• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोमीताईचा सल्ला

- प्रसाद ताम्हनकर

Nitin Phanse by Nitin Phanse
June 12, 2025
in भाष्य
0

सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –

भस्मासुराला वेळेत आवरा…

प्रश्न : ताई, सोशल मीडियाचे भविष्य काय आहे असे तुला वाटते?
उत्तर : शहाण्या माणसांनी यावर लवकरात लवकर आपले नियंत्रण स्थापन केले नाही, तर सोशल मीडियाचे भविष्य म्हणजे फक्त आणि फक्त अराजकता असेल. जंगलात जशा तरसांच्या आणि वाळवंटात गिधाडांच्या टोळ्या टपलेल्या असतात, तसे टपलेले अनेक लोक या चांगल्या उद्देशाने बनवलेल्या व्यासपीठाची वाट लावतील. एकेकाळी सोशल मीडिया हे लोकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे, ज्ञान मिळवण्याचे, विरंगुळ्याचे आणि दूरच्या मित्रांशी जोडले जाण्याचे साधन होते. या छोट्याशा सोशल मीडियाने संपूर्ण जगाला एका गावात बदलून टाकले. हजारो किलोमीटर दूरच्या मित्रांना, नातेवाईकांना एका क्षणात मेसेज करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, प्रत्यक्ष बघणे शक्य होऊ लागले. सोशल मीडियाने जगाला कवेत घेतले. आधी हजारो, मग लाखो आणि नंतर करोडो लोकांना याची भुरळ पडली आणि बघता बघता सोशल मीडिया हेच लोकांचे जग बनायला लागले.
लोकांची ही गर्दी, त्यांचे तासनतास इथे वेळ घालवणे हे चतुर व्यापार्‍यांच्या लक्षात आले आणि सोशल मीडियावर जाहिरातींचे आणि जाहिरातदारांचे जाळे पसरायला लागले. फुकट वापरायला मिळतंय ना? बनवणार्‍याला पण चार पैसे मिळायला हवेत अशा गोंडस विचारांखाली जाहिरातींचा मारा चालू झाला. वेगवेगळ्या गेम्स, ट्रेंडस, करमणूक अशा सदराखाली तुमची वैयक्तिक माहिती गोळा होऊ लागली, तुम्ही कुठल्या पेजवर जास्त वेळ घालवता, कुठे कुठे क्लिक करता याची माहिती गोळा केली जाऊ लागली. ही माहिती मग जाहिरातदारांना विकली जाऊ लागली आणि तुमच्या वर्तनाचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जाऊ लागल्या. हुशार लोकांनी हे ओळखले आणि ओरडा केला, पण तो सगळा व्यर्थ ठरला. हे कमी की काय म्हणून लोकांच्या स्वत:च्या आयुष्याचे प्रदर्शन मांडण्याच्या मूर्ख वृत्तीचा फायदा घेण्यासाठी सायबर चोरट्यांनी सोशल मीडियावर हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यांच्या लुबाडणुकीचा फटका आज लाखो करोडो लोकांना बसलेला आहे. रोज पेपरमध्ये, न्यूज चॅनलवर सायबर फसवणुकीच्या बातम्या येत असतात, वाचल्या जात असतात, पण लोकांच्या सवयी काही बदलत नाहीत.
हे सगळे कमी की काय, म्हणून राजकारण्यांना सोशल मीडियाचे महत्त्व अचूक लक्षात आले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना भुरळ घालायला सुरुवात केली. भ्रष्टाचाराने माखलेले नेते गोरगरीबांचे कैवारी म्हणून नावाजले जायला लागले. रक्ताने हात माखलेले देशभक्त म्हणवले जाऊ लागले. तरुणांच्या हाताला काम देण्यापेक्षा त्यांच्या हातात कीबोर्ड देऊन त्यांच्या झुंजी लावणे सोपे आहे, हे राजकारण्यांच्या ध्यानात आले आणि सगळे चित्र बदलून गेले. एकमेकांना ’कसा आहेस?’ असे विचारत दिवसाची सुरुवात करणारे आता ’तुझ्या नेत्याचा पराक्रम बघितला का?’ असे विचारायला लागले. ख्याली खुशालीची जागा ’तू जास्त देशभक्त का मी जास्त देशभक्त’ या स्पर्धेत बदलली, मित्र कार्यकर्त्यांमधे बदलले आणि सोशल मीडियाचे रणांगण बनले. प्रश्न विचारणारे देशद्रोही बनले आणि समजुतीच्या गोष्टी सांगणारे नेभळट म्हणून हिणवले जाऊ लागले. उघड्या डोळ्यांवर अंधभक्तीच्या पट्ट्या आल्या आणि मेंदूवर न झालेल्या विकासाचा थर पसरला. शहाण्या लोकांनी सोशल मीडियापासून दुरावा स्वीकारला आणि उन्मादाचा पारा वाढायला लागला. स्वार्थी लोकांनी उभा केलेला हा भस्मासुर आता त्यांच्याच डोक्यावर हात ठेवेपर्यंत शांतपणे पाहात राहणे हेच तेवढे आपल्या हातात आहे.
– हताश सोमी

या माझ्या कौतुकमूर्ती!

