• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इतिहास क्षमा करणार नाही!

- मर्मभेद १५ एप्रिल २०२३

Nitin Phanse by Nitin Phanse
April 13, 2023
in संपादकीय
0

इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे; आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा…
ज्ञानपीठ विजेते थोर मराठी कवी विंदा करंदीकर यांची ही अजरामर रचना. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांच्या वाचनात आली असण्याची शक्यता कमीच. मुळातच या जमातीचा शिक्षणाशीच कधी फारसा संबंध असल्याचे त्यांच्या धतिंगबाज वर्तनातून आणि निर्णयांतून दिसत नाही. या ओळी त्यांनी वाचल्या असत्या आणि त्यांचा अर्थही त्यांना समजला असता, तरी त्यांच्यावर काही फरक पडला नसता… चोरी करू नये, चोरी हे पाप आहे, हे अट्टल चोराच्या वाचनात आलेले असतेच की; तरी तो चोरी करायचा थांबतो का? त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे हो तो! चोर सुविचार अंमलात आणायला लागला, तर खाईल काय?
चोराला जशी चोरी टाळता येत नाही, तसे भारतीय जनता पक्षाला सोयीने इतिहास उकरणे आणि बदलणे टाळता येत नाही. त्यांचाही पोटापाण्याचा धंदा आहे तो. मुळात काही उभारण्यापेक्षा आहे ते मोडण्याकडे यांचा कल अधिक. जे आहे ते उभारण्यात यांचा वाटा शून्य; त्यामुळे ते मोडून टाकताना किंवा विकून खाताना शरम वाटण्याचा प्रश्न येत नाही. सध्या या पक्षाच्या मोडतोड विभागाने एनसीईआरटी नावाच्या होयबा संस्थेच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करायला घेतली आहे. आठवी नववीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहासच गायब कर, महात्मा गांधीजींच्या लढ्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा विषयच गायब कर, गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे हा कट्टरपंथी मासिकाचा संपादक होता, ही माहितीच काढून टाक, असले थिल्लर उद्योग एनसीईआरटीने केले आहेत. काहीही करून अदानी किंवा खरे तर मोदानी प्रकरणावरून देशाचे लक्ष उडवायचे, हाच यामागचा हेतू दिसतो.
या देशात मुघल आक्रमक म्हणून आले, हे खरेच. पण राजा जयचंद कोण होता? मुघलांना इथे बोलावून घेणारे कोण होते? मुघल इथे आले, पण ते देश लुटून परत गेले नाहीत, ते या देशाचेच झाले. त्यांच्या काळात हा देश जगातल्या सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. मुघलांशी सोयरिकी करणारे कोण होते? मुघलांचे विश्वासू चाकर कोण होते? जहाँगीर आणि औरंगजेब या बादशहांचा जन्म मुघल-रजपूत सोयरिकीतून झाला होता, मग त्यांना मुघल मानायचे की रजपूत? की राहुल गांधींची आई इटालियन असल्याने ते इटालियन पण, यांचे वडील मुघल म्हणजे हे मुघल अशी आपल्या सोयीने रचना करायची? हिंदी सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणे मुघल बादशहा फर्ड्या उर्दू भाषेत बोलत नसत, ते या मातीतली अवधी भाषा बोलत असत. त्यांनी स्थानिक भाषांमध्ये काव्य केले आहे. सम्राट अकबराच्या काळात राम-सीता यांचे नाणे चलनात होते. जवळपास सगळा देश मुघल साम्राज्य आणि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या ताब्यात असतानाही त्याचे तलवारीच्या बळावर घाऊक पद्धतीने धर्मांतर केले गेले नाही. भारतीय खानपान, राहणीमान, भाषा, कला आणि स्थापत्यात मुघल काळाचे योगदान फार प्रचंड आहे. ते नाकारणे ही विखारी आणि कद्रू मनाच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्यामागे एकवटलेल्या मूर्ख अंधभक्तांची निखळ आत्मवंचना आहे. मुघल काळ भारताच्या इतिहासातून इतिहासजमा करणे हे चिकन मुघलाईचे नाव बदलून चिकन आदित्यानंद करण्याइतके थिल्लर काम नाही.
यावर सत्ताधीशांचे काही भाट तावच्या ताव निबंध लिहून मुघलांच्या इतिहासानेच शालेय अभ्यासक्रम कसा व्यापला होता, अशा लोणकढ्या थापा मारत आहेत. यांच्या नेत्यांप्रमाणे हेही कधी शाळेत गेले नसावेत किंवा यांनी शाळेला बुट्ट्या मारून टगेगिरी करण्यात वेळ घालवला असावा. रामायण महाभारत काळापासून ते मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती, शालिवाहन, सातवाहन, देवगिरीचे रामदेवराय या सगळ्यांचा इतिहास सर्वांना शाळेतच शिकवला गेला आहे. एका इयत्तेला पूर्ण वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला गेला आहे. मुघलांनी या दिवाभीतांची रिकामी डोकी व्यापली आहेत, शालेय अभ्यासक्रम व्यापलेला नाही.
आधीच भारतीय शाळा, शिक्षणपद्धती हा जगभरात विनोदाचा विषय झाला आहे. कृत्रिम जातीय उतरंडीतील तथाकथित खालच्या स्तरावरील लोक शिक्षण घेऊन आपल्या बरोबरीला येतील आणि शेकडो वर्षे काही तथाकथित उच्चजातींनी भोगलेल्या ‘मेरिट’ नावाच्या भंपक आरक्षणाला चूड लागेल, हे लक्षात घेऊन शिक्षणाचा जाणीवपूर्वक बट्ट्याबोळ करण्यात येतो आहे. इतिहासाच्या पुस्तकात असे उघड उघड मूर्खपणाचे बदल करून त्या मातेर्‍याला हातभार लावण्यापलीकडे काही होणार नाही.
शिवाय, आजच्या गुगल आणि चॅट जीपीटीच्या काळात आपल्या गैरसोयीचा इतिहास दडवून ठेवणे अशक्य आहे. इथल्या चिरफाळलेल्या, विद्वेषाने भरलेल्या, चिकित्सा नाकारणार्‍या, इतिहासपुरुषांचे अनाठायी दैवतीकरण करणार्‍या अस्मिताबाज वातावरणामुळे आधीच इथली विद्वान मंडळी इंडॉलॉजी अर्थात भारतविद्या शिकण्यासाठी परदेशांत जात आहेत; आता भारताचा इतिहास गंभीरपणे शिकण्याची इच्छा असलेलेही परदेशांत जाऊ लागतील. पाठ्यपुस्तकांमध्ये असले आचरट बदल करून आपण जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अर्हतेचे मोल कमी करत आहोत, भारतीय पदवीची पत आणखी कमी करत आहोत.
मोदी आणि कंपनीला येनकेनप्रकारेण फक्त निवडणुका जिंकण्याचा चस्का लागलेला आहे. देशाचे भले होते की वाईट, याची त्यांना फिकीर नाही; आत्ता मते मिळाल्याशी मतलब. इतिहास अशा अडाण्यांना आणि त्यांच्या नादी लागलेल्या त्यांच्याहून अधिक अडाणी असलेल्या भक्तगणांना क्षमा करत नाही, हे कळण्याइतका तरी इतिहास त्यांनी वाचायला हवा होता…
…एंटायर हिस्टरीची एखादी पदवी असते का?

Previous Post

“सत्यशोधक”च्या मोशन पोस्टरचे अनावरण

Next Post

सर्चलाईट विझला!

Next Post

सर्चलाईट विझला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.