‘आयपीएल’ जेतेपद हुकल्यामुळे पंजाब किंग्जचा कप्तान श्रेयस अय्यरचं स्वप्न भंगलं. पण, त्याआधी इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात आणि भारत ‘अ’ संघातही तो स्थान मिळवू शकला नाही. ‘बीसीसीआय’च्या काळ्या यादीतून सकारात्मक प्रयत्न करीत भारतीय क्रिकेटमध्ये परतलेला हा नेतृत्वक्षम फलंदाज दुर्लक्षित का राहतोय? सातत्यानं धावा करूनही श्रेयसचं काय चुकतंय?
– – –
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुची विराट कोहलीच्या चाहत्यांना हवीहवीशी स्वप्नपूर्ती क्रिकेटजगतानं अनुभवली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रक्षेपण वाहिन्यांनी या निमित्तानं आपले गल्लेही भरले. विजयाचा उन्माद आणि त्यानंतर विजयफेरीला लागलेलं गालबोट याचं कवित्व इतक्यात ओसरणार नाही. ही झाली एक बाजू; पण इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्याला एक दुसरी बाजूसुद्धा होती. ती होती श्रेयस अय्यरची. आपल्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला जेतेपदाचं स्वप्न दाखवणार्या एका मुंबईच्या वीराची बाजू. दुर्दैवानं श्रेयसच्या पंजाबचा स्वप्नभंग झाला. पण समाजमाध्यमांवरील पडिकांना हळहळ वाटली, ती पन्नाशीची खळीदार संघ मालकीण प्रीती झिंटा हिच्या पदरी पडलेल्या अपयशाची.
‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात श्रेयस दोन चेंडूंचा सामना करीत फक्त एक धाव काढून माघारी परतला. हेच पंजाबच्या अपयशाचं कारण ठरलं. ‘‘श्रेयसची अंतिम सामन्यातील ही चूक म्हणजे फौजदारी गुन्हा आहे,’’ असे ताशेरे भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी ओढले. क्रिकेटमध्ये प्रत्येक फटका मनाप्रमाणे चौकार-षटकार जाऊ शकत नाही, एखाद्या चेंडूवर विकेटसुद्धा ठरलेली असते. ‘हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून,
कोणाचं जीवन उधळी… दे कुणास यश उजळून…’ हे शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं गाणं क्रिकेटमध्ये अजरामर झालंय. त्यामुळे पंजाबच्या पराभवाला एकट्या श्रेयसला जबाबदार धरणं चुकीचं ठरेल. सलग दुसर्या वर्षी हा पठ्ठ्या आपल्या नेतृत्वाखाली संघाचा वारू अंतिम फेरीपर्यंत नेतोय, त्याचं काय? गतवर्षी त्यानं कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून दिलं. पण श्रेय नेलं गौतम गंभीरनं. त्या विजयामुळे गंभीरचा भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा मार्ग मोकळा झाला. पण श्रेयसला कोलकातानं संघात स्थान दिलंच नाही.
श्रेयसचं काय चुकलं? हा विषय तेव्हाही ऐरणीवर होता. तसाच काही दिवसांपूर्वी इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या भारतीय संघनिवडीच्या वेळीसुद्धा महत्त्वाचा होता. ज्याच्याकडे भारतीय संघाचा कर्णधार होण्याची क्षमता आहे. अशा श्रेयसला भारतीय संघात स्थान नव्हतं. यासंदर्भात माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही टीकेची झोड उठवली. कारण हेच वास्तव होतं. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखी नेतृत्वक्षम मंडळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असताना प्रशिक्षक आणि निवड समितीला नवोदित शुभमन गिलमध्ये भावी कर्णधार दिसला; पण श्रेयसचे फलंदाजीचे आणि नेतृत्वाचे गुण दुर्लक्षित राहिले. श्रेयसची तर इंग्लंड दौर्यावर महिनाभर आधीच गेलेल्या भारत ‘अ’ संघातही वर्णी लागली नाही. म्हणजेच त्यांना तो त्या योग्यतेचाही वाटला नाही, हे आश्चर्यकारक आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गंभीर यांनी श्रेयसच्या निवडीविषयीच्या प्रश्नावर सारवासारवीची उत्तरं दिली.
