अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा कसून शोध चालू असून प्राप्तीकर विभागाचा त्यासंबंधीचा अहवाल आठवडाभरात प्राप्त झाल्यानंतर एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकार्याने दिल्याची बातमी वाचल्यावर माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या संतापला. एका मताच्या बदल्यात महिना दीड हजार रुपये लाच मिळणार, अशी लालुच दाखवल्यावर उत्पन्नाची कागदपत्रे वरवर तपासल्याचे नाटकं करून या लाडक्या बहिणींकडून अंदाजे एक कोटी मते खरेदी करणारी महायुती का नाही सत्तेवर येणार, असा जळजळीत सवाल पोक्याने केला. ज्यांच्या जिवावर निवडून आलो त्या लाडक्या बहिणींना काम झाल्यावर लाथाडण्याचे काम आता जोरात सुरू आहे, याबद्दल पोक्याने खंत व्यक्त केली. उद्या महापालिका, नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशीच दुसरी काहीतरी टूम काढतील आणि पैशाची लालुच दाखवून ही मंडळी पुन्हा लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या मेव्हण्या यांच्याकडून अशीच मते वसूल करतील, अशी भीती पोक्याने व्यक्त केली. त्यावर या योजनेशी संबंधित नेत्यांच्या या विषयावर प्रतिक्रिया घेण्याची सूचना मी पोक्याला केली. त्याच या प्रतिक्रिया…
एकनाथ शिंदे : त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी सुरू केली. त्याला लाडक्या बहिणींनी कोटी कोटी मते महायुतीला देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच महायुती भरघोस मतांनी सत्तेवर आली, पण याची जाणीव महायुतीच्या दोन नेत्यांना अजिबात नाही. सत्तेवर येताच त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले आणि नंतर ज्यांच्या मतांमुळे महायुती सत्तेवर आली त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मागे ते आता हात धुवून लागले आहेत. याला कृतघ्नपणा म्हणतात. मी याचा जाब विचारताच त्यांचा एक प्रमुख नेता म्हणाला, खर्या शिवसेनेने तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला मोठमोठी मंत्रीपदे दिली, पण तुम्ही स्वार्थी हावरटपणामुळे त्यांना टांग मारून महायुतीत आलात, त्याला वेगळे काय म्हणतात? त्यावर मीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. मी म्हटलं, मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली म्हणूनच मी शिवसेनेच्या ४० आमदारांसह महायुतीत सामील झालो. महाराष्ट्राचं आणि माझ्या लाडक्या बहिणींचं भलं करण्यासाठी. किती भव्य स्वप्नं बघितली होती मी! पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो तर मी दहा गुणवंत लाडक्या बहिणींना मंत्रीपदंही दिली असती. पण या लोकांनी सत्ता मिळताच बोगस लाडक्या बहिणींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. मी यांना चॅलेंज देतो, लाडक्या बहिणींच्या मतांशिवाय तुम्ही निवडून येऊन दाखवाच. लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम तुम्ही बंद केलीत ना, तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. आता ते अजितदादा म्हणतात की, लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडतो. बारामतीतून तुमचे कधी नव्हे ते इतके उमेदवार निवडून आले ते कशाच्या जिवावर? आता ही योजना राबवण्यात चूक झाली, असं म्हणतात. त्यांच्याकडून मतं घेताना चूक वाटली नाही. हिंमत होती तर तेव्हाच विरोध करायचा होता ना! त्यांनी बारामतीत सहकाराचे काय दिवे लावले ते सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून तर महायुतीत येणं भाग पडलं त्यांना. नाहीतर बसला असता ईडीचा दट्ट्या. माझ्या लाडक्या बहिणींच्या वाट्याला जाऊ नका. पस्तावाल, एवढंच सांगतो.
अजितदादा : राज्याची तिजोरी सांभाळणं हे ठाण्यातल्या खंडणीखोरांना सांभाळण्याइतकं सोपं नाही. हे मला पैशांचे व्यवहार कसे करायचे ते शिकवणार! लाडक्या बहिणी म्हणजे तुमच्यासाठी मतांची लाट असेल. माझ्यासाठी नाही. मी माझ्या कर्तृत्त्वावर इतके आमदार निवडून आणले. लाडक्या बहिणींच्या मतांवर नाही. मी बारामतीकरांसाठी केलेल्या कामांची ती पावती होती. काकांनासुद्धा मी भारी पडलो तो माझ्या कामाच्या झपाट्यामुळे. आज बारामतीकर मला काकांपेक्षा जास्त मानतात. मला लाडक्या बहिणींच्या मतांची गरज तेव्हाही नव्हती आणि यापुढेही नसेल. ज्यांना फक्त ठाण्यातलं अर्थकारण कळतं त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. त्यांनी दुय्यम उपमुख्यमंत्री म्हणून आपलं स्थान कसं टिकून राहील याचा अभ्यास करावा. मला फुकटचे सल्ले देऊ नयेत.
देवेंद्र फडणवीस : लाडक्या बहिणींच्या मतांमुळे आम्ही निवडून आलो की नाही, हे काळच ठरवील. पण त्यावेळच्या यशात माननीय मोदी साहेबांचा आणि अमित शहाजींचा मोठा वाटा होता हेही विसरून चालणार नाही. काही लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याची मोहीम या घटकेला योग्य आहे की नाही हे मी सांगणार नाही. पैशाच्या आमिषाला बळी पडून अपात्र बहिणींनी मते दिली असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे किंवा नाही यावरही मी भाष्य करणार नाही. शेवटी अजितदादा अर्थमंत्री आहेत. स्पष्टवक्ते आहेत. लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली असे ते म्हणत असतील तर त्यांचे हे म्हणणे योग्य की अयोग्य हे सांगण्याइतका मी मोठा नाही. या वादावर पडदा टाकावा की न टाकावा हे ज्याचं त्यांनी ठरवावं.
अदिती तटकरे : ही योजना बंद करण्याचं पाप मी करणार नाही. यापुढे आपलं राजकीय भवितव्य लाडक्या बहिणींच्याच हाती आहे, असं पपा सारखं सांगत असतात. त्यामुळे कितीही अडथळे आले तरी ही योजना अखंड सौभाग्यवती व्रताप्रमाणे चालूच राहील. तिच्यात खंड पडणार नाही, हे मी येणार्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला स्मरून सांगते. मध्ये मी योजनेबाबत तळ्यात-मळ्यात असल्यासारखी बोलत होते, पण आता पपांनी सल्ला दिल्यानंतर लाडक्या बहिणींचं महत्त्व मला कळलं. यापुढे शतकानुशतकं ही योजना चालूच राहील. कळलं ना हो टॉवेलवाले गोगावले?