आचार्य अत्रे यांचे ‘तो मी नव्हेच!’, वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’, गंगाराम गवाणकरांचे ‘वस्त्रहरण’, पुरुषोत्तम बेर्डे यांचे ‘टुरटूर’, केदार शिंदे यांचे ‘सही रे सही’ आणि या गद्य नाटकांच्या मालिकेत संतोष पवार यांचे ‘यदाकदाचित रिटर्न्स’… या नाटकांनी मराठी रंगभूमीवर जणू चमत्कारच घडविला आहे. रसिकांनी याचे प्रयोग अक्षरश: उचलून धरले. संतोष पवार याच्या ‘यदाकदाचित रिटर्न्स’नेही विक्रमी प्रयोगांचा पल्ला हा अल्पावधीत पूर्ण केलाय. चेहरे नसणारे कलाकार सोबत घेऊन स्वत: मुखवटा धारण करून त्याने आजवर कमालच केलीय. ‘रसिकांचे शंभर टक्के मनोरंजन’ हा एकमेव हेतू पक्का मनात धरून त्याची प्रत्येक निर्मिती दिसते. त्या जोरावरच त्याने स्वत:चा हक्काचा रसिकवर्ग उभा केलाय. असो. तर निमित्त आहे ते त्याचे दिग्दर्शन आणि रंगावृत्ती असणारे नवे नाटक ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगभूमीवर प्रगटलंय. ‘कुलकर्णी’ मधला इथे ‘ल’ आहे ‘ळ’ नव्हे. याचाही किस्सा गाजतोय. तो ओघानं येईलच!
‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे नवं कोरं नाटक. त्यातले प्राध्यापक कुलकर्णी हा एक मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस. त्याची अगदी टिपिकल माधवी नावाची पत्नी. तिला सिरियलचं भारी वेड. दिवसरात्र ‘इडियट बॉक्स’समोर अडकलेली. त्यातल्या कथानकात पुरती गुंतलेली. म्हणतात ना, आपला बिनडोकपणा अबाधित राहावा म्हणून काहीजण मालिका बघतात, त्याच वळणावरली! त्यांना एक तरूण मुलगा आहे, पण तो दुबई मुक्कामी असतो. तर या कुलकर्ण्याच्या दिवाणखान्यातलं हे नाट्य. एके दिवशी घराबाहेर आवाज होतो. गोळीबार, गँगवॉर, असंच काहीसं घडतं. तिथे हे कुलकर्णी महोदय तात्काळ पोहोचतात. ‘चुकून माकून’ ते तिथला थरार अनुभवतात. ठार झालेला माणूस त्यांच्यावर कोसळतो. रक्ताचे डागही त्यांच्यावर उडतात. एकच गोंधळ उडतो. कुलकर्णी घाबरून घरी येतात. शर्ट बदलतात आणि मग खून होताना बघणारे एकमेव साक्षीदार होतात. चॅनलवाले, पोलीस यांची चौकशी सुरू होते.
बघता-बघता ‘मर्डर’ न करता हे कुलकर्णी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ म्हणून प्रसिद्ध होतात. त्यांना नवी ओळख मिळते. ते ग्लॅमरस बनतात. यथावकाश एक गुंड प्रवृत्तीचा शर्या नावाचा तरूण या घरात शिरतो. त्याला हे दोघेजण घरात लपवतात. तो मुलगा असल्याचीही थाप मारतात. आता या गुंडाची ‘डान्स बार’मधली ‘आयटम’ तिथे त्याच्या मागोमाग येते. तिला दिवस गेलेत. त्याचेही उपकथानक यात आहे. चौकशी करणारे पोलीस मानतोडे यांना एक पुरावा सापडतो. त्यातून कुलकर्णी यांनीच हा ‘मर्डर’ केलाय असं उघड होतंय. आता या बनवाबनवी आणि फसवाफसवीत शेवट काय होतो हे प्रत्यक्ष बघणं उत्तम! ही गुंतागुंत कशी संपते यात नाट्य हास्यस्फोटाच्या टोकापर्यंत पोहचते!!!
‘फार्स’ या प्रकारातले हे नाट्य. ही शैली भरगच्च भरलेली. म्हणजे मानवी स्वभावदोषांवर, तर्हेवाईकपणावर बेतलेली. फसवाफसवी, लपवाछपवी, पळापळ याने परिपूर्ण. गरजेप्रमाणे यातली पाचही पात्रे वाट्टेल ती पातळी गाठतात. ही अशी ‘उत्स्फूर्त’ता आजकाल रंगभूमीवर महापुरासारखी अवतरली आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ हे लॉजिक याच्या सादरीकरणात दिसतेय. संतोष पडद्यामागे असला तरी सबकुछ संतोष पवार स्टाईलचं नाट्य. दिग्दर्शन आणि रंगावृत्ती या दोन्ही एकाच हाती असल्याने नाट्य वेगात आहे. कुठेही कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक प्रयोग नवनव्या विनोदाच्या जागा निर्माण करणारा ठरू शकेल. ‘प्रासंगिक फार्सिकल कॉमेडी’ म्हणून नाटकाची भट्टी चांगली जमली आहे.
