आपल्याला रोजचं टेन्शन विसरायला लावणार्या एखाद्या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील बहुतेक सर्व प्रमुख कलाकार एखाद्या सिनेमात दिसणार असतील, तर तो सिनेमा आपलं शंभर टक्के मनोरंजन करणार अशी अपेक्षा ठेवूनच आपण सिनेमा पाहायला जातो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम लेखक आणि अभिनेते प्रसाद खांडेकर यांनी ‘एकदा येऊन तर पाहा…’ या सिनेमातून लेखक-दिग्दर्शक म्हणून रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
सिनेमाची कथा फुलंब्रीकर कुटुंबीयांची आहे. मराठी महिन्यांची नावे असलेले तीन भाऊ, श्रावण (गिरीश कुलकर्णी) फाल्गुन (प्रसाद खांडेकर) कार्तिक (ओंकार भोजने). श्रावणची बायको रोहिणी (तेजस्विनी पंडित) आणि मेहुणी अश्विनी (नम्रता संभेराव) असं पंचरंगी कुटुंब. श्रावण आणि रोहिणी हे निपुत्रिक जोडपं मूल होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी गुलाबी बाबांकडे आलेलं असतं. तिथून परतताना त्यांना एक अनपेक्षित कॉल येतो.
पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केलेल्या एका गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे, जी रस्तारुंदीकरणासाठी घेण्यात येणार आहे. त्या जमिनीचे त्यांना वीस लाख रुपये मिळणार आहेत, असं सांगितलं जातं. पैसे घेण्यासाठी गावात गेल्यावर तिथे त्यांची गाठ पडते नूतन शेठ या गावगुंडाशी. तो सांगतो की, या जमिनीव्यतिरिक्त त्यांच्या नावावर एक जुना वाडा आणि आणखी काही जमीन देखील आहे. या सगळ्याचे तो फुलंब्रीकर कुटुंबीयांना चाळीस लाख रुपये देऊ करतो. पण हे गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं आहे, तेव्हा जुन्या वाड्याची डागडुजी करून तिथे हॉटेल उघडले तर सर्वांना रोजगार मिळेल या उद्देशाने फुलंब्रीकर नूतन शेठची ऑफर नाकारतात. ‘एकदा येऊन तर पाहा, रिटर्न जाणार नाही’ या नावाचे हॉटेल सुरू होतं. पण अनेक दिवस वाट पाहून देखील एकही ग्राहक फिरकत नाही.
फुलंब्रीकर कुटुंबीय हॉटेल बंद करायचा विचार करत असताना एक ग्राहक येतो, तो रिटर्न जात नाही. मग दुसरा ग्राहक येतो, तोही रिटर्न जात नाही. तेव्हा या हॉटेलच्या नावाचा खरा अर्थ कळतो. या हॉटेलमध्ये एकामागोमाग एक अनाकलनीय घटना घडत राहतात. त्याचं बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून तिन्ही भाऊ त्या गोष्टींची विल्हेवाट लावतात. एक गोष्ट लपवताना होणारी पळापळ, घालमेल यातून बाहेर पडताना दुसरं संकट उभं राहतं. मग पुन्हा लपवालपवी, घावपळ… एका संकटातून सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच पुन्हा नवे संकट. हे घटनासत्र थांबतं का? आणि घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा कोणाला मिळते, या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहताना मिळतील.
चित्रपटाची पटकथा विस्कळीत आहे. सिनेमातल्या अनेक घटना का घडतात याची उत्तरे शेवटपर्यंत मिळत नाहीत. घटना निस्तरताना होणार्या धावपळीतून हास्यनिर्मिती होते खरी, पण त्याच त्याच घटना वारंवार घडत राहतात, तेव्हा पुनरावृत्तीमुळे त्यातील रंजकता कमी होते. पटकथेतील या उणीवेवर मात करून चित्रपटातील संवाद लिहिताना प्रसाद खांडेकर यांनी बाजी मारलेली आहे. अतिशयोक्ती, विसंगती, उपहास, उपरोध, शब्दनिष्ठ-प्रसंगनिष्ठ विनोद, विसंगती, विरोधाभास, पीजे यांची बक्कळ रेलचेल आपल्याला प्रसंगानुरूप पाहायला मिळते. अनुभवी, कसलेल्या कलाकारांच्या तोंडून हे संवाद ऐकताना ‘पैसा वसूल’ हेच म्हणावसं वाटतं.
हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करायला प्रसाद खांडेकर यांनी सयाजी शिंदे, विशाखा सुभेदार, रोहित माने, भाऊ कदम, वनिता खरात, पॅडी कांबळे, शशिकांत केरकर, राजेंद्र शिसाटकर अशी मातब्बर कलाकारांची फौज सोबत घेतली आहे. ही सर्व मंडळी आपापले हशे चोख मिळवतात. मंदार चोळकरलिखित आणि रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘आली गं भागाबाई’ हे गाणं मस्त जमून आलं आहे.
एकंदरच ‘एकदा येऊन तर पाहा, रिटर्न जाणार नाही’ ही प्रसाद खांडेकर यांची मनोरंजनाची गॅरंटी विनोदाच्या कसोटीवर उतरणारी आहे. छोट्या पडद्यावर मोठी धमाल करणारे विनोदवीर जेव्हा मोठ्या पडद्यावर त्याहूनही मोठी धमाल कशी करतात, हे बघायला हा चित्रपट पाहायला एकदा जाऊन पाहायला हरकत नाही.