• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

या नव नवल नयनोत्सवा!

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 12, 2025
in मनोरंजन
0

जागतिक नाटकांच्या इतिहासात मराठी संगीत नाटकांना मानाचे पान आहे. संपन्न, समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण असा वारसा त्याला लाभलाय. याची नोंद घेतल्याखेरीज नाट्येतिहास पूर्ण होणार नाही. केवळ रंगमंचावरील नाट्यप्रयोगच नाही तर पडद्यामागे अनेक हृदयस्पर्शी प्रसंगांची मालिकाच आहे, जी त्या काळातील, सामाजिक, राजकीय, आर्थिक घटनांना सोबत करतेय. एक विस्मृतीत जाणारा कालखंड जागा करते. त्यात डोकावणं म्हणजे जणू एखाद्या महाकादंबरीचा दस्तावेजच अलगद प्रकाशात येतो. एक सुवर्णपर्व कवेत घेण्याची ताकद या नाट्यप्रवाहात आहे…
नाटक ‘संगीत मानापमान’. नाटककार कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर यांच्या समर्थ लेखणीतून आकाराला आलेलं नाट्यपुष्प. त्यांच्या पंधराएक नाटकांमध्ये रसिकप्रिय ठरलेलं हे नाट्य. याचा पहिला प्रयोग १२ मार्च १९११ रोजी किर्लोस्कर संगीत मंडळीने मुंबईत सादर केला. त्याचे दिग्दर्शक होते गोविंदराव सदाशिव टेंबे. पंचाक्षरी नाटके त्याकाळी यशस्वी ठरविली जात. अर्थात ‘बालगंधर्व’ हेही पंचाक्षरी विशेषणच. सारा योगायोग. नाटककार म्हणून काकासाहेबांची तीन नाटके एकापाठोपाठ आलेली. आणि त्यातील बालगंधर्वांची भूमिका तुफान गाजलेली. आधी ‘मानापमान’. नंतर १९१३ साली ‘विद्याहरण’ आणि १९१६ सालचे ‘स्वयंवर’! सर्वांगसुंदर अलौकिक साज चढविलेली ही एकापेक्षा एक अशी संगीत नाटके. त्यातील ‘मानापमाना’तल्या बालगंधर्वांच्या भामिनीच्या भूमिकेतून ‘गंधर्व जमाना’ सुरू झाला. नाटकात एकूण ५४ पदे त्यातील चक्क २१ बालगंधर्वांच्या तोंडी आली. गाजलेली पदे अन् गोड गळ्याचा गंधर्वस्वर!
याच काळात दुसरीकडे संगीतसूर्य केशवराव भोसले यांचाही नाट्यसृष्टीत दबदबा होता. स्वरांच्या लहरींशी खेळ खेळणारा केशवराव यांचा मर्दानी स्वर रसिकांना थक्क करून सोडायचा. विलक्षण छटा असणारे बालगंधर्व आणि केशवराव हे रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारे महानायकच. दोघेही दोन टोकांचे. एकमेकांचे स्पर्धक समजले जायचे. दोघांचे जणू ‘फॅन क्लब’ तयार झालेले. संगीत नाटकातील हे दोघे चंद्र-सूर्य एकाच नाटकात, एकाच वेळी एकत्र आले. अशक्य शक्य झाले.
महात्मा गांधींंच्या टिळक स्वराज्य फंडसाठी रक्कम जमा करण्याचा संकल्प झाला आणि ‘संयुक्त मानापमान’ची जुळवाजुळवी सुरू झाली. नाटकात नाटक. त्यामागे घटना आहेत. दोघा महान व्यक्तिरेखांची महानता सिद्ध होते. दोघांमध्ये तशी कुठलीही चुरस नव्हती की तुलनाही नव्हती. फक्त रसिकांचे रंजन आणि स्वराज्यासाठी सहाय्य, हाच प्रामाणिक हेतू त्यामागे होता. ८ जुलै १९२१ला संयुक्त ‘मानापमान’चा शुभारंभी प्रयोग झाला. त्यात बालगंधर्व अर्थातच भामिनी आणि केशवराव हे धैर्यधराच्या भूमिकेत होते. या घटनेला आज १०४ वर्ष उलटली तरी हे नाटक विसरता येत नाही. येणारही नाही. नाटककार अभिराम भडकमकर याने नेमकी हीच गोष्ट दोन अंकी नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पडद्यामागल्या घटना म्हणजेच हे नाटक. त्याला पदांची सुरेल कलाकुसरही आहे.