कुलकर्णीच्या मध्यवर्ती भूमिकेत वैभव मांगले. एका मध्यंतरानंतर त्यांना पुन्हा एकदा विनोदी भूमिका मिळाल्याने यातला ‘कुलकर्णी’ बहरला आहे. ‘एक डाव भटाचा’, ‘करून गेलो गाव’ या विनोदी नाटकानंतर ‘वाडा चिरेबंदी’, ‘संज्या छाया’ अशा काहीशा गंभीर नाटकानंतर त्यांची ही भूमिका वेगळ्या वळणावरली ठरते. संतोष पवारसोबत प्रथमच नाटक करीत असल्याने वेगळेपण दिसतेय. पूर्ण एनर्जीसह हा कुलकर्णी रसिकांना ‘लोटपोट’ हसवितो. विशेषत: प्रत्यक्ष खून होतानाच्या प्रसंगाचे वर्णन अफलातून! ही मध्यवर्ती भूमिका सुपरस्टार अशोक सराफ करणार होते असेही कळते. अशोकमामांना ही भूमिका आवडली, पण काही कारणांमुळे कुलकर्णीचा मुखवटा अखेर हा वैभव मांगले यांनी चढविला आणि त्यांनी त्याचे सोनं केलंय. लवचिक अभिनय आणि सुरेख गळ्यातून बहार उडाली आहे.
माधवी कुलकर्णीच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले हिने चांगली साथ दिलीय. दोघांची जोडी शोभून दिसते. ‘चहा टाकू का!’ हे पालुपद हशे निर्माण करते. न्यूज चॅनलची रिपोर्टर आणि डान्स बारमधली रेश्मा या दोन्ही भूमिकेत सुकन्या काळण हिने वेगळेपणा दाखविला आहे. नृत्याची जमेची बाजू ठरते. मानतोडे पोलीस विकास चव्हाण हा वैशिष्ट्यपूर्णच. नावाप्रमाणेच मानतोडे झालाय. बहिणीच्या लग्नाची काळजी असणारी गंभीर किनार याला आहे. ‘दुबई’ शब्द येताच ‘कंबरनृत्य’ हे धम्मालच उडविते. गुंड शर्या बनलेला निमिष कुलकर्णी याची ‘स्टाईल’ गुंडमय. देहबोली शोभून दिसते. विनोदनिर्मितीसाठी असलेल्या पाचही कलाकारांच्या आविष्कार किती वेगळ्या प्रकारचा असू शकतो, याचा अनुभव येतो. खरवडून काढलेला विनोद यात नाही, तर तो पारदर्शक, उत्स्फूर्त आणि मनमुराद हसविणारा आहे. युक्तिवाद आणि तर्कशास्त्र याच्या चष्म्यातून प्रयोग बघू नये, हा इशारा!
या नाटकाची मूळ संहिता ही नागपूरकर असलेले नाटककार जयंत उपाध्ये यांची आहे. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या टायटलवरून राज्य नाट्यस्पर्धेत बराच वादविवाद यापूर्वी झाला होता. ५७व्या राज्य नाट्यस्पर्धेत नगर केंद्रात २०१७-१८ साली ‘मर्डरवाले कुलकर्णी’चा प्रयोग झालेला. त्याचे लेखन व दिग्दर्शन अमित खताळ यांचे होते. तर ५६व्या (१६-१७ वर्षे) स्पर्धेत जयंत उपाध्ये यांची संहिता आणि दिग्दर्शन रूपाली बांदे यांचे होते. नगर केंद्रात शीर्षकात ‘ल’ तर नागपूर केंद्रात ‘ळ’ यावरुन परस्परांवर आक्षेप घेण्यात आले होते. पण आज २०२३ साली मर्डरवाले कुलकर्णी हे ‘ल’ आहेत, हेदेखील नाटककारांनी स्पष्ट केलंय. ‘कुलकर्णी’ नाव व उच्चाराचा घोळ हा चालूच असतो! तर हे नाटक मूळचे राज्य नाट्यस्पर्धेतून व्यावसायिकवर आलेलं. ‘अष्टविनायक’ या नाट्यसंस्थेचे कल्पक निर्माते दिलीप जाधव यांनी या नाटकाची निर्मिती केली असून प्रयोगांचा धडाका लावला आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘संज्या छाया’ या दोन्ही नाटकांची निर्मिती ‘अष्टविनायक’ संस्थेची आणि या नव्या नाटकासह तिन्ही नाटकात वैभव मांगले ‘कॉमन’ आहेत, त्यामुळे तारखाही सुरळीत दिसत आहेत. बुकिंगच्या अर्थशास्त्रात ‘चाणक्य’ असल्याने या नाटकाला अडथळा नाही. निर्मितीत कामगिरी चोख आहे.