प्रश्न : सोमी, तुझी एकूण उत्तरे वाचता, तुझी मते बघता तुला कोणाचेच कौतुक वाटत नाही असे जाणवते. हे असे का?
उत्तर : लाडक्या भावड्या, हे असे वाक्य अनेकदा माझ्या सख्या सोबत्यांनी मला ऐकवून झाले आहे. शेवटी मी आता मला कोणाकोणाचे कौतुक आहे त्याची एक यादीच बनवायला घेतली आहे.
१) वल्हीसारखे दोन्ही पाय गाडीच्या बाजूला लोंबकाळत दुचाकी चालवणार्‍या बायकांचे, रस्त्यातच एकदम गाडी लावत आजुबाजूला अशी कावळ्यासारखी मान वळवत पत्ता शोधणार्‍या पुरुषांचे, विन डीझेल आपला शिष्य असल्याच्या थाटात वेगाने गाड्या हाकणार्‍या तरुणाईचे.
२) पानी-पानी-पानी, आयपीएलची तुतारी, टिक टिक वाजते डोक्यात, कमाल झाली स्वप्नात आली असले रिंगटोन ठेवणार्‍यांचे.
३) स्वत:च्या पोस्टला लाईक करणार्‍यांचे, अत्यंत टुकार भिकार फोटो काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात ते फेसबुकवर टाकणार्‍यांचे आणि त्या फोटोवर त्याला साजेशीच स्वत:ची भिकार चारोळी प्रतिसाद म्हणून देणार्‍यांचे.
४) खिडकीतल्या फुटक्या कुंडीतल्या छाडमाड फुलाचे ते सुवर्णकमळ असल्यागत कौतुक करणार्‍यांचे, गाढवापासून कावळ्यांपर्यंतचे फोटो भीषण भीषण कॅप्शन्ससह टाकणार्‍यांचे, रोमिओ ज्युलिएटनंतर किंवा कदाचित त्याआधीचे आपणच अशा थाटात हनिमूनचे फोटो टाकणार्‍यांचे.
५) कागदाचे कपडे घालणार्‍या, मी पूर्ण शाकाहारी आहे फक्त अंडे खाते असे ज्ञान पाजळणार्‍या पाताळसुंदरींच्या पेजला लाईक करणार्‍यांचे, साईबाबा-हनुमानाचे ‘ओरोजनल’ फोटो शेअर करणार्‍यांचे.
६) ‘श्री-जान्हवीच्या लग्नाला यायचे हां!’ किंवा ‘रोडीज न्यू सिझन ऑसम’ सारखे स्टेटस टाकणार्‍यांचे.
७) मराठी चित्रपट आज कोटीच्या घरात यश खेचून आणतोय ह्याचे कौतुक करून, शेवटी ‘चित्रपट फुकट डाऊनलोड कुठे करायला मिळेल?’ विचारणार्‍यांचे.
८) सल्लागाराच्या वेषात अ‍ॅडमिन म्हणून वावरणार्‍यांचे आणि आंतरजालावरील जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच उसासे टाकत बसणार्‍यांचे.
९) सावरकर जयंतीला गांधींचे गोडवे गाणार्‍यांचे आणि ड्रायडेला त्याच गांधींच्या नावाने बोंबा मारणार्‍यांचे.
१०) ‘तुम्ही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहेत, पण तुम्ही मला ओळखता का नक्की?’ ह्या प्रश्नाला ‘तुमच्याकडच्या मित्र यादीत माझे पण तीन मित्र आहेत’ असे उत्तर देणार्‍यांचे.
११) ग्रुपमध्ये बसून अपेय ढोसून, गिळ गिळ गिळून मग बिल आल्यावरती करंगळी वर करून जाणार्‍यांचे किंवा सरळ बिलाखालची बडीशेप उचलून बाहेरचा रस्ता धरणार्‍यांचे.
१२) व्हॉट्सअप विद्यापीठात येणार्‍या प्रत्येक गोष्टीला इतिहास समजणार्‍यांचे आणि तो प्रसाद भक्तिभावाने इतरांना वाटणार्‍यांचे.
१३) जे१ झाले का, २झी माझी यारी अशा वाक्यांना साहित्याची नवनिर्मिती समजणार्‍यांचे.
१४) रात्री पाजळलेले ज्ञान सकाळी हळूच डिलिट करणार्‍यांचे.
१५) छुप्या ग्रुपमध्ये ‘आपण अमक्या तमक्या अन्यायावर जाहीर आवाज उठवला पाहिजे’ अशा ललकार्‍या देणार्‍यांचे.
१६) प्रत्येक पोष्टची सुरूवात ‘मी काही भक्त नाही पण मला असे वाटते की..’ असे करणार्‍यांचे.
१७) देशाची रास कोणती आहे आणि तिला सध्या कोणते ग्रह त्रासदायक आहेत हे कथन करणार्‍यांचे आणि त्यावर ’अगदी योग्य बोलत आहात. माझी देखील हीच रास आहे आणि सध्या खूप त्रास सहन करतो आहे’ अशी प्रतिक्रिया देणार्‍यांचे.
१८) चुलीवरचे जेवण आणि वाढते प्रदूषण यांचा तौलनिक अभ्यास करणार्‍यांचे.
१९) ‘आजकालची तरुण पोरं सतत मेसेज करून पिडत असतात मला’ अशी लाडिक तक्रार करणार्‍या ‘अजून यौवनात मी’ काकूंचे.
२०) प्रत्येक चौथ्या माणसाला सोशल मीडियावर ‘आता पोलिसात तक्रार दाखल करतो मग कळेल’ अशी धमकी देणार्‍यांचे.
यादी बरीच लांब आहे पण तूर्तास इतकेच. आणि हो, वेळात वेळ काढून माझे हे टुकार लेखन वाचणार्‍यांचे आणि मला प्रश्न विचारणार्‍यांचे पण मला कौतुक आहे बरे!
– कौतुकरत्न सोमी