पडदा उघडतो आणि संगीत नाटकातील पारंपारिक नटी-सूत्रधाराच्या प्रसंगाचे नाट्य सुरू होतं. एकेका स्थळ प्रसंगातून कथानक पुढे सरकते. नाटकवाल्यांचे बिर्‍हाड. तिथले दोघा दिग्गजांचे समर्थक व विरोधक यांचे वादविवाद, बालगंधर्वांचे बिर्‍हाड. तिथे गांधीजींच्या टिळक स्वराज्य फंडासाठी धन गोळा करण्याचा प्रस्ताव. पुढे संयुक्त मानापमानाच्या प्रयोगांचा प्रस्ताव, तर दुसरीकडे केशवरावांचे बिर्‍हाड. तिथे झालेली बालगंधर्व-केशवराव यांची भेट. एकाच भेटीत प्रयोगांचा निर्णय. आणि एकाच नाटकात दोघे रंगभूमीवर येण्याचा मणिकांचन योग! पण या संयुक्त नाट्यप्रयोगाला अनेक अडथळ्यांच्या वाटेवरून जावं लागलं. त्यात नाटककार खाडिलकर यांची प्रयोगाला अनुमती देण्यास नकारघंटा. अखेर केशवरावांच्या कंपनीतर्पेâ नाटक सादर करण्याचा प्रस्ताव. एकेका छोट्या प्रसंगातून तो काळ उलगडत जातो.
एक बोलका प्रसंग म्हणजे रंगमंदिरातल्या रंगपिटात प्रयोगाची तयारी सुरू आहे. बालगंधर्वांना केशवराव दूध पाठवितात, तर बालगंधर्व पान पाठवितात. सहकारी काही संशय घेतात, पण तो खोटा ठरतो. बालगंधर्व म्हणजे शांत, शीतल, जलधारा तर केशवराव म्हणजे सागरातील वडवानल, पाण्यासारखे निर्मळ, अशी प्रतिक्रिया उमटते. आणि ‘चंद्रिका ही जणू’, ‘दे हाता शरणागता’, ‘मला मदन भासे हा’, ‘शूरा मी वंदिले’, ‘माता दिसली, भाली चंद्र असे हा’, ‘युवती मना’ या पदांची मैफल रंगते. वन्समोअर, टाळ्या, साद प्रतिसाद यांनी नाटक रसिकांच्या पसंतीला उतरते. काही प्रयोगानंतर केशवराव गेले. अजून काही संयुक्त प्रयोगांची आशा होती पण ती विरली. त्यावर बालगंधर्व म्हणतात, ‘गानहिर्‍याचे तेज रंगभूमीला सोसलं नाही आणि संगीतसूर्य अस्ताला गेला.’ शेवट सूत्रधार भरतवाक्याने समारोप करतो. त्यात ‘कलेत ना चुरस ना तुलना, तर कलेत असते ती फक्त साधना. मायबाप रसिकांना आनंद द्यायचा आपणही घ्यायचा.’
हे दोन अंकी संगीतमय नाट्य अभिराम भडकमकर या कल्पक नाटककाराने नेमकेपणानं बांधलं आहे. त्यामागे त्याचा अभ्यास, संशोधन नजरेत येते. त्यांची ‘असा बालगंधर्व’ ही चरित्र कादंबरी गाजलेली. तोच कालखंड त्यांनी रंग्ामंचावरही उभा करण्याचा प्रयत्न केलाय. दुसर्‍या अंकात मात्र नाटक हरवल्यासारखं वाटत राहातं. काही किस्से, प्रसंग, घटना याची गरज होती. पदांमुळे नाट्य दिसत नाही. पण तरीही संहिता बंदिस्त करण्याचा प्रयत्न दाद देण्याजोगा. दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. कुणीही अनुभवी कलाकार नसतानाही त्याची कमतरता जाणवत नाही. तांत्रिक बाजूंनीही नाट्य परिपूर्ण आहे. राजेश पवार यांची रंगभूषा, मयुरा रानडे यांची वेशभूषा कलाकारांना शोभून दिसते. कौशल इनामदार यांचे संगीत सुरेलच. ते कुठेही खटकत नाही. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य तत्कालीन नाटकांची आठवण करून देणारे आहे. रंगविलेले पडदे सर्वांगसुंदरच. ज्योती सातपुते यांची केशभूषाही नोंद घेण्याजोगी. सर्व तांत्रिक बाजूंनी पकड घेणारे नाट्य. अशा नाटकांमध्ये वातावरणनिर्मितीचे आव्हान असते ते या ‘टीम’ने पेलले आहे.
डझनभर कलाकारांचा सहभाग यात आहे. एकेक अभिनेता अनेक भूमिका करतो. सारेजण व्यावसायिक नाटकात पहिल्यांदाच दिसले आहेत. मात्र संगीत आणि गायनाची चांगली समज त्यांना आहे. बालगंधर्व आणि केशवराव यांच्या दोन जोड्या असल्याचे वेगळेपण नजरेत भरते. जोडी क्र. एक ही प्रसंगांसाठी तर जोडी क्र. दोन ही गाण्यासाठी आहे. पहिल्या जोडीत बालगंधर्वांच्या भूमिकेत आशीष नेवाळकर आणि केशवराव बनलेत हृषिकेश बांबुरकर.