देखणं घर आणि चांगली रंगसंगती नेपथ्यरचनेत दिसते. हॉल, बेडरूम, किचन याची रचना उत्तम. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी हालचालींचा पुरेपूर विचार केला आहे. रवी-रसिक यांची प्रकाश योजना आणि आशुतोष वाघमारे यांचे संगीत साजेसं आहे. नाटकाचा पडदा उघडण्यापूर्वी कॉमेडीची ‘महाराणी’ निर्मिती सावंत यांचे निवेदन हे परिणामकारक ठरते. रसिकांची मानसिकता तयार होते. ‘टायटल साँग’ही ताल धरायला लावणारे आहे. वैशाली सामंत, योगिता चितळे, वृषाली घाणेकर यांची गाणी तर तन्वी पालव हिचे नृत्यदिग्दर्शन आणि वैभव जोशी यांचे गीत हे सारं काही तालासुरात भर पाडतेय. सार्या तांत्रकि बाजू नाट्याची रंगत वाढविणार्या आहेत.
आणखीन एक नोंद. गुंड शर्याची भूमिका करणारा निमिष कुलकर्णी. हा आडनावानं जरी कुलकर्णी असला तरी नाटकात कुलकर्णी नाही. गेली चार पाच वर्षे तो ‘हास्यजत्रे’तून रसिकांना हसवित आहे. विनोदाची उत्तम जाण त्याच्याकडे आहे. घराघरात तो पोहचला असल्याने अनेकांना गैरसमज होतो की ‘टायटल रोल’ हा निमिष कुलकर्णीचा आहे. तशी विचारणा अनेकांनी केली होती. पण पडदा उघडला गेल्यावर अर्थातच हा गैरसमज दूर होतो. आडनाव ‘एकच’ आहे. हा निव्वळ योगायोगच.
चित्रपटाची ‘वनलाइन स्टोरी’ निर्मात्यांना सांगण्याची पद्धत आहे. ती पसंत पडली तर पुढली सारी बोलणी करणं शक्य होतं. त्याच प्रकारे आता नाटकाचीही ‘वनलाईन’ ही निर्माता ऐकून ती दिग्दर्शकाच्या हवाली करतो आणि मग जे काही होईल ते तालमीतून साकार होतं. ‘सही रे सही’पासून हा प्रकार ‘क्लिक’ झालंय. आता तर मनोरंजनाचे अनेक पर्याय हे घरोघरी चॅनलवर चारीबाजूंनी आक्रमण करीत आहेत. त्याला समर्थपणे सामोरं जाण्यासाठी ‘हटके’ निर्मिती करणे क्रमप्राप्त बनते. त्यामुळे संहितेपेक्षा सादरीकरण वरचढ करावे लागते. त्यावर सारी बुकिंगची आणि पर्यायाने पुढल्या प्रयोगांची अर्थगणितं मांडली जातात.
संतोषसारखा विनोदाचा जादूगार आपल्या पोतडीतून एकेक नटवून-सजवून जे काही ‘सोंगाडे’ बाहेर काढेल याचा काहीएक भरवसा नाही. नेमकं इथेही तेच भरलंय. असा एवढा चैतन्यदायी प्रयोग बरेच दिवसानंतर ‘मर्डरवाले कुलकर्णी’च्या रूपाने नाट्यगृहात प्रगटला आहे. रसिकांनी आवर्जून हजेरी लावून तो अनुभवला पाहिजे. दिवाळी संपली असली तरीही रंगमंचावरली ही हास्यस्फोटक चौफेर आतषबाजी सुरूच आहे.
मर्डरवाले कुलकर्णी
मूळ लेखन – जयंत उपाध्ये
रंगावृत्ती/ दिग्दर्शन – संतोष पवार
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – रवी-रसिक
संगीत – आशुतोष वाघमारे
कार्यकारी निर्माती – खुशबू जाधव
निर्माता – दिलीप जाधव
सूत्रधार – प्रणित बोडके
निर्मिती – अष्टविनायक