. त्यांना पाकिस्तान कसा बेचिराख झाला नाही, लाहोरचे लवकुश नगर आणि कराचीचे उत्तर काशी कसे बनवले गेले नाही, याचा सल आहे. ही युद्धपिपासू झुरळं आज देशाच्या विदेश सचिवांना अश्लाघ्य भाषेत ट्रोल करण्यापर्यंत पोहोचली आहेत. हे बेभान आणि बेफाम लष्कर-ए-होयबा वेळेत आवरलं नाही, तर ते लवकरच खुद्द मोदींनाही ट्रोल करतील आणि त्यांच्यावर तौबा तौबा करण्याची वेळ आणतील.
कारण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच या ट्रोलांसाठीही मोदी हे फक्त त्यांच्या अजेंडापूर्तीचं साधन आहेत. साध्य संपलं की गच्छंति अटळ!