दोघांची देहबोली शोभून दिसते. निवड अचूक. नाटकातल्या नाटकात भामिनी – अजिंक्य पोंक्षे आणि धैर्यधर – ओमकार प्रभूघाटे आहेत. दोघांना गोड गळा तसेच अभिनयाचे उत्तम अंग आहे. दोघेही वन्समोअरची हक्काची दाद वसूल करतात. दुसरा अंक पदांमध्ये भरगच्च भरलेला. ‘संपदा चपल चरण’, ‘मूर्तिमंत भीती उभी’, ‘धनराशी जाता’, ‘नाही मी बोलत नाथा’ ही पदे अजिंक्य पोंक्षे यांनी ताकदीने पेश केली. ‘चंद्रिका ही जणू’, ‘युवती मना’, ‘शूरा मी वंदिले’, ‘रवी मी चंद्र कसा’, ‘प्रेम सेवा शरण’ ही पदे ओमकार प्रभूघाटे यांनी धैर्यधराच्या भूमिकेतून चांगली सादर केलीय. नटी-सूत्रधाराच्या पारंपारिक प्रसंगात अश्विनी जोशी, अजिंक्य पोंक्षे यांचे प्रसन्न दर्शन होते. अन्य भूमिकेत प्रद्युम्न गायकवाड (काकासाहेब खाडिलकर), श्रीराम लोखंडे (बखलेबुवा), परमेश्वर गुहे (कुंटे), श्यामराज पाटील (बोडस) यांची साथसोबत आहे.
नाटककार अभिराम भडकमकर यांच्या ‘बालगंधर्व’ कादंबरीत या इतिहासातील अनेक पाने उभी करण्याचा सुरेख प्रयत्न झालाय. कादंबरी ते नाटक असा रंगप्रवासही वाचक आणि रसिक प्रेक्षक यांना अनुभविण्यास मिळतो. केशवरावांचे मर्दानी सौंदर्य, पाणीदार डोळे, आत्मविश्वास तर गंधर्वांच्या डोळ्यातील निष्पाप लहान मुलासारखा निर्मळपणा, गुळाच्या सायीसारखा त्वचेचा नितळपणा आणि आवाजातील गोडवा या दोन्ही नायकांचे जागोजागी असलेले वर्णन हे भाषेतील सौंदर्याची साक्षच ठरते. कादंबरीतली काही पाने जणू बोलू लागतात.
याच वर्षात ‘संगीत मानापमान’ चित्रपटही प्रदर्शित झाला. सुबोध भावे याचे दिग्दर्शन आणि भूमिका त्यात होती. सुबोध धैर्यधर तर वैदेही परशुराम भामिनीच्या भूमिकेत. नाटकावरून चित्रपट असाही प्रवास झालाय. बालगंधर्व कादंबरीतल्या एका उपकथानकावरून नाटक आणि मूळ नाटकावरून चित्रपट, अशी ही रंगबदल भटकंती!! जी पुन्हा पुन्हा संगीत नाटकाच्या जमान्यातील श्रेष्ठत्व व वैभव अन् रसिक मनावर आजही असलेली निर्विवाद जादुगिरीच दाखविते. अशा नाटकाचे प्रयोग शासनाने, नाट्यप्रेमी संस्थेने दत्तक घ्यावेत जेणेकरून नाट्य चालत राहील, ही अपेक्षा. आता भविष्यात यावर एखादा चित्रपट निघाला तर नवल वाटणार नाही. शंभर वर्षाच्या आख्यायिकेला निश्चितच त्यातून सत्यरुप मिळू शकेल. आणखीन एक नजरेत भरणारी बाब म्हणजे नाटकाच्या जाहिराती, छायाचित्रे यातही कल्पकता पूरेपूर भरलेली. जाहिरातीची जर स्पर्धा झाली तर त्यात बाजी मारली जाईल. मुंबई-पुण्यापुरते याचे प्रयोग झालेले नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्रातही प्रयोग झाले आहेत.
केशवरावांच्या गळ्यातील तान ही लखलखत्या ज्वालेसारखी तर बालगंधर्वांच्या भामिनीचा स्वर हा मोत्याच्या लड्या उलगडत जाव्यात तसा… मानापमाननं मान-अपमान, श्रेष्ठ-कनिष्ठ, वाद-विवाद हे सारं विसरायला शिकवलं. एका नाटकाभोवतीच्या माणसांचे अस्तित्व अन् भूतकाळातील आठवणींचे सूर-स्वर याचे ऋण मराठी रसिकांवर आहेत. पिढ्यानपिढ्या बदलल्या तरीही अशा नाटकांमुळे ते विस्मृतीत जाणार नाहीत, हेच खरे! ‘या नव नवल नयनोत्सवा’ असेच वर्णन या प्रयोगाचे करावे लागेल.

गोष्ट संयुक्त मानापमानाची!

लेखन : अभिराम भडकमकर
दिग्दर्शन : हृषिकेश जोशी
नेपथ्य / प्रकाश : प्रदीप मुळ्ये
संगीत : कौशल इनामदार
वेशभूषा : मयुरा रानडे
रंगभूषा : राजेश पवार
सूत्रधार : नितीन नाईक
निर्माते : श्यामराव पाटील, अनंत पणशीकर
निर्मिती : नाट्यसंपदा कलामंच

[email protected]

Previous Post

शापित गंधर्व : गुरुदत्त!

Next Post

प्रिबायोटिक आणि प्रोबायोटिक

Next Post

प्रिबायोटिक आणि प्रोबायोटिक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.