□ राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! – राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला.
■ त्यांनी राजकारणच इव्हेंट मॅनेजमेंटच्या स्तरावर आणून ठेवलेलं आहे राहुलजी, कारण त्यांना तेवढंच येतं. त्यापेक्षा वेगळं काही करायची वेळ आली की त्यांचा टेलिप्रॉम्पटर बंद पडून जातो.
□ ऐकावं ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे.
■ एखाद्याने आपल्या घरात काय लावावे, त्याचा त्याला काही उपयोग आहे का, याबद्दल इतरांनी बोलण्यात पॉइंट काय? असे तर ते अधून मधून पुस्तकंही हिरवळीवर पालथी ठेवून बसतातच की!
□ हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच – रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा.
■ भारताच्या मानहानीसाठी जगातले दोन कट्टर शत्रूही एकत्र यावेत, म्हणजे केवढी महान कामगिरी केली आहे आपल्या थोर विश्वगुरूंनी, त्यांच्या लाडक्या गावठी जेम्स बाँडनी आणि नेत्यांच्या मित्रांसाठी देशाची विदेशनीती राबवून तोंडघशी पडलेल्या जय जय शिवशंकर काकांनी.
□ मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांना फडणवीसांचा धक्का – जलसंधारणातील रखडलेल्या ९०३ योजनांची मान्यता रद्द.
■ भारतीय जनता पक्ष हा अजगर आहे. मित्र मित्र म्हणून विळखा घालतो, हाडं मऊ करतो आणि आरामात मटकावतो… आता यांची हाडं मोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे… पुढे दादा गटाचा नंबर लागेल.
□ समृद्धी महामार्गात १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार; फडणवीस, शिंदेंच्या बगलबच्च्यांनी मलिदा खाल्ला – काँग्रेसचा आरोप.
■ महामार्गाचं नाव काय आहे ते पाहा. या महामार्गात दोघांचा इतका जीव अडकला होता की रात्रीच्या वेळी हुडी वगैरे घालून एकमेकांना भेटून, रेडे कापून, खोकी वाटून सरकार पाडलं गेलं, पक्ष फोडला गेला. काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही सांगताय तो आकडा फारच किरकोळ आहे हो!
□ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सात लाख मतदार मतदानापासून वंचित राहणार.
■ ईव्हीएम वापरलं जाणार असेल तर कोणतीही निवडणूक लोकशाहीपासून आणि खर्याखुर्या निकालापासून वंचित राहणार आहेच.
□ महायुतीच्या काळात भ्रष्टाचारी मोकाट; लाचखोर सरकारी बाबूंवर मुदतीत खटले भरण्यात टाळाटाळ.
■ बाबूंच्या बांबूंवरच वरचे डोलारे तरलेले असतात. ते काढून टाकण्याचा अवसानघातकीपणा हे व्यापारी वृत्तीचे सत्ताधारी करतील काय? नंतर काही मिळणार नाही, हे माहिती आहे. जमेल तेवढे खाऊन घेतायत.
□ नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मोदी सरकारची टाळाटाळ.
■ महाराष्ट्रात मराठी माणसाला हवे आहे, असे काय करण्यात मोदी सरकारचा उत्साह दिसतो? मग इथे कसा दिसेल? महाराष्ट्रात मराठीजनांना अपमानित करण्यासाठी बहिणींच्या तोंडावर पैसे फेकून आणि काला कांडी करून हा तीन तिघाडा, काम बिघाडा आणून बसवलेला आहे. तो त्याचं काम करतोय.
□ धक्कादायक! सांडपाणी प्रक्रिया प्लांटमध्ये कोरोना विषाणूचे जनुकीय अंश – एनसीएलच्या तपासातून माहिती उघड.
■ एवढ्या संसर्गजन्य आजाराचा विषाणू देशात सर्वदूर पसरलेला आहेच. तो कुठे आढळून येण्यात आता काय कौतुक राहिले?
□ महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार – शिवसेना-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे थेटच बोलले.
■ तुमच्या तोंडात साखर पडो, उद्धव साहेब! उभय बंधूंनी मिळून ठाकरी बाण्याच्या तडाख्यांनी हे सगळे चोर पळवून लावले तर महाराष्ट्रावरचं प्राणसंकटच दूर होईल.
□ महायुतीचे पितळ उघडे – तिजोरीत खडखडाट, घोषणा भरमसाट.
■ आता पाच वर्षं सत्ता भोगायची सुसाट, बहुरंगी कांडे करायची पिसाट!
□ महाराष्ट्रात भाज्या महाग, कर्ज स्वस्त.
■ मग बेस्ट झालं की… कर्ज काढून भाज्या खरेदी करा… सिंपल!
□ सामाजिक न्याय विभागाच्या ६ हजार ७६५ कोटींवर महायुतीकडून वर्षभरात डल्ला.
■ हे कधीही सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देणार नाहीत, म्हणून तर यांच्या मतदारांनी यांना निवडून दिलं आहे… मग वाया जाणारे पैसे त्यांनी सार्थकी लावले तर बिघडलं कुठे?
□ भाजप नेते अरुण जेटली यांना सांगूनच मी देश सोडला – विजय मल्ल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट.
■ कोणत्या निधीमध्ये किती देणगी दिली तेही विजयभाईंनी लगेहाथ सांगून टाकलं असतं तर बरं झालं असतं… देश बुडवून पळणार्यांच्या लायनीत बरेच जण आहेत हो… एकदा ड्यू प्रोसीजर समजली असती तर बरं झालं असतं!
□ जनतेच्या पैशाने उभारलेल्या समृद्धीवर लालपरीला बंदी.
■ मुळात सत्ताधार्यांना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आपण काय लायकीच्या एसटी बस चालवतो याची लाज वाटली पाहिजे. इतर राज्यांच्या बसगाड्या येतात तेव्हा आपल्या बस शरमेनेच लाल होत असतील.
□ युद्धबंदीबद्दल डोनाल्ड ट्रम्प अकरा वेळा बोलले तरी नरेंद्र मोदी गप्प का? – राहुल गांधी यांचा थेटच सवाल.
■ त्यांचं तोंड फक्त पाकिस्तानच्या दिशेनेच उघडतं आणि देशात आपल्याच लोकांना मंगळसूत्र चोर ठरवून, हे म्हशी पळवून नेतील वगैरे भीती दाखवून मुसलमानांचा बागुलबुवा उभा करतानाच त्यांच्या रसवंतीला बहार येते. बाकी नेहरूंवर अधून मधून घसरण्याची मजा वेगळीच.