या सर्व प्रतिकूल परिस्थितीत श्रेयसला ‘बीसीसीआय’नं वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंच्या ‘ब’ श्रेणीमध्ये स्थान दिलं, हीच एक अनुकूल घटना त्याच्याबाबत घडली. कारण मागील वर्षीच्या करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीतून त्याचं नावच वगळण्यात आलं होतं. देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी अनुपलब्ध राहिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आल्यानं तो ‘बीसीसीआय’च्या काळ्या यादीत समाविष्ट होता. पाठीच्या दुखापतीचं कारण देत श्रेयस बडोद्याविरुद्धचा रणजी उपांत्यपूर्व सामना खेळू शकला नव्हता. परंतु श्रेयसच्या दुखापतीची आपल्याला माहितीच नसल्याचं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं स्पष्ट केल्यानं हे प्रकरण चिघळलं. पुढे तमिळनाडूविरुद्धचा उपांत्य आणि विदर्भाविरुद्धचा अंतिम सामना तो खेळला होता. याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबईनं रणजी जेतेपदाला गवसणी घातली होती. श्रेयसनं तीन सामन्यांत ३८.२५च्या सरासरीनं एकूण १५३ धावा काढल्या होत्या. तसंच अंतिम सामन्याच्या दुसर्या डावात त्यानं ९५ धावांची दमदार खेळी साकारली होती. ‘बीसीसीआय’ची कारवाई श्रेयसच्या जिव्हारी लागली. त्यातून सावरत आणखी जोमानं त्यानं कामगिरी केली आणि ‘बीसीसीआय’चे दरवाजे ठोठावले. मग श्रेयसनं कोलकाताला २०२४चं ‘आयपीएल’ जेतेपद मिळवून दिलं. या यशात श्रेयसचं फलंदाजीतलं योगदान होतं ३५१ धावांचं. या वर्षी इराणी करंडकही मुंबईनं पटकावला. यातही पहिल्या डावात त्यानं अर्धशतक नोंदवलं. त्यानंतर डिसेंबर २०२४मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली मुंबईनं सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेवर नाव कोरलं. श्रेयसनं नऊ सामन्यांत ४९.२८च्या सरासरीनं एकूण ३४५ धावा काढल्या. २०२४-२५च्या रणजी स्पर्धेत मुंबईचा संघ उपांत्य सामन्यात विदर्भाकडून पराभूत झाला. पण श्रेयसच्या खात्यावर पाच सामन्यांत दोन शतकांसह ६८.५७च्या सरासरीनं एकूण ४८० धावा जमा होत्या. यात ओडिशाविरुद्धच्या द्विशतकाचाही (२३३ धावा) समावेश होता. वर्षाच्या पूर्वार्धात विजय हजारे करंडक स्पर्धेत श्रेयसनं पाच सामन्यांत दोन शतकांसह ३२५ धावा काढल्या. मग रोहित-विराटनं भारताला प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवून दिलं. या स्पर्धेतही श्रेयसच्या तळपत्या बॅटनं ४८.६०च्या सरासरीनं एकूण २४३ धावा काढल्या.
कोलकात्याला ‘आयपीएल’ जेतेपद मिळवून दिल्यानंतरही कर्णधार श्रेयसलाच संघाबाहेर ठेवण्यात आलं. कशासाठी? याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु पंजाब किंग्जनं लिलावात २६.७५ कोटी ही दुसर्या क्रमांकाची सर्वोच्च बोली लावत त्याला संघात स्थान दिलं. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये श्रेयसनं १७ सामन्यांत सहा अर्धशतकांसह एकूण ६०४ धावा केल्या. यावेळी श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ ११ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला. एकंदर सर्वच स्पर्धांमध्ये धावांचं सातत्य राखूनही त्याला कुठेच न्याय मिळाला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलंय. परंतु अशा प्रकारची निर्विवाद कामगिरी अन्य दोन क्रिकेट प्रकारांत त्याच्याकडून झालेली नाही. गेली दीड वर्ष त्यानं भारताचं ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेलं नाही. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही त्याला स्थैर्य प्राप्त झालेलं नाही. १४ कसोटी सामन्यांत ३६.८६च्या सरासरीनं ८११ धावा, ही त्याची कामगिरी. २५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी गावस्करांच्या हस्ते श्रेयसला कसोटीची कॅप प्रदान करण्यात आली. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणीय कसोटीत त्यानं पहिल्या डावात शतक आणि दुसर्या डावात अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. असा पराक्रम गाजवणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. मग श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर जानेवारी २०२३मध्ये श्रेयसनं पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. यानंतर बोर्डर-गावस्कर करंडक मालिकेसाठी तो भारतीय संघात परतला. दिल्ली आणि इंदूर कसोटी सामन्यांत तो अपयशी ठरला, तर अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत फलंदाजीला उतरूच शकला नाही. पाठीची दुखापत त्याच्या कारकीर्दीत पुन्हा अडथळा बनली. परिणामी त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. एप्रिलमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यानं इंग्लंड गाठलं. केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही तो खेळू शकला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याची पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. २०२३-२४च्या दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी श्रेयसनं पुनरागमन केलं. पण दोन कसोटी सामन्यांत फक्त ४१ धावा केल्या. २०२४च्या पूर्वार्धात इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर आला होता. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत श्रेयसनं १०४ धावा काढल्या. परंतु पुन्हा पाठीच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित मालिकेत खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या वेगवान खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांचा कस लागतो. नेमक्या याच देशांमधील तीन कसोटी सामन्यांत त्याला एकूण फक्त ७५ धावाच करता आल्या. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यात तो अपयशी ठरतो, हा शिक्का त्याच्यावर बसला. फलंदाजीच्या तंत्रात बदल करून त्यानं धावांच सातत्यही राखलं. पण मुंबईकर निवड समिती अध्यक्ष आगरकरला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो योग्य वाटला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन आणि अर्शदीप सिंग यांना पदार्पणाची संधी मिळू शकते, त्रिशतकानंतर भारतीय क्रिकेटचा उंबरठा झिजवणार्या करुण नायरलाही भारतीय संघात स्थान मिळालंय. या भारतीय संघनिवडीच्या सकारात्मक बाबी. पण, मग श्रेयसचं काय चुकलं? पाठीची दुखापत, फलंदाजीचं तंत्र आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव ही त्याची कसोटी क्रिकेटमधील स्थान गमावण्याची प्रमुख कारणं ठरली. येत्या आठवड्याभरात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होईल. हा दौरा दीर्घकालीन आहे. त्यासाठी पर्यायी फलंदाजसुद्धा इंग्लंडमध्ये डेरेदाखल आहेत. पण श्रेयस आपल्या कामगिरीनिशी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याच्या प्रयत्नांना कधी तरी यश मिळो !