ज्याने त्याने आपले काम करावे…

प्रश्न : सोशल मीडियावर होणार्‍या ट्रोलिंगला कंटाळून अनेक प्रसिद्ध व्यक्ती ते सोडून जात आहेत. हे जे काही चालले आहे ते योग्य आहे का?
उत्तर : कसे आहे ताई, प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक आपली बाजू, एक समोरच्याची बाजू आणि एक खरी बाजू. योग्य बाजू ओळखता येणे महत्त्वाचे. ज्या प्रसिद्ध व्यक्ती स्वत:ला सोशल मीडियापासून दूर करत आहेत त्या प्रत्येकाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींमुळे त्रासाला सामोरे जावे लागलेले आहे. एकेकाळी ज्येष्ठ लोक सल्ला देताना ’जिभेवर ताबा ठेवा’ असे सांगायचे. आता ’कीबोर्डवर ताबा ठेवा’ असे सांगायची वेळ आलेली आहे. आपले विचार मांडताना शब्दांची योग्य निवड जमायला हवी आणि भावनेवर ताबा ठेवता यायला हवा. चार लोकं वाचत आहेत म्हणून वाटेल ते बरळणे योग्य नाही. अनेकदा प्रसिद्ध व्यक्ती उघडपणे किंवा छुपे असे विचार मांडतात की जे एखाद्या राजकीय पक्षाच्या विचारसरणीला किंवा एखाद्या जहाल संघटनेच्या विचारांना पूरक असतात. तेव्हा मग तुम्ही कोण आहात याचे भान तुम्हाला करून देणे गरजेचे बनते. याउलट जेव्हा तुमच्या योग्य विचारावर देखील कोणी चुकीचे उत्तर दिले, तर त्याला तो कोण आहे आणि तुम्ही कोण आहात याचे भान करून देणे देखील तितकेच गरजेचे असते.
तुम्ही एखाद्याच्या खांद्यावर हात टाकला तर तो पण तुमच्या खांद्यावर हात टाकणार हे अगदी सरळ आहे. अशावेळी ‘माझ्या खांद्यावर हात टाकायची हिंमत कशी झाली?’ हा प्रश्न चुकीचा ठरतो. प्रसिद्ध व्यक्तींनी देखील स्वत:चा आब राखून घ्यायला हवा. सोशल मीडियावर तुमच्या आजूबाजूला फक्त चाहतेच असतात असे नाही. तुम्हाला त्रास देऊन मजा घेणारे, अमक्या तमक्या प्रसिद्ध व्यक्तीला कसे खडे बोल सुनावले याचे बिनडोक सुख उपभोगणारे, स्वत:चे अपयश, त्यातून निर्माण झालेला राग कोणावर तरी फेकायला आसुसलेले, पैशाच्या मोबदल्यात लेखण्या विकलेले असे अनेक प्रकारचे लोक आजुबाजूला असतात ह्याचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे. माझे प्रामाणिक मत विचारशील तर खेळाडूने खेळावे, कलाकारांनी अभिनय करावा, नेत्यांनी राजकारण करावे, अभ्यासकांनी अभ्यासोनी प्रगटावे, उद्योजकांनी उद्योग उभारावेत, तंत्रज्ञांनी नवे नवे तंत्रज्ञान निर्माण करावे अर्थात प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात आधी नीट लक्ष घालावे. पण झालंय असे की नेते अभिनय करायला लागले आहेत, खेळाडू राजकारण करायला लागले आहेत, कलाकार अभ्यासक व्हायला लागले आहेत आणि अभ्यासक खेळ खेळायला लागले आहेत. सगळ्याचा नुसता जांगडगुत्ता झालेला आहे.
– भंजाळलेली सोमी

Previous Post

पुलं गेले तेव्हा…

Next Post

शापित गंधर्व : गुरुदत्त!

Next Post
शापित गंधर्व : गुरुदत्त!

शापित गंधर्व : गुरुदत्त!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.